Pages

Thursday, January 20, 2022

पौष पौर्णिमा - गिरनारी

             पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अष्टमीपासून सुरु होणारं शाकंभरी देवीचं नवरात्र पौर्णिमाला समाप्त होतं. 
             पृथ्वी वर पडलेल्या प्रचंड दुष्काळापासून जनतेला वाचविण्यासाठी माता पार्वतीने अवतार धारण केला आणि आपल्या तनुवरल्या फळं,भाज्या वनौषधींचा उपयोग करुन जीवसृष्टी वाचवली आणि त्यामुळे तिला शाकंभरी देवी हे नांव मिळालं. 
             अशा वैशिष्ट्यपूर्ण पौष पौर्णिमेला आम्हाला पुन्हा एकदा गिरनार शिखर दर्शन आणि अखंड धुनी दर्शनाचा योग आला हे खूप भाग्याचंच.
             पौष पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं खरं पण नेमकं त्याचदरम्यान काही घरगुती कार्यक्रम आधीच ठरलेले होते. मग कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावून गिरनारला जायचं ठरवलं. जायच्या आधी दोन दिवस पित्तामुळे माझी तब्येत बिघडली. पण  शक्य तेवढा आराम करुन आणि औषध घेऊन गिरनारला जायचं नक्की केलं. 
             पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघून रात्री वेळेत भवनाथ तलेटीला आमच्या रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. खोलीवर जाऊन ताजंतवानं होऊन जेवण्यासाठीसाठी पुन्हा बाहेर पडलो. परंतु वाढत्या निर्बंधांमुळे सारी दुकानं आणि उपहारगृहही दहा वाजत आल्याने बंद होण्याच्या तयारीत होती. फारशी भूक नसल्याने गरमागरम ठेपले आणि त्याबरोबर झणझणीत मिरची लोणचं बांधून घेतलं आणि आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेऊन परत आलो. जेवण करुन गिरनार दर्शनाचं सुखस्वप्न पहातच निद्राधीन झालो.
             दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरुन पुन्हा पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ जाऊन रांगेत उभं राहिलो. भल्या पहाटेपासून उडन खटोलासाठी भाविक रांगेत उभे होते. ठरलेल्या वेळी उडन खटोलाच्या फेऱ्या सुरु झाल्या आणि थोड्या वेळातच आम्ही अंबाजी टुकवर पोहोचलो. नुकताच सूर्योदय झाला होता. एका बाजूला सोनकेशरी रंग पसरला होता तर दुसऱी बाजू अजून धुक्याची दुलई लपेटून बसली होती. अतिशय सुंदर नजारा होता. आकाश सोनकेशरी रंगात रंगलेलं, खाली धुक्याची दुलई आणि अंबाजी टुकवर जमलेले, भक्तीरसाने  रसरसलेले सारे भाविक, सारंच अप्रतिम. गिरनारचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्यानं नटलेला आणि भक्तीरसात चिंब भिजलेलाच असतो.  गिरनारहून परत यावसंच वाटत नाही इतका तिथला परिसर भारलेला आहे. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या तपोबलाने पावन झालेल्या त्या भूमीवरुन दर्शन घेऊन परत फिरावसंच वाटत नाही.
             अंबामातेच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोरक्षनाथ टुकवर पोहोचून दर्शन घेतलं आणि मंदिरासमोरील पापपुण्याच्या छोट्याशा बोगद्यातून (खिडकी) रांगत बाहेर येऊन पुन्हा पुढे गुरुशिखराकडे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. पुढच्या काही क्षणातच मी श्री दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि जाणवली ती अपार तृप्ती. स्वयं श्री दत्तात्रेय सतत आपल्याबरोबर आहेत ही जाणीवच फार विलक्षण आहे. मी घरुन करुन नेलेला नैवेद्य दत्तगुरुंना अर्पण करुन, तीर्थ आणि अष्टगंध लेऊन अखंड धूनीच्या दर्शनाला गेलो.
             अखंड धुनी ही दर सोमवारी सकाळी दोन तासांसाठी प्रज्वलित होते. दर सोमवारी तिथले साधूसंत पिंपळवृक्षाची काष्ठं धूनीच्या स्थानी रचतात आणि काही क्षणातच धुनी प्रज्वलित होते. पुढचे साधारण दोन तास धुनी तशीच प्रज्वलित असते.  यावेळी पौर्णिमा आणि सोमवार असा विशेष योग आल्यामुळे धुनीच्या दर्शनाला खूपच गर्दी होती. त्यामुळे थोड्या पाय-या उतरुन रांगेत उभं राहिलो. साधारण तासाभरात आम्ही धुनीजवळ पोहोचलो. मला धुनींचं दर्शन झालं आणि मी तिथेच अक्षरशः खिळून उभी राहिले. माझ्या दृष्टीसमोर होत्या धुनीतल्या केशरपिवळ्या ज्वाला आणि दत्तगुरुंची प्रसन्न मूर्ती. काही क्षणांनी भानावर आले आणि अन्नछत्रासाठी नेलेला शिधा, रक्कम गुरुजींच्या हाती अर्पण करुन नतमस्तक झाले. धूनीचं भस्म लेऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. नंतर तिथे लागूनच असलेल्या एका छोट्या समाधीस्थळी जाऊन बसलो. पून्हा एकदा शांतपणे गुरुशिखर आणि अखंड धुनीचं मानसदर्शन केलं.  गुरुचरित्राचं थोडं वाचन करुन मार्गस्थ झालो. गोरक्षनाथ टुकवर पोहोचून पून्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक येथे आलो. अंबामातेचही परत एकदा दर्शन घेऊन उडन खटोलाजवळ आलो. काही वेळातच उडन खटोलाने तलेटीला परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी परत येऊन थोडा आराम करुन परतीच्या प्रवासाला लागलो.
             कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष सलग तीन पौर्णिमा गिरनार दर्शन श्री दत्तगुरुंनी आम्हाला घडवलं हे आमचं फारच मोठं भाग्य.
             कार्तिकी पौर्णिमेला दर्शन आणि परिक्रमा दोन्हीचा योग आला. निर्बंधांमुळे सुरुवातीला परिक्रमेला परवानगी नव्हती. पण श्री दत्तगुरुंनी भक्तांची प्रार्थना ऐकली आणि ऐनवेळी परवानगी मिळाली. आमच्यासारख्या साऱ्या भाविकांना परिक्रमा करता आली म्हणून वेगळंच समाधान लाभलं होतं. 
             दत्तजयंतीला गिरनारला जायचा आनंद तर विशेषच होता. नेहमी आम्ही दोघं आणि स्नेही असंच दर्शनाला जातो. यावेळी मात्र मुलीही बरोबर होत्या. त्यांना तर दर्शनाला येण्याआधीच श्री दत्तात्रेयाच्या अस्तित्वाची, आमच्या जवळ असण्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दत्तजयंतीलाही उत्तम रितीने गिरनार दर्शन झालं होतं. त्यादिवशीही संपूर्ण गिरनार धुक्यात हरवला होता. चैतन्याने भारलेलं अतिशय सुंदर वातावरण होत. सूर्योदय होऊनही बराच वेळ सारा परिसर धुक्याची दुलई पांघरूनच बसला होता. 
             भवनाथ तलेटीचा सारा परिसर मला खूप आवडतो. सतत उत्सहाने भरलेल्या आणि भाविकांनी फुललेल्या या ठिकाणी  पोहोचलं की आपणही त्या उत्साहाचा भाग होतो, एका वेगळ्याच विश्वात रमतो. गिरनार पर्वताच्या नुसत्या दर्शनानेही लीनता येते. आणि प्रत्यक्ष दर्शनाचं समाधान तर अवर्णनीयच.
             खरंतर नोव्हेंबर २०१९ आधी कुणी ज्योतिषांनी जरी मला भविष्य सांगितलं असतं तरी माझा विश्वास बसणंच कठिण होतं की इतका मोठा गिरनार वारीचा विशेष योग आमच्या आयुष्यात येईल. खरंच स्वयं श्री दत्तात्रेयच आम्हाला प्रत्येकवेळी गिरनार वारी घडवत आले आहेत. आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि पूर्तता श्री दत्तगुरु करतात. 
           || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त  ||


मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास
     मिटल्या नेत्रीही तू नित्य दिसावे
     पापणीत डोळीयांच्या तू असावे
हृदयमंदिरी तू सदा वसावे
अधरावरती तू  नित्य रहावे
     श्वासागणिक तुजला मी स्मरावे
     नामातच तुझिया सदा रमावे
कातर हळव्या क्षणी तू असावे
झुल्यावर सुखाच्या तुज स्मरावे
            सगुण निर्गुण भेदच नुरावे
            दत्तचरणी 'मी' पण हे सरावे
मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास

- स्नेहल मोडक

Wednesday, January 12, 2022

बंध मैत्रीचे

                    कोरोना आणि काही इतर कारणांमुळे गेली दोन वर्षं पुढे पुढे जात राहिलेल्या आम्हा मित्रमैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाला अखेर मुहूर्त मिळाला. तारिख आणि ठिकाण ठरवून रेल्वेचं आरक्षण केलं आणि सगळ्यांमधे उत्साहाची लहर पसरली.
                     मळवली - लोणावळ्यापासून अगदी जवळ म्हणजे नऊ किमी अंतरवार असलेलं एक छोटंसं शांत पण निसर्गरम्य गांव. आमच्या स्नेहसंमेलनासाठी या मळवलीमधलाच एक सुंदर बंगला आरक्षित केला होता. 
                    खरंतर काही कारणास्तव मी या संमेलनाला न जाण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यामुळे माझे सारे मित्रमैत्रिणी खूपच नाराज झाले होते. त्यांची नाराजी मला सतत जाणवत होती. अखेर संमेलनाच्या आदल्या दिवशी कारणं बाजूला ठेवून मी जीवलगांबरोबर संमेलनाला जायचं ठरवलं. रात्री उशिरा जायची तयारी केली आणि सगळेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भेटीचं स्वप्न पाहातच निद्राधीन झालो.
                   दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने सारे निघालो. एका मैत्रिणीने भल्या पहाटे उठून उत्साहाने तयार केलेल्या चविष्ट नाश्त्याने प्रवासाची छान सुरुवात झाली. नाश्त्याबरोबर गप्पाही रंगल्या. आणि त्यात वेळ कसा गेला कळलही नाही. आम्ही लोणावळा स्थानकावर उतरलो. तिथून थोडं दूर असलेल्या पण संमेलन स्थळ म्हणून ठरवलेल्या मळवली गावातील बंगल्यापर्यंत जाण्यासाठी एका मित्राने गाडीची व्यवस्था आधीच केली होती. त्या गाडीने आम्ही संमेलन स्थळी पोहोचलो. काही मित्र मैत्रिणीं दूसरीकडून येणार होते. त्यांना आमच्याबरोबर रेल्वेनं येणं शक्य नसल्यानं एका मित्राच्या गाडीने तेही एकाच वेळी संमेलन स्थळी पोहोचले. बंगला गावापासून थोडा आत होता. पण आवारात सुंदर बाग फुलवलीय. आणि जवळुन एक लहानशी नदी वाहते. एखाद्या छानशा चित्रासारखंच हे ठिकाण आहे.
                    सारे एकत्र जमलो आणि मग सुरु झाली धमाल मजामस्ती. बंगल्यात पोहोचलो, ताजेतवाने झालो आणि मग सुरु झाला यज्ञ - गप्पांचा अखंड यज्ञ. त्यात वाफाळत्या चहाची पहिली आहुती पडली आणि यज्ञ तेजाळला. नंतर भोजन आहुती अर्पण करेपर्यंत त्यात गप्पा आणि छायाचित्रणाच्या समीधा वाहणं अखंड सुरु होतं. झणझणीत भरली वांगी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी अशा गावरान जेवणाचा आस्वाद घेत गप्पा अधिकच रंगल्या होत्या.
                    भोजनाच्या आहुतीनंतरही गप्पांच्या समीधा यज्ञात पडतच होत्या. नंतर यज्ञ थोडा बाजूला ठेवून जवळच्या तरणतवावात मनसोक्त खेळून यज्ञाची धग थोडी कमी केली. मग परत आवरुन अंगणातच बसून वाफाळत्या चहाची आहुती यज्ञार्पण केली. मधल्या काळात सकाळपासूनचं स्वच्छ आकाश भरुन यायला लागलं होतं. चहा होईपर्यंत आकाशात मेघ दाटून आले. चहापानानंतर आम्ही जवळच थोडं फिरुन आलो. थोड्याच वेळात वरुणराजाने आमच्यावर गुलाबपाणी शिंपडायला सुरुवात केली. गार वारा आणि पावसाचा हलका शिडकावा वातावरण अतिशय सुंदर झालं होतं. गप्पा गोष्टी आणि छायाचित्रांचा यज्ञ सुरुच होता.
                     दोन मित्रांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी ते संमेलनाला येऊ शकले नाहीत तर एक मित्र कामाच्या व्यस्ततेमुळे रात्री येणार होता त्याची वाट पहाणं सुरु होते. न आलेल्या मित्रांची उणीव सतत जाणवत होती. 
                    अशातच सांजसावल्या गडद झाल्या आणि पावसाचा शिडकावाही वाढला. मग घरात बसून खेळायचं ठरवलं. एका मित्राने घेतलेल्या या खेळाचा मुख्य उद्देश व्यक्त होणं हाच होता. 
                    खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात. पण त्यासाठी योग्य वेळ आणि आपल्याला समजून घेणारी योग्य व्यक्ती हे दोन्ही असावं लागतं. बहुतेक वेळा आपल्याला कुणी समजून घेणार नाही या भावनेतून आपण अव्यक्त रहातो. आणि मनाच्या तळाशी या मनभावना दडपून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि पर्यायाने तब्येतीवर होतच असतो. मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. इथं आपल्याला समजून घेणारे मित्रमैत्रिणी आहेत याची जाणीव होते आणि मग गप्पांच्या, खेळांच्या माध्यमातून इथं प्रत्येकाला मनापासून व्यक्त होता येतं. आणि मग मनमुक्त झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं.
                    आम्ही असंच मनमुक्त बोलत असतानाच काम संपवून येणाऱ्या मित्राचं आगमन झालं आणि आमच्या खेळाची रंगत अजूनच वाढली. अखेर खूप उशीराने गप्पांच्या यज्ञात भोजनाची आहुती दिली. आणि पुन्हा नवीन खेळाला सुरुवात केली. उशीरापर्यंत जागरण करुन अखेर थोडीशी विश्रांती घेतली. 
                   लगेच पहाटे ऊठून फिरायला गेलो. साऱा परिसर धुक्याची दुलई पांघरून बसला होता. पूर्वदिशेला पसरत असलेला सोनकेशरी रंग पाहात, छायाचित्र काढत, गार वारा अनुभवत आम्ही फिरत होतो. काही वेळातच सूर्योदयाचं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत परत आलो. 
                 आदल्या दिवसापासून सुरु असलेल्या यज्ञात पून्हा वाफाळत्या चहा आणि चमचमीत मिसळीची आहुती दिली. सारं आवरुन परत गप्पा, गाणी, खेळ, छायाचित्रं यात दंग झालो. अखेर काही वेळातच यज्ञात भोजनाची पूर्णाहुती दिली. आम्हाला दोन दिवस उत्तम चवीचं, आमच्या पसंतीचं, चहा, नाश्ता, भोजन करुन खाऊ घालणाऱ्या पती-पत्नी चा निरोप घेऊन तृप्त मनाने आम्ही निघालो. 
                 मळवलीपासून जवळच भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी आहेत. ही लेणी आणि कार्ल्याच्या एकवीरा देवीचं मंदीर पाहण्यासारखे आहेत. तसंच इथं मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारे लोहगड आणि विसापूर हे किल्लेही पहाण्यासारखे आहेत.
                आम्ही जवळच असलेला लोहगड किल्ला बघायला जायचं आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे किल्ल्याजवळ पोहचलो. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेलाय. अतिशय मजबूत आणि बुलंद असा हा किल्ला आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा किल्ला पहाण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. पण गप्पा आणि छायाचित्रणाच्या नादात दमल्याची जाणीव न होता आम्ही वरपर्यंत चढून गेलो. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा हे पहात महादरवाजातून पुढे गेल्यावर एक ध्वजस्तंभ, लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, एक छोटंसं अष्टकोनी तळं हे सारं पहाता येतं. वर पोहोचलो आणि एका वेगळ्याच आनंदानं मन भरुन आलं. नुसतं किल्ला चढतानाही आपल्याला दमायला होतं आणि जाणवतं त्याकाळी कुठलीही सुविधा नसताना बांधलेल्या अशा साऱ्या अभेद्य किल्ल्याचं महत्व. किती विपरीत परिस्थितीत बांधलेत हे सारे गडकिल्ले. कुठून आली असेल एवढी शक्ती त्या लोकांमध्ये. जिद्द, निष्ठा, जीवाची बाजी लावणं या साऱ्या शब्दांचा खरा अर्थ या इतिहासातूनच कळतो. किल्ल्यावर पोहोचून मनोमनी नतमस्तक होऊन, फिरुन, छायाचित्र काढून परत खाली उतरलो.
                 दोन दिवस सुरु असलेला हा संमलनाचा यज्ञ पुनरागमनायच म्हणून तात्पुरता शांत केला आणि गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन उत्फुल्ल मनाने परतीच्या प्रवासाला लागलो. 

      
जरतारी वस्त्र खास मैत्रीचे
स्नेहाच्या धाग्याने विणायचे
   गीत सुमधुर हे आयुष्याचे
   द्यायचे स्वरसंगीत मैत्रीचे
स्वप्नचित्र मनी रेखायचे
रंग मैत्रीचे त्यात भरायचे
   शांत अव्यक्त मन जपायचे
   अन मैत्रीत मनमुक्त व्हायचे
जीवन सारे जरी सुखदुःखाचे
मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे
   मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे

- स्नेहल मोडक

Monday, January 3, 2022

प्रारंभ नववर्षाचा

     पुन्हा एक नवं वर्ष सुरु झालंय. गतवर्षीच्या साऱ्या आठवणी आणि आपल्या माणसांसह या नवीन वर्षाचं स्वागत करुया. कटू आठवणी विसरुन, दु:खद आठवणींना काळाचं औषध लावून, आपल्याला आणि आपल्या साऱ्या सुहृदांना जपूया. नवीन वर्ष सौख्य समृध्दी आणि उत्तम आरोग्याचं असावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. म्हणजे आपल्या आयुष्याचं गीत सुमधुर नक्कीच होईल, हो ना?


   

सूर संगीताचे मनी उमलावे

नीत नवे तराणे हृदयी छेडावे 

     श्वासातूनी आपल्या गीत फुलावे

     अधरातल्या तानेवर मन झुलावे

सुरावटीवरी जणू स्वैर विहरावे

नादावरी अलवार पाऊल थिरकावे

      भलेबुरे ते सारे विसरावे

      गीतामधूनी मनमुक्त व्हावे

क्षणी सुखाच्या संगीत ऐकावे

विरहात कुणाच्या गीत ते गावे

       विसरुन सारे स्वच्छंद जगावे

       गीत जीवनाचे गातच रहावे


- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...