Pages

Showing posts with label Chardham Yatra. Show all posts
Showing posts with label Chardham Yatra. Show all posts

Saturday, June 24, 2023

चारधाम यात्रानुभव... भाग - ३

            दिवस दहावा - बद्रीनाथ हून सकाळी लवकर आम्ही माणा गाववाकडे प्रयाण केलं. बद्रीनाथ पासून अगदी जवळ म्हणजे ५-६ किमी अंतरावर असलेलं हे माणा गांव म्हणजे भारत - चीन सीमेवरचं पहिलं गांव. 

            माणा गावात शिरल्यावर प्रथम श्री गणेशजी ने ज्या गुंफेत बसून महाभारताचं अथकपणे लिखाण केलं ती गुंफा पहायला मिळते. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर  महर्षी व्यासांनी ज्या गुंफेत बसून  महाभारत कथन केलं ती गुंफा आहे. फक्त इथेच आपल्याला सरस्वती नदी पहाता येते. इथून पुढे सरस्वती नदी गुप्त होते. जेव्हा महर्षी व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली आणि श्री गणेश ते लिहू लागले तेव्हा सरस्वतीला राग आला, आपण विद्येची देवता असताना गणेशाला का सांगितलं म्हणून चिडून ती जोराने खळखळाट करु लागली. त्या आवाजाने गणेशाला व्यासांचे शब्द ऐकू येईनासे झाले. व्यासांनी सरस्वतीला शांत होण्यास सांगितलं. पण ती अधिकच चिडली. तेव्हा व्यासांनी क्रोधित होऊन तिला शाप दिला की तू याच जागी गुप्त होशील. तेव्हा सरस्वतीला आपली चूक समजली आणि तिने उःशाप मागितला तेव्हा व्यासांनी जिथे जिथे दोन नद्यांचा संगम होईल तिथे तिथे तूही गुप्त स्वरुपात असशील असं सांगितलं. त्यामुळे फक्त याठिकाणीच आपल्याला सरस्वती नदीचं दर्शन घडतं. 

            पांडव जेव्हा पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी तपश्चर्या करुन स्वर्गारोहण करण्यासाठी इथे आले तेव्हा खळाळती सरस्वती नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी भीमाने या नदीवर दोन मोठे पाषाण टाकून पूल तयार केला आणि  त्यावरुन पुढे जाऊन पांडवांनी स्वर्गारोहण केलं. या पूलाला भीमपूल नांवानं ओळखलं जातं. 

            हे सारं पाहून, तिथल्या भारत - चीन सीमेवरच्या पहिल्या चहाच्या दुकानात चहा पिऊन आम्ही ऋषिकेश येथे निघालो. खरंतरं आम्हाला ऋषिकेशला गंगा आरतीसाठी पोहोचायचं होतं. पण मार्गातील वाहन कोंडीमुळे  ऋषिकेशला पोहोचायला रात्र झाली. 

            दिवस अकरावा - हा आमच्या चारधाम यात्रेचा अंतिम दिवस. सारं पॅकिंग करुन सकाळी लवकरच निघालो. 

            लक्ष्मण झुला पहायला जायचं होतं. पण वाहन कोंडी आणि आम्हाला असलेलं वेळेचं बंधन यामुळे गाडी अर्ध्यावरुनच परत फिरवली आणि रामझुला हा गंगा नदीवरचा झुलता पुल पहायला गेलो. साधारण एकदिड किमी अंतर चालून गेल्यावर गंगा नदीच्या घाटावर पोहोचलो. तिथून रामझुलापर्यंत परत चालत गेलो. रामझुल्यावरुन चालत पलिकडच्या तीरावर पोहोचलो. त्या अगदी अरुंद अशा पुलावरही दुचाकीस्वारांना जा - ये करण्यास परवानगी आहे. त्यांच्यामुळे पायी जाणाऱ्यांना खूपच त्रास होतो. पण तिथेही असाच बेशिस्त कारभार आहे. आम्ही पलिकडच्या तीरावर उतरुन नावेने परत अलिकडच्या तीरावर आलो. गंगास्नान करण्यासाठी इथेही भाविकांची खूप गर्दी असते. 

            रामझुला पाहून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्हाला डेहराडूनला पोहोचायचं होतं. त्या मार्गावर मात्र सुरुवातीला जरा वाहन कोंडी होती. पण नंतर रस्ता मोकळा होता. त्यामुळे आम्ही वेळेतच डेहराडून विमानतळावर पोहोचलो.

            आमची चारधाम यात्रा संपूर्ण झाली होती. मात्र तिथल्या रहिवासी लोकांच्या उद्दामपणाच्या वागण्याचा मनस्ताप झाला होताच त्याचबरोबर आम्ही ज्या मिथिला ट्रॅव्हल्स कडून ही कस्टमाईज टूर प्लॅन केली होती त्या ट्रॅव्हल्सनेही आम्हाला प्रचंड मनःस्ताप दिला. सारे पैसे आधीच भरलेले असूनही प्रत्येक ठिकाणी रुमसाठी भांडावं लागत होतं. चार रुमचे पैसे भरलेले असताना दोनच रुम मिळत होत्या. त्यामुळे हे सर्व लक्षात घेऊनच यापुढे प्रत्येकाने ट्रॅव्हल्सचं बुकिंग करावं हे उत्तम. कारण आपण ज्यांच्याकडून हे बुकिंग करतो ते स्वतः आपल्या बरोबर नसतील तर असा मनस्ताप सहन करायची वेळ येऊ शकते.अर्थात प्रत्येक यात्रेत थोडंफार कमीजास्त होतंच पण असा त्रास होऊ नये एवढं नक्की.

            असा त्रास सोडल्यास आमची चारधाम यात्रा उत्तम रितीने पार पडली. आम्हा सर्वांच्या तब्येतीही नीट राहिल्या. एवढा मोठा प्रवास, प्रचंड दगदग, रोजचं जागरण हे सारं असूनही कुणालाही त्रास झाला नाही. आणि चारही धामांचं उत्तम दर्शन घडलं ही श्री दत्तात्रेयांची कृपा.

- स्नेहल मोडक





Friday, June 23, 2023

चारधाम यात्रानुभव... भाग -२

            दिवस सहावा - खरंतर पहाटेच आम्हाला गुप्तकाशी ला मुक्काम करण्यासाठी निघायचं होतं. पण काही कारणानं निघायला थोडा उशीर झाला. अखेर सकाळी प्रवासाला सुरुवात केली. नेहमी सारखंच वाहनकोंडीत अडकत, थांबत रात्री गुप्तकाशीला पोहोचलो. सारा दिवस फक्त प्रवास झाला होता. चारधाम मधलं तिसरं अवघड तरीही तितकंच आकर्षण असलेलं धाम म्हणजे केदारनाथ. गुप्तकाशीहून आम्हाला याच केदारनाथच्या दर्शनासाठी जायचं होतं. 

            केदारनाथचा पायी चालण्याचा मार्ग गौरीकुंडपासून सुरु होतो. गौरीकुंड येथे मुक्कामाची व्यवस्था उपलब्ध नसल्याने भाविकांना गुप्तकाशी किंवा सोनप्रयाग येथेच मुक्काम करावा लागतो. सोनप्रयाग पर्यंत आपल्या वाहनाने जाता येतं. तिथून पुढे गौरीकुंड पर्यंतचा ५-६ किमी चा प्रवास जीपने, घोड्यावरुन अथवा पायी करावा लागतो. जीपने प्रवास करण्यासाठी किमान १ ते ४ तास रांगेत थांबावं लागतं. 

            हे सगळं माहित असल्याने आम्ही रात्री दोन वाजताच गुप्तकाशीहून निघालो. तासाभरातच गाडी सोनप्रयाग जवळ वाहन कोंडीत अडकली. अखेर आम्ही तिथेच उतरुन चालायला सुरुवात केली. एक दिड किमी चालून गौरीकुंडला जाणाऱ्या रांगेत पोहोचलो. तिथे तासभर रांगेत उभं राहिलो. इतकावेळ शिस्तीत असलेली रांग गेटजवळ मात्र एकदम सोडतात. आणि जीप मिळवण्यासाठी एकच गडबड गोंधळ सुरु होतो. तिथले लोक अतिशय बेशिस्त आणि उर्मट आहेत. त्रस्त मनाने आम्ही अखेर एका जीपमध्ये चढलो. पूढेही तीच परिस्थिती. वाहनकोंडीमुळे गौरीकुंडपर्यंत  परत एकदिड किमी चालावं लागलंच. अखेर एकदाचं गौरीकुंडला पोहोचलो.

            केदारनाथला हेलिकॉप्टरमधूनच जायचं असं आधी ठरवलं होतं. पण ज्यादिवशी हेलिकॉप्टरची ऑनलाईन तिकीटं मिळणार होती त्यादिवशी शर्थीचे प्रयत्न करुनही तिकीटं मिळाली नव्हती. ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये ही काहीतरी गडबड असल्याचं सहज लक्षात आलं. खरतंर तेव्हाच माझा थोडा मूड गेला होता. पण नाईलाज होता. चारधामचं बाकी सगळंच बुकिंग तोपर्यंत झालेलं होतं. त्यामुळे हेलिकॉप्टर ऐवजी डोली करुन जायचं ठरवलं होतं.

           दिवस सातवा -   गौरीकुंडला पोहोचल्यावर डोलीची चौकशी केली असता बुकिंग फुल झाल्याचं कळलं. मग पायी चढून जाणं किंवा घोड्यावरुन जाणं हे दोनच पर्याय उरले होते. मंदिरात पोहोचण्यासाठी १६ ते १८ किमीची  चढाई पार करावी लागते. आणि जसजसं चढून वर जातो तसतशी ऑक्सिजन ची पातळीही कमी होत जाते.  त्यामुळे केदारनाथ ही अतिशय अवघड अगदी आपल्या शारिरीक क्षमतेचा कस पहाणारी अशी चढाई आहे. 

            केदारनाथ मंदिर निर्मितीची कथा पांडवाशी निगडीत आहे. कुरुक्षेत्रावरील युध्दात पांडवांनी कौरवांचा पराभव करुन वध केला. या हत्येच्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी ते भगवान शिवांच्या शोधात काशी वाराणसीला गेले. पण भगवान शिव कुरुक्षेत्रातील मृत्यूंमुळे संतापले होते. त्यामुळे पांडवापासून लपण्यासाठी त्यांनी नंदीचं ( बैलाचं) रुप धारण केलं आणि गढवाल प्रदेशात लपून बसले. पांडवाना काशीला शिवदर्शन न झाल्यानं ते फिरत फिरत गढवाल प्रांतात आले. तिथे भीमाला कुरणात चरणारा बैल दिसला. भीमाने तो बैल म्हणजेच भगवान शिव असल्याचं ओळखलं. आणि त्याची शेपटी  आणि मागचे पाय धरले पण भगवान शिव मस्तकाच्या बाजूने जमिनीत अदृश्य झाले आणि भीमाने पकडलेला भागच दृश्य स्वरूपात राहिला. पांडवांनी इथेच भगवान शिवाचं मंदिर बांधलं. त्यानंतर आद्य शंकराचार्यांनी त्याची पुनर्बांधणी केली.  नंतर पांडवांनी मोक्षप्राप्ती साठी येथेच तपस्या केली आणि स्वर्गारोहिणी द्वारे त्यांना मोक्षप्राप्ती झाली. या कथेनुसारच केदारनाथ मंदिरात निराकार पाषाण स्वरुपात भगवान शिवाचं दर्शन आपल्याला घडतं. या पहाडाच्या पायथ्याला बिलगून गंगेची उपनदी मंदाकिनी वाहते. ११,७०० फूट उंचावर वसलेले हे मंदिर आणि आसपासचा परिसर अक्षरशः स्वर्ग भासावं इतकं नितांतसुंदर आहे

           २०१३ साली  उत्तराखंड मध्ये आलेल्या महापूरात हे मंदिर वगळता सारं काही वाहून गेलं होतं. या मंदिराच्या मागे अवघ्या काही मीटर अंतरावर एक महाकाय शिला पहाडातून सुटून गडगडत येऊन थांबली आणि त्या शिळेच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचा प्रवाह पसरुन  सारा परिसर वाहून गेला. मात्र या मंदिराचं तीळमात्रही नुकसान झालं नाही. आता ही शिळा भीमशिला या नावानं ओळखली जाते.

           डोलीची सोय उपलब्ध न झाल्याने अखेर आम्ही घोड्यावरुन जायचं ठरवलं. घोडेही पाय घसरुन पडतात हे प्रत्यक्ष अनुभवलं असल्याने खरंतर माझी घोड्यावरुन जायची तयारी नव्हती. पण याची तब्येत सततच्या जागरणाने थोडी अस्वस्थ असल्याने पायी चालून जायला जमणं कठीण होतं. अखेर  आम्ही घोड्यावरुन निघालो. अवघ्या दिड तासांत अर्धं अंतर आमच्या घोड्यांनी पार केलं आणि विश्रांती साठी थांबलो. आम्हीही तेव्हाच नाश्ता केला. अर्ध्या पाऊण तासाच्या विश्रांती नंतर पुढे निघालो. पुढच्या दिड तासातच बेस कॅम्प ला पोहोचलो. पायथ्यापासून बेस कॅम्प पर्यंतचं १६ किमीचं अंतर घोड्यांनी आणि बरोबर असलेल्या मुलांनी अक्षरशः तीन तासात पार केलं होतं . अतिशय अवघड अशी ही चढाई लिलया पार करणाऱ्यांना नमस्कारच केला. बेस कॅम्प ला उतरल्यावर पुढे ४ किमीची चढाई बाकी होती. तेवढं अंतरही पायी चालताना आमची पूर्ण दमछाक झाली. कारण आम्ही जरी घोड्यावर बसून आलो असलो तरी सतत हाताची घट्ट पकड ठेवावी लागत होतीच. शिवाय सतत चढावाचा रस्ता असल्याने घोड्याला चढताना त्रास कमी व्हावा म्हणून पुढे झुकून बसावं लागत होतं. थांबत थांबत चालून अखेर आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो. आमची मंदिराच्या जवळच मुक्कामाची व्यवस्था होती. त्यामुळे ते हॉटेल शोधून रुममध्ये शिरलो लगेचच विश्रांतीसाठी बेडवर  अगदी आडवे झालो. 

           जेमतेम १० मिनिटं झाली आणि त्या हॉटेलाच्या मालकाने दार वाजवलं. आणि अभिषेक पूजा करायची आहे का याची चौकशी केली. आम्ही इतके दमलो होतो की कसलाही विचार न करता त्यांनी सांगितलेली रक्कम त्वरित त्यांना दिली.आणि निद्राधीन होण्याचा प्रयत्न करु लागलो. एवढ्यातच जोरदार पावसाला सुरुवात झाली.आणि माझ्या मनात काळजी दाटली. आम्हा ८ जणांपैकी आम्ही तिघंच घोड्यावरुन आलो होतो. बाकीचे चालत येत होते. पावसामुळे आधीच अवघड असलेली चढाई त्यांना आणखीनच थकवणार होती. तसंच झालं. मंदिरापर्यंत पोहोचायला त्यांना अकरा तास लागले. अर्थात तेही मधेमधे थांबतच आले होते. 

           आम्ही अभिषेक पूजेसाठी पैसे भरल्याने आम्हाला दर्शनासाठी रांगेत उभं रहायची गरज नव्हती. रात्री जेवून आरामात रांगेत उभं राहीलो. पुढच्या अर्ध्या तासातच आमचा नंबर आला. आणि मंदिरात शिवलिंगासमोर बसून अभिषेक पूजा करायला मिळाली. स्वहस्ते जलाभिषेक आणि घी लेपन करायला मिळालं, आणि मन प्रसन्न तृप्त झालं. पूजा करुन मंदिराच्या मागे असलेल्या भीमशिलेचं दर्शन घेऊन रुमवर परत आलो. रोजच पडत असलेल्या पावसामुळे केदारनाथ आणि आजूबाजूच्या परिसरातील तापमान खूपच कमी म्हणजे जवळजवळ उणे अंशाईतकं खाली घसरलं होतं. आदल्या दिवशी रात्री निघताना घातलेलं जॅकेट क्षणभरासाठीही काढलं नव्हतं. 

          दिवस आठवा -  पहाटे उठून आवरुन परत निघायचं होतं. स्नानासाठी रुममध्ये गरम पाणी उपलब्ध नव्हतं. दिडशे रुपये देऊन छोटी बादली भरुन गरम पाणी उपलब्ध होतं. ते आणून सारं आवरलं. आणि पून्हा मंदिराजवळ गेलो. प्रचंड मोठी रांग असल्याने बाहेरुनच दर्शन घेतलं. थोडं थांबून, खरेदी करुन परत निघालो. पायीच परत जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणे चालायला सुरुवात केली. वाटेत असलेल्या ग्लेशियर जवळ थांबून बर्फात खेळत छायाचित्रं घेत पूढे निघालो. काही वेळातच धुकं पसरायला सुरुवात झाली. धुक्यातून  तासभर चाललो आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरु झाला आणि आमची चिंता वाढली. मुळातच रस्ता नीट नाही. त्यात पाऊस सुरु झाला. त्यामुळे रस्त्यावरची माती आणि घोड्यांची लीद यामुळे अतिशय घाण चिखल सगळीकडे तयार झाला होता. त्या चिखलात पाय रुतू न देता किंवा त्यावरुन न घसरता चालणं ही मोठी कसरतच होती. त्याचवेळी घोडे, पिठ्ठू, डोलीवाले यांच्यापासूनही स्वताला सावरत चालावं लागत होतं.  

           हे असं सांभाळून चालत असतानाच पून्हा एकदा माझ्यासमोर एक घोडा घसरुन पडला. थोडं पुढे आलो आणि बाजूने चालाणाऱ्या ४-५ घोड्यांमधला एक घोडा धडपडला आणि बाकीचे घोडे उधळून उलट फिरले. अगदी आमच्या अंगावर येता येता राहिले. मग मात्र माझी भीती अजूनच वाढली. पाऊस बराच वेळ पडून थांबला पण माझी भीती मात्र कमी होत नव्हती. असच चालताना अचानक जाणवलं एक काळा केसाळ असा श्वान आमच्या पलिकडच्या बाजूने पण सतत आमच्या बरोबर चालतोय. पण मला घसरुन पडण्याची एवढी भीती वाटत होती की त्या श्वानाचं असणं जाणवलं तरीही मन शांत होत नव्हतं. बराचसा वेळ असाच गेला आणि हळूहळू माझी भीती थोडी कमी झाली. मग माझ्या चालण्याचा वेग थोडा वाढला. अखेर आम्ही गौरीकुंडला पोहोचलो आणि सोनप्रयागला जाण्यासाठी रांगेत उभं राहिलो. 

           इथेही आदल्या दिवशीचीच परिस्थिती होती. आधी तासभर रांगेत उभं रहायचं आणि मग एकदम लोकांना सोडायचं. जीपमध्ये बसण्यासाठी उरीपोटी धावायचं. सगळा बेशिस्त कारभार. एकदाची जीप मिळाली आणि आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. मात्र तिथूनही आमच्या गाडीपाशी पोहोचायला एकदिड किमी चालावं लागलं. गाडीजवळ पोहोचून गुप्तकाशीला मुक्कामासाठी परत गेलो. मंदिरापासून पायथ्याशी पोहोचायला आम्हाला जवळपास दहा तास लागले होते. अशा वाईट परिस्थितीत मी केवळ सगळ्यांच्या सहकार्यानेच चालू शकले होते. रात्री उशिरा मुक्कामी पोहोचलो तेव्हा सगळेच प्रचंड दमलो होतो. पण त्याचवेळी एवढी अवघड चढाई करुन श्री केदारनाथांचं अतिशय सुंदर असं दर्शन घडलं असल्यानं मन मात्र तृप्त होतं. 

           दिवस नववा - सकाळी लवकरच आवरुन चारधाममधील अंतिम धाम बद्रीनाथला निघालो. वाटेत आधी उखीमठला गेलो. 

           उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ हे गांव आहे. बाणासुरांची कन्या उषा आणि भगवान श्रीकृष्णांचा नातू अनिरुद्ध यांचा विवाह इथे संपन्न झाला होता. कन्या उषेच्या नांवावरुनच या स्थानाला उखीमठ हे नांव मिळालंय. केदारनाथाची शीतकालीन पूजा सहा महिने या उखीमठमध्ये केली जाते. कपाट बंद करताना बाबा केदारनाथांना उखीमठ इथे पालखीतून आणलं जातं. या उखीमठचं दर्शन घेऊन पुढे निघालो. वाहन कोंडी आणि जास्त अंतरामुळे प्रत्यक्ष बद्रीनाथ ला पोहोचायला उशीर झाला. 

           चारधाम मधलं अंतिम धाम म्हणजे बद्रीनाथ धाम. चमोली जिल्ह्यातील अलकनंदा नदीतीरावर वसलंय हे बद्रीनाथ धाम. या मंदिराची निर्मिती सातव्या ते नवव्या शतकात शंकराचार्यांनी केली होती. हे मंदिर श्री विष्णूंना समर्पित आहे. बद्रीनाथ स्वरुपात इथे श्री विष्णूची पूजा केली जाते. बद्रीनाथाची शाळिग्रामची मूर्ती मंदिरात आहे. या चतुर्भुज मूर्तीच्या एका हातात शंख आणि दुसऱ्या हातात चक्र आहे. दोन हात योगमुद्रेत मांडीवर ठेवले आहेत. मूर्तीच्या वर सोन्याचा कळस आहे. हे मंदिर बद्रीनाथ नांवाने प्रसिद्ध असण्यामागची एक आख्यायिका सांगितली जाते. भगवान विष्णू इथे तपश्चर्येला बसले असताना त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून लक्ष्मीदेवीने बदरीवृक्षाचं रुप धारण करुन श्री विष्णूंना छाया दिली. त्यावरुनच हे ठिकाण बद्रीनाथ म्हणून प्रसिद्ध झालं. केदारनाथाच्या दर्शनानंतर बद्रिनाथाचं दर्शन घेणं महत्त्वाचं आहे . यानंतरच यात्रा सफल होते अशी मान्यता आहे.

           आम्ही बद्रीनाथला पोहोचलो आणि आधी मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. फ्रेश होऊन लगेच दर्शनासाठी निघालो. मंदिरात पोहोचेपर्यंत दर्शनाची वेळ संपत आली होती. त्यामुळे खूपच गडबड गोंधळ उडाला होता. भाविकांची दर्शनासाठी धक्काबुक्की सुरु झाली. त्याच गोंधळात आम्हालाहु मंदिरात जेमतेम प्रवेश मिळाला आणि लगेच प्रवेशद्वार बंद केलं गेलं. गर्भगृहात प्रवेश मिळाल्याने आम्हाला बद्रीनाथांचं सुंदर दर्शन घडलं आणि त्या गर्दीबरोबरच आम्ही बाहेर पडलो. 

           चारधाम हे भाविकांचं खूप मोठं श्रध्दास्थान आहे. पण इथे कुठेही भाविकांच्या सुरक्षेचा, सोयीसुविधांचा विचार केला जात नाही. इथले लोकं भाविकांशी अतिशय उद्दामपणे, मुजोरपणाने वागतात. सारा कारभार अत्यंत बेशिस्तीचा आहे. भाविकांच्या पैशावरच सहा महिने त्यांचा चरितार्थ चालतो पण तरीही ते अतिशय उर्मटपणाने बोलतात, वागतात. यमुनोत्री आणि केदारनाथ या दोन्ही ठिकाणी भाविकांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागतो तोही केवळ तिथल्या लोकांच्या अरेरावीच्या वागण्यामुळेच. 

            खरंतर यमुनोत्री आणि केदारनाथ या दोन्ही ठिकाणी रोप वे ची सुविधा होणं अत्यंत गरजेचं आहे. केदारनाथ साठी हेलिकॉप्टरची सुविधा असूनही तिथे तिकीटांसाठी प्रचंड काळाबाजार चालतो तेही बंद होणं अत्यावश्यक आहे. रस्ते सुस्थितीत आणून शक्यतो त्यावर दुभाजक बसवून पायी चालणाऱ्यांसाठी एक भाग आणि घोडे, डोली, पिठ्ठू यांच्यासाठी एक भाग अशी व्यवस्था करणंही अत्यावश्यकच आहे. इथे घोडेवाले पायी चालणाऱ्यांशी नेहमीच उद्दामपणे वागतात. त्यामुळे नेहमीच इथे भांडणं, बाचाबाची सुरु असते. कित्येकदा ही भांडणं मारामारी पर्यंत पोहोचतात. हे सगळं बंद होणं होणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा हळूहळू पण निश्चितपणे भाविक चारधाम यात्रेला जाणं कमी करतील. सातत्याने अशा वाईट, तापदायक अनुभवांना सामोरं जावं लागत असेल तर भाविक चारधाम यात्रेला जाणं टाळतीलच. 

क्रमशः

- स्नेहल मोडक









Wednesday, June 21, 2023

चारधाम यात्रानुभव... भाग १

            उत्तराखंड मधील चारधाम यात्रा हे अनेक लोकांप्रमाणेच आमचंही स्वप्न. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ हे चारधाम दर्शन आणि त्यातही केदारनाथ चं विशेष आकर्षण आम्हाला होतं. आमचं एकवीसावं गिरनार दर्शन झालं आणि लगेच चारधाम यात्रेचा योग आला.

            आम्ही चारधाम यात्रा करायचं ठरवलं‌ पण मोठ्या ग्रुपबरोबर जायचं की स्वतंत्रपणे हा प्रश्न होता. मला शक्यतो स्वतंत्रपणे जायची इच्छा होती. मग आंतरजालावरून माहिती घेतली आणि तसच ठरवलं. वेगवेगळ्या यात्रा कंपन्यांशी बोलून एका कंपनीतर्फे जायचं नक्की केलं. आम्ही दोघं आणि याचे ऑफिस मधील तीन सहकारी मित्र आणि त्यांच्या सौ. असे एकूण आठजणं मिळून जायचं ठरलं. 

            वटपौर्णिमेला गिरनार दर्शन करुन आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी चारधाम यात्रेसाठी प्रस्थान केलं. पहाटेच्या विमानाने निघून सकाळी डेहराडूनला पोहोचलो. आम्ही डेहराडून ते डेहराडून असं पॅकेज घेतलं होतं त्याप्रमाणे डेहराडून ला आम्ही पोहोचलो तेव्हा आमच्यासाठी गाडी येऊन थांबली होती. आम्ही गाडीत बसलो आणि आमच्या चारधाम यात्रेला प्रारंभ झाला. 

            आमचं मुक्कामाचं पहिलं ठिकाण होतं हरिद्वार. साधारण तासाभरात आम्ही हरिद्वारला पोहोचलो. पण आमच्या हॉटेलपासून जवळपास एक किमी अंतरावरच गाडी थांबवावी लागली. तिथून पुढे काही कारणास्तव गाड्या सोडत नव्हते. मग सगळं सामान घेऊन आमची वरात हॉटेलपर्यंत पोहोचली. रुम रिकाम्या नसल्याने आधी थोडावेळ एकाच रुममध्ये सगळे थांबलो. फ्रेश होऊन नाश्त्याची ऑर्डर दिली. नाश्ता तयार होईपर्यंत रुम मिळाल्या. मग आपापल्या रूममध्ये सामान ठेवून नाश्ता केला. आवरुन स्थलदर्शन करण्यासाठी निघालो.

            दिवस पहिला - हरिद्वारला आम्ही जिथे मुक्कामाला थांबलो होतो तिथून जवळच मनसा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग होता. त्यामुळे सर्वात आधी आम्ही मनसा देवीच्या दर्शनासाठी निघालो.

            मनसा देवी ही भगवान शिव आणि मातापार्वतीची मानसकन्या. मस्तकापासून उत्पन्न झाली म्हणून मनसा या नावाने ओळखली जाते. तसंच ती कश्यप मुनींच्या मनातून उत्पन्न झाली अशीही एक मान्यता आहे. हरिद्वार मधील शिवालिक पर्वतावर मनसा देवीचं मंदिर आहे. ती नागसर्पांची देवी म्हणूनही प्रसिद्ध आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी खड्या पायऱ्या आहेत. ८०० पायऱ्या चढून जावं लागतं. तसंच उडन खटोलाचीही व्यवस्था आहे. आम्ही मंदिरात जाताना उडन खटोलाने जायचं ठरवलं. मात्र त्यासाठी खूपच गर्दी होती. दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आमचा नंबर लागला. रोपवे ने आम्ही वर मंदिराजवळ पोहोचलो. दर्शनासाठीही मोठी रांग होती. रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आणि परत निघालो. येताना पायऱ्या उतरुन खाली आलो. हे मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. अतिशय सुंदर अशा या मंदिराच्या आजूबाजूचा परिसरही सुंदर आहे.  उंचीवर असल्याने इथून साऱ्या हरिद्वारचा नजारा पहाता येतो.

            हर की पौडी हे हरिद्वार मधील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळ. मनसा देवीचं दर्शन घेऊन आम्ही हर की पौडीला गैलो. समुद्र मंथनातून निर्माण झालेलं अमृत मिळवण्यासाठी साठी देव आणि दानवांमध्ये भांडण सुरु झालं. त्यावेळी दानवांना अमृत मिळू नये म्हणून भगवान विश्वकर्मा हे अमृत घेऊन निघाले असताना त्यातले काही थेंब या स्थानी पडले. तसंच इथे एका पाषाणावर भगवान श्री विप्ष्णूंचं पदचिन्ह उमटलेलं आहे. यामुळे पहाडातून येणाऱ्या गंगा नदीचं हे स्थान हर की पौडी या नावानं प्रसिद्ध आहे. हा घाट राजा विक्रमादित्य यांनी त्याचे बंधू भर्तृहरी यांच्या स्मरणार्थ बांधला आहे. भर्तृहरी या स्थानी ब्रम्हदेवाचं ध्यान करत असत. म्हणून या कुंडाला ब्रम्हकुंड म्हणून ओळखलं जातं. इथल्या ब्रम्हकुंडावर मा गंगेची नित्यनेमाने अतिशय सुंदर अशी सायंआरती केली जाते. ही आरती आणि एकूणच इथला अतिशय सुंदर नजारा पाहण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे येत असतात. दर बारा वर्षांनी भारतातील सर्वात मोठा असा कुंभमेळा इथं भरतो. लाखों भाविक या कुंभमेळ्याला उपस्थित असतात.

            आम्ही घाटावर पोहोचून मंदिर दर्शन करुन गंगा आरतीसाठी थांबलो. मधल्या वेळेत हलका पाऊस पडून गेला होता. साऱ्या वातावरणात गारवा आला होता. ठरलेल्या वेळेत म्हणजे सायंकाळी सात वाजता गंगा आरती सुरु झाली. आणि सारा परिसर दीपज्योतींनी उजळून निघाला. उपस्थित सारे भाविक आरतीत रममाण झाले. आरतीचं सुंदर दृश्य नजरेत आणि छायाचित्रात साठवून आम्ही मुक्कामी परतलो.

            दिवस दुसरा - सकाळी लवकरच पुढील मुक्कामी म्हणजे बारकोटला निघालो. थोडा प्रवास सुरळीत झाला आणि मग वाहनकोंडीमध्ये अडकलो. हळूहळू पुढे जात अखेर मसूरीला पोहोचलो. मसूरी हे उत्तराखंड मधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ. 'पहाडोंकी रानी' या नावानंही हे शहर ओळखलं जातं.  मार्गावरच एका ठिकाणी झिप लाईन, पॅराग्लायडिंग असे साहसी खेळ खेळायची सुविधा होती. मग मात्र तिथे थांबलोच. खेळ खेळून पुढे निघालो. पण वाहनकोंडी सुरुच होती. त्यामुळे सरळ केम्टी वाॅटरफाॅल बघायला गेलो. केम्टी फाॅल मुख्य रस्त्यापासून थोडा आत आहे. फाॅल बघण्यासाठी सुरवातीला थोडंसं  चालून खाली उतरुन जावं लागतं. अतिशय सुंदर असा हा धबधबा आहे. मार्गावर दोन्ही बाजूला थोडी दुकानंही आहेत. त्यामुळे इथे खानपान आणि खरेदी याचाही आनंद लुटता येतो. 

            सुंदर असं हे ठिकाण पाहून आम्ही पुढे निघालो. वाहनकोंडीत बराच वेळ वाया गेल्यामुळे खरेदीसाठी प्रसिद्ध अशा मसूरीमधल्या मालरोड वर आम्हाला जाता आलं नाही. अखेर सायंकाळी आम्ही आमच्या मुक्कामी बारकोटला पोहोचलो. एका बाजूला उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा सततचा वळणावळणचा प्रवास खूप छान झाला होता. 

            दिवस तिसरा - यमुनोत्री दर्शन. चारधाम मधील पहिल्या धामाचं दर्शन आम्ही घेणार होतो. बारकोटहून जानकचट्टीपर्यंत आमचा गाडीचा प्रवास होता. तिथून पुढे यमुनोत्रीला चालत जायचं होतं. भल्या पहाटे आम्ही जानकीचट्टीला निघालो.

            यमुनोत्री हे उत्तराखंड राज्याच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील ठिकाण आहे. १०,८०४ फुट उंचीवरील हे यमुना नदीचं उगमस्थान आणि चारधाम मधील पहिलं धाम आहे. १९१९ साली टिहरी, गढवालचे महाराजा प्रतापशाहा यांनी देवी यमुनेचं हे मंदिर बांधलंय. त्यांतर आलेल्या एका मोठ्या भूकंपात हे मंदिर उध्वस्त झालं होतं. नंतर याची पुनर्निर्मिती जयपूरच्या महाराणी गुलेरिया यांनी केली. मंदिरात काळ्या संगमरवरात घडवलेली देवी यमुनेची मूर्ती आहे. यमुना ही सूर्यदेवाची कन्या आणि यमदेवाची भगिनी आहे. अशी मान्यता आहे की भाऊबीजेच्या दिवशी इथं यमुना नदीत स्नान केल्यास मृत्यू भय रहात नाही. याठिकाणी असितमुनींचा आश्रमही होता. पांडव जेव्हा उत्तराखंड मधील चारधाम यात्रेला आले तेंव्हा त्यांनी पहिल्यांदा यमुनोत्री, गंगोत्री मग केदारनाथ आणि मग बद्रीनाथ अशी यात्रा केली. त्यामुळे त्यानंतर चारधाम यात्रेला सुरुवात झाली. यमुनोत्री मंदिराच्या थोडं खाली जवळच सूर्यकुंड आहे. हे गरम पाण्याचं कुंड असून यात भाविक स्नान करतात. या स्नानाने त्वचारोग बरे होतात असाही एक समज आहे.

            जानकीचट्टी पर्यंतच वाहनं जाऊ शकतात. त्यापुढे यमुनोत्री मंदिरापर्यंत जाण्यासाठी ६ किमीची अवघड चढाई पार करावी लागते. पहाडाला विळखा घालत जाणारा वळणदार आणि अरुंद असा हा मार्ग आहे. एका बाजूला पहाड तर दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्यातून शुभ्र खळखळाट करत वहाणारी यमुना नदी असा सुंदर पण थोडासा भीतीदायक रस्ता आहे. त्यामुळे चढता-उतरताना अतिशय सांभाळून चालावं लागतं. ज्यांना पूर्ण चढून जाणं शक्य नसतं त्यांच्या साठी घोडा, डोली किंवा पिठ्ठूची सोय उपलब्ध आहे. 

            आम्ही चालतच जायचं ठरवलं. सुरुवातीला सहज सोपी वाटणारी चढाई थोड्या वेळातच आपलं खरं स्वरूप दाखवते. पण तोपर्यंत आपण चालायला सुरुवात केलेली असते. त्या अरुंद रस्त्यावरुन एकाच वेळी पायी चालणारे, डोलीवाले, घोडे, पिट्ठू हे चालत असतात. त्यातून मार्ग काढत चालणं त्रासदायकच असतं. अतिशय खडी अशी चढाई चढताना हळूहळू ऑक्सिजनची पातळी कमी होत असते. त्यामुळे जास्तच दमछाक होते. आम्ही सकाळी लवकरच चालायला सुरुवात केली होती. तेव्हा वातावरण आल्हाददायक होतं. कोवळं उन, धुकं असा खेळ सुरु होता. नंतर मात्र आम्हाला चढाई दमवू लागली. थांबत थांबतच आमचं चालणं सुरु होतं. इथे रस्ता सतत चढावाचा आणि उंचसखल पायऱ्यांचा आहे. आम्हाला गिरनार पर्वत चढण्या- उतरण्याचा सराव असूनही यमुनोत्रीची चढाई अतिशय थकवणारी होती. 

            एका क्षणी माझ्यापुढे चालत असलेला एक घोडा चढताना घसरला आणि तो स्वताला सावरु न शकल्याने त्यावर बसलेल्या मुलीसह माझ्या पायाशी कोसळला. मी कसाबसा माझा तोल सावरला अन्यथा त्या घोड्याबरोबरच मी आणि माझ्या मागे चालणारी १-२ लोकं असे सगळेच जोरदार धडपडलो असतो. सुदैवाने घोडा लगेच उठला आणि त्यावरुन पडलेल्या मुलीलाही फारशी दुखापत झाली नाही. यानंतर आम्ही फारच काळजी घेत चालायला सुरुवात केली. थोडंस चालून पुढे गेलो आणि पुन्हा एकदा काळजी वाटावी अशी घटना घडली. चढावाचा रस्ता जिथे वळतो तिथे कोनात रेलिंग नाहीय. चालणाऱा माणूस तोल जाऊन वरुन खालच्या रस्त्यावर सहज पडू शकतो. नेमकं तसंच झालं. वरच्या रस्त्यावर चालणाऱ्या एका महिलेला घोड्याचा जोरदार धक्का लागला आणि तिला तोल सावरता न आल्याने ती वरुन खाली अगदी माझ्या मागे जोरात पाठीवर पडली. ती स्वता उठूच शकली नाही. लोकांनी तिला उचलून बाजूला घेतलं. तिला तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज होती. ती महिला पडली आणि तिच्या थोडं मागे चालत असलेला हा पण धडपडला. मी खालूनच त्याला आधार द्यायचा प्रयत्न केला आणि तो कसाबसा सावरला. खूपच सांभाळून चालत असूनही अशा घटना घडत असतात. 

            हे असे अनुभव घेत , थांबत थांबत अखेर एकदाचे आम्ही मंदिरात पोहोचलो. सारी चढाई पूर्ण करुन मंदिरात पोहोचायला आम्हाला जवळपास ५ तास लागले होते. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि मन प्रसन्न झालं. क्षणात सारा थकवा नाहीसा झाला. यमुनेचं, सूर्यकुंडाचं दर्शन घेतलं. यमुनेचा खळाळता जलप्रपात पाहिला. यमुना जल बाटलीत भरुन घेतलं आणि सारे परतीच्या मार्गाला लागलो.

            परतीचा मार्ग उताराचा असल्याने थोडा सोपा होता. मात्र आम्ही चालायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे मार्गावर चिखल निर्माण झाला आणि आमची चाल आपसूकच मंदावली. कारण त्या चिखलात घसरुन पडण्याची भीती होती. साधारण दिड तासानंतर पाऊस थांबला आणि चालणं थोडं सुकर झालं. एकूण साडेतीन तासात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. जानकीचट्टी ला पोहोचून पून्हा गाडीने बारकोटला मुक्कामी परत आलो. यमुनोत्री ची अवघड चढाई पायी पूर्ण करुन आल्याने सारे अतिशय थकलो होतो. जेमतेम जेवून लगेचच निद्राधीन झालो.

            दिवस चौथा - आदल्या दिवशी सगळेच अतिशय दमल्याने सकाळी जरा आरामात आवरुन उत्तरकाशीकडे प्रयाण केलं. वाहनकोंडी हा तिथला नित्याचाच भाग असल्याने उत्तरकाशीला पोहोचायलाही दुपार उलटून गेली. रुमवर पोहोचलो आणि पावसाला सुरुवात झाली. पाऊस थांबल्यावर सायंकाळी उशिरा थोडं जवळपास फिरुन आलो. रात्री जेवून लगेचच निद्राधीन झालो. कारण दुसऱ्या दिवशी परत लवकरच प्रवासाला सुरुवात करायची होती. 

            दिवस पाचवा - पहाटे लवकरच आवरुन आम्ही गंगोत्री या दुसऱ्या धामाच्या दर्शनासाठी प्रस्थान केलं. आमचा मार्ग हर्शिल या उत्तराखंड मधील अजून एका प्रसिद्ध पर्यटनस्थळावरुन जात होता. पण आधी गंगोत्री दर्शन करायचं असल्याने जाताना कुठेही स्थळदर्शनसाठी थांबलो नाही.

            गंगोत्री हे चारधाम मधील दुसरं धाम. राजा भगिरथाने या स्थानी आपल्या पूर्वजांना पापमुक्ती मिळावी म्हणून कठोर तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले. आणि त्यांनी मा गंगेला पृथ्वी वर त्या स्थानी अवतीर्ण होण्यास सांगितलं. गंगेच्या तीव्र आणि प्रचंड धारांना नियंत्रित करण्यासाठी भगवान शिवांनी तिला आपल्या मस्तकावरील जटेत धारण केलं आणि मग गंगा भागीरथी या नावानं गंगोत्री ला प्रकट झाली. इथल्या मंदिराची निर्मिती १८ व्या शतकात नेपाळचे महाराजा अमरसिंह थापा यांनी केलीय. त्यानंतर देवी गंगेची मूर्ती शंकराचार्य यांनी स्थापन केली. या मूर्ती बरोबरच इथे सरस्वती , यमुना, भगीरथ आणि शंकराचार्य यांच्याही मूर्त्या इथे स्थापित केल्या आहेत. गंगा नदीचं उगमस्थान म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे. पूर्वाभिमुख असं हे मंदिर शुभ्र संगमरवरी दगडातून घडवण्यात आलं आहे .

           या मंदिरापर्यंत वाहनानं जाता येतं. अगदी थोडंसं सरळ साध्या रस्त्याने चालावं लागतं. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि तिथे  उपस्थित असलेल्यांपैकी एका पंडितजीना भेटलो. त्यांच्या कडून गंगापूजन करायचं ठरवलं आणि आम्ही घाटावर आलो. यमुनोत्री प्रमाणेच गंगोत्रीलाही बर्फाचं अत्यंत थंडगार पाणी असल्याने इथंही स्नान करणं अशक्य होतं. म्हणून मग पाण्यात उतरुन हातपाय धुवून मार्जन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे पाण्यात पाऊल टाकलं आणि बर्फाच्या पाण्याच्या स्पर्शाने पावलं सुन्नबधीर झाली. जेमतेम ५-१० मिनीटं पाण्यात थांबून हातपाय धुवून मार्जन करुन गंगाजल बाटलीत भरुन घेऊन वर आलो. तोपर्यंत पंडितजीनी पूजेची तयारी केली होती. घाटावर येऊन सारे पुजेला बसलो. बाटलीत भरुन घेतलेल्या गंगाजलाचं पूजन आणि पितृतर्पण केलं. साग्रसंगीत पूजा करुन प्रसन्न मनाने मंदिरात दर्शन घेण्यासाठी साठी रांगेत उभं राहिलो. थोड्याच वेळात रांगेतून मंदिरात पोहोचलो. मी गंगामैयासमोर नतमस्तक झाले. अन लगेच तिथल्या पंडितजीनी मला प्रसाद म्हणून चार बांगड्या दिल्या आणि माझ्या डोळ्यात पाणी तरळलं. माझी सेवा प्रार्थना गंगामैयापर्यंत पोहोचल्याची प्रत्यक्ष अनूभूती मला मिळाली होती. कारण क्वचितच असा प्रसाद तिथे दिला जातो. 

           दर्शन घेऊन आम्ही परत उत्तरकाशीला आमच्या मुक्कामी परत निघालो. वाटेत हर्शिल या पर्यटनस्थळी थांबून स्थलदर्शन करत, दाट हिरव्यागार जंगलाचं नेत्रसुख घेत उत्तरकाशीला पोहोचलो. पोहोचायला नेहमीप्रमाणे रात्र झालीच होती. दुसऱ्या दिवशी परत पहाटे निघायचं होतंच.

            एकूणच आमचा सारा प्रवास धावपळीचाच होता. रात्री उशिरा मुक्कामी पोहोचायचं आणि पहाटे लवकर प्रवास सुरु करायचा असंच सारखं सुरु होतं. मात्र कुठेही प्रवास कंटाळवाणा झाला नाही. याला कारण उत्तराखंडचं अतिशय सुंदर, असं निसर्ग सौंदर्य. जणू आभाळाशी स्पर्धा करणारे उंचच उंच बेलाग पर्वत आणि त्यांच्या पायथ्याला बिलगलेली शुभ्र खळखळाट करणारी सरिता आणि मधून जाणारा अतिशय नागमोडी वळणदार असा रस्ता. इतकं अप्रतिम निसर्गसौंदर्य असल्याने प्रवासही अगदी हवाहवासा वाटत होता. चारधामच्या संपूर्ण प्रवासात कधी यमुना, कधी गंगा ,कधी मंदाकिनी तर कधी अलकनंदा या सुंदर सरितांची साथ आपल्याला मिळत असते. 

क्रमशः

- स्नेहल मोडक








कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...