Pages

Wednesday, February 4, 2026

माघ पौर्णिमा

             माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म्हणजेच १ फेब्रुवारीला 'गिरनार' दर्शनासाठी जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं ३१ जानेवारीला दुपारी आम्ही प्रवासाला सुरुवात केली.

            १ फेब्रुवारीला भल्या पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षानं तलेटीला मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. आदल्या दिवशी प्रवासातच १ तारखेलाच गिरनारला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याचं कळलं होतं. त्यासाठी ३१ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून ते १ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत गिरनारच्या पायऱ्या चढून दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. ही स्पर्धा पहिल्या पायरीपासून अंबाजी मंदिर ते परत पहिली पायरी अशी असल्यानं भाविकांना या काळात पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश नव्हता. त्यामुळं साहजिकच रोप वे साठी प्रचंड गर्दी झाली होती. खरंतर दर पौर्णिमेला उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढतच आहे. आणि याच दिवशी मॅरेथॉन आयोजित करुन भाविकांना पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश बंदी करणं हे अगदी त्रासदायक आहे. यापूर्वीही पौर्णिमेलाच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा गोष्टींचा भाविकांना नक्कीच त्रास होतो. आम्ही त्या गर्दीतून रांगेतूनच साधारण पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर रोपवे नं अंबाजी मंदिरापर्यंत पोहचलो. अंबा मातेचं दर्शन घेऊन पुढे गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरु शिखरावर निघालो. गर्दी प्रचंड होती तरी भाविक एकत्र समुहानं वर चढत असल्यानं दर्शनाला रांग नव्हती. 

            मंदिरातले भाविक दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुदैवानं त्यावेळी मंदिरात आमच्यासह आणि २-३ भाविकच होते. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकांसमोर नतमस्तक होऊन आम्हाला पादुकांसमोरच दिड दोन मिनिटं शांत बसायला मिळालं. लगेचच भाविक दर्शनासाठी आल्यानं लगेच उठलोच. पण ती दिड दोन मिनिटं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती. वाढत्या गर्दीमुळं पौर्णिमेला दर्शन जरी छान होत असलं तरी तिथं बसायला मिळणं अवघड असतं. दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन वाचन करुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवेनं पायथ्याशी पोहोचलो. 

            यावेळी नेहमीप्रमाणं सोरटी सोमनाथच्या दर्शनाला न जाता दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं लगेच दुपारी एक वाजता कारने निघालो. मला जिथं जायचं होतं तिथं आधी बाकी तिघंही आधी जाऊन आले होते. मात्र माझा योग आता आला होता.

             'जांबुवंत गुहा' - जूनागढ पासून १०५ किमी अंतरावर आणि पोरबंदर पासून १७ किमी अंतरावर असलेली ही गुहा पौराणिक, धार्मिक आणि पुरातत्वीयऋ दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. 'पोरबंदर' मधील 'राणावाव' तालुक्यातील 'आदित्याणा' गावाजवळ प्रसिद्ध 'बरडा टेकड्यां'च्या पायथ्याशी ही गुहा आहे. ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. जमिनीवरुन पाहताना एखादी छोटी विहिर असल्यासारखं भासतं. आत उतरण्यासाठी एका खांबाभोवती गोल फिरणाऱ्या अगदी अरुंद दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरताना आधारासाठी मजबूत दोर बांधला आहे. या गुहेत छतामधून सतत टपकणाऱ्या पाण्यामुळं नैसर्गिक रितीनं शिवलिंग तयार झाली आहेत. अजूननही ही निर्मिती सुरुच आहे. यातलं 'पाताळेश्र्वर' हे नैसर्गिक रितीनं तयार झालेलं एकमेव असं 'रुद्राक्ष शिवलिंग' आहे. 'अमरनाथ' ला जसं 'बर्फाचं स्वयंभु शिवलिंग' तयार होतं तसंच हे 'स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग' इथं तयार झालं आहे. जांबुवंतानं भगवान शिवांसाठी इथं तपश्चर्या केली होती. त्यामुळं इथं स्वयंभू शिवलिंग तयार होतात. या सर्व शिवलिंगावर गुहेच्या छतातून नैसर्गिकपणे सतत जलाभिषेक होत असतो. अतिशय भव्य आणि लांबलचक अशा या गुहेत दोन बोगदे आहेत. त्यातला एक बोगदा जूनागढला पोहोचतो आणि दुसरा द्वारकेला पोहोचतो. मात्र आता काही अंतरावर ते बुजले आहेत. नैसर्गिक हवा आणि प्रकाशासाठी गुहेत दोन मोठे झरोके आहेत. जमिनीवरुन खाली एवढी मोठी गुहा असेल याची तिळमात्रही कल्पना येत नाही. 

            'भगवान श्रीकृष्ण' आणि वानरांचा 'राजा जांबुवंत' यांच्यात 'स्यमंतक मण्या'साठी २८ दिवस युद्ध चाललं होतं ते स्थान म्हणजे ही गुहा. अर्थातच 'जांबुवंतां'चा या युद्धात पराजय झाला होता. पण जेव्हा त्यांना कळलं की प्रत्यक्ष 'भगवान श्रीकृष्ण' आपल्या बरोबर युद्ध करत होते तेव्हा त्यांनी ते 'रत्न' म्हणजे 'स्यमंतक मणी' तर 'श्रीकृष्णांना' दिलाच पण त्याचबरोबर आपली कन्या 'जांबुवंती' हिचा विवाहही श्रीकृष्णाबरोबर केला. जांबुवंत हे 'प्रभू श्रीरामां' च्या वानरसेनेचे सेनापती होते पण त्यांना युद्धात सहभागी होता आलं नव्हतं आणि त्याची खंत त्यांना होती म्हणून 'प्रभू श्रीरामां'नी त्यांना 'मी पुढील 'श्रीकृष्ण' अवतारात तुझ्याशी युद्ध करेन' असा आशीर्वाद दिला होता. 'राजा सत्यजिता'नं 'सूर्यदेवा'ची आराधना आणि तपश्चर्या केली होती तेव्हा 'सूर्या'नं त्यांना 'स्यमंतक मणी' प्रसाद म्हणून दिला होता. तो त्याच्या भावाने पळवला पण सिंहाच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी सिंहाला हरवून जांबुवंतानं तो मणी हस्तगत केला होता. आणि या मण्यासाठीच इथं हे युद्ध झालं होतं. 

          या गुहेतील खडक आणि पायाखालची माती मध्ये मध्ये सोन्यासारखी चमकते. याच कारण पुरातत्व विभागाच्या दृष्टीनं इथं नैसर्गिक खनिजं आणि 'बाॅक्साईट' चं प्रमाण जास्त आहे. ही गुहा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळं इथून माती किंवा इतर कुठलीही वस्तू नेण्यासाठी परवानगी नाही. 

            आम्ही गुहेत उतरण्याआधीच किमान २०-२५ जणं गुहेत उतरले होते. पण गुहा अतिशय प्रशस्त आणि लांबलचक असल्यानं गर्दीचा त्रास नव्हता. १०-१५ मिनीटातच ते सारे गुहेतून बाहेर पडले. आम्ही गुहेत उतरलो तेव्हाच गुहा पहायला गुजरातचे एक मोठे वन अधिकारी आणि त्यांच्या बरोबर एक माहितगार पोलीस असे दोघं आले होते. त्यांच्याशी गुहेच्या पौराणिक कथेबद्दल, गुहेत तयार होणाऱ्या शिवलिंगांबद्दल आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल बोलणं झालं. ते दोघं सारं पाहून बाहेर गेले आणि आम्ही चौघंच तिथं राहिलो. मग परत नीटपणे सारी गुहा पाहून, परत 'पाषाणेश्वरा'चं दर्शन घेऊन, तिथली अपार शांतता अनुभवून, सारी शिवलिंग पाहून एक वेगळीच अनुभूती घेऊन आम्ही गुहेतून बाहेर आलो.  ही गुहा वर्षभरात सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत कधीही पहाता येते. 

            'श्रीहरी मंदिर' - 'पोरबंदर' मधलं हे अजून एक सुंदर स्थान. जांबुवंत गुहेपासून १८ किमी अंतरावर आणि पोरबंदर विमानतळापासून ४-५ किमी. अंतरावर हे मंदिर आहे. 'श्रीहरी मंदिर' हे 'सांदिपनी विद्यानिकेतन' म्हणूनही ओळखले जाते. सुप्रसिद्ध भागवताचार्य 'रमेशभाई ओझा' यांच्या प्रेरणेतून  मंदिर उभारण्यात आलं आहे. २००६ साली याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अतिशय अवाढव्य परिसरात भव्य मंदिर आणि बगिचा तयार केला आहे. भगवान श्रीकृष्णांना हे मंदिर समर्पित आहे. मंदिरात राधा कृष्ण, शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, गणपती, हनुमान, सूर्य नारायण, माता करुणामयी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत आहेत. अतिशय भव्य असं हे मंदिर संकुल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या बाजूलाच सांदिपनी संस्कृत विद्यापीठ आहे. एकूण सारा परिसर आणि मंदिर दर्शन चित्तवृत्ती प्रसन्न करणारं आहे. 

            'जांबुवंत गुहा' आणि 'श्रीहरी मंदिर' पाहून आम्ही परत तलेटीला मुक्कामी गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळीच 'भवनाथ महादेवा'च्या मंदिरात गेलो. सुंदर दर्शन घडलं. येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या आवारात जोरदार तयारी सुरु होती. या मंदिराच्या आवारात असलेलं मृगी कुंड अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं आहे. याच कुंडात महाशिवरात्रीला अनेक नागा साधू, संत स्नानासाठी उतरतात मात्र त्यातील एक साधू परत कुंडाबाहेर येत नाही. ते स्वयं भगवान शिव असतात अशी मान्यता आहे. 

            भवनाथाचं दर्शन घेऊन मुक्काम सोडून दुपारच्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.

- स्नेहल मोडक




    





Friday, January 30, 2026

स्पर्श

स्पर्श होताच पावलांस जळाचा

शिरशिरी हलकेच तनुवरी उठते 

स्पर्श होताच वीणेस अंगुलीचा

सप्तसूरात सुमधुर ती झंकारते

स्पर्श होताच कलिकेस वाऱ्याचा

अलवार मधुगंधी सुमन उमलते

स्पर्श होताच रंगास कुंचल्याचा

सुरेख सप्तरंगी रचना साकारते

स्पर्श होताच शब्दांस भावनांचा

तरल मनभावन कविता उमलते

स्पर्श होताच मनास ईशभक्तीचा

आयुष्याचे सहजच सार्थक होते

- स्नेहल मोडक

Wednesday, January 7, 2026

प्रारंभ

            नवीन वर्षाचा प्रारंभ 'श्री दत्तगुरुं'च्या दर्शनानं करायचा असं यावर्षीही मनात होतं. अर्थातच त्यासाठी 'गिरनार'ला जायचा विचार होता. मात्र यावेळी पौर्णिमेला 'माउंट अबू'च्या गुरु शिखरावर दर्शनाला येण्याचा आदेश मिळाला आणि मग 'माउंट अबू'ला जायचं नक्की केलं. गतवर्षी प्रमाणं अहमदाबाद पर्यंत रेल्वे आणि तिथून पुढे गाडी असंच जायचं ठरवलं.

          ठरवल्या प्रमाणं एक जानेवारीला सायंकाळी 'अहमदाबाद' ला पोहोचण्यासाठी प्रवासाला सुरुवात केली. दोन तारखेला भल्या पहाटे आम्ही अहमदाबादला पोहोचलो. गाडी यायला थोडा वेळ होता. मग तिथल्या कडाक्याच्या थंडीत वाफाळत्या चहाचा आस्वाद घेत गप्पा मारत बसलो. काही वेळानं गाडी आली आणि आमचा पुढला प्रवास सुरु झाला. 

          आमच्या बरोबर असलेल्या याच्या एका मित्राला प्रवासाच्या मार्गावरच्या त्यांच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. यापूर्वीही आम्ही या मंदिरात जाऊन आलो होतो. यावेळीही परत जायच असल्यानं त्या दर्शनाबरोबरच अजून एका स्थानी जायची मला संधीच मिळाली. अर्थात इथंही आम्ही अधेमधे जात असतोच. पण यावेळी आम्ही अगदी योग्य वेळी तिथं पोहोचणार होतो. त्यामुळं वाटेत कुठंही न थांबता आम्ही थेट तिथेच गेलो.

             'सूर्य मंदीर - मोढेरा' 'अहमदाबाद' पासून १०० किमी. अंतरावर असलेलं अतिशय पुरातन म्हणजे ११ व्या शतकातलं सूर्य मंदीर. 'मेहसाणा' 'जिल्ह्यात पुष्पावती' नदी तीरावर वसलेलं अतिशय प्राचीन आणि स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. 'चालुक्य राजा भीम पहिला' यांनी इसवी सन १०२६-२७ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. 'स्कंद' पुराणात 'मोढेरा' गावाजवळच्या भागाला रामायण काळात 'धर्मारण्य' असं संबोधलं जायचं. 'रावणाचा' वध केल्यावर ब्रम्हहत्येच्या पातकातून मुक्त होण्यासाठी काय करावं असं 'प्रभू श्रीरामां'नी 'गुरु वसिष्ठ' यांना विचारलं. त्यावेळी 'गुरु वसिष्ठ' यांनी धर्मारण्यात जाऊन यज्ञ करण्यास सांगितलं. त्याप्रमाणं प्रभू श्रीराम आणि सीता यांनी तिथं यज्ञ करुन 'मोढेरक' गावाची स्थापना केली. तेच नंतर मोढेरा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

            इथं प्रवेश करताच प्रथम समोर येतो तो जलाशय. अतिशय प्रशस्त आणि अप्रतिम असं हे कुंड पायऱ्यांनी बांधलेल्या विहिरीसारखं असल्यानं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. याला 'रामकुंड' किंवा 'सूर्यकुंड' म्हणून ओळखलं जातं. याच्या चारही बाजूंनी पायऱ्यांवर विविध देवतांची १०८ छोटी छोटी मंदिरं आहेत. 

          त्यापुढे दिसतो तो 'सभामंडप'. ५२ खांबावर उभ्या आणि अप्रतिम शिल्पकलेनं नटलेल्या या सभामंडपाला चारही बाजूंनी प्रवेशद्वारं आहेत. सभागृहाला आधार देणारे ५२ खांब म्हणजे ५२ आठवड्यांचं प्रतिक आहेत. 

          यानंतर आपण प्रवेश करतो तो 'गूढ मंडप'. गूढ मंडपाच्या बाहेरील भिंतींवर सूर्य देवाच्या १२ प्रतिमा, विश्वकर्मा, गणेश, सरस्वती,अग्नी आणि अष्ट दिक्पाल  कोरलेले आहेत. गूढ मंडपाला तीन खिडक्या असून त्यातून विशिष्ट दिवशी सूर्यकिरणं आत असलेल्या सूर्य देवाच्या मूर्तीवर पडतात. मात्र आता इथं मूर्ती नाही. 

             आम्ही इथं पोहोचलो तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. सारं मंदिर, रामकुंड आणि बाजूला असलेली प्रशस्त बाग सारंच  सुंदर अशा सोनकिरणात उजळलं होतं. अत्यंत नयनरम्य दृश्य दिसत होतं. सोनकिरणांमधे सारं मंदिर सुवर्णमंदिर असल्यासारखं भासत होतं. अगदी योग्य वेळी आम्ही तिथं पोहोचलो होतो. यापूर्वीही तिथं जाऊन आलो असल्यानं सारा परिसर माहित होता. पण सूर्योदयाच्या वेळचा नजारा अप्रतिम, मंत्रमुग्ध करणाराच होता. २०२६ हे वर्ष ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देवाचं वर्ष आहे. नियमित सूर्योपासना, पूजा, मंत्रजप हे या वर्षी अधिक फलदायी ठरणार आहे. त्यामुळं वर्षारंभीच सूर्य मंदीरात जाण्याचा आलेला योग आमच्यासाठी महत्वाचा होता.

               सूर्य मंदीर बघून आम्ही पुढं 'देलमाल' गावातील 'लिंबजा देवी'चं दर्शन घ्यायला गेलो. हे मंदिर ही पुरातन म्हणजे सूर्य मंदीराच्या आसपासच्या काळातलं आहे. इथंही मंदिरावर अप्रतिम शिल्पकला पहायला मिळते. इथलं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला त्या मंदिरातच्या पंडितजीनी जवळच असलेल्या त्यांच्या घरी नेलं. आणि इथं एक वेगळाच वृक्ष आम्हाला पहायला मिळाला. 'मिसवाक ट्री' किंवा 'पिलू' या नावानं हा वृक्ष ओळखला जातो. खूप मोठ्या, रुंद घेराचं खोड असलेल्या या वृक्षाच्या फांद्या मात्र वेलीसारख्या जमिनीकडे झेपावणाऱ्या असतात. याला अतिशय नाजूक अगदी छोटीशी फिकट पारदर्शी गुलाबी रंगाची फळं येतात. हे पक्ष्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे. आणि या झाडाच्या फांद्यांचा उपयोग दात घासण्यासाठी करतात. या झाडात नैसर्गिकरीत्या ॲण्टी बॅक्टेरिअल आणि ॲण्टी सेप्टिक गुणधर्म असतात. जे दातांना चमक देतात, किड आणि हिरड्यांचे आजार टाळतात. याचमुळं याला 'टुथब्रश ट्री' म्हणूनही ओळखतात. या वृक्षाची माहिती घेऊन, पंडितजींबरोबर थोड्या गप्पा मारुन आम्ही पुढे निघालो. वाटेत नाश्ता करुन दुपारी सव्वा तीन वाजता 'माउंट अबू'ला आमच्या मुक्कामी पोहोचलो.

                रुमवर पोहोचून सारं आवरुन जेवून फिरायला निघालो. सर्वांत आधी आम्ही गेलो देवीच्या दर्शनासाठी. 'अर्बुदा देवी' -  देवीच्या ५१ शक्तीपीठांमधलं एक शक्तीपीठ. 'सती माते'चे या स्थानी अधर (ओठ) पडल्यानं हे स्थान 'अधर देवी' किंवा 'अर्बुदा देवी' म्हणून ओळखलं जातं. साधारण ४०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण मंदिरात प्रवेश करतो. इथं दर्शन घेऊन थोडावेळ थांबून आम्ही परत खाली उतरलो. तोपर्यंत सांजसावल्या वाढू लागल्या होत्या . मग लगेच तिथून 'अचलेश्वर महादेवा'च्या मंदिरात गेलो. इथं शिवलिंग नसून 'भगवान शिवा'च्या पायाचा अंगठा आहे त्याचीच पूजा केली जाते. याच अंगठ्यावर 'माउंट अबू' पर्वत ' भगवान महादेवांनी' तोलून धरला आहे अशी मान्यता आहे. 'भगवान परशुराम' यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. या अंगठ्याचा रंग दिवसातून तीनदा बदलतो अशी आख्यायिका आहे. मंदिरात फारशी गर्दी नसल्यानं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे 'नक्की तलाव' बघायला गेलो. तोपर्यंत गडद अंधारलं होतं. वीज दिव्यांच्या प्रकाशात 'नक्की तलावा'चं पाणी चमचमत होतं. 'राजस्थान'मधला सर्वात उंचावरचा हा गोड्या पाण्याचा तलाव आहे. राजकन्येशी विवाह करण्यासाठी 'रसिया बालम' नावाच्या एका तरुणानं हा तलाव नखांनी एका रात्रीत खोदला होता अशी कथा आहे. सुंदर निसर्ग आणि नौकानयन यासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. इथं थोडं फिरुन जेवून रात्री मुक्कामी परतलो. कडाक्याची थंडी होती तिथं. रात्री तर तापमानाचा पारा फारच खाली घसरला होता. अतिशय सुंदर वातावरण होतं. 

    ‌             दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला म्हणजेच तीन तारखेला भल्या पहाटे सारी आन्हिकं आवरुन गाडीनं आम्ही गुरु शिखरावर निघालो. हा संपूर्ण मार्ग अतिशय चढावाचा आणि घाटदार वळणांचा आहे. शिखराच्या पायथ्यपर्यंत गाडीनं जाता येतं. पायथ्याशी उतरुन साधारण ५०-६० पायऱ्या चढल्यावर आधी 'श्री दत्तात्रेयांचं' मंदिर आहे. इथं छोट्याशा गुहेत 'श्री दत्तात्रेयांची' मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. आणि थोडं बाजूलाच अखंड धुनी आहे. तिथूनच पुढं जवळपास अडिचशे पायऱ्या चढून वर चरण पादुका आहेत. हे अगदी छोटंसं मंदिर आहे. मात्र एकूण मंदिर परिसर मोठा आहे. 

              आम्ही शिखरावर पोहोचत असतानाच  कनकगोल‌ अवतरला. आणि क्षितीजावर एक अत्यंत नयनरम्य, विहंगम असं दृश्य निर्माण झालं. चालत्या गाडीतून वृक्षवल्लींच्या आडून आम्हाला हे दृश्य मधेमधे दिसत होतं. शिखराच्या पायथ्याशी गाडी पोचली आणि आम्ही गाडीतून उतरुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. जसजसं आम्ही वर जात होतो तसतसं क्षितीजावर दिसणारं दृश्य अधिकच मोहवत होतं. आम्ही आधी शिखरावर चरण पादुकांचं दर्शन घ्यायला पोहोचलो आणि अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन पहातच राहिलो. अद्भुत, अवर्णनीय असं दृश्य होतं. 'रवीराजा'ची लखलखती सोनकिरणं क्षितीज रेषेवर पसरुन केशरजळासारखा एक वेगळाच आभास निर्माण झाला होता. गिरनारलाही नेहमी सूर्योदयाला केशर पिवळी क्षितीज रेषा दिसते. पण इथलं दृश्य अतिशय वेगळं, शब्दात व्यक्त न करता येणारं असं होतं. काही क्षणांनी भानावर येऊन चरण पादुकांचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिराजवळ गेले आणि पून्हा एकवार थक्क झाले. स्वयं 'सूर्य नारायण' आपल्या किरणांनी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांवर अभिषेक करत होते. पून्हा एकदा मी नि:शब्द. प्राचीन काळातील स्थापत्यकार किती ज्ञानी होते हे पून्हा जाणवलं. कुठलीही विशेष साधनं नसताना अभ्यास करुन त्यांनी अशी मंदिर रचना केली आहे की ठराविक काळात सूर्य किरणं तिथल्या मूर्तीवर पोहोचतात. बरीच मंदिरं अशा पध्दतीनं बांधण्यात आली आहेत. चरण पादुकांसमोर नतमस्तक होताना साहजिकच डोळे पाणावलेच. दर्शन प्रसाद घेऊन मंदिराच्या आवारात थांबून त्या नयनरम्य दृश्याचं छायाचित्रण केलं. खरंतर तिथून निघायची बिलकुल इच्छा नव्हती. पण वेळेचं बंधन असल्यानं नाइलाज होता. तिथून खाली उतरुन श्री दत्तात्रेयांच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेऊन तिथंच बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. आणि अखंड धुनीचं दर्शन घेऊन पायथ्याशी पोहोचलो. गाडीने लगेच मुक्कामी जाऊन सामान घेऊन मुक्काम सोडून निघालो. 

                परत एकदा 'नक्की तलावा' जवळ गेलो. थोडं फिरुन नाश्ता करुन निघालो. परतीच्या प्रवासात अजून एक मंदिर दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यामुळं आधी तिथंच गेलो. 

                 'अंबाजी माता मंदिर' - 'राजस्थान' आणि 'गुजरात' राज्याच्या सीमेवर बनासकांठा या तालुक्यात अरावली पर्वत रांगेतील एका डोंगरावर हे 'अंबा माते'चं शक्तीपीठ आहे. माउंट अबू पासून ४५ किमी अंतरावर हे मंदिर आहे. इथं 'सती मातेचं' हृदय पडलं होतं. इथं मूर्तीची नाही तर 'श्रीयंत्रा'ची पूजा केली जाते. गर्भगृहात एक ज्योत अखंड तेवत असते. त्याचीही पूजा केली जाते. मंदिरात जाण्यासाठी ९९९ पायऱ्या चढायला लागतात. मात्र रोप वे ची सुविधा उपलब्ध आहे. आम्ही इथं पोहोचण्याआधी रोप वे ची ऑनलाईन तिकिटं काढायचा प्रयत्न केला पण ती सुविधा बंद होती. त्यामुळं मंदिराच्या पायथ्याशी पोहोचून तिकीटं काढायचं ठरवलं. प्रत्यक्षात तिथं तिकिटासाठी आणि वर दर्शनासाठी अफाट गर्दी होती. पण आम्ही गुजरात दर्शन ची तिकिटं काढणार असल्यानं ती लगेच मिळाली. आणि प्रचंड मोठी रांग असूनही १० मिनिटांतच रोपवेनं वरतीही जायला मिळालं. दर्शनासाठीही भलीमोठी रांग होती त्या रांगेत उभं राहून अखेर प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला. 'अंबा मातेचं' ज्योती स्वरुपातलं अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. त्याच रांगेतून बाजूच्या 'श्रीयंत्रा'चं दर्शन घेतलं. थोडावेळ थांबून रोपवेनं परत पायथ्याशी पोहोचलो. तोपर्यंत फक्त पौर्णिमा म्हणून एवढी अफाट गर्दी आहे असंच आम्हाला वाटत होतं मात्र पायथ्याशी आल्यावर कळलं त्याचदिवशी 'अंबा मातेचा' जन्मसोहळा होता. त्याच दिवशी आम्हाला तिच्या दर्शनाचा योग आला म्हणून खूपच आनंद झाला. पायथ्याशी मात्र प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच देवीची खूप मोठी मिरवणूक सुरु होती. किमान तासभर आम्ही त्या वाहतूक कोंडींत अडकलो होतो. नंतर वाहतूक सुरळीत झाली आणि आम्ही पुढे निघालो. रात्री जेवून अहमदाबाद स्टेशन वर जाऊन बसलो. रात्री उशिराची ट्रेन असल्यानं बराच वेळ थांबणं भाग होतं. अखेर ट्रेन वेळेत आली आणि आम्ही घरी परत निघालो.  

            वर्षारंभीच आम्हाला सूर्य मंदीर, लिंबजा देवी',श्री दत्तात्रेय गुरु शिखर, अचलेश्वर महादेव आणि दोन शक्तीपीठं एवढी सारी दर्शनं घडली आणि अगदी प्रसन्न चित्तानं आम्ही परतलो. याचबरोबर निसर्गाचा एक अद्भुत आविष्कारही पहायला मिळाला.





    



- स्नेहल मोडक

Tuesday, December 30, 2025

वर्ष

सरेल अजून एक वर्ष पाऊलखुणा ठेवत

येईल नववर्ष आगमनाचा जल्लोष करत

काय सरलं काय उरलं मनातच स्मरुया

अन संकल्प नववर्षाचा मनाशी करुया

वस्त्र रेशमी नात्यांचं उसवलं जर किंचित 

प्रेमधाग्यात गुंफून पुन्हा जुळवूया संचित

विसरुन क्षण दुःख अन क्लेशाचे सगळे

नववर्षात करुया साजरे सुखाचे सोहळे

पुन्हा एकदा नवी आशा नवी स्वप्नं पाहुया

नवी नाती नवी मैत्री उत्साहानंच जोडूया

दुःख वेदनांचे घाव सोसले सरत्या वर्षात 

सौख्य आनंदाचे क्षण वेचुया नव्या वर्षात

देऊया निरोप मूकपणाने सरत्या वर्षाला

अन सज्ज होऊया नववर्षाच्या स्वागताला

            स्नेहल मोडक

Sunday, December 28, 2025

क्षण


काही क्षण मनाला थांबायचंय

एकांतात एकटंच बसायचंय

काही क्षण आठवांत रमायचंय

मुक्तपणे डोळ्यांना पाझरायचंय

काही क्षण कडूगोड विसरायचंय

मन अगदी रितं रितं करायचंय

काही क्षण कोरी पाटी व्हायचंय

मनासारखं सुंदर चित्र रंगवायचंय

विसरून नकोसं सारं पुढे जायचंय

नव्या अनुभवांत रममाण व्हायचंय

ऋतुंसारखं मनालाही बदलायचंय

चाफा मोगऱ्यात धुंद गंधाळायचंय

विखुरल्या शब्दांना एकत्र करायचंय

कवितेच्या गोफात सुरेख गुंफायचं 

                              स्नेहल मोडक

Monday, December 8, 2025

दत्तावधुत मठ


             यावर्षीही 'दत्तजयंती' सोहळ्यासाठी आम्ही गावाला जाणार होतो. आणि याचवेळी अजून एका मंदिरात दर्शनासाठी जायचंही ठरवलं होतं. त्यानुसार ३ डिसेंबरला भल्या पहाटे सारं आवरुन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. आणि सायंकाळी ४ वाजता आमच्या इच्छित स्थानी पोहोचलो. 
           'श्री दत्तावधुत मठ' - 'राजापूर निखरे' एक अतिशय वेगळं, दुर्मिळ असं हे मंदिर. 'राजापूर रेल्वे स्टेशन' पासून तीन किलोमीटर अंतरावर आणि 'मुंबई गोवा महामार्गावर' 'राजापूर' पासून १६/१७ किमी.वर हे मंदिर आहे. 
            'सद्गुरू श्री रामचंद्र महाराज' यांनी 'श्री स्वामीं'करीता साधनेसाठी या मठाची स्थापना केली. त्यावेळी हा मठ म्हणजे एक अगदी साधं कौलारु घरच होतं. पूजाघर आणि साधनास्थळ अशी याची रचना होती. २०१५-१६ मध्ये आलेल्या चक्रीवादळांत या मठाच्या दोन्ही बाजूला असलेले वृक्ष कोसळले. मात्र मठाचं काहीही नुकसान झालं नाही. यानंतर 'सद्गुरुंनी' या मठाचा भाविकांच्या सहाय्यानं जीर्णोद्धार केला. आणि या मठाचा ट्रस्ट नोंदणीकृतही केला. 
              या मठात नुकत्याच 'श्री दत्तात्रेय' आणि 'श्री अनघालक्ष्मी माता' यांच्या कृष्णशिळेत घडवलेल्या सात फुट उंच मूर्ती प्राणप्रतिष्ठित केल्या आहेत. 'श्री दत्तात्रेयांची' मूर्ती एकमुखी द्वीभूज असली तरीही 'ब्रम्हा' 'विष्णू' 'महेशांचं' तेजस्वी,  शांत, करुणामय रुप यात प्रकट झालं आहे. भाविकांना या तिन्ही रुपांची अनुभूती येतेच. 'अनघालक्ष्मी माता' ही 'आदिशक्ती' स्वरुप असून तिच्या मुकुटावर नाग आहे. चंद्र सूर्य कोरलेले आहेत. तराजूसह अनेक शक्तीचिन्हांनी युक्त अत्यंत रेखीव अशी ही मूर्ती आहे. मूर्तींच्या समोरच शिवपिंडीवर चरण पादुका  आहेत . या 'श्री दत्तात्रेय' आणि 'माता अनघालक्ष्मी' यांच्या दर्शनानं अध्यात्मिक स्पंदन जाणवतात. अगदी दुर्मिळ असं हे मंदिर आहे. 'पीठापूर'ला 'श्रीपाद श्रीवल्लभ' आणि 'अनघालक्ष्मी असं मंदिर आहे. पण तिथं त्रिमूर्ती दत्तात्रेय आणि ' माता अनघालक्ष्मी' अशा मूर्ती प्राणप्रतिष्ठित केल्या आहेत. या मंदिरातही दर्शनाचा योग आम्हाला आला आहे. या व्यतिरिक्त कुठेही 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी माता'  यांचं एकत्रित मंदिर नाही. 
            आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा 'अनघालक्ष्मी' मातेला वस्त्राभूषणं घालण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं आम्ही सभागृहातच १५-२० मिनिटं उभं राहून हे सारं पाहत होतो. तन मन एकाग्र करून हे सारं पाहत असताना डोळ्यात आसवांनीही दाटी केलीच. पंधरा-वीस मिनिटांनी मात्र आम्ही दर्शनाला गाभाऱ्यात येऊ का अशी विचारणा केली. कारण आमचा परतीचा प्रवासही लांबचा होता. आम्ही आत गेलो आणि 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी' यांचं अगदी जवळून दर्शन घेऊन, नतमस्तक होऊन बरोबर नेलेली ओटी, वस्त्रं आणि पेढे सारं काही अर्पण केलं. पून्हा एकवार नतमस्तक होऊन प्रसाद घेऊन तृप्त, प्रसन्न चित्तानं बाहेर आलो. किमान अर्धा तास तरी आम्ही तिथं होतो तेवढा वेळ तिथं सतत एक अध्यात्मिक उर्जा आणि आगळी अनुभूती जाणवत होती. एका साध्याशा पण दुर्मिळ अशा मंदिरात 'श्री दत्तात्रेय' आणि 'अनघालक्ष्मी' यांचं अतिशय सुंदर असं दर्शन आम्हाला घडलं ही आमच्यासाठी  भाग्याची गोष्ट होती                                                                                                                                                                                                                               
- स्नेहल मोडक

    



Monday, December 1, 2025

मासानां मार्गशीर्षोहम्

          मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा या कालावधीत 'अंबाजोगाईच्या' 'श्री योगेश्वरी देवी'चा म्हणजेच आमच्या कुलस्वामिनीचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. यावर्षी या काळात देवीच्या दर्शनासाठी जायचंच असं आम्ही आधीच ठरवलं होतं. सुरुवातीचे दोन - तीन दिवस गर्दी कमी असते. त्यामुळं उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. त्यानुसार २७ तारखेलाच सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली.

          सूर्योदयापूर्वीच प्रवास सुरु केला त्यामुळं अर्थातच हवेत छान गारवा होता. साहजिकच समृद्धी महामार्गने प्रवास अगदी उत्साहात सुरु झाला. वाटेत नाश्ता, जेवण, रसपानासाठी थांबत होतोच. पण तरीही सायंकाळी ४ वाजताच आम्ही 'परळी वैजनाथ' ला पोहोचलो. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. त्यामुळं 'परळी वैजनाथाचं' अतिशय सुंदर दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही तिथून ४ किमी. वरच असलेल्या 'डोगर तुकाई' ला गेलो. इथं 'अंबा आरोग्य भवानी' आणि 'नृसिंह सरस्वती' यांचं मंदिर आहे.  'नृसिंह सरस्वती' या स्थानी एक वर्ष गुप्त स्वरूपात राहिले होते. या मंदिरात गाभाऱ्यात 'अंबा आरोग्य भवानी'ची रेखीव मूर्ती आहे. आणि या गाभाऱ्याखालील तळघरात नृसिंह सरस्वती यांचं स्थान आहे. तळघरात जाण्यासाठी एकावेळी अगदी जेमतेम एक माणूस उतरु शकेल असा प्रवेशमार्ग आहे. नवरात्रात आम्ही इथं गेलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी मुळं हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळं आम्हाला तेव्हा नृसिंह सरस्वतींच दर्शन घडलं नव्हतं. पण यावेळी मात्र मंदिरात पुजारी आणि आम्ही पाच जणंच असल्यानं नेहमीसारखं आम्हाला खाली उतरुन 'नृसिंह सरस्वतीं'चं अगदी शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. हे सगळं फिरुन आम्ही 'अंबाजोगाई' ला निघालो. 

          अंबाजोगाईला पोहोचल्यावर मुख्य मंदिरा पासून थोड्याच अंतरावर असलेल्या 'रेणुका देवी' आणि 'मूळ जोगाई' देवी यांच्या दर्शनाला गेलो. इथंही मंदिरापर्यंत गाडी जाते. आधी 'रेणुका देवी' चं दर्शन घेऊन काही पायऱ्या खाली उतरुन 'मूळ जोगाई'चं दर्शन घेतलं. इथंही बिलकुल गर्दी नसल्यानं छान दर्शन घडलं. सायंकाळची वेळ असल्यानं मंदिराच्या मागच्या बाजूस नेहमीप्रमाणं यावेळीही दोन मोर मनमुक्त बागडताना पहायला मिळालेच. इथलं दर्शन घेऊन आम्ही तिथूनच पुढे 'बाराखांबी मंदिरा'त गेलो. उत्खननात सापडलेल्या १२ व्या शतकातील, 'यादवकालीन सेनापती खोलेश्वर' यांनी बांधलेल्या या महादेवाच्या मंदिरातही आम्ही जातोच. हे मंदिर ज्यांच्या शेतजमीनीत  सापडलं ते स्वतः तिथं सकाळ सायंकाळ पूजाअर्चा करतात. आम्ही गेलो तेव्हा ते सायंआरतीच्या तयारीच होते. मंदिरात बाकी कुणीच नव्हतं. मग आम्ही पाच जणं आणि त्यांनी मिळून छान आरती केली. दर्शन प्रसाद घेऊन त्यांच्याशी थोड्या गप्पा मारुन आम्ही मुक्कामी पोहोचलो.

          मुक्कामी पोहोचल्यावर आवरुन, ताजंतवानं होऊन जवळच असलेल्या मंदिरात 'योगेश्वरी मातेच्या' दर्शनाला गेलो. तिन्हीसांज उलटल्यानं मंदिरात गर्दी नव्हती. अगदी शांतपणे अतिशय सुंदर असं  'योगेश्वरी देवी'चं दर्शन घडलं. मातेच्या चरणी नतमस्तक होताना डोळे पाणावलेच पण मन अगदी तृप्त प्रसन्न झालं. मातेच्या कुशीत शिरल्यासारखं मन आश्वस्त झालं. थोडावेळ मंदिरात थांबून मुक्कामी परत आलो.

          दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ तारखेला पहाटे सारी आन्हिकं आवरुन लवकरच परत मंदिरात गेलो. देवीला अभिषेक करुन, ओटी, नैवेद्य अर्पण करुन अतिशय प्रसन्न मनानं परत मुक्कामी गेलो. सारं आवरुन मुक्काम सोडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

         परतीच्या प्रवासात एका अतिशय पुरातन, वेगळ्या आणि राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या एका मंदिरात जायचं आधीच ठरवलं होतं. त्यानुसार दिड पावणेदोन तासांतच आम्ही तिथं पोहोचलो. 

           'त्रिविक्रम मंदिर' - 'धाराशिव' मधल्या 'तेर' गावात असलेलं चौथ्या शतकातलं 'भगवान श्री विष्णुं' च्या‌ 'वामन' अवतारातील हे मंदिर. हे मंदिर अतिशय वेगळं म्हणजे 'चैत्य' शैलीतलं आहे. प्रशस्त असा सभामंडप आणि ५-६ पायऱ्या खाली उतरुन प्रशस्त गर्भगृह अशी याची रचना आहे. संपूर्ण सभामंडपात लाकडी खांब आणि अतिशय सुंदर असं नक्षीदार लाकडी कोरीव काम आहे. मंदिरात 'त्रिविक्रमांची' काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती विराजमान आहे. मूर्तीच्या डोक्यावर मोत्यांच्या झुमक्यांनी सुशोभित मुकुट, कानात मोठे कर्णालंकार, गळ्यात विविध हार, हातात नक्षीदार कंकणं, दंडावर बाजूबंद आणि दोन्ही कर कटीवर असं सुरेख रुप आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीचा डावा पाय वर उंचावलेला आहे. मूर्तीच्या उजव्या पायाशी 'बळीराजा', 'दैत्य गुरु शुक्राचार्य', 'बळीराजाची' पत्नी 'विद्यावली' यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. बाजूलाच 'भगवान श्री विष्णूंची' पत्नी 'रमादेवी' यांची मूर्ती आहे. इथल्या सभामंडपात 'संत गोरोबाकाका' आणि तत्कालीन संतांचा संत मेळा भरत होता. 'संत नामदेव महाराजांनी' इथं किर्तन केल्याचे पुरावे आहेत. 

           आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो, गाडी बाजूला लावली आणि गाडीतून उतरण्याआधीच बाजूला असलेल्या घराच्या जवळून एकामागोमाग एक असे पूर्ण वाढ झालेले गुबगुबीत तीन मुंगुस बाहेर येऊन आमच्या गाडीच्या समोरुन पलिकडे निघून गेले. अचानक इतके सुंदर मुंगुस पहायला मिळणं हा खूपच छान अनुभव होता. असं अचानक मुंगुसाचं दर्शन होणं हा एक शुभ संकेत मानला जातो. नंतर आम्ही मंदिरात गेलो तेव्हा तिथं आमच्याशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. त्यामुळं अतिशय शांतपणे मंदिर पहाता आलं. प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश केला समोरची त्रिविक्रमांची भव्य मूर्ती बघून भारावून गेलो. घाईगडबड करायला तिथं कुणीच नसल्यानं अगदी छान दर्शन घेता आलं. दर्शन घेऊन थोडावेळ गर्भगृहातच बसून नामस्मरण केलं. आणि प्रसन्न चित्तानं मंदिराबाहेर आलो. नेमकं त्याचवेळी तिथले एक स्थानिक गृहस्थ तिथे आले आणि मंदिराविषयी छान माहिती त्यांनी आम्हाला दिली.  

          'मासानां मार्गशीर्षोहम्' असं 'भगवान श्रीकृष्णांनी' 'भगवद्गीतेत' म्हटलय. अर्थातच 'भगवान श्रीकृष्णांचा' म्हणजेच 'भगवान विष्णूंचा' हा अत्यंत आवडता महिना. 'मोक्षदा एकादशी', 'श्री दत्त जयंती', 'देवी महालक्ष्मीचं' गुरवार व्रत अशा महत्त्वाच्या आध्यात्मिक दिवसांचा हा मार्गशीर्ष महिना. या महिन्यात केलेलं नामस्मरण, पुजाअर्चा, देवदर्शन हे अधिक शुभ फलदायी असतं. अशा या विशेष महिन्यात आम्हाला कुलस्वामिनीचं, परळी वैजनाथाचं, नृसिंह सरस्वतींचं आणि त्रिविक्रमांचं म्हणजेच श्री विष्णूंचं घडलेलं दर्शन ही आमच्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट होती. 

- स्नेहल मोडक

   



Sunday, November 16, 2025

दर्शनयोग

        खूप आधीपासून मनात असलेली एक इच्छा गुरुवारी १३ तारखेला अचानक पूर्ण झाली, आणि दत्तगुरूंच्या कृपेची पुन्हा एकदा अनुभूती आली. 'अलिबाग'-'चौल'च्या 'दत्त मंदिरात' जाण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती पण जवळच आहे कधीही जाता येईल असं म्हणून त्याला मुहूर्त मिळत नव्हता. तीन चार दिवसांपूर्वीच माझ्या मनानं परत उचल खाल्ली मी माझ्या सहचराला दत्त मंदिरात जाण्याबद्दल सांगितलं. पण तो त्याच्या गिरनार यात्रेच्या उरलेल्या कामातच व्यस्त होता, त्यामुळे सहाजिक त्यानं माझ्या सांगण्याकडं दुर्लक्ष केलं. पण बुधवारी रात्री मात्र माझ्या मनात दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे तर दर्शनाला जायचच असंच आलं आणि मी त्याला लगेच आमच्या गाडीच्या चक्रधराला संपर्क करायला सांगितलं.  सुदैवानं चालकाला दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मोकळा वेळ होता खरंतर त्याचं काही काम सुरू होतं पण ते गुरुवारी पूर्ण होणार नव्हतं त्यामुळे तो येऊ शकत होता. त्यामुळं चालकाचा होकार येताचं जायचं नक्की केलं. 

          पहाटे लवकरच सारं आवरुन आम्ही 'चौल'च्या 'दत्त' मंदिराकडे निघालो. नुकतीच थंडीला सुरुवात झाल्यानं हवेत छान गारवा होता. अशा छान वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला. वडखळला पोहोचल्यावर नाश्ता करून आम्ही पुढे निघालो. अलिबाग पासून १६ किमी अंतरावर असलेल्या चौल नाक्यापासून २ किमी आत 'भोवाळे' या निसर्गरम्य गावातील एका टेकडीवर हे 'दत्त मंदिर' आहे. या टेकडीच्या पायथ्यापर्यंत गाडीनं जाता येतं. इथून पुढं मात्र पायऱ्या चढूनच मंदिरापर्यंत पोहोचता येतं. अतिशय शांत, हिरव्यागार वनराईनं नटलेल्या या टेकडीवरच्या मंदिरात जाण्यासाठी ७००/७५० पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता 'भोवाळे' गावाच्या पुढील 'सराई' या गावातून गाडीने अजून वरपर्यंत जाता येतं. 

          आम्ही 'सराई' गावातून या टेकडीजवळ पोहोचलो. गाडीतून उतरुन काही पावलं पुढे गेलो आणि श्री स्वामी समर्थांच्या मठाजवळ पोहोचलो. पायथ्यापासून पायऱ्या चढून आल्यास हा मठ पाचशे पायऱ्यांवर डाव्या बाजूला आहे. आम्ही गाडीने तिथं पोहोचलो होतो. इथं  बाहेरुनच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. साधारण ५० पायऱ्या चढून गेल्यावर 'श्री दत्तात्रेयांचं' विश्रांती स्थान आहे. इथं सद्गुरू 'श्री बुरांडे' महाराजांचं समाधी स्थान आहे. त्यानंतर जवळपास १५० पेक्षा जास्त पायऱ्या चढल्यावर 'सत्चित आनंद साधना कुटी' आहे. नंतर काही पायऱ्या चढल्यावर 'हरे राम विश्राम धाम', 'धुनी मंदिर' आहे. ही सारी दर्शन घेत आम्ही पुढे पायऱ्या चढत होतो. यानंतर आणखी काही पायऱ्या चढल्यावर 'श्री दत्तात्रेयांच्या' मुख्य मंदिराजवळ आम्ही पोहोचलो. अतिशय पुरातन अशा १८ व्या शतकात बांधण्यात आलेल्या या मंदिराचं बाह्य दर्शनही खूप सुंदर आहे. 

           या मंदिराचा गाभारा थोडा उंचावर आहे. त्यासाठी अजून काही पायऱ्या चढून वर जावं लागतं. आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून पहात राहिलो. 'श्री दत्तात्रेयांची' अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातील चांदीचा  मुखवटा धारण केलेली षड्भुज मूर्ती आणि चांदीच्या पादुका इथं प्रतिष्ठापित केल्या आहेत. इथं आम्हाला स्वहस्ते पूजा करायला मिळाली. हार, श्रीफल, नैवेद्य सारं आम्ही स्वहस्ते अर्पण केलं. पूजा करुन मी प्रत्यक्ष पादुकांवर नतमस्तक झाले आणि त्या मृदू स्पर्शानं एक अत्यंत वेगळी अनुभूती तनमनात शिरशिरली. खूपच वेगळा सुंदर अनुभव होता तो. कितीही प्रयत्न केला तरी डोळे पाणावलेच. नैवेद्य अर्पण केल्यावर आधीपासूनच तिथं असलेल्या ४-६ श्वानांना त्यातला थोडा प्रसाद दिला. आणि आम्ही गाभाऱ्यात अगदी मूर्तीसमोरच आसनस्थ झालो. शांतपणे काही वेळ थोडं नामस्मरण, स्तोत्र पठण करुन अतिशय तृप्त मनानं आम्ही मंदिराबाहेर आलो. कुणीही कुठलीही घाईगडबड न केल्यानं शांतपणे घेता आलेलं दर्शन, स्वहस्ते करायला मिळालेली पूजा, त्यानंतरही जवळपास अर्धा तास करता आलेलं नामस्मरण या सगळ्या गोष्टींमुळे मनाला अतिशय समाधान लाभलं होतं. दर्शन घेऊन आम्ही परत पायऱ्या उतरुन खाली आलो. 'श्री स्वामी समर्थांच्या' मठात आत जाऊन छान दर्शन घेतलं. तिथून जवळच उभ्या केलेल्या गाडीने परत निघालो.

          हे दर्शन कमी वेळात झालं म्हणून आम्ही परत फिरताना अचानक 'श्री कनकेश्वर' मंदिरात जायचं ठरवलं.  

         'अलिबाग' पासून १२ किमी. वर असलेल्या 'मापगाव' या गावात एका डोंगरावर हे 'कनकेश्वर मंदिर' आहे. मापगाव गावातलं हे मंदिर ३८५ मीटर उंच डोंगरावर वसलेलं आहे. अतिशय पुरातन म्हणजे १६ शतकातली 'होयसाळ' शैलीतली अतिशय देखणी, मनोहारी अशी मंदिराची अष्टकोनी वास्तु आहे. या मंदिरात पोहोचण्यासाठी पायथ्यापासून ७५०/८०० पायऱ्या चढाव्या लागतात. 

           आम्ही इथं पायथ्याशी पोहोचलो तेच तळपत्या उन्हात. पण दर्शनाला जायचंच असं ठरवलंच होतं. कारण या मंदिरात यायची माझी खरंतर खूप वर्षांपासून इच्छा होती. आता ती अगदी अनपेक्षितपणे पूर्ण होणार होती. त्यामुळं अगदी भर दुपारी आम्ही दर्शनाला जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. संपूर्ण डोंगरावर दाट वनराजी आहे. त्यामुळं पायऱ्यांवर मध्ये मध्ये छान सावली असते. आणि आपल्याला अवतीभवती खूप विविधरंगी फुलपाखरं भिरभिरत असतात. मात्र पहिला चढ खडा आणि तीव्र आहे. आणि महत्वाचं म्हणजे पायऱ्या सलग नसून दोन पायऱ्यांमध्ये काही पावलांचं अंतर आहे. याच कारणामुळं हा पहिला चढ चढतानाच खूप दमायला होतं. आम्हालाही हा चढ चढताना मधेमधे काही क्षण थांबावं लागत होतं. मात्र पायऱ्या कमी उंचीच्या आणि रुंद आहेत. तसंच बऱ्याच भागात सावली आहे. पण तरीही ही एकूण चढाई चांगलीच थकवणारी आहे हे नक्की. साधारण अर्ध्या अंतरावर 'देवाची पायरी' लागते. अशी मान्यता आहे की या पायऱ्या बांधल्यावर स्वयं देवानी इथं पहिलं पाऊल ठेवलं होतं. या स्थानी पायरीवरच एका अगदी छोट्याशा घुमटीत छोटसं शिवलिंग आहे. इथं दर्शन घेऊन जरा विश्रांती घेउन आम्ही पुढे निघालो. पुढे थोड्या भागापर्यंत सरळच पायऱ्या आहेत. तिथंच थोड्या अंतरावर 'नागोबाचा टप्पा' आहे. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा आमचा चालक तिथं थबकून काहीतरी पहात आणि छायाचित्रण करत होता. तिथं काहीतरी असल्याचं आम्हाला त्याचक्षणी लक्षात आलं आणि हलक्या पावलांनी जवळ गेलो आणि एका भल्यामोठ्या पिवळ्याधमक नागानं आम्हाला दर्शन दिलं. अतिशय देखणा नागोबा पहाताच मीही छायाचित्रण केलं पण तोपर्यंत तो आपला मार्ग बदलून हलकेच जंगलात निघून गेला. 'कनकेश्वर महादेवाच्या' दर्शनाआधीच हे सुंदर दर्शन घडल्यानं मन अगदी प्रसन्न झालं. खरंतर पहिल्या पायऱ्या चढतानाच आत्यंतिक थकवा आला होता. पण नागोबाच्या दर्शनानं आम्हाला एकदम उत्साह आला. 

          इथून थोडं पुढं गेल्यावर एक 'पालेश्वर महादेव मंदिर' आहे. यानंतर थोड्या सरळ पायऱ्या चढल्यावर परत खडी चढण असलेल्या पायऱ्या आहेत. जिथं खडी चढण आहे तिथं मधेमधे आधारासाठी रेलिंग लावलं आहे. ही चढाई पार केली आणि परत अगदी थोडं सपाट रस्त्यावर चालत असतानाच एका मोठ्या कमानीनं आमचं स्वागत केलं. कमानीतून आत गेल्यावर लगेचच उजव्या बाजूला 'ब्रम्हकुंड' आहे. अतिशय सुंदर रित्या बांधलेला हा प्रशस्त तलाव आहे. पाणीही एकदम स्वच्छ आहे. बाजूलाच एक लहानसं मारुती मंदिर आहे. इथं थोडं थांबून आम्ही पुढं गेलो. थोडं अंतर गेलो आणि मंत्रमुग्ध होऊन थबकलोच. 'होयसळ'  शैलीतलं अत्यंत देखणं वास्तुशिल्प असलेलं 'कनकेश्वर मंदिर' आणि बाजूला असलेली अष्टकोनी सुरेख अशी 'पुष्करणी' हे दृश्य अगदी पावलं खिळवून ठेवणारंच आहे. 

          प्रतयक्ष मंदिरात प्रवेश केला आणि आधीपेक्षा अत्यंत सुंदर दृश्य पाहून भान हरपून पहातच राहिलो. मंदिर अगदी प्रशस्त आहे. भला मोठा गाभारा आणि अंतर्गृह अशी रचना आहे. गाभाऱ्यात भला मोठा चांदीचा नंदी उभा आहे. गर्भगृहात जाण्यासाठी ५-६ पायऱ्या उतरुन जावं लागतं. तिथं रेखीव अशी ४ फुट लांबीची चांदीची 'शिवपिंडी' आहे. आणि मागंच चांदीची 'माता पार्वती' ची मूर्ती आहे. सोमवार किंवा इतर कुठलाही महत्वाचा दिवस नसुनही ताज्या फुलांची अतिशय सुंदर अशी सजावट पिंडीवर आणि नंदी भोवती केलेली होती. अप्रतिम असं दृश्य होतं. इथंही आम्हाला अगदी शांतपणे दर्शन घ्यायला, जलाभिषेक करायला मिळाला. अगदी मनासारखं असं स्पर्श दर्शन घेता आलं. दर्शन घेऊन पाणावल्या डोळ्यांनी तिथंच थोडावेळ बसून नामस्मरण करुन अतिशय तृप्त मनानं बाहेर गाभाऱ्यात येऊन पुन्हा थोडावेळ बसलो. 

        'कनकासुर' नावाच्या दैत्यानं भगवान महादेवाना प्रसन्न करुन घेण्यासाठी या ठिकाणी तपस्या केली होती. भगवान शिव प्रसन्न झाल्यावर त्यांनी आपल्याबरोबर द्वंद्व करावं अशी प्रार्थना केली. हे द्वंद्व अनिर्णित राहिल्यावर दैत्यानं याच डोंगरावर भगवान शंकरानी वास्तव्य करावं आणि इथंच कनकासुराचंही स्थान असावं अशी इच्छा व्यक्त केली. त्याला शंकरानी होकार दिला. आणि कनकासुराच्या पाठीवर मोठा यज्ञ केला. त्यात कनकासुराला मुक्ती मिळाली. आणि तेव्हापासून हे मंदिर 'कनकेश्वर' नावानं ओळखलं जातं. हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधलं अशीही आख्यायिका आहे. तसंच श्री रामरायांनी एकदा भगवान विष्णूंना सहस्त्र कमलपुष्प अर्पण केली,मात्र ती अर्पण करताना त्यातलं एक कमल कमी झालं म्हणून त्यांनी कमलपुष्पासमान असलेला आपला एक नयन काढून श्री विष्णूंना अर्पण केला तेच हे स्थान अशीही आख्यायिका आहे. या मुख्य मंदिराच्या आवारात 'श्रीराम सिद्धिविनायक मंदिर', 'विष्णू मंदिर', 'कालभैरव मंदिर' अशी मंदिरं आहेत. आम्ही तिथून बाहेर येऊन मंदिराजवळच असलेल्या उपहारगृहात नाश्ता केला आणि पायऱ्या उतरायला सुरुवात केली. 

          खरंतर आम्हाला गिरनार चढाउतरायची बऱ्यापैकी सवय असूनही 'कनकेश्वर' ला जाताना टळटळीत उन, खडी चढाई, पायऱ्या मधलं अंतर यामुळं अतिशय थकायला झालं होतं. पण कितीही त्रास झाला तरी चढून जाऊन दर्शन घ्यायचंच हा अट्टाहासच होता. आणि इथं पायऱ्या चढूनच जावं लागतं. दुसरा कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळं थांबत थांबत का होईना आम्ही दर्शनाला गेलोच. मात्र मंदिरात प्रवेश करताच सारा थकवा क्षणात नाहीसा झाला होता. पायऱ्या उतरतानाही तीव्र उतार असल्यानं खरंतर त्रास होतो पण आम्हाला उतरताना सवयीमुळं त्रास झाला नाही. खाली उतरुन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

         खूप आधीपासून असलेली 'श्री दत्तात्रेयांच्या' आणि 'कनकेश्वराच्या' दर्शनाची इच्छा अगदी अनपेक्षितपणे श्री दत्तगुरुंनी पूर्ण केली आणि पून्हा एकवार त्यांच्या कृपादृष्टीची साक्ष पटली. दोन्ही मंदिरात दर्शनासाठी घाईगडबड करणारं कुणीही नव्हतं. दोन्ही ठिकाणी पुजारी असूनही शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. अर्थात दोन्ही मंदिरात भाविकांची अगदीच तुरळक गर्दी होती. त्यामुळं श्री दत्तात्रेयांचं आणि भगवान शिवाचं अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि मन तृप्त झालं.

- स्नेहल मोडक




Thursday, November 6, 2025

गिरनार परिक्रमा

नि:शंक हो निर्भय हो मना रे |

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ||

      या तारकमंत्राची प्रत्येक दत्तभक्ताला अगदी ठायी ठायी प्रचिती येत असते. आपण पूर्ण श्रद्धेने घातलेली प्रत्येक साद, केलेली प्रार्थना 'श्री दत्तात्रेयां'पर्यंत पोहोचते आणि त्वरित ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या चिंतेचं निवारण करुन आश्वस्त करतात. म्हणूनच तर त्यांना 'स्मर्तृगामी' म्हणतात. त्यामुळेच 'श्री दत्तात्रेयांचं' 'गिरनार' हे अक्षयस्थान दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचं स्थान. प्रत्येक भक्त गिरनार दर्शनाबरोबरच वर्षातून एकदाच करता येणाऱ्या 'गिरनार परिक्रमेची' अतिशय आसुसून वाट बघत असतो. 

         आम्हीही दरवर्षी प्रमाणे या वर्षीही परिक्रमेची ४-६ महिने आधीपासूनच तयारी सुरु केली होती. यावेळी तीन वेगवेगळ्या तारखांना मिळून जवळपास दिडशेच्या वर भाविक आमच्याबरोबर परिक्रमेला येणार होते. त्यानुसार जय्यत तयारीनिशी ३१ ऑक्टोबरला पहिला ५४-५५ भाविकांचा ग्रुप घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान केलं.

        खरंतर यावर्षी दीपावलीनंतरही पावसाचा मुक्काम संपला नव्हता. त्यात भर म्हणून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ आणि त्याचवेळी अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळं भारतातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला होता. महाराष्ट्रासह संपूर्ण गुजरात मध्ये हीच परिस्थिती होती. त्यामुळं यावर्षीच्या गिरनार परिक्रमेवर पावसाचं, वादळाचं सावट होतं. 31 तारखेला प्रवास सुरू केला तेव्हा मार्गात मध्ये पाऊस पडत होता. एक तारखेला पहाटे जेव्हा आम्ही जुनागढ ला पोहोचलो तेव्हा मात्र पाऊस थांबला होता. जुनागढला उतरुन रिक्षाने तलेटीला मुक्कामी पोहोचलो. त्यावेळी पाऊस नुकताच पडून गेला होता पण अतिशय जोरदार वारा सुटला होता. प्रवासात असतानाच गिरनार वरच्या एकूण परिस्थितीची खात्रीशीर माहिती मिळाली होतीच. 

       मुक्कामी पोहोचल्यावर भराभर आन्हिकं आवरुन सगळेच गिरनार दर्शनासाठी निघालो. चार दिवसांपासून वादळी हवेमुळे रोपवे बंदच होता. त्यामुळे रोपवेची तिकिटं आधीच काढलेली असूनही उपयोग नव्हता. तुफान वारा आणि पाऊस यामुळं रोपवे सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. म्हणून आम्ही सगळेच भाविक श्री दत्तात्रेयांच्या दर्शनला दहा हजार पायऱ्या चढून उतरुन जायच्या तयारीनेच निघालो होतो. संपूर्ण गिरनार पर्वत खालपर्यंत उतरलेल्या शुभ्र ढगांमध्ये हरवला होता. वारा आणि पाऊस असल्यानं जास्तीच्या आधारासाठी म्हणून यावेळी इतरांबरोबरच आम्ही दोघांनीही काठी घेतली. नेहमीप्रमाणं लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना करुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. भाविकांच्या अतिशय गर्दीतच आम्हीही चढत होतो. सुदैवानं पाऊस नव्हता पण वारा मात्र जोरदार होता. अर्थात आम्हाला या परिस्थितीची थोडी सवय असल्यानं काळजी नव्हती. पण बऱ्याच भाविकांना या परिस्थितीत एवढं चढण्या उतरण्याची थोडं काळजी वाटत होती. पण रोपवे सुरु नसल्यानं चढून जाणं किंवा डोली ने जाणं एवढेच पर्याय होते. 

      साधारण ५०-६० पायऱ्या चढून गेलो आणि अचानक आम्हाला रोपवे सुरु होणार असल्याची बातमी कळली. मग होतो तिथंच थांबून बातमीची खात्री करुन घेतली. रोपवे आणि पायऱ्या हे दोन्ही मार्ग वेगवेगळे असल्यानं पूर्ण खात्री केल्याशिवाय परत फिरुन उपयोग नव्हता. रोपवे सुरु होण्याची खात्री झाल्यावर मात्र सगळ्यांना संपर्क करुन रोपवे जवळ यायला सांगितलं. जाता जाता वाटेत घेतलेल्या काठ्या परत केल्या. रोपवे जवळ गेल्यावर कळलं ज्यांनी आधीच तिकिटं काढली आहेत त्यांनाच फक्त रोपवेने सोडणार आहेत. त्यामुळं पुढल्या १०-१५ मिनीटांतच आमचा नंबर लागला आणि आम्ही अगदी अनपेक्षितपणे रोपवेने 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ पोहोचलो. दहा हजार पायऱ्या चढून उतरायची मानसिक तयारी केलेली असताना अचानक रोपवे ने जायला मिळालं म्हणून सारेच खुष झाले. अर्थात जाताना रोपवे ने जाता आलं तरी परत येताना रोपवे मिळेलच याची शाश्वती नव्हती. 'अंबा मातेचं' दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. सन्नाट वारा सुटला होता. संपूर्ण गिरनारने शुभ्र मेघांची दुलई लपेटली होती. अतिशय अप्रतिम दृश्य दिसत होतं. ८-१० फुटांपलिकडे काहीच दिसत नव्हतं. अगदी जुलै, ऑगस्ट मध्ये असते तशीच परिस्थिती होती. सन्नाट वाऱ्यात स्वतः ला सावरत पुढे जाणं म्हणजे कसरतच होती. पण एकूणच नयनरम्य अशा वातावरणात चढताना किंचितही श्रम जाणवत नव्हते.

       काही मिनीटांतच आम्ही 'गोरक्षनाथ' मंदिरात पोहोचलो. 'गोरक्षनाथांचं' दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करुन पुढे निघालो. थोड्या पायऱ्या उतरलो आणि तिथूनच दर्शन रांग सुरु झाली. दरवर्षी पेक्षा यावर्षी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. खरंतर परिक्रमेच्या काळात बहुसंख्य भाविक हे चार दिवस जंगलात वास्तव्य करुन परिक्रमा पूर्ण करुन अखेरच्या दिवशी दर्शनाला जातात. पण एक तारखेला परिक्रमा वादळी पावसामुळे सुरु न झाल्यानं सारेच भाविक दर्शनासाठी आले होते. साहजिकच त्यामुळे दर्शन रांग प्रचंड मोठी होती. त्याच रांगेतून आम्ही कमानी पर्यंत पोहोचलो. तिथे नतमस्तक होऊन त्याच रांगेतून प्रत्यक्ष मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिरात प्रवेश केला आणि मी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांसमोर नतमस्तक झाले.‌ त्याक्षणी मनाची पाटी अगदी कोरी होती. कुठलाच विचार, प्रार्थना मनात नव्हती. अतिशय शांत तृप्त मनानं नैवेद्य अर्पण करुन पाणावलेल्या डोळ्यांनी परत एकवार नमस्कार करुन मी पुढे प्रदक्षिणा घालून मंदिराबाहेर आले. एरवी सतत श्री दत्तगुरुंशी संवाद करणारं मन प्रत्यक्ष दर्शन घेताना मात्र नि:शब्द होतं. काही मागणं उरतच नाही. 

      चरण पादुकांचं दर्शन घेऊन परत निघालो तेही रांगेतूनच. नेहमीच्या ठिकाणी बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं आणि अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन घेऊन, देणगी देऊन भोजनप्रसाद घेतला. परत रांगेतूनच खाली उतरायला सुरुवात केली. 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ आलो आणि तिथे अलोट गर्दीत अडकलो. पायथ्यापासून चढून येणारे, रोपवे ने येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे यांची प्रचंड गर्दी झाली होती. एकमेव पोलिस तिथे उभा होता. त्याला एकट्याला या गर्दीवर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. त्या चेंगराचेंगरीत काहीही होऊ शकलं असतं. अखेर २०-२५ मिनिटांनी आम्हाला रोपवे कडे जायला वाट मिळाली. परत येतानाही रोपवे सुरु होता आणि गर्दीही नव्हती. त्यामुळं आम्ही पुढल्या १५-२० मिनिटांतच पायथ्याशी पोहोचलो. तिथेच असलेल्या उपाहारगृहात थोडं खाऊन मुक्कामी परत आलो. रोपवे सुरु झाल्यानं एवढ्या प्रचंड गर्दीतही आम्ही दुपारी १२.३० वाजताच दर्शन घेऊन परत आलो होतो. साधारण साडेतीन चार च्या दरम्यान कळलं की मधल्या वेळेत रोपवे बंद झाला होता. पुन्हा सुरु होईल याची शाश्वती नव्हती. पण आम्हाला मात्र दोन्ही वेळा रोपवेने जायला मिळालं. तुफान वारा असला तरी पाऊस बिलकुल पडला नाही ही  केवळ दत्तगुरुंची कृपाच. चार दिवस बंद असलेला रोपवे जणू आमच्या साठीच सुरु झाला होता. कारण त्यानंतर २-३-४ तारखेलाही परत रोपवे बंद केला होता. फक्त परत येण्यासाठी रोपवे सुरु ठेवला होता तोही हवामानुसार मधेमधेच. 

      ज्या परिक्रमेसाठी गिरनारला भाविकांनी अलोट गर्दी केली होती ती परिक्रमा मुळात एक तारखेला रात्री सुरु होणार होती. पण पाऊस पूर्ण थांबला नव्हता. आणि आधी चार दिवस झालेल्या धुवांधार पावसाने परिक्रमा मार्ग पूर्ण क्षतिग्रस्त झाला होता. प्रचंड चिखल झाला होता, मध्ये मध्ये मार्ग वाहून गेला होता जेवढ्या मार्गापर्यंत वाहने जातात तीही चिखलात रुतून बसण्याची शक्यता होती. त्यामुळं नाईलाजास्तव एक तारखेला परिक्रमा रद्द करण्यात आली. नंतर जर तिथली परिस्थिती सुधारणं शक्य झालंच तर परिक्रमा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल असा निर्णय झाला. आम्ही दोन तारखेलाच भल्या पहाटे परिक्रमा सुरु करणार होतो पण परिक्रमाच रद्द केल्यानं दोन तारखेला आम्ही सगळे मोकळे होतो. मग संध्याकाळी आम्ही 'भवनाथ' च्या दर्शनाला गेलो आणि परत येऊन दोन तारखेला द्वारका, बेट द्वारका इथं दर्शनाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध होतील का याची बरीच चौकशी केली. सगळ्या नेहमीच्या ट्रॅव्हल्स कडे चौकशी केल्यावर अखेर तीन बसेस उपलब्ध झाल्या. 

        दोन तारखेला पहाटे सारं आवरुन आमचा ५४-५५ जणांचा ग्रुप घेऊन द्वारकेला निघालो. चहा नाश्त्यासाठी वाटेत थांबून ट्रॅफिक जॅम मधून द्वारकेला पोचायला खूपच वेळ लागला. मंदिर दर्शनासाठी १२ ते ५ यावेळेत बंद असतं. म्हणून त्या आधी दर्शन मिळणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आधीच तिथल्या एका पंडितजींबरोबर बोलणं केलं होतं. त्यामुळं दर्शन रांगेत उभं रहायला मिळालं. इथंही अलोट गर्दी होती दर्शनासाठी. आणि अतिशय चीड आणणारी गोष्ट म्हणजे दर्शनाला रांग, शिस्त याचा संपूर्ण अभाव होता. प्रचंड लोटालोट सुरु होती. 'द्वारकाधीशा' ला नैवेद्य अर्पण करेपर्यंत जवळपास अर्धा तास दर्शन बंद होतं. त्यानंतर दर्शन सुरु झालं आणि अक्षरशः धक्काबुक्की करत भाविक दर्शन घेत होते. अर्थातच नाईलाजाने आम्हालाही असंच दर्शन घ्यावं लागलं. पण प्रत्यक्षात अतिशय छान दर्शन झालं. मन अगदी तृप्त झालं. काही क्षण का होईना 'द्वारकाधीशा'समोर उभं राहून नतमस्तक होता आलं. 

       दोन तारखेला म्हणजेच 'कार्तिकी एकादशीला' आम्हाला 'द्वारकाधीशाचं' दर्शन घडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. 'आषाढी एकादशीला' 'भगवान विष्णू' योग निद्रेत जातात आणि 'चातुर्मास' संपल्यावर म्हणजे 'कार्तिकी एकादशीला' योग निद्रेतून बाहेर येऊन सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात. म्हणून या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी', 'देव उठनी एकादशी' असंही म्हणतात. अशा या अतिशय महत्वाच्या एकादशी दिवशीच आम्हाला 'द्वारकाधीशाच्या' दर्शनाचा सुंदर योग आला. 

       द्वारकेहून आम्ही पुढे निघालो. वाटेत जेवून आम्ही 'बेट द्वारकेला' निघालो. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्घाटन झालेल्या २३२० मीटर लांबीच्या 'सुदर्शन सेतु' वरुन आम्ही द्वारका बेटावर पोहोचलो. हा द्वारका बेटा ते ओखा यांना जोडणारा सेतु आहे. इथल्या मंदिरातही प्रचंड आणि बेशिस्त अशी गर्दी होती. दर्शन सायंकाळी ४.३० वाजता सुरु होणार असल्याने बराच वेळ वाट बघावी लागली. दर्शन सुरु झाल्यावर आधी सारखंच ढकलाढकली करतच पण इथंही अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. मुख्य मंदिर आणि आजूबाजूची दर्शनं घेऊन आम्ही परत निघालो. द्वारका आणि बेट द्वारका या दोन्ही मंदिरात नेहमीच भाविकांची प्रचंड गर्दी असते. आम्हाला या बेशिस्त गर्दी चा वारंवार अनुभव आला आहे. परंतु या बेशिस्त बेदरकार गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही सुरक्षा यंत्रणा इथं नाही.  या गर्दीत चेंगराचेंगरीत काहीही दुर्दैवी घटना घडल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचीही कुठलीही व्यवस्था इथं उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासनानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. परंतु या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं जात असल्याचं खेदानं म्हणावं लागतय. 

         तिथून परतीच्या प्रवासात मार्गातच 'नागेश्वर' मंदिरात दर्शनासाठी गेलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक 'नागेश्वर ज्योतिर्लिंग'. इथं मात्र फार गर्दी नव्हती. आणि इथं कितीही जास्त गर्दी असली तरी दर्शन अगदी शिस्तीत रांगेतून घेतलं जातं. इथलं दर्शन घेऊन आम्ही रात्री उशिराने तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

          तीन तारखेला सकाळी लवकरच सारं आवरुन मुक्काम सोडून सगळेजणं आधीच ठरवलेल्या बसने 'सोरटी सोमनाथ' ला निघालो. वाटेत नाश्ता करुन 'सोमनाथ' ला पोहोचलो. सोमवार असल्यानं दर्शनाला बऱ्यापैकी गर्दी होती. पण इथंही व्यस्थित रांगेतून दर्शन होत असल्यानं फार वेळ न लागता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत फिरुन वाटेतच असलेल्या 'भालका तीर्थ' चं दर्शन घेतलं. त्यानंतर नेहमीच्या हाॅटेलमध्ये जेवण करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. राजकोटहून आमची परतीची ट्रेन होती. त्यामुळं वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. सोमनाथ ते राजकोट रस्त्याचं काम अजूनही सुरु असल्यानं खूप वाहतूक कोंडी होते. त्यामुळं प्रवसाचा वेळ वाढतो. म्हणून मग इतर कुठं न जाता सरळ राजकोटला वेळेतच पोहोचलो. 

         'गिरनार परिक्रमा' रद्द झाल्यामुळं खरतर प्रत्येकालाच रुखरुख लागली होती. कारण आता एकदम पुढल्या वर्षी ही परिक्रमा करता येणार आहे. पण तरीही कार्तिकी एकादशीला घडलेलं 'द्वारकाधीशाचं' दर्शन आणि सोमवारी घडलेलं 'सोमनाथाचं दर्शन' यामुळं मनाला खूप समाधानही वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेतच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

          माझा सहचर जरी सेवा म्हणूनच या यात्रेचं आयोजन करीत असला तरी त्याच्या सहकारी मित्रांची त्याला लाभणारी साथ ही अतिशय महत्वाची असते. त्यांच्या सहकार्यामुळे आणि 'श्री दत्तात्रेयांच्या' कृपेनेच ही यात्रा यशस्वी होते.  आणि प्रत्येक यात्रेत एक नवीन ऊर्जा प्रत्येकाला लाभते. 

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Monday, October 6, 2025

कोजागिरी

अलवार हळवी सांज अवतरते

केशरासंगे चांदणचुरा पसरते

नभी हळूच चांदवा उमलतो

अवचित धुंद वेगळा भासतो

सागरावरी चांदवर्ख पसरतो

पुळणीचा काठ रुपेरी दिसतो

चांदणे अलगद मनात उतरते

अबोल हळवे मन हे मोहोरते

भावविभोर होतसे रंगबावरी

मनामनात जागते कोजागिरी 

मनामनात जागते कोजागिरी       

स्नेहल मोडक 

Friday, September 26, 2025

गर्भगिरी

         यावर्षी जुलै महिन्यात 'अमरनाथ यात्रे'बरोबरच 'वैष्णोदेवी'चंही दर्शन आम्ही घेऊन आलो होतो. त्यामुळं परत लगेच नवरात्रात 'वैष्णोदेवी'च्या दर्शनाला जायचं नव्हतं. मग अगदी गेल्या ३-४ महिन्यांपासून जायचं असलेल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला म्हणजेच 'अंबाजोगाई'ला जायचं ठरवलं.‌ 

          घटस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीच 'योगेश्वरी देवी'च्या दर्शनासाठी जायचं आणि तिसऱ्या माळेला दर्शन, अभिषेक करुन‌ लगेच घरी परत यायचं ठरवलं. आणि जाताना किंचित वाट वाकडी करुन अजून एक दर्शन घ्यायचंही ठरवलं.

          'अंबाजोगाई'ला नेहमी आम्ही 'अहिल्यानगर' ( अहमदनगर) मार्गेच जातो. त्याप्रमाणं तिथपर्यंत जाऊन तिथून 'नगर' - 'वांबोरी' मार्गावरुन 'डोंंगरगणू' गावातून  'मांजरसुंबा' या गावातील 'सोन्याच्या डोंगरा'वरील एका मंदिराजवळ पोहोचलो. 'नगर' ते 'पाटोदा बीड' पर्यंत असलेली डोंगररांग ही 'गर्भगिरी पर्वतरांग' म्हणून ओळखली जाते. 'नवनाथ भक्तिसारा'मध्ये या 'गर्भगिरी' पर्वताचा उल्लेख आहे.  या पर्वतालाच 'सोन्याचा डोंगर' म्हणूनही ओळखलं जातं. 

          स्वर्गलोकीची राजकन्या 'पद्मिनी' हिला तिला मिळालेल्या शापामुळं पृथ्वीवर स्त्री राज्यात ' मैनावती' या नावानं मानवदेह धारण करावा लागतो. कालांतरानं ती स्त्री राज्याची राणी होते. त्यानंतर ती आपल्या तप सामर्थ्यानं  नाथपंथाचे पहिले गुरु 'मच्छिंद्रनाथ' यांनी स्वतः समवेत रहावे असे वरदान मिळवते. त्यानुसार ' गुरु मच्छिंद्रनाथ ' हे स्त्री राज्यात प्रवेश करतात. आणि 'राणी मैनावती' सह राज्य कारभार पाहू लागतात. यथावकाश त्यांना पुत्रप्राप्ती होते.  'गुरु मच्छिंद्रनाथांचे' प्रथम शिष्य 'गुरु गोरक्षनाथ' हे आपल्या गुरुंना भेटण्यासाठी गावोगावी फिरत असताना त्यांना हा सारा वृत्तांत कळतो. आणि ते नाथपंथाचं कार्य आणि संन्यस्त जीवन सोडून संसारपाशात अडकलेल्या आपल्या 'गुरु मच्छिंद्रनाथ' आणि त्याचा पुत्र 'मीननाथ' यांना स्त्री राज्यातून बाहेर काढतात. 

          राज्यातून बाहेर पडताना 'मैनावती' मच्छिंद्रनाथांच्या झोळीत त्यांच्या नकळत एक सोन्याची वीट ठेवते. पुढं मजल दरमजल करत जंगलातून जाताना मच्छिंद्रनाथ आपल्या शिष्याची परिक्षा पहाण्यासाठी चोरांची भीती वाटत असल्याचं सांगत आपली झोळी आणि पुत्र 'मीननाथ' याला गोरक्षनाथांना सांभाळायला सांगतात. गोरक्षनाथांना जेव्हा ती झोळी जड लागते तेव्हा ते उघडून पहातात. त्यांना त्यात सोन्याची वीट दिसते आणि मच्छिंद्रनाथांना वाटणाऱ्या चोरांच्या भीतीचं कारण कळतं. ते मच्छिंद्रनाथांच्या नकळत ती वीट जंगलात भिरकावतात. आणि त्याच वजनाचा दगड झोळीत ठेवतात. जंगल पार करुन एका पर्वतावर पोहोचल्यावर जेव्हा मच्छिंद्रनाथांना हे कळतं तेव्हा ते दुःखी होतात. त्यांना त्या यात्रेनिमित्त सर्व देवदेवतांना आमंत्रित करुन मोठा यज्ञयाग करण्यासाठी ती वीट हवी असते. गोरक्षनाथांना हे कळताच ते गुरुंची क्षमा मागतात. आणि गुरुंचं दुःख दुर करण्यासाठी आपल्या सिध्दी सामर्थ्यानं संपूर्ण पर्वतच सोन्याचा करतात. गंधर्वांना बोलावून साऱ्या देवदेवता, गंधर्व, ऋषीमुनींना आमंत्रित करतात. मोठा यज्ञयाग, भोजन समारंभ करतात. बराच काळ चाललेला हा सोहळा संपल्यावर सारे देवदेवता आपआपल्या निवासस्थानी निघाले त्यावेळी हा सोन्याचा पर्वत कुबेराने झाकोळून टाकला. यानंतर गोरक्षनाथांनी तिथं काही काळ तपस्या केली. 

          हे सर्व कार्य ज्या स्थानी घडलं तिथं 'गुरु गोरक्षनाथ ' यांचं भव्य आणि अतिशय सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं आहे. काळ्या पाषाणातील अत्यंत रेखीव अशी गोरक्षनाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रदक्षिणा मार्गावर 'हिंगला देवी',  'श्री दत्तात्रेय' आणि ' मच्छिंद्रनाथ' यांच्या मूर्ती आहेत.

          मंदिरात जाण्यासाठी थोड्या पायऱ्या आहेत. तसंच आता मंदिरापर्यंत रस्ताही करण्यात आला आहे. त्यामुळं थेट मंदिरापर्यंत आपल्या वाहनानं जाता येतं.मंदिरात प्रवेश करताना एखाद्या गडावर प्रवेश करत असल्यासारखं वाटतं. कारण संपूर्ण मंदिराला एखाद्या किल्लयासारखीच तटबंदी केली आहे.‌ आजूबाजूचा सारा परिसर शांत, हिरवागार निसर्गरम्य असाच आहे. डोगरावरुन पायथ्याच्या गावांचं विहंगम दृश्य दिसतं. अतिशय शांत, पवित्र आणि रमणीय असा हा मंदिर परिसर आहे. 

          आम्ही मंदिरात गेलो तेव्हा बिलकुल गर्दी नव्हती. मंदिरात प्रवेश करुन 'गोरक्षनाथा'समोर नतमस्तक झाले आणि तृप्ततेबरोबरच एक वेगळीच अनुभूती आली. बरोबर नेलेला नैवेद्य अर्पण करुन प्रदक्षिणा घालून सभामंडपात थोडावेळ शांत बसलो. इथं येण्याआधी माझं नुकतंच परत एकदा 'नवनाथ भक्तीसारा'चं पारायण पूर्ण झालं होतं. त्यामुळं हे दर्शन घडणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती. हे दर्शन घेऊन निघालो आणि रात्री आम्ही अंबाजोगाईला पोहोचलो. लगेचच मंदिरात गेलो. पण दर्शनाला भाविकांची खूपच मोठी रांग होती. मग बाहेरुनच दर्शन घेऊन मुक्कामी आलो. 

            दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच मंदिरात जाऊन 'योगेश्वरी देवी'चं दर्शन घेऊन, अभिषेक केला. नवरात्रानिमत्त दर्शनासाठी खूपच गर्दी होती. मात्र आमचा अभिषेक, दर्शन अतिशय सुंदर रितीनं घडलं. योगेश्वरी मातेचं दर्शन म्हणजे अपार तृप्ती आणि आनंद. खरंतर तिच्यासमोरुन बाजूला व्हावसंच वाटत नाही. बाळाला जसं सतत आईच्या कुशीत रहावंसं वाटतं अगदी तशीच भावना असते मातेसमोर. पण भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळं तिथं जास्त वेळ थांबता येत नाही. 

             योगेश्वरी मातेचं दर्शन घेऊन पुढे परळीला आधी 'अंबा आरोग्य भवानी' मातेचं दर्शन घ्यायला गेलो. इथं 'नृसिंह सरस्वती' एक वर्ष गुप्त रितीनं राहिले होते. भवानी मातेच्या मंदिरातच बाजूलाच अगदी छोटासा मार्ग असलेलं  (एकावेळी एक व्यक्तीच प्रवेश करु शकेल ) एक तळघर आहे. इथंच 'नृसिंह सरस्वती ' एक वर्ष वास्तव्यास होते. हि दोन्ही दर्शनं घेण्यासाठी आम्ही इथं गेलो. या मंदिरातही नवरात्रानिमित्त खूपच गर्दी होती. 'अंबा भवानी' मातेचं खूप सुंदर दर्शन आम्हाला मिळालं पण गर्दीमुळं नृसिंह सरस्वती यांच्या दर्शनाचा मार्ग बंद ठेवला होता. त्यामुळं 'नृसिंह सरस्वती' यांच्या दर्शनाचा योग यावेळी आला नाही. नवरात्राव्यतिरिक्त इथं फारशी गर्दी नसते. त्यामुळं 'नृसिंह सरस्वतींंचं' दर्शन सहज घेता येतं. आम्ही आधीही हे दर्शन घेतलं असल्यानं बाहेरुनच नमस्कार करुन आम्ही पुढे 'परळी वैजनाथा'च्या दर्शनाला गेलो. इथं फारशी गर्दी नसल्यानं बिल्वदलं, गंगाजल अर्पण करुन अतिशय सुंदर दर्शन घेता आलं. नवरात्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अतिशय सुंदर असा दर्शन योग आला आणि अतिशय समाधान वाटलं. 

             परळी वैजनाथाचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करुन सायंकाळी घरी परत आलो.

                                                                                                    स्नेहल मोडक



Monday, September 8, 2025

बहर

बहर धुंद तरुस आला
नीलरंगात चिंब नाहला
मुग्ध कळ्या उमलल्या
तरुवरी मुक्त झुलल्या
झुबके निळ्या फुलांचे
जणू मोहक चांदण्यांचे 
नीलपुष्पे तरुस लगडली
पर्णे सारी त्यात झाकली
भार फुलांचा जरी झाला
मधुगंधाने तरु मोहरला

              -स्नेहल मोडक 
             


Friday, July 25, 2025

श्रावण श्रावण

नभमेघात श्रावण दाटतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

     क्षणात सरसर क्षणात उन

     संगे वाजे मेघमल्हाराची धुन

     खेळ उन पावसाचा रंगतो ग

     मनामनात श्रावण फुलतो ग

पर्णात झरती मौक्तिकमाला 

दरवळतो गंध मातीचा ओला

धरेवर अमृतवर्षाव होतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

       हिरव्या पिकात हिरवी लाट

       झुळझुळ वाहती शुभ्र पाट

        रंग पाचूचा सुंदर खुलतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

रंगांच्या रानात स्वप्नांचे पक्षी

नभी खुलते इंद्रधनुची नक्षी

अल्लड वारा चहुकडे घुमतो ग

मनामनात श्रावण फुलतो ग

        रानफुलांत पायवाटा सजती

        अवखळ सरितेपाशी थांबती

        केकारव मयुराचा घुमतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

        मनामनात श्रावण फुलतो ग

- स्नेहल मोडक

Sunday, July 20, 2025

जय बाबा बर्फानी -२

          ९ तारखेला सकाळी 'बालताल' चा बेस कॅम्प सोडून आम्ही निघालो. बेस कॅम्प पासून साधारण दोन किमी. अंतरावर पार्किंग लॉट होता. तिथपर्यंत जाऊन आम्ही आमच्या गाडीनं पुढं 'श्रीनगर'ला निघालो. श्रीनगरला जाण्याआधी 'बालताल' पासून ७८ किमी. अंतरावर असलेल्या 'खीर भवानी माता' मंदिरात दर्शनासाठी जायचं होतं. मात्र जे जे रस्ते त्या मंदिराकडे जात होते ते सारे रस्ते बंद करण्यात आले होते. कुठल्याही मार्गानं मंदिरात जाता येणार नव्हतं. सगळ्याच रस्त्यांवर सैनिक उभे होते. काहीतरी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यानं मंदिरात जाता येणार नसल्याची माहिती मिळाली.‌ अखेर आम्ही दुपारी सरळ श्रीनगरला पोहोचलो. मुक्कामी जाऊन थोडा आराम करुन सायंकाळी श्रीनगर फिरायला निघालो. सर्वांत आधी 'लाल चौक' पहायला गेलो. लाल चौकात थोडं फिरुन‌ नंतर 'दल लेक' बघायला गेलो. तोपर्यंत पूर्ण अंधार झाल्यानं शिकाऱ्यातून न फिरता फक्त तिथंच आजूबाजूला फिरुन‌ जवळच्याच हाॅटेलमध्ये जेवून मुक्कामी परत आलो. 

          दुसऱ्या दिवशी म्हणजे १० तारखेला सकाळी परत आम्ही फिरायला निघालो. आधी आम्ही 'गुलमर्ग' ला फिरायला गेलो. 'अमरनाथ' व्यतिरिक्त बाकी सारंच आम्हा काही जणांचं पाहून झालं असल्यानं खरं तर सगळी ठिकाणं परत पहाण्याची हौस नव्हती. म्हणून आम्ही काही जणांनी गुलमर्ग ला असलेल्या प्राचीन शंभू महादेवाचं दर्शन घेऊन तिथंच थोडावेळ बसायचं असं ठरवलं. सारं काश्मीर आणि गुलमर्ग एका वेगळ्याच आणि अप्रतिम सौंदर्यानं सजलं होतं.थंडीच्या दिवसांत जसं सारं काश्मीर  सुंदर बर्फमय होतं तसंच वर्षा ऋतू मध्ये नाजूक शुभ्र पांढऱ्या फुलांची  मखमली दाट दुलई लपेटून सजतं. सारं गुलमर्ग अशा शुभ्र फुलांनी नटलं होतं. आम्ही हा अप्रतिम नजारा अनुभवतच मंदिरात गेलो. मंदिरात बिलकुल गर्दी नसल्यानं छान दर्शन झालं. दर्शन घेऊन आम्ही तिथेच बसलो आणि अर्थातच तिथल्या सवयीनुसार घोडेवाले गाडीवाले आमच्या मागे काही पॉईंट फिरण्यासाठी घोड्यावरुन  किंवा गाडीमधून यावं म्हणून मागं लागलेच. घोड्यावरुन अमरनाथला भरपूर फिरावं लागल्यानं परत घोड्यावरुन जायची इच्छा नव्हती. अखेर हो-नाही करत आम्ही ६-७ जणं जीपने काही ठिकाणं फिरायला गेलो. बाकीचे आधीच घोड्यावरुन फिरायला गेले होते. जीपने आम्ही 'महाराजा हरि सिंह' महाल,  गोल्फ कोर्स आणि इतर काही ठिकाण पाहायला गेलो. हे सारं पाहून,  मनसोक्त निसर्गसौंदर्य अनुभवून, छायाचित्रं काढून आम्ही परत निघालो. 

          'गुलमर्ग' फिरुन नंतर आम्हाला खरंतर 'श्रीनगर' मधल्या 'श्री शंकराचार्य' मंदिरात जायचं होतं. पण ते मंदिर सायंकाळी ४.३० वाजताच बंद होत असल्यानं आणि आम्ही त्या आधी न पोहोचल्यानं त्या मंदिरात जाता आलं नाही. मग परत 'दल लेक' ला गेलो. आदल्या दिवशी अंधार पडल्यानं राहिलेली शिकारा फेरी करायची ठरवली. आणि शिकारे ठरवून दिड तासाची दल लेक मध्ये छान फेरी मारुन आलो. शांत जळावर संथ तरगणाऱ्या शिकाऱ्यातून फिरायला नेहमीच खूप छान वाटतं. दल लेक मध्ये फिरत असतानाचं अंधार झाला होता. मग शिकारा फेरी मारुन आल्यावर तिथंच थोडं फिरुन मुक्कामी आलो.

          श्रीनगरचा मुक्काम ११ तारखेला सकाळी सोडून आम्ही आधी 'श्री शंकराचार्य' मंदिरात गेलो. सकाळी लवकर मंदिरात गेल्यामुळं गर्दी थोडी कमी‌ होती . छान दर्शन घडलं. इथंही मंदिरापासून २-३ किमी. आधीच आमची गाडी थांबली होती. त्यामुळं तेवढं अंतर चालून थोड्या पायऱ्या चढून मंदिरात जावं लागलं होतं. परत येताना तर गाडी अजूनच लांब उभी होती. त्यामुळं पुन्हा ३-४ किमी अंतर चालत गेलो. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे 'पटणी टाॅप'ला निघालो. दुपारनंतर आम्ही पटणी टाॅपला मुक्कामी पोहोचलो. 

             'पटणी टाॅप'ला मुक्कामी पोहोचल्यावर थोडा आराम करुन सायंकाळी आम्ही फिरायला निघालो. आम्ही जिथं राहिलो होतो तिथून सारंच लांब होतं. मग असंच फिरायला निघालो. अतिशय सुंदर वातावरण होतं. सारा गाव धुक्याची दुलई पांघरून बसला होता. चांगलाच गारवा होता. अशा छान वातावरणात फिरायलाही मस्त वाटत होतं. रस्त्याच्या कडेला भरगच्च केशरपिवळे तुरे लगडलेली गवती झाडं खूप छान दिसत होती. थोडं पुढं गेलो अन एक बाग दिसली. सुंदर सुबक नीटनेटकी बाग बघताच आम्ही लगेच बागेत प्रवेश केलाच. मऊ लुसलुशीत हिरव्या गवतातून जाणाऱ्या दगडी पायवाटा आणि आजूबाजूला असलेली सुंदर फुलांनी बहरलेली झाडं अगदी सुरेख दृश्य. फिकट निळ्या रगांच्या नाजूक फुलांच्या गुच्छानी डवरलेली झाडं अप्रतिम दिसत होती. अर्थातच छायाचित्रणाचा मोह आवरणं अशक्यच होतं. तिथं बराच वेळ घालवून आम्ही मुक्कामी परत आलो.

           'पटणी टाॅप'हून १२ तारखेला आम्ही पुढे निघालो. सर्वांत आधी तिथून थोड्या अंतरावर असलेल्या 'नाग मंदिरात' दर्शनासाठी गेलो. नंतर 'गौरी कुंड' इथं जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर 'शुध्द महादेव' अर्थात 'शुलपाणेश्वर' मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हे सारं करुन 'शिव-पार्वती विवाह स्थान' पहायला गेलो. इथं दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या मुक्कामी म्हणजे 'कटरा' ला सायंकाळी पोहोचलो. 

            'कटरा' हून १३ तारखेला सकाळी आम्ही 'शिवखोरी' इथं शंभू महादेवाच्या दर्शनाला निघालो. इथंही खूपच लांब अंतरावर आपली गाडी थांबते. तिथून स्थानिक जीपने २-३ किमी अंतर जावं लागतं. त्यानंतर पुढे साधारण ४ किमी अंतर चालत किंवा घोड्यावरुन जाता येतं. दर्शनासाठी जाताना अर्थातच थोडा चढावाचा रस्ता आहे. आणि त्यापुढे २५० पायऱ्या आहेत. इथं मात्र आम्ही जीपनं थोडं अंतर जाऊन पुढं पुर्ण चालत गेलो आणि चालतच आलो. दर्शनासाठी पण दोन मार्ग आहेत. एक पूर्वापार जरा कठीण असा अगदी अरुंद गुहेतून आणि दुसरा सोपा पण प्रशस्त गुहेतूनच. आम्ही तिथूनच दर्शनाला गेलो. आतमध्ये गुहा खूप मोठी प्रशस्त आहे. अतिशय सुंदर असं 'महदेवाचं' दर्शन  घडलं.‌ दर्शन घेऊन आम्ही परत सायंकाळी 'कटरा' ला मुक्कामी आलो. 

            १३ तारखेलाच रात्री आमच्या यात्रेतलं अजून एक महत्त्वाचं दर्शन घ्यायला जायचं होतं. त्यासाठी RFID Card काढणं गरजेचं होतं. त्यामुळं 'शिवखोरी' चं दर्शन घेऊन परतल्यावर RFID Card काढून आलो. आणि मग रात्री उशिरा आम्ही दर्शनासाठी निघालो. 'वैष्णोदेवी' मातेच्या दर्शनाला आम्ही नेहमीच सकाळी लवकर जातो. यावेळी पहिल्यांदाच रात्री जाणार होतो. इथंही घोड्यावरुनच जायचं होतं. रात्रीची वेळ असल्यानं घोडे बरेच कमी होते. दर्शनाला खरंतर चालतही जाऊ शकलो असतो पण 'शिवखोरी' ला बरंच चालणं झालं होतं आणि वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन नेहमीसारखं चालतच पायथ्याशी जायचं होतं. त्यामुळं मंदिरात जाताना घोडे ठरवलेच. घोड्यावरुन निघालो आणि थोड्याच वेळात एक धुंद गंध जाणवायला लागला. तो रातराणीचा गंध होता हे लगेच लक्षात आलं पण इथं रातराणी कुठं असणार असं वाटत होतं. पण अखंड दरवळ येतच होता. आणि अचानक एका ठिकाणी जाळी पलिकडे मला बहरलेली रातराणी दिसली. मुळात इथला रस्ता चढावाचा असला तरी छान बांधलेला, डोक्यावर छत असलेला, असा असल्यानं चालताना किंवा घोड्यावरुन जाताना बिलकुल त्रास होत नाही. त्यात यावेळी तर  रातराणीचा धुंद गंध सर्वत्र दरवळत होता. वर्दळ कमी असल्यानं बऱ्यापैकी शांतता होती. खूप छान वाटत होतं. अशातच पावसाची भुरभुर सुरु झाली. पण छत असल्यानं भिजायचा प्रश्न नव्हता. घोड्यावरुन जात असताना मध्येच एका ठिकाणी मुख्य रस्ता सोडून घोडे आतल्या रस्त्याला वळले. या अरुंद रस्त्यावर बऱ्यापैकी अंधार होता आणि बाजूला दाट झाडी. कशी कुणास ठाऊक पण तिळमात्रही भिती न वाटता मी ती नीरव शांतता अनुभवत होते. तिथून फक्त आमचे घोडे चालले होते मधेच समोरुन परतीचे २-३ घोडे येत होते. काही वेगळीच अनुभूती येत होती. जेमतेम १५ मी. त्या रस्त्यावरुन घोडे चालले आणि परत मुख्य मार्गाला लागले. पण तेवढा काळ माझ्यासाठी खास होता. भल्या पहाटे आम्ही मंदिरात पोहोचलो. 

          यावेळी पहिल्यांदाच दर्शनासाठी गर्दी कमी होती. त्यामुळं चेकिंग झाल्यावर पुढच्या अवघ्या १० मीनिटांत आम्ही गुहेत प्रवेश केला होता. रांगेतून मातेसमोर पोहोचलो आणि नतमस्तक झालो. पहिल्यांदाच आम्हाला काही क्षण माते समोर थांबायला अन निवांत दर्शन घ्यायला मिळालं होतं. गर्दी नसल्यानं तिथल्या सुरक्षारक्षकांनी किंवा पंडितजीनी कुणीच 'चलो चलो' अशी घाई केली नाही. नतमस्तक होऊन, डोळे भरुन मातेचं दर्शन घेऊन तृप्त मनानं आम्ही गुहेबाहेर आलो. भल्या पहाटे ब्रम्ह मुहूर्तावर 'वैष्णोदेवी' मातेचं दर्शन घडल्यानं मन अन डोळे भरुन आले होते. 

           दर्शन घेऊन थोडावेळ थांबून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. आता हा मार्ग उताराचा, सोपा आणि सवयीचा असल्यानं आम्ही निवांतपणे चालायला सुरुवात केली. वाटेत थांबत थांबत सकाळच्या शांत अन प्रसन्न वातावरणातून आम्ही चालत होतो. अखेर पायथ्याशी पोहोचून RFID Card जमा केली आणि आमच्या वैष्णोदेवी यात्रेची सांगता झाली. मुक्कामी पोहोचून आराम केला. 'कटरा' ला वारंवार जाणं होत असल्यानं तिथं परत फिरायची इच्छा नव्हती. त्यामुळं  एकदम रात्रीच जेवणासाठी बाहेर जाऊन आलो. परत येऊन सगळं सामान आवरून निद्राधीन झालो.

           १५ तारखेला घरी परततानाही आम्हा दोघांचीच विमानाची तिकिटं होती. म्हणून आम्ही सकाळी लवकरच आधीच ठरवलेल्या गाडीने जम्मूला निघालो. जाताना वाटेत नेहमीप्रमाणं 'नाभा माता' मंदिरात दर्शनासाठी गेलो. छोट्या गुहेतील या शक्तीपीठात आम्ही गेलो तेव्हा आम्ही दोघंच होतो. बाकीचे भाविक दर्शन घेऊन परत निघाले होते. इथं नेहमीच मातेचं अतिशय शांत आणि सुंदर दर्शन घडतं. हे दर्शन घेऊन पुढं 'कोल कंडोली' मातेच्या दर्शनाला गेलो. दोन्ही मंदिरात दर्शन घेऊन आम्ही जम्मूला विमानतळावर पोहोचलो. यात्रा पूर्ण करुन, विमान प्रवास करुन रात्री उशिरा घरी पोहोचलो. 

            अवघड अशा अमरनाथ यात्रेचं स्वप्न साकार झालं ते केवळ श्री दत्तगुरुंच्या कृपेनेच. खरंतर माझ्या इच्छेविरुद्ध मला यात्रेला जावं लागलं होतं. दत्तगुरुंनी अत्यंत कठीण परिक्षा घेतली आमची पण अतिशय सुंदर अशी फलप्राप्तीही करुन दिली. गेल्या वर्षी पासून 'बाबा अमरनाथ' फारच लवकर अंतर्धान पावत आहेत. त्यामुळं असंख्य भाविकांना पुर्ण स्वरुपाचं दर्शन घडतच नाहीय.  यावर्षीही असचं झाल्यानं मला अमरनाथांचं दर्शन घडेल की नाही याची काळजी वाटत होती पण त्यांच्याच कृपेनं लहान आकारात का होईना प्रत्रक्ष दर्शन घडलं आणि सारे सायास सार्थकी लागले. 

            यात्रेचे आयोजक आणि त्यांचे मित्रमंडळ यांचं सहकार्य आम्हाला पूर्ण यात्रेत मिळालं. निर्विघ्नपणे यात्रा पूर्ण झाली मात्र आमच्या ग्रुपमधल्या काही जणांच्या वर्तनामुळे थोडा त्रास बाकीच्या आम्हा सगळ्यांना सोसावा लागला. ग्रुपबरोबर यात्रा/सहलीला जाताना वेळेचं आणि इतर गोष्टींचं बंधन पाळलं, भान ठेवलं तर यात्रा / सहल छान आनंददायी आणि यशस्वी होते. आमच्या बरोबरच्या त्या काही जणांनी हे वेळेचं बंधन आणि इतर गोष्टींच भान अजिबात ठेवलं नाही त्यामुळं सगळीकडेच आम्हाला उशीर होत गेला. तेवढी गोष्ट सोडल्यास एक अवघड यात्रा निर्विघ्नपणे पूर्ण झाली हे महत्वाचं. मी हे सारं लिहित असतानाच बालताल मार्गावर भूस्खलन झालं एका भाविकेचा मृत्यू आणि काही जखमी झाले. यात्रा मार्ग बंद झाला. असं लहान मोठं कुठलंही विघ्न येऊ न देता दत्तगुरुंनी अवघड परिक्षा घेतानाही ही काळजी घेत सुंदर दर्शन घडवलं. माझी अजूनही अशी परिस्थिती आहे की देहानं जरी मी घरी परतले असले तरी मन मात्र अमरनाथलाच रमलंय.

|| जय बाबा बर्फानी|

- स्नेहल मोडक





    

    

    



कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...