माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म्हणजेच १ फेब्रुवारीला 'गिरनार' दर्शनासाठी जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं ३१ जानेवारीला दुपारी आम्ही प्रवासाला सुरुवात केली.
१ फेब्रुवारीला भल्या पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षानं तलेटीला मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. आदल्या दिवशी प्रवासातच १ तारखेलाच गिरनारला मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली असल्याचं कळलं होतं. त्यासाठी ३१ तारखेला रात्री १२ वाजल्यापासून ते १ तारखेला दुपारी १२ वाजेपर्यंत गिरनारच्या पायऱ्या चढून दर्शनाला जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता. ही स्पर्धा पहिल्या पायरीपासून अंबाजी मंदिर ते परत पहिली पायरी अशी असल्यानं भाविकांना या काळात पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश नव्हता. त्यामुळं साहजिकच रोप वे साठी प्रचंड गर्दी झाली होती. खरंतर दर पौर्णिमेला उत्तरोत्तर भाविकांची गर्दी वाढतच आहे. आणि याच दिवशी मॅरेथॉन आयोजित करुन भाविकांना पायऱ्या चढून जाण्यासाठी प्रवेश बंदी करणं हे अगदी त्रासदायक आहे. यापूर्वीही पौर्णिमेलाच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अशा गोष्टींचा भाविकांना नक्कीच त्रास होतो. आम्ही त्या गर्दीतून रांगेतूनच साधारण पाऊण तासाच्या प्रतिक्षेनंतर रोपवे नं अंबाजी मंदिरापर्यंत पोहचलो. अंबा मातेचं दर्शन घेऊन पुढे गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन गुरु शिखरावर निघालो. गर्दी प्रचंड होती तरी भाविक एकत्र समुहानं वर चढत असल्यानं दर्शनाला रांग नव्हती.
मंदिरातले भाविक दर्शन घेऊन बाहेर आले आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुदैवानं त्यावेळी मंदिरात आमच्यासह आणि २-३ भाविकच होते. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकांसमोर नतमस्तक होऊन आम्हाला पादुकांसमोरच दिड दोन मिनिटं शांत बसायला मिळालं. लगेचच भाविक दर्शनासाठी आल्यानं लगेच उठलोच. पण ती दिड दोन मिनिटं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच होती. वाढत्या गर्दीमुळं पौर्णिमेला दर्शन जरी छान होत असलं तरी तिथं बसायला मिळणं अवघड असतं. दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन वाचन करुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवेनं पायथ्याशी पोहोचलो.
यावेळी नेहमीप्रमाणं सोरटी सोमनाथच्या दर्शनाला न जाता दुसरीकडे जायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं लगेच दुपारी एक वाजता कारने निघालो. मला जिथं जायचं होतं तिथं आधी बाकी तिघंही आधी जाऊन आले होते. मात्र माझा योग आता आला होता.
'जांबुवंत गुहा' - जूनागढ पासून १०५ किमी अंतरावर आणि पोरबंदर पासून १७ किमी अंतरावर असलेली ही गुहा पौराणिक, धार्मिक आणि पुरातत्वीयऋ दृष्ट्या अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. 'पोरबंदर' मधील 'राणावाव' तालुक्यातील 'आदित्याणा' गावाजवळ प्रसिद्ध 'बरडा टेकड्यां'च्या पायथ्याशी ही गुहा आहे. ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. जमिनीवरुन पाहताना एखादी छोटी विहिर असल्यासारखं भासतं. आत उतरण्यासाठी एका खांबाभोवती गोल फिरणाऱ्या अगदी अरुंद दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरताना आधारासाठी मजबूत दोर बांधला आहे. या गुहेत छतामधून सतत टपकणाऱ्या पाण्यामुळं नैसर्गिक रितीनं शिवलिंग तयार झाली आहेत. अजूननही ही निर्मिती सुरुच आहे. यातलं 'पाताळेश्र्वर' हे नैसर्गिक रितीनं तयार झालेलं एकमेव असं 'रुद्राक्ष शिवलिंग' आहे. 'अमरनाथ' ला जसं 'बर्फाचं स्वयंभु शिवलिंग' तयार होतं तसंच हे 'स्वयंभू रुद्राक्ष शिवलिंग' इथं तयार झालं आहे. जांबुवंतानं भगवान शिवांसाठी इथं तपश्चर्या केली होती. त्यामुळं इथं स्वयंभू शिवलिंग तयार होतात. या सर्व शिवलिंगावर गुहेच्या छतातून नैसर्गिकपणे सतत जलाभिषेक होत असतो. अतिशय भव्य आणि लांबलचक अशा या गुहेत दोन बोगदे आहेत. त्यातला एक बोगदा जूनागढला पोहोचतो आणि दुसरा द्वारकेला पोहोचतो. मात्र आता काही अंतरावर ते बुजले आहेत. नैसर्गिक हवा आणि प्रकाशासाठी गुहेत दोन मोठे झरोके आहेत. जमिनीवरुन खाली एवढी मोठी गुहा असेल याची तिळमात्रही कल्पना येत नाही.
'भगवान श्रीकृष्ण' आणि वानरांचा 'राजा जांबुवंत' यांच्यात 'स्यमंतक मण्या'साठी २८ दिवस युद्ध चाललं होतं ते स्थान म्हणजे ही गुहा. अर्थातच 'जांबुवंतां'चा या युद्धात पराजय झाला होता. पण जेव्हा त्यांना कळलं की प्रत्यक्ष 'भगवान श्रीकृष्ण' आपल्या बरोबर युद्ध करत होते तेव्हा त्यांनी ते 'रत्न' म्हणजे 'स्यमंतक मणी' तर 'श्रीकृष्णांना' दिलाच पण त्याचबरोबर आपली कन्या 'जांबुवंती' हिचा विवाहही श्रीकृष्णाबरोबर केला. जांबुवंत हे 'प्रभू श्रीरामां' च्या वानरसेनेचे सेनापती होते पण त्यांना युद्धात सहभागी होता आलं नव्हतं आणि त्याची खंत त्यांना होती म्हणून 'प्रभू श्रीरामां'नी त्यांना 'मी पुढील 'श्रीकृष्ण' अवतारात तुझ्याशी युद्ध करेन' असा आशीर्वाद दिला होता. 'राजा सत्यजिता'नं 'सूर्यदेवा'ची आराधना आणि तपश्चर्या केली होती तेव्हा 'सूर्या'नं त्यांना 'स्यमंतक मणी' प्रसाद म्हणून दिला होता. तो त्याच्या भावाने पळवला पण सिंहाच्या हल्ल्यात भावाचा मृत्यू झाला. त्यावेळी सिंहाला हरवून जांबुवंतानं तो मणी हस्तगत केला होता. आणि या मण्यासाठीच इथं हे युद्ध झालं होतं.
या गुहेतील खडक आणि पायाखालची माती मध्ये मध्ये सोन्यासारखी चमकते. याच कारण पुरातत्व विभागाच्या दृष्टीनं इथं नैसर्गिक खनिजं आणि 'बाॅक्साईट' चं प्रमाण जास्त आहे. ही गुहा पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळं इथून माती किंवा इतर कुठलीही वस्तू नेण्यासाठी परवानगी नाही.
आम्ही गुहेत उतरण्याआधीच किमान २०-२५ जणं गुहेत उतरले होते. पण गुहा अतिशय प्रशस्त आणि लांबलचक असल्यानं गर्दीचा त्रास नव्हता. १०-१५ मिनीटातच ते सारे गुहेतून बाहेर पडले. आम्ही गुहेत उतरलो तेव्हाच गुहा पहायला गुजरातचे एक मोठे वन अधिकारी आणि त्यांच्या बरोबर एक माहितगार पोलीस असे दोघं आले होते. त्यांच्याशी गुहेच्या पौराणिक कथेबद्दल, गुहेत तयार होणाऱ्या शिवलिंगांबद्दल आणि इतर संबंधित गोष्टींबद्दल बोलणं झालं. ते दोघं सारं पाहून बाहेर गेले आणि आम्ही चौघंच तिथं राहिलो. मग परत नीटपणे सारी गुहा पाहून, परत 'पाषाणेश्वरा'चं दर्शन घेऊन, तिथली अपार शांतता अनुभवून, सारी शिवलिंग पाहून एक वेगळीच अनुभूती घेऊन आम्ही गुहेतून बाहेर आलो. ही गुहा वर्षभरात सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत कधीही पहाता येते.
'श्रीहरी मंदिर' - 'पोरबंदर' मधलं हे अजून एक सुंदर स्थान. जांबुवंत गुहेपासून १८ किमी अंतरावर आणि पोरबंदर विमानतळापासून ४-५ किमी. अंतरावर हे मंदिर आहे. 'श्रीहरी मंदिर' हे 'सांदिपनी विद्यानिकेतन' म्हणूनही ओळखले जाते. सुप्रसिद्ध भागवताचार्य 'रमेशभाई ओझा' यांच्या प्रेरणेतून मंदिर उभारण्यात आलं आहे. २००६ साली याचं उद्घाटन करण्यात आलं आहे. अतिशय अवाढव्य परिसरात भव्य मंदिर आणि बगिचा तयार केला आहे. भगवान श्रीकृष्णांना हे मंदिर समर्पित आहे. मंदिरात राधा कृष्ण, शिव पार्वती, लक्ष्मी नारायण, गणपती, हनुमान, सूर्य नारायण, माता करुणामयी यांच्या मूर्ती प्रतिष्ठापीत आहेत. अतिशय भव्य असं हे मंदिर संकुल वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या मंदिराच्या बाजूलाच सांदिपनी संस्कृत विद्यापीठ आहे. एकूण सारा परिसर आणि मंदिर दर्शन चित्तवृत्ती प्रसन्न करणारं आहे.
'जांबुवंत गुहा' आणि 'श्रीहरी मंदिर' पाहून आम्ही परत तलेटीला मुक्कामी गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळीच 'भवनाथ महादेवा'च्या मंदिरात गेलो. सुंदर दर्शन घडलं. येणाऱ्या महाशिवरात्रीसाठी मंदिराच्या आवारात जोरदार तयारी सुरु होती. या मंदिराच्या आवारात असलेलं मृगी कुंड अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचं आहे. याच कुंडात महाशिवरात्रीला अनेक नागा साधू, संत स्नानासाठी उतरतात मात्र त्यातील एक साधू परत कुंडाबाहेर येत नाही. ते स्वयं भगवान शिव असतात अशी मान्यता आहे.
भवनाथाचं दर्शन घेऊन मुक्काम सोडून दुपारच्या ट्रेन ने आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
- स्नेहल मोडक
























