'अधिकस्य अधिक फलम्' म्हणजे हिंदू पंचांगानुसार दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक महिन्यात केलं जाणारं नामस्मरण, जपतप, पूजाअर्चा, देवदर्शन हे सारं अक्षय आणि अधिक फलदायी असतं. याच विचारातून अधिक महिन्यात कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायची खूप इच्छा होती. पण इतर कार्यक्रमांमुळं जायला जमलं नाही. मग मात्र श्रावण महिन्यात कुलस्वामिनीच्या दर्शनाला जायचं ठरवलंच.
ठरल्याप्रमाणं सोमवारी सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली. अंबाजोगाईला श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी वारंवार जाणं होतंच. त्यावेळी शक्य असेल तेव्हा तेव्हा प्रवासादरम्यान किंवा थोडी वाकडी वाट करुन किंवा थोडा प्रवास वाढवून इतर पुरातन मंदिरं, वास्तू किंवा काही स्थलदर्शन आम्ही नेहमीच करतो. तसंच यावेळीही जायचं ठरवलं होतं. त्यानुसार काही तासांच्या प्रवासानंतर आम्ही एक स्थान पहायला पोहोचलो.
'सर्पिलाकार बारव' - 'परभणी' जिल्ह्यातील 'सेलु' तालुक्यातील 'वालुर' या गावात ही बारव / विहीर आहे. अतिशय दुर्मिळ अशी ही विहीर आहे. या विहिरीला पाण्यापर्यंत जाण्यासाठी आठ बाजूंनी कुंडलिक किंवा सर्पिल आकाराच्या पायऱ्या आहेत. पूर्वी उन्हाळ्यात विहीरीतील पाणी कमी झालं तरी पाण्यापर्यंत पोहोचता यावं यासाठी अनेक ठिकाणी अशी पायऱ्यांची रचना केली जात होती. या पायऱ्यांच्या सुरुवातीच्या भागात आठ देवकोष्ठ किंवा कोनाडे आहेत. ३२ फूट खोल आणि ३२ फूट रुंदीची अतिशय अप्रतिम अशी ही बारव आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते ही १००० ते १५०० वर्षं प्राचीन आहे. उत्कृष्ट भुमिती आणि गुरुत्वाकर्षणाचा ताळमेळ साधून याची रचना केली आहे. इतकी पुरातन वास्तू असूनही बराच काळ दुर्लक्षित होती. मात्र आता ग्रामस्थांनी एकत्र येऊन तिची साफसफाई केली आहे. पण तरी अजूनही बारव दुर्लक्षितच आहे. आम्ही दुपारी इथं पोहोचलो तेव्हा आसपास कुणीच नव्हतं. विहिरी पर्यंत कारने जाता येतं. आम्ही गाडीतून उतरून विहिरीजवळ गेलो तर तिथं कुणीच नव्हतं. विहिरीच्या अगदी आजुबाजुला लोकांची घरं आहेत. इतकी प्राचीन बारव असूनही पर्यटन, अभ्यासक यावेत यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. साताऱ्यातील बारा मोटेची विहीरही अशीच दुर्लक्षित होती. आता हळूहळू पर्यटक, अभ्यासक तिथे येऊ लागलेत. पण तिथंही काही व्यवस्था नाही. खरंतर या सर्पिलाकार विहिरीच्या ऐतिहासिक महत्वामुळं ही महाराष्ट्रातील संरक्षित वास्तूंमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. किमान वास्तू बद्दल माहिती देणारे फलक लावणं, सातत्यानं विहीरींची, आसपासची स्वच्छता राखणं हे करणं तरी आवश्यक आहे. अतिशय सुंदर अशी ही पुरातन बारव बघून आम्ही पुढे निघालो.
पुढे परभणीला एका मित्रांच्या घरी पोहोचलो. त्यांच्याकडे पोचून खूप गप्पा मारत गरमागरम भोजनाचा आस्वाद घेतला. नंतर त्यांच्याबरोबरच आम्ही अजून एका ठिकाणी पोहोचलो.
'श्री मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर' - परभणी शहरातील नांदखेडा रस्त्यावर हे पुरातन मंदिर आहे. स्वामी सच्चिदानंद सरस्वती महाराज यांच्या प्रयत्नातून या मंदिराचं निर्माण कार्य झालं आहे. भारतातील विशाल पारद मंदिर म्हणून हे ओळखलं जातं. २५० किलो पाऱ्यापासून ( mercury) या शिवलिंगाची निर्मिती करण्यात आली आहे. याला पारदलिंग किंवा 'तेजोलिंग' असही म्हणतात.तसंच या मंदिराचं प्रवेशद्वार कमान ८० फूट उंच आहे. अतिशय सुंदर रेखीव असं हे मंदिर आहे. भारतातील सर्वात विशाल पारद महादेव मंदिर म्हणून हे ओळखलं जातं. शिवपुराणात भगवान शिव पार्वती मातेला पारदाबद्दल गुप्त ज्ञान देताना सांगतात 'मम बीजं तु पारद:' अर्थात पारद ही माझी बीजशक्ती आहे. द्वादश ज्योतिर्लिंगं, पंचकेदार, पशुपतीनाथ यांच्या दर्शनानं जेवढं पुण्यफल लाभतं तेवढं पुण्यफल एका पारद शिवलिंगाच्या दर्शनानं लाभतं अशी पौराणिक मान्यता आहे. आम्ही मंदिरात जायला निघालो श्रावणी सोमवार असल्यानं दर्शनासाठी खूप गर्दी असेल असं वाटलं होतं. मात्र प्रत्यक्षात मंदिरात पोहोचलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती. अतिशय भव्य अशा कमानीतून आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला ओळीनं असलेल्या छोट्या मंदिरातून महालक्ष्मी, कालिमाता, राधाकृष्ण अशी दर्शनं घेत मुख्य मंदिरात गेलो. इथं शिवपिंडीचं दर्शन लांबूनच घेता येतं. अतिशय सुंदर असं पारद शिवलिंग आणि मागे भगवान महादेवांची मोठी रेखीव मूर्ती प्रतिष्ठापीत केलेली आहे. अगदी शांतपणे खूप छान दर्शन घ्यायला मिळालं. श्रावण सोमवारी इतकं छान दर्शन महादेवांनी घडवलं ही आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट होती. थोडावेळ मंदिरात थांबून आम्ही पुढे निघालो.
नेहमीप्रमाणं आमची गाडी परळी वैजनाथला निघाली होती. परळी वैजनाथ मंदिराच्या १ किमी आधीच रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मग खूप वळसा घालून मंदिराच्या पार्किंग लॉटमध्ये पोहोचलो. गाडीतूनच दर्शनासाठी असलेली प्रचंड गर्दी दिसत होती. श्रावण सोमवार म्हणजे गर्दी असणारच हे माहीत होतच पण रात्री एवढी गर्दी असेल अशी आम्ही कल्पना केली नव्हती. अर्थातच मग 'वैजनाथांना' बाहेरुनच नमस्कार केला आणि परत फिरलो. तिथून अंबाजोगाईला मुक्कामी पोहोचलो.
सकाळी सारी आन्हिकं आवरुन सात वाजता श्री योगेश्वरी मातेच्या मंदिरात पोहोचलो. फारशी गर्दी नसल्यानं छान दर्शन घेता आलं. अभिषेक करण्यासाठी गुरुजींना यायला थोडा वेळ लागणार होता. तेवढा वेळ आम्हाला शांतपणे देवीसमोरच तिचं दर्शन घेत बसायला मिळालं. खूपच छान गोष्ट होती ती आमच्यासाठी. गुरुजी आल्यावर अभिषेक केला. आज फारशी गर्दी नव्हती त्यामुळं अगदी छान यथासांग अभिषेक करायला मिळाला. श्रावण मंगळवारी देवीची सेवा करायला मिळाल्याचा विशेष आनंद होता. अभिषेक झाल्यावर साडीओटी भरुन प्रसाद घेतला. ओटीही शांतपणे भरायला मिळाली. अतिशय प्रसन्न तृप्त मनानं मंदिराबाहेर आलो. परत मुक्कामी येऊन आवरुन मुक्काम सोडून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.
परत निघेपर्यंत सकाळचे दहा वाजले होते. मग परत एकदा परळीला जायचा बेत रद्द केला. घरी परतताना आदल्या दिवशीच्या मार्गानं न जाता नेहमीच्या मार्गानं जायचं ठरवलं. दुपारी दिड वाजता आम्ही अहिल्यानगरला पोहोचलो. मंगळवार असल्यानं इथल्या गणपतीचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं. त्याप्रमाणं गावात असलेल्या या मंदिराजवळ पोहोचलो.
'विशाल गणपती मंदिर' - अहिल्यानगरमधील माळीवाडा भागात बस स्थानकाच्या जवळच हे मंदिर आहे. एका नाथपंथीय सत्पुरुषाने या मंदिराची स्थापना केली आहे. आणि त्यांची मंदिराच्या मागेच संजीवन समाधी आहे. इथली बाप्पाची मूर्ती भव्य म्हणजे ११फूट उंच आहे. पूर्वाभिमुख असलेली ही मूर्ती उजव्या सोंडेची असून या बाप्पाच्या नाभीवर फणाधारी नाग आहे. ही मूर्ती स्वयंभू असून अतिशय जागृत असल्याची मान्यता आहे. अतिशय देखणा आणि रेखीव असा हा बाप्पा आहे. इथंही दर्शनासाठी गर्दी नव्हती. त्यामुळं खूप छान दर्शन घडलं. शक्य असेल तेव्हा तेव्हा अंबाजोगाईला जातायेताना आम्ही इथं दर्शनाला येतोच. गणरायाच्या दर्शनानं मन अगदी प्रसन्न होतं. इथं दर्शन घेऊन परत पुढे निघालो.
प्रवास सुरु होताच पण हळूहळू माझी चलबिचल सुरु झाली. वातावरण पूर्णपणे ढगाळ होतं. आकाशात कृष्णमेघांची अपार दाटी झाली होती. मधेमधे जोरदार पाऊस पडत होता. मला दर्शनासाठी अजून एका मंदिरात जायचं होतं. ते मंदिर दर्शनासाठी नेहमीच सायंकाळी सहा वाजता बंद होतं. आणि अशा पावसाळी वातावरणात आम्ही सहा वाजण्यापूर्वी पोहोचू ना, दर्शन होईल ना, मंदिर आणि परिसर व्यवस्थित पहाता येईल ना याबाबत मन साशंक झालं होतं.
गोंदेश्वर मंदिर - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हे अतिप्राचीन आणि भव्य असं शिवमंदिर. बाराव्या शतकात 'गवळी राजकुमार राजगोविंद' यांनी निर्माण केलंलं हे शिवमंदिर १२५ फूट × ९५ फूट इतकं विशाल आहे. प्रत्यक्षात इथं 'शिवपंचायतन' आहे. मध्यभागी 'गोंदेश्वर महादेवा'चं मुख्य मंदिर आणि चार दिशांना 'माता पार्वती', 'गणपती', 'विष्णू' आणि 'सूर्य' यांची मंदिरं आहेत. हेमाडपंथी शैलीतील हा मंदिर समुह स्थापत्यकलेचा अतिशय उत्कृष्ट नमुना आहे. मंदिरांच्या सर्व भिंतींवर देव देवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक, रामायणातील प्रसंग हे सारं अतिशय रेखीव असं कोरलेलं आहे. मुख्य मंदिरात सभागृह आणि गाभारा आहे. गाभाऱ्यात अतिशय सुंदर शिवपिंडी आहे. गर्भगृहावर बांधलेलं पटई पध्दतीचं आकाशाकडे झेपावणारं देखणं शिखर अप्रतिम कोरीवकामानं सजलेलं आहे. या संपूर्ण मंदिरावरच्या अप्रतिम अशा त्रिमितीय शिल्पकलेवर सूर्यप्रकाश पडल्यावर साऱ्या मंदिराचं देखणेपण अतिशय उठावदार दिसतं. साधारणपणे दख्खन पठारावर मंदिर निर्माणासाठी काळ्या पाषाणांचा उपयोग केला गेला आहे. पण आश्चर्य म्हणजे हे मंदिर मात्र व्हेसिक्युलर पाषाणापासून निर्माण करण्यात आलं आहे. यामुळं या मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे. या पाषाणाची झीज जरा लवकर होते तसंच या पाषाणात कोरीवकाम करणंही अवघड असतं. परंतु याच पाषाणातून उत्तम शिल्पकलेचं हे मंदिर निर्माण करण्यात आलं आहे. या मंदिरालाही 'राष्ट्रीय संरक्षित स्मारक' म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
साशंक मनानं प्रवास सुरु असताना मी मनोमन शंभो शंकराला दर्शन घडवा म्हणून प्रार्थना करत होते. आणि सूर्य नारायणांनाही प्रार्थना केली की आम्ही मंदिराजवळ पोहोचू तेव्हा पाऊस नसावा आणि सायंकाळचं छान उन असावं. दोन्ही देवांनी प्रार्थना ऐकली आणि आम्ही पावणेसहाच्या जरा आधी मंदिरात पोहोचलो. तिथं बिलकुल पाऊस नव्हता आणि अगदी मला हवं तसं छान सांजवेळेचं केशरी उन पडलं होतं. मंदिर प्रांगणात शिरताना अगदी १-२ छायाचित्रं काढून आधी मंदिरात प्रवेश केला. अतिशय सुंदर अशा शिवपिंडीसमोर नतमस्तक झाले आणि मन भरुन आलं. दर्शन घेऊन जल अर्पण केलं. काही क्षण तिथं थांबून बाहेर आलो. महादेवाचं दर्शन घेऊन चार बाजूंना असलेल्या मंदिरात दर्शन घ्यायला गेलो. सूर्य मंदिरासमोर गेले आणि पावलं खिळलीच. सूर्य मंदिरात सूर्यास्ताचे सोनेरी किरण मूर्तीच्या अर्ध्या भागावर पडले होते आणि तो लहानसा गाभारा सोनरंगात उजळून निघाला होता. अतिशय नयनरम्य दृश्य होतं. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. गणपती मंदिराचा गाभाराही असाच सोनरंगानं उजळला होता. दर्शन घेतलं आणि मग शांतपणे थोडी छायाचित्रं काढली. गोंदेश्वर मंदिर जवळच आहे जाऊ केव्हातरी असं म्हणत आजवर राहिलेली दर्शनाची आणि मंदिर पहाण्याची आस आज पूर्ण झाली आणि मन तृप्त झालं.
मंदिर पाहून दर्शन घेऊन तृप्त मनानं रात्री घरी पोहोचलो. कुलस्वामिनी श्री योगेश्वरी मातेच्या दर्शनाबरोबरच प्राचीन बारव पहाता आली. पारदेश्वर महादेवाचं आणि गोंदेश्वर महादेवाचं अगदी छान दर्शन घडलं त्यामुळं श्रावण महिना आमच्यासाठी खूप खास ठरला. अधिक महिन्यात दर्शनासाठी जाता न आल्याची रुखरुख पुर्णपणे संपली.
- स्नेहल मोडक





















