'ऋतूनां कुसुमाकर' असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेत म्हटलंय. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसंत ऋतूचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे.
चैत्र-वैशाख हे दोन महिने उन्हाळा आणि वसंत ऋतू यांचे जणू समीकरणच.
सहस्ररश्मीच्या तेजाची दाहकता वाढत असतानाच वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी मात्र विविध रंगांनी बहरते आणि आपल्या दृष्टीसमोर रंगमयी उधळण होते.
वसंत ऋतू म्हणजे जणू निसर्गाची मानवाला एक शिकवण. पर्णहिन झालेल्या तरुवेलींही काही काळानंतर पुन्हा पालवतात, रंगगंधी फुलांनी बहरतात. अगदी तसंच आपल्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी खंबीरपणे पाय घट्ट रोवून उभं राहिलं तर वादळं नक्की शमतील आणि आपल्या आयुष्यातही पुन्हा पुन्हा वसंत फुलेल.
येता कुसुमाकर होई अवनी रंगगंधी
येई सुरेख दरवळ आसमंती मधुगंधी
वृक्ष बहाव्याचा जरी जाहला निष्पर्ण
लटकती झुंबरे पुष्पांची जणू सुवर्ण
पर्णसंभार जरी तयाचा कमी जाहला
लालकेशरात हा गुलमोहोर बहरला
वृक्ष ताम्हिणीचा इतकीच प्रतिमा उरे
वसंतसमयी फुलती त्यावरी जांभळे तुरे
पानगळीतही ठाम उभा वृक्ष पलाशाचा
येई ज्वाळेसम त्यास बहर सोनकेशराचा
शीतलछाया देत हा वृक्ष असे उरला
पिवळ्या पुष्पांनी सोनमोहोर फुलला
गाळूनी सारी पर्णे उभी काटेसावर
काटयातच येई लाल गुलाबी बहर
शुभ्र मोगरा अन मादक सुरंगी पिवळी
दरवळे जाईजुई अन नाजूक बकुळी
कूजिती कोकिळ मोहरल्या आम्रवनी
अन फुलतो अलवार वसंत मनोमनी
- स्नेहल मोडक




No comments:
Post a Comment