आपलं मन कधी आशेच्या हिंदोळ्यावर झुलतं तर कधी निराशेच्या डोहात शिरतं. आपली तब्येत, आजूबाजूच्या घटना, इतर परिस्थिती यानुसार आपल्या मनात भावतरंग उमटत असतात. मनसोक्त भटकावं, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हावं आणि सदैव आपल्या माणसांचा सहवास लाभावा ही प्रत्येक मनातली इच्छा. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न करतच असतो.
कधी कधी वाटतं
पहाटसमयी घनदाट जंगलात फिरावं
पक्ष्यांचे मधुर कूजन ऐकून मन प्रसन्न व्हावं
कधी कधी वाटतं
दिवसभर शुभ्र निर्झराजवळ बसावं
स्पर्श होता शीतजळाचा मन तृप्त व्हावं
कधी कधी वाटतं
वेगवेगळ्या छोट्यामोठ्या गिरीशिखरांवर चढावं
आपल्या क्षमता अन जिद्दीला आपणच जाणावं
कधी कधी वाटतं
साऱ्या गड किल्ल्यांवर इतिहास आठवत फिरावं
शिवराय अन मावळ्यांसमोर नतमस्तक व्हावं
कधी कधी वाटतं
फेसाळत्या लाटा पहात सागरतीरी बसावं
मनभावनांचे चित्र अलगद वाळूवर रेखावं
कधी कधी वाटतं
धुवांधार बरसणाऱ्या पावसात चिंब भिजावं
ओघळणाऱ्या थेंबांनी मन शांत शुध्द व्हावं
कधी कधी वाटतं
नात्यांच्या अन मैत्रीच्या साऱ्यांना सहज भेटावं
अन घट्ट गळाभेटीने विरहाचं मळभ दूर व्हावं
कधी कधी वाटतं
कधी कधी वाटणाऱ्या या भावनांना मूर्तरुप द्यावं
अन वेगवेगळ्या अनुभवांनी आपण समृध्द व्हावं
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment