जसजशी वैशाखाची काहिली वाढत जाते तसतशी सगळ्यांना पावसाची आस लागते. पावसाची अगदी आतुरतेनं वाट पहाणं सुरु होतं आणि मग सुरु होतो वर्षा ऋतू.
आपल्या आसुसलेल्या मनाला आणि धरतीला शांत करण्यासाठी मृगधारा बरसू लागतात. तृषार्त अवनी आणि आपणही तृप्त तृप्त होतो. नभी मृगमेघ दाटू लागताच आपल्या मनातही आठवणी दाटतात. आणि बरसत्या पर्जन्यधारेबरोबरच आठवणीही झरु लागतात.
मित्र-मैत्रिणी किंवा प्रिय व्यक्तीसह पावसात भिजण्याची मजा वेगळीच असते. ते क्षण पुन्हा अनुभवता आले तर खूपच सुंदर नाहीतर त्या आठवणीत मात्र रममाण होतो आपण.
मृगमेघांनी नभ हे आक्रमिले
बिजलीसंगे मेघमृदुंग कडाडले
बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले
तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले
भेट आपली स्मरते धुंद पावसातली
अवचित भेट घडली जणू स्वप्नातली
रिमझिम जलधारांत आपण भिजलो
अन मृदगंधाने मनोमनी मोहरलो
बरसता घन निळा मन मयुर जाहले
स्मरुनी ती प्रीत मन अलगद फुलले
झेलुनी मृगधारा तन तृप्त जाहले
आठवणीत तुझिया मन हे रमले
बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले
तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले
- स्नेहल मोडक



No comments:
Post a Comment