Pages

Saturday, March 28, 2026

नर्मदे हर

           'नर्मदा मैया'ची 'उत्तर वाहिनी परिक्रमा' गुढी पाडव्यापासून सुरु होते. त्या परिक्रमेची तयारी खूप आधीच करावी लागते. त्यानुसार आमचीही सारी तयारी आधीच करुन झाली होती. वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून पौर्णिमेपर्यंत न थांबता यावर्षी आम्ही पाडव्यानंतर लगेच परिक्रमा करायचं ठरवलं होतं. 

              ठरल्याप्रमाणे २२ मार्च रोजी रात्री आम्ही परिक्रमेसाठी प्रस्थान केलं. २३ तारखेला पहाटे वडोदऱ्याला पोहोचलो. तिथून आधीच ठरवलेल्या दोन ट्रॅव्हलर्स आणि मोठ्या कारने आम्ही सकाळी साडेसात वाजता मुक्कामी पोहोचलो. सारं आवरुन लगेच नेहमीप्रमाणं मुक्काम स्थानापासून जवळच असलेल्या 'त्रिवेणी संगमा'वर स्नानासाठी गेलो. इथं 'नर्मदा मैया', 'ओरसंग नदी' आणि 'गुप्त सरस्वती' असा 'त्रिवेणी संगम' आहे. इथं स्नान करण्याचा अनुभव नेहमीच अतिशय सुंदर असतो. मैयाजळात उतरल्यावर क्षणातच अगदी आईच्या कुशीत शिरल्याचा आभास होतो. लेकराला माय जशी आंदुळते अगदी तस्से मैया जळाचे हलके तरंग आपल्या भोवती उठतात. आणि त्या तरंगांसारखंच आपलं मनही उत्फुल्ल होतं. आम्ही स्नानाला जळात उतरलो तेव्हा पूर्वेला नुकताच 'वासरमणी' अवतरला होता. मग स्नान करतानाच त्यालाही अर्घ्य अर्पण केलं. थोडावेळ मैयाचा सहवास अनुभवून आम्ही मुक्कामी परत आलो. सारी तयारी करुन 'उत्तर वाहिनी परिक्रमे'ची संकल्प पूजा केली. त्यानंतर तिथंच भोजन केलं.

               दुपारच्या भोजनानंतर अगदी थोडा आराम करुन लगेच पुढील दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी जवळच असलेल्या 'कुबेर भंडारी' मंदिरात गेलो. तिथं दर्शन घेऊन पुढे 'भालोद'ला पोहोचलो. आमच्या प्रत्येक परिक्रमेत आणि एरवीही जेव्हा शक्य असेल तेव्हा आम्ही इथं येतोच. इथं 'एकमुखी श्री दत्तात्रेय', 'वासुदेवानंद सरस्वती' यांचं दर्शन घेतलं. आणि तिथल्या 'प्रतापे महाराजां'ना नमन करुन त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी थांबलो. दरवेळी आम्हाला त्याच्याकडून नवनवीन माहिती मिळते. त्यामुळं त्यांना भेटणं ही आमच्यासाठी पर्वणीच असते. त्यांच्या नुसत्या दर्शनानं, थोडंसं बोलण्यानंही एक वेगळीच आंतरिक उर्जा आम्हाला जाणवते. यावेळी खरंतर ते दोन दिवसांपूर्वीच परगावी जाणार होते. पण काही कारणास्तव त्यांचं जाणं स्थगित झालं. आणि आम्ही जेव्हा आश्रमात गेलो तेव्हाही ते एका कामासाठी बाहेर जाणारच होते. पण काही भक्त दर्शनासाठी आल्यानं ते थांबले आणि तेवढ्यातच आम्ही तिथं पोहोचलो. एकूण महाराजांच्या भेटीचा योग होता. अन्यथा आम्हाला फारच रुखरुख लागली असती हे नक्की. अतिशय साधं, प्रेमळ आणि प्रसन्न असं हे महारांजांचं व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच अध्यात्मिक उर्जा देतं आलंय. त्यांच्याशी बराच वेळ वार्तालाप करुन वेळेच्या बंधनामुळं तिथून निघालो.

                भालोदहून आम्ही 'शूलपाणी' मंदिरात दर्शनासाठी गेलो. अर्थातच तोपर्यंत सायंकाळ झाली होती. मग तिथंच थांबायचं असं ऐनवेळी ठरवलं आणि नर्मदा मैयाच्या घाटावर गेलो. खरंतर तिथं बराच वेळ थांबल्यावर इतरत्र कुठंही न जाता मुक्कामी परतावं लागणार होतं. पण तिथं होणारी अप्रतिम अशी मैयाची आरती आम्हाला पहायचीच होती. अखेर त्यांच्या ठरलेल्या वेळी म्हणजे रात्री ८ वाजता प्रत्यक्ष आरतीला सुरुवात झाली. आणि क्षणार्धात सारं वातावरण चैतन्यमय झालं. आम्ही तर अगदीच जवळ बसलो होतो. धूप आणि कापूर यांच्या सुगंधानं मनही प्रसन्न झालं. मैयाची अतिशय सुंदर अशी आरती सुरु होती. आणि समोर प्रवाहातून प्रत्यक्ष मैया जणू सगुण साकार झाली होती. तनमनात वेगळीच स्पंदनं जाणवत होती. आरती संपली आणि नर्मदाष्टक सुरु झालं. नर्मदा अष्टक संपलं आणि अत्यंत देखणा असा 'लेझर शो' सुरु झाला. शिवतांडव स्तोत्र त्या लेझर शो मधून उलगडलं. अगदी मंत्रमुग्ध करणारा असा हा कार्यक्रम होता. सारा कार्यक्रम संपल्यावर मैयाचं दर्शन, आरती आणि तीर्थ घेऊन आम्ही मुक्कामी परतलो. आरती संपायला ९ वाजून गेले होते. त्यानंतर तिथून निघून वाटेत जेवून मुक्कामी पोचायला ११.३० वाजले होते. 

                   परिक्रमेसाठी (२४ तारखेला) पहाटे ३ वाजता आम्हाला निघायचं होतं. आमच्या मुक्कामापासून आम्ही जिथून परिक्रमा उचलणार होतो तिथं पोचायला एक तास लागणार होता. सारी आन्हिकं आवरुन निघायला अखेर साडेतीन वाजले. काही भक्तांच्या उशीरा येण्यानं बाकी सर्वांनाच ताटकळावं लागलं. अखेर पावणे पाच वाजता आम्ही परिक्रमा जिथून उचलणार होतो तिथं म्हणजे 'रामपुरा' गावात 'धनेश्वर मंदिरा'जवळ पोहोचलो. याआधीच्या परिक्रमा आम्ही 'तिलकवाडा'- 'रामपुरा'- 'तिलकवाडा' अशाच केल्या होत्या. पण पूर्वीच आम्हाला श्री प्रतापे महाराजांनी या उत्तर वाहिनी परिक्रमेबद्दल माहिती दिली होती. मुळात नर्मदा मैया रामपुरा इथं उत्तर वाहिनी होते ती तिलकवाडा पर्यंत उत्तर दिशेने वाहते. आणि तिलकवाड्यापासून परत ती पश्चिम वाहिनी होते. त्यामुळं खरी परिक्रमा 'रामपुरा'- 'तिलकवाडा'- 'रामपुरा' अशी करायची आहे. पण भाविक दोन्ही बाजूंनी ही परिक्रमा करतात. फार पूर्वी पासून सुरु असलेली ही परिक्रमा काही काळ बंद झाली होती. श्री प्रतापे महाराजांनी पून्हा ही परिक्रमा सुरु केली आणि शास्त्रानुसार ती रामपुराच्या धनेश्वर मंदिरापासून सुरु केली. गतवर्षी आम्ही परिक्रमेत धनेश्वर मंदिरात गेलो असताना तिथल्या साधकांनीही परिक्रमा याच मार्गानं होते असं सांगितलं. पण आम्ही सारा कार्यक्रम ठरवताना तिलकवाडाहूनच परिक्रमा करायचं ठरवलं होतं. मात्र आम्ही परिक्रमेला घरुन प्रस्थान करायच्या ५-६ दिवस आधी मला अचानक मैयाकडून रामपुराहून परिक्रमा सुरु करण्याचा संकेत मिळाला. मनात थोडी चलबिचल झाली. पण आमच्या मुक्कामापासून जेमतेम एक तासावरच 'धनेश्वर मंदिर' आहे हे पहाताच यावेळी मैयाच्या संकेतानुसार रामपुराहूनच परिक्रमा उचलायचं नक्की केलं. 

               धनेश्वर मंदिरात दर्शन प्रसाद घेऊन पहाटे साडेपाच वाजता परिक्रमा सुरु केली. मार्गातीलं साऱ्या मंदिरांचं कधी आत जाऊन कधी बाहेरुन दर्शन घेत होतो. 'नर्मदा मैया' कुमारीका असल्यानं इथं 'कन्यापूजना'ला अतिशय महत्व आहे. पूर्ण परिक्रमा मार्गावर या काळात अनेक कन्यका मुखानं 'नर्मदे हर' चा गजर करत उपस्थित असतात. सारे परिक्रमावासी आपापल्या परीने त्यांना दक्षिणा, खाऊ, शालेय साहित्य, शृंगार साहित्य असं देऊन एक प्रकारे मैयाची सेवा करतात. आम्हीही मार्गातील अशा कन्यकांना दक्षिणा खाऊ देत चाललो होतो. भल्या पहाटे अंधारात अशा कुमारिकांना तिथं पाहून मनात विचारांची गर्दी होतेच. एका ठिकाणी अशीच एक अगदी लहान कन्या एकटीच बसली होती. थोडं उजाडलं होतं. मी तिला खाऊ दिला आणि ती चटकन 'नर्मदे हर' म्हणाली. मीही 'नर्मदे हर' म्हणताच एकदम गोड निर्व्याज हसली आणि त्या क्षणीच माझ्या तनमनावर एक शिरशिरी उमटली. तिचं ते लाघवी हास्य पहाताच मला प्रत्यक्ष नर्मदा मैयाच हसत असल्याचा भास झाला. मी अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते. क्षणातच भानावर आले त्या कन्येच्या गालाला हलकासा स्पर्श केला आणि मी पुढे निघाले. मग मनात विचार आला तिचं गोड हसतानाचं छायाचित्र घ्यायला हवं होतं. पण लगेच दुसऱ्या क्षणी जाणवलं की माझ्या मन:पटलावर तर तिचा गोड चेहरा उमटलाय तो तर पुसला जाणार नाही. मग माझ्यासाठी तेवढं पुरेसं आहे. 

                 आम्ही पुढे चालत राहिलो आणि नंतर तात्पुरत्या बांधलेल्या पुलावरुन 'तट परिवर्तन' केलं. किनाऱ्यावर थोडं चालत एक उंच चढण चढून गेलो. इथं याचवर्षी पायऱ्या बांधल्या आहेत. यापूर्वी ही चढण चढायला थोडी अवघडच होती. वर येऊन 'वासुदेव कुटीर' मध्ये गेलो. तिथं 'मारुतीराया' आणि 'शंभु महादेवाचं' दर्शन घेऊन थोडंसं नर्मदाजल अर्पण करुन‌ त्या किनाऱ्यावरुन परत चालायला सुरुवात केली. मार्गात ठिकठिकाणी सेवा म्हणून चहा, पाणी, ताक, नाश्ता, भोजन देणाऱे, मुक्कामाची व्यवस्था करणारे काही आश्रम आहेत. एखाद्या ठिकाणी ताक पिऊन आम्ही पुढे चालत होतो. चालत 'नंदी घाटा'वर पोहोचलो आणि सर्वांनी एकत्र एकाच नावेतून पून्हा 'तट परिवर्तन' केलं. नावेतून जात असतानाच आमच्या जवळचं थोडंसं 'नर्मदाजल' प्रवाहात अर्पण करुन प्रवाहातलं जल आमच्या कुपीमध्ये भरुन घेतलं. याला 'तीर्थ मिलन' म्हणतात.  नावेतून उतरुन वर आलो आणि तिथल्या 'तीर्थेश्वर महादेवा'च्या मंदिरात गेलो. महादेवाला थोडं जल चढवून परत चालायला सुरुवात केली. पून्हा धनेश्वर मंदिरात पोहोचून धनेश्वराला थोडं जल चढवलं आणि आमची परिक्रमा पूर्ण झाली.अलवार उमलणाऱ्या पहाटेला साक्षी ठेवून, मार्गात होणारा नर्मदे हर चा गजर, मनात सुरु असणारं नामस्मरण आणि बाजून संथ, शांत वाहणारी नर्मदा मैया या सर्वांबरोबर केलेली परिक्रमा म्हणजे अतिशय सुंदर अशीच अनुभूती. 

                परिक्रमा पूर्ण करुन आम्ही परत मुक्कामी आलो. यावेळी पहिल्यांदाच आम्हाला परिक्रमा पूर्ण झाल्यावर २१ कुमारिकांना 'कन्यापूजना'साठी बोलावण्याचं भाग्य लाभलं होतं. अर्थात आम्ही जिथे राहिलो होतो त्यांनीच ही व्यवस्था केली होती. तिथे जवळच असलेल्या शाळेत शिकणाऱ्या छोट्या छोट्या कुमारिका आल्या होत्या. आम्ही त्यांचं पूजन करुन दक्षिणा, खाऊ आणि इतर वस्तू दिल्या. आणि लगेचच भोजनासाठी पानं वाढली. साऱ्याजणी भोजन करुन दिलेल्या वस्तू घेऊन आनंदानं परत गेल्या आणि आम्ही सारे तृप्त झालो. आमच्या उत्तर वाहिनी परिक्रमेची सांगता अगदी छान अशा कन्यापूजनानं झाली.

                   आम्हीही जेवून सारं आवरुन मुक्काम सोडून निघालो. २३ तारखेला वेळेअभावी 'गरुडेश्वरा'चं दर्शन राहिलं होतं. त्यामुळं आधी गरुडेश्वराचं दर्शन घेतलं. आणि वडोदरा स्टेशन वर निघालो. आमचा पुढचा प्रवासाचा टप्पा परत वडोदऱ्याहून सुरु होणार होता. आमच्यापैकी जवळपास अर्धे भाविक वडोदऱ्याहून परत जाणार होते. आणि आमच्यासह अर्धे भाविक वडोदऱ्याहून 'गिरनार'ला जाणार होते.

                      त्यानुसार रात्री प्रवास सुरु करुन २५ तारखेला पहाटे आम्ही 'जूनागढ'ला पोहोचलो. मुक्कामी पोचून सारं आवरुन लगेच दर्शनाला गेलो. कुठलाही महत्त्वाचा दिवस नसतानाही दर्शनासाठी पौर्णिमेसारखीच गर्दी होती. रोपवेनं अंबामाता मंदिरापर्यंत पोचून पुढे पायऱ्या चढून गुरु शिखरावर पोहोचलो. मंदिरात प्रवेश करुन नतमस्तक झाले. अतिशय सुंदर दर्शन घडलं. पुन्हा खाली उतरुन नेहमीच्या ठिकाणी बसून गुरुचरित्र वाचन केलं. नंतर अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवे ने पायथ्याशी गेलो. थोडा आराम करुन परत दर्शनासाठी निघालो. नेहमीप्रमाणं 'नाग मंदिर', 'भालका तीर्थ', 'गीता मंदिर',  'त्रिवेणी संगम' ही सारी दर्शनं घेत 'सोमनाथ' ला पोहोचलो. सोमनाथ दर्शन घेऊन जेवून रात्री उशिरा मुक्कामी परत आलो. 

                       २६ तारखेला सकाळी लवकर आवरुन दर्शनाला निघालो. त्या दिवशी 'श्री राम नवमी' असल्यानं आधी 'श्री रामरायाचं' दर्शन घेऊन 'भवनाथ महादेवा'चं दर्शन घेतलं. मुक्कामी परत येऊन सामान घेऊन मुक्काम सोडून परतीच्या प्रवासाला लागलो. 

                        प्रवासाला निघायच्या दिवसापासूनच माझ्या तब्येतीनं असहकार पुकारला होता. जोरदार कसकस, डोकेदुखी, घसादुखी सुरु झाली होती. औषंधं घेऊनच सारी यात्रा केली. अर्थातच श्री दत्तात्रेयांच्या आणि नर्मदा मैयाच्या कृपेनंच माझी ही यात्रा पूर्ण झाली. 

                    पूर्ण श्रध्देनं केलेली नर्मदा परिक्रमा नेहमीच अतिशय सुंदर अनुभूती देते. गिरनार दर्शनही श्री दत्तात्रेयांच्या कृपेनंच सुंदर रित्या घडतं. 

|| नर्मदे हर||      ||जय गिरनारी||

                              - स्नेहल मोडक






No comments:

Post a Comment

कविता

नर्मदे हर

             ' नर्मदा मैया 'ची ' उत्तर वाहिनी परिक्रमा ' गुढी पाडव्यापासून सुरु होते. त्या परिक्रमेची तयारी खूप आधीच करावी ल...