Pages

Monday, May 3, 2021

भावपूर्ण

           सद्यस्थितीत कोरोनाबद्दल वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा, लिखाण सातत्याने सुरु आहे. अर्थात परिस्थिती फारच भयावह आहे. प्रत्येकजण मनातून प्रचंड धास्तावलेला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून सतत होणाऱ्या उलटसुलट चर्चा. लेखन आणि चित्रफिती यांनी सगळे गोंधळलेल्या बावरलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे आता आपण व्यक्त व्हायचं नाही असं ठरवलं होतं पण नुकत्याच वाचनात आलेल्या एका वाक्याने विचारचक्र सुरु झालं आणि मन शांत होणं अवघड होऊन बसलं. अखेर शब्दबद्ध करायचं ठरवलंच.

           'जितक्या सहजतेने आपण thank you किंवा sorry म्हणतो तितक्याच सहजतेने आपण आता भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणायला लागलोय'. हे वाक्य वाचताक्षणीच मन सुन्न झालं. आणि काही क्षणांनंतर जाणवली ती सद्यपरिस्थितीतली भीषणता. अक्षरशः मृत्यूचं तांडव सुरु आहे सध्या.

           नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच कुठल्याही परिस्थितीलाही दोन बाजू असतात. कोरोनामृत्यूचं प्रमाण जरी अधिक असलं तरी त्यातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण त्याहून नक्कीच जास्त आहे. विविध माध्यमांतून आपल्या समोर नकारात्मक घटनाच येत आहेत. पण त्याची दुसरी बाजू म्हणजे ज्या काही सकारात्मक घटना घडतायत त्या आपल्यापर्यंत फारशा येत नाहीयेत. 

           हा आजार फार भयावह आहे हे जरी खरं असलं तरी यातून माणुसकी, सद्सदविवेक बुध्दी संपत चाललीय ही या आजाराहून भयंकर वाईट गोष्ट आहे. अर्थात याचीच दुसरी बाजू म्हणजे कुठेतरी काही प्रमाणात तरी माणुसकी अजून जिवंत आहे. एखाद्या वादळी रात्री दूरवर लुकलुकणारा दिवाही आपल्याला त्या वादळाला ठामपणे सामोरं जाण्याची शक्ती देतो अगदी तसंच या आजारात सुरक्षेची काळजी, जिवंत असलेली माणुसकी, सकारात्मक घटना, आपली मन:शक्ती आणि प्रार्थना यांच्या आधारानेच आपल्याला या कोरोनाच्या भयप्रद संकटावर मात करायची आहे. या आजारापासून सुरक्षित रहाण्यासाठी शारीरिक अंतराची गरज असली तरीही भावनिक अंतर पडू न देता एकमेकांना आधार देणं आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

          आपल्या मन:शक्तीचा आपल्या शरीरावर खूप मोठा परीणाम होत असतो. त्यामुळे कितीही संकटं आली तरी आपण मनाने खंबीर रहायलाच हवं म्हणजे नक्की आपण संकटावर मात करु शकू. सध्या आपण सगळेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे अतिशय भयावह परिस्थितीतून जातोय.पण एकत्रितपणे सकारात्मक विचार,प्रयत्न आणि प्रार्थनेच्या आधारावरच आपण या दु:स्वप्नातून बाहेर येणार आहोत. 

           आपली सद्सदविवेकबुध्दी आणि माणुसकी चिरंतन रहावी आणि उदंड आयुरारोग्य लाभावं हिच ईशचरणी प्रार्थना.


आयुष्य थांबलंय की संपलंय

जमेल का परत हसत खेळत जगणं

कि उरेल ते फक्त स्वप्नात पहाणं

       धावत होतो सारे आपण पैशासाठी

       कुटुंबासाठी, सुखाने जगण्यासाठी

धावपळीच्या जगण्यातून काढून वेळ

जमवत होतो मैत्री अन नात्यांचा मेळ

        करुन साजरे नित्य उत्सव आणि सण

        वेचत होतो मिळून सारे आनंदाचे क्षण

 शोधात नवनवीन बिघडला तोल निसर्गाचा

 होणार का आता त्यातच ऱ्हास मानवाचा

         चिंता सोडून काळजी घेणं गरजेचं झालंय

         प्रयत्न अन प्रार्थना एवढंच हाती उरलंय

         आयुष्य थांबलंय की संपलंय........

स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...