वैशाख अर्धा सरलाय पण रणरणतं उन आणि जीवाची तगमग काही कमी होत नाहीय. पावसाळा सुरु व्हायलाही अजून थोडा काळ बाकी आहे. या रखरखीत उन्हाने भुई भेगाळलीय, जीवाची काहिली होतेय त्यामुळे मनाला पर्जन्यसरींची आस लागलीय. वर्षाऋतूच्या आगमनाला जरी वेळ असला तरी त्या आधीच्या वळवाच्या पावसाची मन आसुसून वाट पहातय. अगदी अचानकपणे पण वाजत गाजत येणारा, थोडा बरसुन निघून जाणारा असा हा वळवाचा पाऊस. धरती अन मनाला सुखावणाऱ्या या अवचित पावसासाठी मन फारच आसुसलंय.
दाह धरतीचा अति जाहला
वनी वैशाखवणवा पेटला
तनामनाची जणू काहिली झाली
अवचित पावसाची आस लागली
पाऊस मृगाचा जरी तो नसेल
दाह धरतीचा किंचीत शमेल
क्षणिक गारवा जरी त्याने पसरेल
मृदगंधाने मग मन हे मोहरेल
नभी मृदुंग तो कडाडेल का
नर्तन विद्युल्लता करेल का
पाऊस असा अवचित येईल का
धरती अन मनास भिजवेल का
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment