Pages

Sunday, May 30, 2021

वळीव

               वैशाख अर्धा सरलाय पण रणरणतं उन आणि जीवाची तगमग काही कमी होत नाहीय. पावसाळा सुरु व्हायलाही अजून थोडा काळ बाकी आहे. या रखरखीत उन्हाने भुई भेगाळलीय, जीवाची काहिली होतेय त्यामुळे मनाला पर्जन्यसरींची आस लागलीय. वर्षाऋतूच्या आगमनाला जरी वेळ असला तरी त्या आधीच्या वळवाच्या पावसाची मन आसुसून वाट पहातय. अगदी अचानकपणे पण वाजत गाजत येणारा, थोडा बरसुन निघून जाणारा असा हा वळवाचा पाऊस. धरती अन मनाला सुखावणाऱ्या या अवचित पावसासाठी मन फारच आसुसलंय.


दाह धरतीचा अति जाहला

वनी वैशाखवणवा पेटला

         तनामनाची जणू काहिली झाली

        अवचित पावसाची आस लागली

पाऊस मृगाचा जरी तो नसेल

दाह धरतीचा किंचीत शमेल

        क्षणिक गारवा जरी त्याने पसरेल

        मृदगंधाने मग मन हे मोहरेल

 नभी मृदुंग तो कडाडेल का

 नर्तन विद्युल्लता करेल का

        पाऊस असा अवचित येईल का

        धरती अन मनास भिजवेल का

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...