Pages

Tuesday, June 22, 2021

सागरा ...

             सध्याच्या कोरोनाकाळात पर्यटनावर खूप निर्बंध घातले आहेत. अर्थात आपल्या सुरक्षिततेसाठीच हे निर्बंध असल्यामुळे पर्यटनाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. 

           कोकण + समुद्र + आंबे = मे महिना  हे समीकरणही गेल्या वर्षापासून जुळवणं अवघड झालंय. वर्षासहलींचाही आनंदानुभव घेता येत नाहीय. गडकिल्ल्यांवर जाणे, समुद्र किनारी फिरणे सारं काही सध्या जवळजवळ बंद आहे.

            कोकणात रहाणाऱ्या लोकांचा समुद्र हा नित्य जीवनाचाच एक भाग आहे. आपल्या मनोभावनेप्रमाणे प्रत्येक वेळी वेगळा भासणारा हा समुद्र वारंवार अनुभवण्यासारखाच असतो. पण काही कारणास्तव कोकणातून इतरत्र स्थायिक झालेल्या लोकांना समुद्र अधुनमधूनच अनुभवायला मिळतो.

             पण सध्याच्या काळातला सागराचा हा दुरावा मात्र कधी संपेल याचीच सगळे लोकं वाट बघत असतील, हो ना? 


      

विरह तुझा मज अपार झाला

सागरा  कधी भेटशील मला

            सरला काळ किती भेट न घडली

            तव दर्शनाची आस मज लागली

अथांग निळजळी नौका डोलती

शुभ्र फेसाळ लाटा किनारी खुलती

            जळात मत्स्य अन वरी समुद्रपक्षी

            ओल्या वाळूत रेखिती खेकडे नक्षी

 अस्ताचलास जेव्हा रविबिंब टेकते

 सागर निळाई मग सोनवर्खी होते

            उमटती पाऊलखुणा वाळूवरी

            स्पर्शजलाने शहारा येई तनुवरी

 वाळूत आठवणींची चित्रं रेखिते

 कधी अलगद शंखशिंपले वेचिते

            कातर हळव्या क्षणी स्तब्ध बसते

            उत्फुल्ल क्षणी शुभ्र लाटांशी खेळते

 येता किनारी तुझिया मी सुखावते

 कधी ऐकत गाज निद्राधीन होते

            किती काळ सुख हे ना लाभले

            दुरुनही तुझे दर्शनही ना घडले

 विरह तुझा मज अपार झाला

 सागरा कधी भेटशील मला

 

- स्नेहल मोडक




Tuesday, June 15, 2021

मृगधारा

            जसजशी वैशाखाची काहिली वाढत जाते तसतशी सगळ्यांना पावसाची आस लागते. पावसाची अगदी आतुरतेनं वाट पहाणं सुरु होतं आणि मग सुरु होतो वर्षा ऋतू.

            आपल्या आसुसलेल्या मनाला आणि धरतीला शांत करण्यासाठी मृगधारा बरसू लागतात. तृषार्त अवनी आणि आपणही तृप्त तृप्त होतो. नभी मृगमेघ दाटू लागताच आपल्या मनातही आठवणी दाटतात. आणि बरसत्या पर्जन्यधारेबरोबरच आठवणीही झरु लागतात. 

            मित्र-मैत्रिणी किंवा प्रिय व्यक्तीसह पावसात भिजण्याची मजा वेगळीच असते. ते क्षण पुन्हा अनुभवता आले तर खूपच सुंदर नाहीतर त्या आठवणीत मात्र रममाण होतो आपण.


मृगमेघांनी नभ हे आक्रमिले

बिजलीसंगे मेघमृदुंग कडाडले

       बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

       तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

भेट आपली स्मरते धुंद पावसातली

अवचित भेट घडली जणू स्वप्नातली

       रिमझिम जलधारांत आपण भिजलो

       अन मृदगंधाने मनोमनी मोहरलो

बरसता घन निळा मन मयुर जाहले

स्मरुनी ती प्रीत मन अलगद फुलले

        झेलुनी मृगधारा तन तृप्त जाहले

        आठवणीत तुझिया मन हे रमले

बरसल्या रेशीमधारा चिंब मी भिजले

तुझिया आठवांचे काहुर मनी दाटले

- स्नेहल मोडक





Sunday, June 6, 2021

मनसखा

                 मनसखा / सखी, अगदी आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील खास व्यक्ती. आपण आपल्या साऱ्या भावभावना, घटना कुटुंबिय, आप्तस्वकिय, मित्र-मैत्रिणी यांच्याशी व्यक्त करतो, चर्चा करतो, निर्णय घेतो, साऱ्या सुखदुःखात एकत्र असतो. पण काही भावना, घटना मात्र अशा असतात की त्या आपण फक्त खास व्यक्ती जवळ म्हणजेच मनसख्याजवळच बोलू शकतो. तर कधी कधी आपण न बोलताही मनसख्याला त्या सहज कळतात.

                कधी विचारांच्या आवर्तात भरकटलेल्या मनाला मार्गावर आणायला मनसख्याची गरज असते. तर कधी सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर हिंदोळताना मनसख्याची साथ असेल तर हिंदोळाही वेडावाकडा होत नाही. कृष्णाप्रमाणे सदैव साथ देणारा एकतरी मनसखा/ सखी प्रत्येकाला असावाच.


भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा

       चित्र कल्पनेतले संगे त्याच्या रेखावे

       कधी सुरेल गीतही दोघांनी गावे

गूज अंतरीचे मी त्यास सांगावे

अव्यक्त भाव मात्र त्याने जाणावे

       मौजमस्ती लटका रुसवा असावा

       परि नात्यात दुरावा कधी नसावा

कधी वाटे दोघांनी अबोल असावे

परि मूक अर्थ त्याने उलगडावे

       हिंदोळ्यावर सुखदुःखाच्या साथ झुलावे

       मधुगंधी मोगऱ्यासम मैत्र आमुचे फुलावे

भेटेल का कधी मज कृष्णसखा

होईल का तो माझा मनसखा


- स्नेहल मोडक

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...