कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही एखादी घटना घडते किंवा कधी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि आपली मनस्थिती द्विधा होते. आजूबाजूला सारं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असतं, आपणही यांत्रिकपणे वावरत असतो पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसतं. या सगळ्यांपासून कुठतरी दूर जावं एकटं शांत बसावं असं काहीसं वाटत असतं. कुणाला त्रास होऊ नये, काही जाणवू नये म्हणून आपण सहज वावरायचा प्रयत्न करत असतो पण मन मात्र भावनांचा गोफ विणतच रहातं.
कधी वाटते एकलेच तळ्याकाठी बसावे
शांत जलाशयासम स्तब्ध नि:शब्द रहावे
जसे पर्ण तरंगे संथ नितळ जळावरी
उठती भावनांचे तरंग जणू मनावरी
कधी वाटते एकलेच फिरावे काजळ राती
होऊनी अंधारसावली विसरावी सारी भीती
जावे विसरुन सारी जणू फसवी नातीगोती
विणावा कोष हा निर्विकारतेचा मनाभोवती
कधी वाटते एकलेच पावसात भिजावे
कुणास नकळत आसवांचे पाट वहावे
भिजूनी पाऊसधारात तनमन शांतवावे
कल्लोळ भावनांचे हृदयातून संपवावे
कधी वाटते फिरावे घनदाट अरण्यात
हलके ओघळावे दु:ख दाटल्या पापण्यांत
वाढली जरी किती ऊंची स्पर्श धरेचा असावा
पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा
पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment