Pages

Saturday, April 9, 2022

भावतरंग

              घड्याळाचे काटे जसे निरंतर फिरत असतात अगदी तसंच आपल्या श्वासाबरोबरच आपलं मनही अखंड विचारात दंग झालेलं असतं. मन चंचल असतं असं म्हणतात ते किती खरंय ना क्षणात कुठल्या कुठे पोहोचतं आपलं मन. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा आपल्या मनालाही दोन बाजू असतात बरं का. किंवा आपल्याला दोन मनं असतात असं म्हणता येईल. एखादी गोष्ट करायची असं मनाने ठरवलं की लगेच मनाची दुसरी बाजू किंवा दुसरं मन लगेच विरोध करतं. क्षणाक्षणाला आपले विचार बदलत असतात. हवीशी वाटणारी एखादी गोष्ट दुसऱ्या क्षणी नकोशी वाटू लागते. मनाची अशी संभ्रमावस्था प्रत्येकाच्या अनुभवाला येत असते.


    जसे उमटती तरंग जळामधे

    तसे आवर्त विचारांचे मनामधे

             कधी मनास लागते काही आस

             क्षणात वाटे हा सारा असे भास

    कधी भाव  दाटती सहज मनात

    क्षणात आतुर अन कातर क्षणात

             कधी भावगीत हे मनी उमलते

             क्षणात मन हळवे अबोल होते

    कधी लागे ओढ रानीवनी फिरावे

    क्षणात वाटे परि मंदिरातच रमावे

             कधी सुरावरी सहज पैंजणे नादती

             क्षणात कानी मग टाळही वाजती

    कधी वाटते मैत्रीचा मेळ जमावा

    क्षणात वाटे परि एकांतच असावा

             आयुष्यात जरी बाग स्वप्नांची फुलते

             भावहिंदोळ्यावर मन सदैव झुलते

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...