प्रत्येकाच्या आयुष्यात वरवर शुल्लक भासणाऱ्या पण मन दुखावणाऱ्या घटना अधूनमधून घडतच असतात. प्रत्येक वेळी त्यामागची कारणंही वेगवेगळी असतात. कित्येकदा आपल्या दुखावलेल्या मनाची समोरच्या व्यक्तीला जाणिवही होत नाही. पण आपण मात्र वेळोवेळी आपल्या मनाची समजूत घालतो. आणि अव्यक्त राहून नात्यात दुरावा निर्माण होऊ देत नाही. पण काही काळानंतर मात्र आपल्यालाच आपल्या मनाची समजूत घालणं अवघड होतं. मग अशावेळी आपलं अव्यक्त मन अलिप्त होऊ पहातं. पुन्हा पुन्हा असं दुखावलं जाण्यापेक्षा अलिप्त रहाणंच योग्य वाटू लागतं.
ठरवलंय आता अलिप्त रहायचं
एकांती राहून 'स्व' ला जाणायचं
मैत्रीनातं मनापासूनच जपायचं
पण अपेक्षेपासून मात्र दूर रहायचं
आपल्यातच नकळत पडतं अंतर
मग सुखदुःखही कधी कळतं नंतर
आता ना गुंतावं न गुंतवून घ्यावंआयुष्य एकट्यानं अव्यक्त जगावं
शब्द स्पर्शानं नात्यास सावरावं
घावास शब्दांच्या अलगद लपवावं
मनातल्या मनात खूप काही सलतं
बोलावं ठरवलं तरी ओठातच रहातं
मनात दडपावी हळवी आर्त स्पंदनं
मनभावनांना घालावी अबोल बंधनं
ठरवलंय आता अलिप्त रहायचं
एकांती राहून 'स्व' ला जाणायचं
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment