Pages

Friday, July 14, 2023

पीठापूर, कुरवपूर, श्रीशैल्यम - २

                 काकिनाड्याहून रेल्वेने रात्रभर प्रवास करुन सकाळी सिकंदराबादला पोहोचलो. पूर्ण प्रवासात मला त्रास होतच होता. सिकंदराबादला उतरुन किमान सहा तासांचा प्रवास जीपने करुन आम्हाला श्रीशैल्यमला पोहोचायचं होतं. आणि त्या प्रवासाचीच मला जास्त काळजी वाटत होती. तो सारा प्रवास जीपने करायचा होता. ठरल्याप्रमाणे आम्ही जीपने श्रीशैल्यमकडे निघालो. वाटेत नाश्त्यासाठी थांबलो पण तिथेही मी जेमतेम दोन घास खाऊन काॅफी प्यायले. श्रीशैल्यमला पोहोचायला दुपार होऊन गेली. मात्र मधल्या वेळेत मला बिलकुल त्रास झाला नाही. रुमवर पोहोचलो आणि माझा त्रास पूर्णपणे थांबल्याचं लक्षात आलं आणि मी निवांत झाले. 

           जेवून, थोडा आराम करुन, आवरुन आम्ही पुन्हा जीपनेच दर्शनासाठी निघालो. सर्वात आधी आम्ही पोहोचलो ते साक्षी गणपती मंदिरात.

           साक्षी गणपती मंदिर - हिरव्या वनराई मधलं हे छोटंसं गणपती मंदिर आहे. अशी मान्यता आहे की श्रीशैल्यमला दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची नोंद श्री गणेश ठेवतात. त्यामुळे श्रीशैल्यम मधील कुठल्याही दर्शनाआधी या साक्षी गणपतीचं‌ दर्शन घेतलं जातं. छान रेखीव अशी काळ्या पाषाणातील श्री गणेशाची मूर्ती इथे आहे. हे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. 

           मल्लिकार्जुन मंदिर - भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे हे मल्लिकार्जुन मंदिर. या मंदिरात शिव- अर्जुन आणि पार्वती - मलिका या रुपात प्रतिष्ठित आहेत. अशी कथा आहे की शिव- पार्वतीचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांना विवाहाची घाई झाली होती. यावर उपाय म्हणून शिव-पार्वतीने जो कुणी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करुन सर्वात आधी परत येईल त्याचा विवाह आधी करण्यात येईल अशी अट घातली. दोघंही पृथ्वी प्रदक्षिणेला निघाले. पण श्री गणेशाने चतुराईने शिव पार्वतीलाच प्रदक्षिणा घातली आणि ते दोघं पृथ्वीसमानच असल्याचं सांगत आपली प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचं सांगितलं. कार्तिकेयाला हे कळताच तो संतापला आणि उंच डोंगरावर गेला. त्याला समजावण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर स्वयं शिव-पार्वती त्याची समजूत घालण्यासाठी निघाले. पण ते येत असल्याचं कळताच कार्तिकेय तिथूनही दूर निघून गेला. यामुळे निराश होऊन माता पार्वती तिथेच बसल्या आणि भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरुपात तिथे प्रकट झाले. हे स्थान मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग या नावानं प्रसिद्ध झालं. हे मंदिर दुसऱ्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे शिलालेख आहेत. मंदिराभोवती तटबंदी असून चार गोपुरं आहेत. मंदिरात इतर अनेक मंदिरं बांधण्यात आली आहेत. पण मल्लिकार्जुन आणि भ्रामरांबा हे शक्तीपीठ हि मुख्य देवालयं आहेत. 

           आम्ही या सुंदर आणि भव्य मंदिरात पोहोचलो. इथं गर्दी थोडी जास्त होती. पण तरीही अतिशय सुंदर असं श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन आम्हाला घडलं आणि मन प्रसन्न झालं. श्री मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचं दर्शनासाठीचं पुढचं मंदिर होतं ते म्हणजे शिवाजी महाराज मंदिर.

           श्री शिवाजी महाराज मंदिर/ स्फूर्ती केंद्र - शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण भारतात गेले होते तेव्हा १६७७ मध्ये ते या परिसरात आले होते. आपली प्रजा आणि आपला धर्म यांसाठी काम करण्याकरीता त्यांनी देवीचा आशीर्वाद घेतला होता. श्री शिवाजी महाराजांनी इथे एक गोपुर बांधलं आणि  भक्तांसाठी अणि गरिबांसाठी अन्नछत्र सुरु केलं. याची आठवण  म्हणून भ्रामरांबा शक्तीपीठाच्या मागेच  श्री शिवाजी महाराजांचं मंदिर किंवा स्फूर्तीस्थान उभारण्यात आलं आहे. या मंदिरात श्री शिवाजी महाराजांचा ब्राॅन्झचा भव्य पुतळा आहे आणि अष्टप्रधान मंडळाचेही पुतळे आहेत. बाजूच्या भिंतीवर अनेक प्रसंग म्युरल्स स्वरुपात चितारलेले आहेत. अतिशय सुंदर असं हे मंदिर पाहून आम्ही परत रुमवर आलो. दुपारपासून माझा त्रास जरी थांबला असला तरी मला अतिशय अशक्तपणा आला होता. मंदिरात जाण्यासाठी सगळीकडेच थोडंफार चालावं लागत होतं. हे चालणं, मंदिर परिसर फिरणं, हे सारं मी अतिशय कष्टाने करत होते. खूपच दमायला झालं होतं मला. रुमवर येऊन‌ निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला. पण झोप येणं अशक्य होतं. पहाटे उठून आवरुन परत पुढील प्रवासासाठी निघायचं होतं. 

           ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर आवरून नाश्ता करुन आम्ही पुढील प्रवास सुरु केला. आमचा यात्रेचा पुढचा टप्पा होता कुरवपूर. पून्हा एकदा जीपने सहा तासांचा प्रवास करुन कुरवपूरला पोहोचायचं होतं. कुरवपूरला जाण्याआधी आम्ही मंथनगुडीला दर्शन घेण्यासाठी गेलो.

           मंथनगुडी - हैदराबादमधील रायचूर जिल्ह्यातील मतकल गावापासून १० किमी अंतरावर असलेलं हे मंदिर. वल्लभेश नावाचा एक विप्र श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता. तो वारंवार कुरवपूर ला येत असे. श्री पादुकांची सेवा, पूजाअर्चा करत असे. आणि मोठ्या प्रमाणावर अन्नदानही करत असे. एकदा त्याने श्री चरणी नवस केला की जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी श्री चरणी खूप मोठी सेवा करेन आणि सहस्त्र ब्राह्मण भोजन अर्पण करेन. भक्त काम कल्पद्रुम श्रीपादांच्या कृपेने त्याल व्यवसायात शतपटीने फायदा झाला. तो अत्यानंदाने कुरवपूरला ब्राह्मण भोजन देण्यासाठी द्रव्य आणि धान्य घेऊन निघाला. काही शर्विलकांना हे कळताच ते आपणही दत्तभक्त असल्याचा बहाणा करत त्याच्याबरोबर चालू लागले. आणि संधी साधून त्यांनी वल्लभेष विप्राला झोपेतच ठार मारलं. श्रीपाद श्रीवल्लभ हे जाणून एकनिष्ठ सेवकासाठी त्यास्थानी प्रकट झाले. तिघांचा वध त्यांनी केला पण चौथा शर्विलक त्यांना शरण गेला. मग त्यांनी त्याला विभुती देऊन ती  मृत वल्लभेशाच्या शिर आणि धडावर लावण्यास सांगितली. आणि ते अंतर्धान पावले. विभुती लावताच वल्लभेश‌ परत जिवंत झाला. त्याला सारा वृत्तांत कळताच श्रीपाद श्रीवल्लभच तिथे आले असल्याचं त्याला जाणवलं. त्याने आनंदानं कुरवपूरला जाऊन दानधर्म,अन्नदान अतिशय थाटामाटात पार पाडलं. श्रीपाद श्रीवल्लभ ज्यास्थानी प्रकट झाले त्याच स्थानी गुरुमंदिराची निर्मिती करण्यात आली. आणि हे स्थान मंथनगुडी या नावानं प्रसिद्ध झालं. 

           आम्ही या मंदिरात गेलो असता तिथल्या पंडितजीनी ही कथा, स्थानमहात्म्य सांगितलं. नंतर आरती केली. दर्शन आणि प्रसाद घेतला. मंदिराजवळच मोठमोठे पाषाण आहेत. हे पाषाण हत्ती, घोडा मगर अशा आकारात असल्याचे आपल्या दृष्टीला सहज दिसतात. हे सारं पाहून आम्ही पुढे कुरवपूरला निघालो. मला सकाळपासूनच अशक्तपणाबरोबरच थोडीशी घसादुखीही जाणवत होती. माझा प्रवास असाच त्रासातच सुरु होता. कुरवपूरला पोहोचल्यावर थोडा आराम मिळेल आणि मग जरा बरं वाटेल याच विचारात मी होते.

           कुरवपूरला मंदिर दर्शनासाठी नावेतून कृष्णा नदी पार करुन जावं लागतं. तिथे वास्तव्याची कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे अलिकडल्या तीरावर पंचदेवपहाड इथे एका आश्रमात आमची रहाण्याची व्यवस्था होती. दुपारनंतर आम्ही इथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कुठेच जायचं नव्हतं. त्यामुळे आश्रमात पोहोचल्यावर फक्त आराम करायचा असं ठरवलं होतं. पण ते अशक्य होतं.

           त्या आश्रमाचा परिसर प्रचंड मोठा आहे. अतिशय साध्या, नीटनेटक्या आश्रमात पाऊल टाकताच मन अगदी प्रसन्न झालं. रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन थोडाच वेळ आराम करुन परत बाहेर आलो. इतकं सुंदर वातावरण होतं की रुममध्ये नुसतं बसणं शक्यच नव्हतं. 

           आश्रमात मध्यभागी श्री दत्तात्रेयांचं एक सुंदर छोटसं देवालय आहे. आणि सभामंडपात अखंड नामजप आणि अखंड अग्नियज्ञ सुरु आहे. हा नामजपही स्पिकरवर सुरु असतो. त्यामुळे संपूर्ण आश्रमात एक पवित्र वातावरण निर्माण झालं आहे. अग्नियज्ञातही सतत मंत्रोच्चारात आहुती देणं सुरु आहे. 

           आम्ही दर्शन घेऊन आसपासचा परिसर फिरुन आलो. सभामंडपासमोरच एक स्वतंत्र चौथरा आहे आणि तिथे छोटसं श्री गणेश मंदिरही आहे. आम्ही सभामंडपाच्या बाहेर मोकळ्या हवेत बसून मनोमनी नामजप करत होतो. तिन्हीसांज झाली आणि मंदिरातील पालखीची वेळ झाली. आम्ही सभामंडपात आलो आणि काही क्षणातच पालखीला सुरुवात झाली. सुंदर सजवलेल्या पालखीतून श्रीपाद श्रीवल्लभांची चांदीची मूर्ती,पादुका आणण्यात आल्या. तिथले  काही स्थानिक लोकंही पालखीसाठी मंदिरात आले होते. आम्ही सारे पालखीच्या पुढे नामघोष करत चालू लागलो. पालखी गणपती मंदिराला प्रदक्षिणा घालून पुन्हा मुख्य मंदिरात येते. तिथे रिंगण करुन भक्तगण नामघोष करत थोडावेळ नाचतात. मग परत पालखी प्रदक्षिणा करुन येते. अशा तीन प्रदक्षिणा घालतात. मग मुख्य मंदिरात आरती होते. आरती, प्रसाद देऊन सोहळा संपन्न होतो. अतिशय सुंदर जोषपूर्ण असा हा पालखीसोहळा आम्हाला अनुभवायला मिळाला हेही भाग्यच. 

           माझी तब्येत खरंतर खूपच बिघडली होती. पण तो सोहळाच एवढा अप्रतिम होता की मी स्वताला थांबवूच शकले नाही. जवळपास तासभर चाललेल्या या सोहळ्यात आम्ही सारेच भान हरपून फेर धरत, नाचत होतो. श्री दत्तगुरुंच्या कृपेनेच मी एवढावेळ सामील होऊ शकले होते. 

           रात्रीपर्यंत माझी घसादुखी अजूनच वाढली. औषध घेऊन निद्राधीन होण्याचा प्रयत्न केला पण त्रास खूपच होत असल्याने झोप आलीच नाही. बरं नसतानाही मी करत असलेल्या दगदगीचा परिणाम व्हायचा तोच झाला. पहाटे मी तापाने फणफणले. आवरुन कुरवपूरला दर्शनासाठी निघायचं होतं. त्यामुळे आवरुन तापाची गोळी घेऊन निघालो. कुरवपूरला पोहोचेपर्यंत ताप उतरला पण चार पावलंही चालायला अंगात त्राण राहिलं नाही. अक्षरशः जीवाच्या कराराने हळूहळू चालत होते ती फक्त दर्शनाच्या ओढीनेच.

           कुरवपूर - श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर - श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचं कुरवपूर हे अक्षय निवासस्थान. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ' या मंत्राचा उगम जिथे झाला तेच हे प्राचीन स्थान.

           अप्पलराज आणि सुमतीदेवी या विप्रदांपत्याचा पुत्र श्रीपाद श्रीवल्लभ हे पीठापूरला आपल्या जन्मस्थानी सोळा वर्षं राहून तीर्थाटनासाठी बाहे पडून आधी गोकर्ण महाबळेश्वरला गेले. तिथून श्रीशैल्यमला गेले तिथे काही काळ वास्तव्य केलं.  आणि अंती कुरवपूरला वास्तव्य केलं. कुरवपूरला बावीस वर्षं तपश्चर्या करुन इथूनच ते अंतर्धान पावले.

           कुरवपूर कर्नाटकात रायचुर जिल्ह्यातलं गांव. कुरगुड्डी या ठिकाणी कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग होतात व पुढे परत एकत्र येतात. जिथे दोन भाग झाले आहेत त्या भागाला कुरगुड्डी बेट म्हणतात.तेच हे श्रीपाद श्रीवल्लभांचं निवासस्थान. इथेच ते तपश्चर्येला बसत असत. हे मंदिर आणि हिरव्या वनश्रीने नटलेला आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर मन प्रसन्न करणारा आहे. हे स्थान बराच काळ अज्ञात होतं. श्रीगुरुंच्या शोधात आलेल्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या स्थानाचा शोध लावला. या मंदिरात येण्यासाठी आपल्याला कृष्णा नदी नावेने पार करावी लागते. नावेतून उतरुन थोडंसं पायवाटेनं चालत आपण थेट मंदिरापर्यंत पोहोचतो. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर एक गुहा आहे. याच गुहेत टेंबेस्वामींनी चातुर्मास केला होता. या स्थानीच त्यांनी घोरकष्टोधरण स्त्रोत्राची निर्मिती केली आहे.

           आम्ही नावेने नदी पार करुन मंदिरात पोहोचलो. बरोबर नेलेल्या वस्तू अर्पण करुन नतमस्तक झालो. इथेही पीठापूरप्रमाणेच रुद्राभिषेक केला जातो. देणगी देणाऱ्या सर्वांना सभामंडपात बसता येतं. मात्र इथे गाभाऱ्यातील मूर्ती थोडी आतल्या बाजूला असल्यानं हा अभिषेक सोहळा आपल्याला बाजूला लावलेल्या स्क्रीन वर पहावा लागतो. अगदी पीठापूर सारखाच इथेही अप्रतिम असा रुद्राभिषेक सोहळा होतो. या सोहळ्यानंतर पुष्प, अलंकार सोहळा होऊन आपल्याला परत सुंदर दर्शनाचा लाभ मिळतो. 

           हा सर्व सोहळा पाहून आम्ही परत एकदा दर्शन घेऊन तीर्थ प्रसाद घेतला. आणि मंदिराच्या जवळच असलेली वासुदेवानंद सरस्वती यांची गुहा पहायला गेलो. या छोट्याशा गुहेत अगदी रांगतच आत जावं लागतं. तसं जाऊन दर्शन घेऊन बाहेर आलो. परत किनाऱ्यावर येऊन नावेने अलिकडल्या तीरावर येऊन पून्हा रुमवर आलो. मी सकाळी निघताना ताप आला म्हणून जी गोळी घेतली होती तिचा परिणाम संपल्यावर मला परत ताप आला होता. आधीपासूनचा अशक्तपणा आणि त्यात आलेला ताप यामुळे माझी अवस्था खूपच वाईट होती. रुमवर पोहोचल्यावर परत एक गोळी घेतली.

           सायंकाळी आम्हाला परत निघायचं होतं. आमचं यात्रेमधलं अखेरचं दर्शन स्थान अजून बाकी होतं. तिथलं दर्शन घेण्यासाठी सायंकाळी आम्ही पुन्हा जीपने निघालो. जवळपास दोन तासांचा प्रवास करुन आम्ही मंदिरात पोहोचलो.

           मंत्रालयम - राघवेंद्र स्वामी मठ

           आंध्र प्रदेशातील मंत्रालयम म्हणजेच राघवेंद्र स्वामी यांचं समाधीस्थळ. राघवेंद्र स्वामींचा जन्म तामिळनाडू राज्यातील भुवनगिरी गावात एका कानडी भाषिक मध्व ब्राह्मण कुटुंबात झाला.  पुढे त्यांना ज्ञानार्जनासाठी कुंभकोणम इथं पाठवण्यात आलं. इथे असतानाच त्यांनी संन्यास घेतला आणि राघवेंद्र तीर्थ हे नांव धारण केलं. राघवेंद्र स्वामींना भगवान विष्णूंचा लाडका भक्त प्रल्हाद याचा अवतार समजलं जातं. मध्वाचार्यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी त्यांनी संपूर्ण दक्षिण भारतात भ्रमंती केली. १६७१ साली त्यांनी मंत्रालयम येथे जिवंत समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांनी आपल्या शिष्यांना पुढील ८०० वर्षं आत्मारुपाने शाश्वत रहाण्याचं वचन दिलं. या ठिकाणी भव्य असा मठ बांधण्यात आला आहे. आणि समोरच भव्य स्वरुपात रामायणातील प्रसंग म्युरल्स रुपात चित्रीत करण्यात आले आहेत.

           आम्ही हे सारं पाहून, दर्शन घेऊन परत निघालो. मंत्रालयमहून आम्ही रायचूरला आलो. आणि रात्री उशिरा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

           आम्ही ज्या यात्रा कंपनीबरोबर ही यात्रा केली ते स्वतः त्यांच्या टिमसह आमच्याबरोबरच होते. त्यांचं किचनही बरोबर होतं. त्यामुळे संपूर्ण यात्रा निर्विघ्नपणे आणि आनंदात पार पडली होती. त्यामुळे आमची आणि इतरांचीही पीठापूर कुरवपूर दर्शनाची इच्छा उत्तम रितीने पूर्ण झाली. 

           आम्ही पीठापूर, कुरवपूर यात्रा केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच पूर्ण करु शकलो होतो. माझी अतिशय अवघड अशी परिक्षा त्यांनी घेतली होती पण त्याचबरोबर सगळीकडे अतिशय उत्तम असं दर्शनही घडवलं होतं. मात्र मला घरी पोहोचल्यावरही ताप येतच होता. आम्ही ही यात्रा करुन आलो आणि लगेच गुरुपौर्णिमा होती. पण मी खूपच आजारी असल्याने ऐनवेळी गुरुपौर्णिमेला गिरनारला जाणं रहित करावं लागलं. आम्हा दोघांनाही खूपच वाईट वाटत होतं. पण मग गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावरच गेल्या महिन्यात लेकींनी दिलेल्या श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. साग्रसंगीत पूजा केली आणि त्यातच समाधान मानलं.

     || दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||


- स्नेहल मोडक





No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...