एखाद्या सांजवेळी गडद होत चाललेल्या अंधारसावल्या पहाताना आपलं मनही तसंच हळवं कातर होतं. भावनांचं काहूर दाटतं मनात. क्षणात कुठून कुठे पोहोचतं मन. आठवांच्या झुल्यावर स्वार होतं मन. अन सोसलेले घावच पुन्हा आठवत रहतात. अन सारं विसरण्याचा प्रयत्न करत रहातं मन.
कधी हळव्या कातर सांजवेळी
दाटते हुरहूर एकाकीच सावळी
मनात भावनांचा कल्लोळ उठतो
संध्यासमय काजळकाळा भासतो
शब्द मात्र सारे मौन स्वीकारतात
अन क्षणातच अधर घट्ट मिटतात
असंख्य आठवणी मग फेर धरतात
जणू शांत डोहावरीच तरंग उठतात
गडद सांज आठवांचे वण उसवते
सावरलेले मनही क्षणात विध्द होते
जीव जणू कासावीस व्याकूळ होतो
अन झुगारुन बंध आसवांचा पूर येतो
मोजताना घाव मन अजूनही चुकते
आठवतच नाही क्षण कुठले गाळते
व्रण जुने मन कधीतरी विसरु म्हणते
नियती मात्र नित्य नवे घाव देत रहाते
तिमिरातच मग एकले बसावे वाटते
घनव्याकूळ मन माझे कुणी न जाणते
घनव्याकूळ मन माझे कुणी न जाणते
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment