Pages

Monday, December 30, 2024

वर्ष

बघता बघता अजून एक वर्ष सरले

कुणास ठाऊक कलियुग किती उरले

     सरत्या वर्षात सारे जुने मैत्र दुरावले

     परि जीवनप्रवासात नवे स्नेह जुळले

सुखाचे कधी दुःखाचे पारडे जड झाले 

विसरुन वेदना त्या मन निर्विकार बनले 

     बऱ्या वाईट अनुभवांचे चित्र रंगले

     भविष्याचे सप्तरंग नजरेत सामावले

खोल घाव किती काळजावरी जाहले

सरला काळ अन हळवे मन सावरले

     कालचक्र फिरले वर्ष एक आले गेले 

     नववर्ष स्वागता मन पुन्हा सिध्द झाले

- स्नेहल मोडक

Sunday, December 8, 2024

खम्मा घणी - २

               दिवस पाचवा - सकाळीच मुक्कामाचं ठिकाण सोडून जैसलमेर मधलं स्थलदर्शन करायला निघालो. जैसलमेर हे ' गोल्डन सिटी ' म्हणून ओळखलं जातं. पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेले पॅलेस आणि किल्ले सूर्यप्रकाशात सोनेरी रंगात चमकतात म्हणून या शहराला ' गोल्डन सिटी ' - ' सुवर्ण शहर ' म्हणतात. 

              ' गड़ीसर लेक ' - ११५६ मध्ये जैसलमेरचे संस्थापक 'राजा रावल जैसल' यांनी या तलावाची निर्मिती केली. त्याकाळी संपूर्ण जैसलमेर शहरासाठी पाणी पुरवठा करणारा हा एकमेव विस्तीर्ण जलाशय होता. त्यावेळी हा तलाव जैसलसर तलाव या नावानं ओळखला जात होता. नंतर १३६७ च्या दरम्यान राजा गड़सीसिंह यांनी या तलावाची पुनर्निर्मिती केली. तेव्हापासून हा तलाव ' गड़ीसर लेक ' म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण अशा या जलाशयाच्या काठावर शानदार स्मारकं, तीर्थस्थळं, लहानलहान मंडप आणि मंदिरंही आहेत. हा तलाव म्हणजे जैसलमेरचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारं संग्रहालयच आहे. इथं सातत्यानं पारंपरिक उत्सव, कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या सोनकिरणांनी चमकणारा हा सुंदर तलाव पाहून आम्ही पुढं गेलो.

              गोल्डन फोर्ट ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट असणारा हा ' सुवर्ण दुर्ग ' ११५६ मध्ये 'महाराज रावल जैसर सिंह' यांनी बांधलाय. सद्यस्थितीतही जैसलमेरच्या एकूण लोकसंख्येच्या १/४ लोकसंख्या या किल्ल्यात वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या वाळूच्या दगडांनी बांधलेल्या विशाल भिंती सूर्योदयाच्या वेळी गहिऱ्या पिवळ्या रंगांनी चमकतात. आणि सायंकाळी सुर्यास्तसमयी सोनसळी रंगानी चमकत इथल्या सोनेरी वाळूत मिसळून जातात. म्हणून याला ' सुवर्ण दुर्ग ' हे नाव मिळालय. हा किल्ला त्रिकुटा टेकडीवर थार वाळवंटात स्थित आहे. १५०० फुट लांब आणि ७५० फुट रुंदीचा हा किल्ला टेकडीवर २५० फुट उंचावर वसलाय. याच्या सुरक्षेसाठी ३० मीटर उंचीची भिंत बाहेरच्या बाजूला आहे. तसंच संपूर्ण किल्ल्यात ९९ बुरुज आहेत. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ४ विशाल प्रवेशद्वारं आहेत जी मुख्य प्रवेशद्वाराला जोडतात. या किल्ल्यात ' राज महल पॅलेस -' जैसलमेरच्या महारावल यांचा पूर्वनिवास, ' बारी हवेली' - ब्राह्मण पुजाऱ्यांची हवेली, जैन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, नाथ हवेली, आणि अनेक व्यापाऱ्यांच्या हवेली हे सारं‌ पहाता येतं. संग्रहालयात पारंपरिक राजस्थानी पोषाख, आभुषणं, चांदीची, काचेची भांडी, शस्त्रास्त्रं हे सारं आहे. किल्ल्याच्या साऱ्या भिंती आणि महाल अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहेत. संपूर्ण राजस्थान मध्ये प्रत्येक हवेली, महाल आणि इतर वास्तू या सर्व ठिकाणी अतिशय नाजूक आणि अप्रतिम कोरीवकाम केलेलं आपल्याला पहायला मिळतं. यानंतर आम्ही अजून एक हवेली बघायला गेलो.

                ' पटवा हवेली ' -  सोन्या चांदीच्या व्यापारातील एका प्रमुख जैन पटवा परिवाराने बांधलेली ही ५ मजली 'पटवा हवेली'. ही हवेली पटवा परिवाराच्या समृद्धीचं आणि यशाचं प्रतिक आहे. याची निर्मिती जवळपास पाच दशकांत करण्यात आली आणि पाचही भावंडांनी आपापल्या हिश्शयाची निर्मिती केली. राजपूत आणि मुघल शैलीचं मिश्रण असलेली ही हवेली  पिवळ्या वाळूच्या दगडांचं नाजूक नक्षीकाम, कोरीव काम याने सजलेली आहे. यातल्या काही भागात अजूनही पटवा परिवार वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या दगडांमुळे सूर्यकिरणात ही हवेली सुंदर दिसते. हवेलीच्या एका भागात संग्रहालय आहे. 'पटवा हवेली' बघून आम्ही पुढं एक जैन मंदिर बघितलं आणि मग गेलो एक विशेष स्थान बघायला. 

               ' कुलधरा गांव ' - एक झपाटलेलं गांव. जैसलमेर पासून १८ किमी. वर असलेलं हे कुलधरा गांव १२९१ मध्ये पाली भागातून आलेल्या कधान नावाच्या व्यक्तीनं वसवलं. मोठा तलाव खणला. हळूहळू ८४ गावं इथं वसली. पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून यांना पालीवाल ब्राह्मण म्हणलं गेलं. कष्ट आणि तंत्रज्ञान विकासीत केल्यानं या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जलसिंचनाचा उपयोग केला. हळूहळू प्रगती होत होती. गायी म्हशी पालन, मातीची भांडी बनवणं, इतर विविध व्यापार यांमुळे इथले लोक राजाला सर्वात जास्त कर देत होते. कुलधरामधल्या लोकांना लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेला होता. साधारण २०० वर्षांपूर्वी गावाचा दिवाण सलीम सिंह याची वाईट नजर कुलधरा गावातील पुजाऱ्याच्या सुंदर मुलीवर पडते. आणि तिला पौर्णिमेच्या आत आपणासमोर हजर करावं असा आदेश तो देतो. कुलधराच्या आजूबाजूची ८४ गावं विभागलेली असली तरी एकी होती. सगळ्या गावाची पंचायत बसली. संकट एका गावावर असलं तरी सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला. जिथं आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या गावाचा त्याग करायचा. शेती, व्यापार सारं सोडून, बरोबर नेता येईल तेवढंच सामान, गायीगुरं बरोबर घेऊन ८४ गावातील सगळ्या लोकांनी एका रात्रीत गाव सोडलं. एका रात्रीत गाव रिकामं करताना तडफडलेल्या गावकऱ्यांनी 'पुन्हा या गावात कुणीही वसू शकणार नाही' असा शाप दिला. आता इथली ओस पडलेली, अर्धवट कोसळलेली घरंदारं पहायला जगभरातून पर्यटक येतात पण सायंकाळी ६ वाजल्यानंतर मात्र इथं कुणीही राहू शकत नाही. ती ओसाड घरं रात्री तिथं थांबणाऱ्यांना भितीदायक अनुभव देतात. कुणीतरी कुजबुज करताना जाणवणं, अचानक आपल्या जवळून कुणी गेल्याचा भास होणं, घुंगरांचा, भांड्यांचा आवाज येणं असे भितीदायक अनुभव रात्री इथं येतात. त्यामुळं सायंकाळी ६ नंतर इथं कुणालाही थांबायची परवानगी नाही. गावातली ओस पडलेली घरं पहाताना त्या काळाची जाणीव होते. काही घरं अजूनही सुस्थितीत आहेत. पण बऱ्याचशा घरांची मात्र आता पडझड झाली आहे. अतिशय कष्टानं उभी केलेली आणि सुखसमृद्धीत नांदणारी घरं एका रात्रीत कायमची सोडून जाताना गावकऱ्यांना किती कठीण गेलं असेल याची त्या ओसाड गावात फिरताना सहज कल्पना येते. अशा परिस्थितीत हे गाव ' झपाटलेलं ' म्हणून ओळखलं जाणं साहजिकच आहे. हा एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही पुढं एक छान अनुभव घेण्यासाठी निघालो.

           'डेझर्ट कॅम्पिंग' - थरच्या वाळवंटामधल्या जैसलमेरमधलं डेझर्ट कॅम्पिंग अतिशय प्रसिद्ध आहे. या वाळवंटात कापडी तंबूमध्ये रहाण्यासाठी अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणापासून दूर या सॅन ड्युन्स मध्ये कॅम्प मध्ये रहाणं हा एक अतिशय वेगळा आणि सुंदर अनुभव आहे. दूरवर पसरलेल्या या सोनेरी वाळवंटात साहसी खेळ, उंट सफारी, जीप सफारी यांचा मनमुराद आनंद घेता येतो. आम्ही इथं पोहोचलो आणि आपापल्या तंबूमध्ये सामान ठेवून ताजतवानं होऊन उंट सफारीला गेलो. उंटावर बसण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. काश्मीर, वैष्णोदेवी, केदारनाथ आणि अशाच काही ठिकाणी जाऊन आल्यानं घोड्यावर बसायची थोडीफार सवय झाली आहे. पण उंटावर बसणं हा वेगळाच भाग आहे. आम्ही उंटावरुन  वाळवंटातच लांबवर गेलो. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा पहाता येतो. पण सूर्यास्ताला खूप वेळ असल्यानं आम्ही लगेच जीप सफारीला जायचं ठरवलं. जीपनेही खूपच लांबपर्यंत फिरवून आणतात. तिथे दुरवर ' बजरंगी भाईजान ' या चित्रपटाचं थोडं चित्रीकरण झालं होतं ते ठिकाण जीपने जाऊन पहाता येतं. मात्र हा प्रवास अतिशय चित्तथरारक असतो. मार्गातल्या वाळुच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवरुन या जीप सुसाट नेतात. खूप वेगळा आणि खास अनुभव असतो हा. ही जीप सफारी करुन परत आम्हाला उंटांनी जिथं सोडलं होतं तिथं आलो. इथल सूर्यास्त पहाणं हाही एक विशेष अनुभव असतो. साधारणपणे आपण सूर्यास्त सागरकिनारी, किंवा डोगराआड होतानाच पहातो. पण दूरवर पसरलेल्या सोनेरी वाळवंटातल्या सूर्यास्ताचं दृश्य वेगळच, भान हरपवणारं असतं. जसजसा तो कनकगोल अस्ताचलास जातो. तसतसं सारं वाळवंट सोनकिरणात चमकतं. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून आम्ही तंबूत परत गेलो. 

              ' डेझर्ट कॅम्पिंग ' मध्ये रात्री पर्यटकांसाठी गायन वादन आणि नृत्याचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही तिथं होतो त्या रात्रीही असाच कार्यक्रम आयोजित केलेला होता. यात आधी खास राजस्थानी संगीताचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर नृत्याचा कार्यक्रम होता. या नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका वेगळ्या व्यक्तीमत्वाला जवळून पहायची बोलायची संधी मिळाली. नृत्य सुरु झालं आणि कलाकाराला पाहून हे काही वेगळंच आहे याची जाणीव झाली. सुरवातीला राजस्थानी नृत्याचं ' एकावर एक ठेवलेल्या मातीच्या घटांची उतरंड ' घेऊन सादरीकरण केलं. अतिशय बहारदार अशा नृत्यानंतर त्या व्यक्तीनं आपली ओळख दिली ती ऐकून आम्ही अक्षरशः थक्क झालो. नृत्य करणारा कलाकार हे आर्मी काॅलेज मध्ये हिंदी भाषा हा विषय शिकवतात. नृत्यासंदर्भात जपानसह अजून ४-५ देश ते फिरुन आले आहेत. स्वतः विविध शैलीच्या आणि शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देतात. याचबरोबर अनेक समारंभ, कॅम्पिंग साईटस् अशा ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करतात. हिंदी भाषेचे प्राध्यापक असूनही स्वानंदासाठी हा वेगळा छंद ते जोपासतात ही खरच अत्यंत कौतुकाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे हे नक्की. त्यांनी केलेली मशाल नृत्य आणि विविध साधनांह केलेली इतर नृत्य सारीच अप्रतिम. सायंकाळपासूनची उबदार थंडी एव्हाना वाढलीच होती त्यामुळं त्या थंडीत मोकळ्या प्रांगणात चमचमत्या ताऱ्यांसह ही नृत्य पहाणं हा खूप छान अनुभव होता. आजूबाजूचं सारं वातावरण सुंदरच होतं. या कार्यक्रमानंतर गरमागरम राजस्थानी भोजनाचा आस्वाद घेऊन आजूबाजूला थोडं फिरुन आम्ही टेन्टमध्ये गेलो. 

               सहाव्या दिवशी सकाळी तिथंच गरमागरम नाश्ता करुन टेन्ट सोडून निघालो. आमचं पुढचं शहर होतं जोधपूर'. वाळवंटाच्या मधोमध जोधपूर शहर वसलंय. त्यामुळं इथल्या अति उष्णतेपासून सुरक्षित रहाण्यासाठी आणि थंडाव्यासाठी इथल्या वास्तू, घरं निळ्या रंगात रंगवतात. आणि म्हणून या शहराला ' ब्लू सिटी ' म्हणतात. जैसलमेर हून जोधपूरला पोहोचल्यावर आम्ही एक पॅलेस बघायला गेलो. ' उमेद भवन पॅलेस ' - जोधपूरचे महाराज ' उमेद सिंह ' यांनी १९४३ मध्ये हा राजवाडा बांधलाय. या राजवाड्याच्या निर्मितीचा इतिहास एका संतांने त्याकाळी दिलेल्या शापाशी निगडित आहे. एका संत महात्म्याने राठोड काळात जोधपूर मध्ये दुष्काळ पडेल असा शाप दिला होता. त्याप्रमाणे महाराज प्रतापसिंह यांचा ५० वर्षांचा शासनकाळ संपल्यावर जोधपूर मध्ये लगेच पुढची ३ वर्षं सलग भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तिथल्या जनतेनं तत्कालीन महाराज उमेद सिंह यांच्याकडे रोजगार देण्याची मागणी केली होती. तेव्हा महाराजांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून या राजवाड्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. वर्तमान स्थितीत या राजवाड्यात ३४७ खोल्या आहेत. हा राजवाडा ताज हॉटेल चाच एक भाग आहे. या वाड्यात ३ भाग आहेत. एका भागात ताज हॉटेल आहे, एकात संग्रहालय आहे आणि एका भागात शाही परिवार वास्तव्यास आहे. सद्यस्थितीत या राजवाड्याचे मालक  ' गज सिंह ' आहेत.  इथल्या संग्रहालयात काचेची, चिनी मातीची भांडी, कलात्मक वस्तू, अतिशय सुंदर अशी मोठमोठी भित्तीचित्रं, जभरातून जमवलेली कलात्मक अशी वेगवेगळी जुनी घड्याळं, शस्त्रास्त्र यांचा समावेश आहे. याशिवाय इथं पूर्वीच्या काळातल्या गाड्यांचं ' व्हिंटेज कार्स ' चं स्वतंत्र संग्रहालय आहे. ज्यात रोल्स राईस, मर्सिडीज-बेंज, ऑस्टिन मार्टिन सारख्या गाड्या पहाता येतात. अतिशय सुंदर असा राजवाडा पाहून आम्ही मुक्कामी गेलो.

              सातव्या दिवशी सकाळी मुक्काम सोडून जोधपूरमधलंच स्थलदर्शन करायला निघालो. ' जसवंतसिंह समाधी ' - महाराज सरदार सिंह यानी १८९९ मध्ये आपले पिता ' जसवंतसिंह ' यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलं. समाधीचा मुख्य हाॅल हा मंदिरासारखा बांधलाय. इथं नित्यनेमानं पूजा केली जाते. आवारात राजपरिवारीतल इतर काही व्यक्तींच्याही समाधी आहेत. 'जसवंतसिंह' यांच्या चितेत एका मयुराने उडी घेऊन अग्नीर्पण केलं होतं. त्या मयुराची समाधधीही सुरुवातीलाच आहे.  या स्मारकाच्या आधी एक तलाव आहे. आणि त्याच्यासमोरच ' महाराज जसवंतसिंह ' यांचा अश्वारूढ पुतळा आहे. हे समाधीस्थळ बघून आम्ही पुढं गेलो.

             ' मेहरानगढ किल्ला ' - १४५९ मध्ये राठोड राजा ' राव जोधा ' यांनी हा किल्ला बांधला. किल्ला ज्या टेकडीवर बांधला तिथं आधी एक ' चिडियानाथ बाबा ' नावाचे साधू वास्तव्यास होते. राजाला त्याच जागी किल्ला बांधायचा असल्यानं त्यानं साधूला ती जागा सोडून जायला सांगितलं. साधूनं नकार देताच त्याला तिथून जबरदस्तीनं निघून जायला लावलं आणि तिथं किल्ल्याचं बांधकाम सुरु केलं. मात्र साधूच्या तपश्चर्येत विघ्न आल्यानं त्यांनं राजाला कधी सौख्य लाभणार नाही कारण त्याला जोधपूर मध्ये पाणीच मिळणार नाही असा शाप दिला. अखेर राजानं त्या साधूच्या कुटीजवळ एक कुंड आणि शिवमंदिर बांधलं. जवळपास ११ मजल्यांएवढ्या उंचीचा हा किल्ला अप्रतिमच आहे. या किल्ल्यात वेगवेगळे महाल बांधलेत. ' फुल महल ' - अतिशय नाजूक अशा कलाकुसरीने सजलेला हा एक प्रशस्त हाॅल आहे. ' शीश महल ' - या महालात संपूर्ण छत आणि भिंतींवर आरसे लावलेत . इथही एक दिवा लावला की त्याची अनेक प्रतिबिंब आरशात दिसतात आणि पूर्ण महाल लख्ख उजळतो. ' झांकी महल ' - राजघराण्यातील स्त्रिया या महालात रहात. आणि या महालाच्या झरोक्यांमधून बाहेर होणारे कार्यक्रम पहात असत. याचबरोबर मोती महल, दौलत खाना, जनाना देवडी, चामुंडा माता मंदिर या किल्ल्यात आहे. एका भागात मोठं संग्रहालय आहे. किल्ल्याच्या बाहेरचा भाग स्थानिक कलाकारांना दुकानांसाठी दिलाय. खूप उंच असणारा हा किल्ला पहायला पायी चढून जाता येतं तसंच आता तिथं लिफ्टची व्यवस्था केली आहे. संपूर्ण राजस्थानमधले अत्यंत नाजूक अशा कोरीव कामानं आणि कलाकुसरीनं सजलेले अवाढव्य राजवाडे, महल, किल्ले पाहून या साऱ्यांच्या निर्मितीसाठी तिथल्या कलाकारांनी किती प्रचंड मेहनत घेतली असेल याचाच विचार मनात येतो. अतिशय सुंदर असा हा किल्ला बघून आम्ही जयपूरला निघालो. रात्री जयपूरला पोहोचलो. भोजन करुन परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर गेलो. 

               पिंक सिटी जयपूर, गोल्डन सिटी जैसलमेर आणि ब्लू सिटी जोधपूर याबरोबरच पुष्करसह बिकानेर अशी राजस्थानची अतिशय सुंदर, अविस्मरणीय सहल मनात आणि छायाचित्रात साठवून आठव्या दिवशी सकाळी विमानानं आम्ही परतीचा प्रवास केला.

- स्नेहल मोडक






   









   


Tuesday, December 3, 2024

खम्मा घणी - १

          अंबाजोगाईला कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आम्ही सोमवारी रात्री घरी परत आलो. आणि लगेच मंगळवारी रात्री उशिरा मोठ्या सहलीसाठी प्रस्थान केलं. बुधवारी भल्या पहाटे निघणाऱ्या विमानानं सकाळी ७ वाजताच आम्ही 'गुलाबी शहर - जयपूर' विमानतळावर उतरलो. आणि आमच्या राजस्थान सहलीला सुरुवात झाली. आमच्या संपूर्ण सहलीसाठी आधीच ठरवलेली ११ सीटर ट्रॅव्हलर विमानतळावर उभी होती. सहलीसाठी आम्ही सारे कुटुंबीय मिळून गेलो होतो. 

            वाटेत नाश्ता करुन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रुमवर पोहोचून आवरुन थोडा आराम करुन फिरायला निघालो. सर्वात आधी आम्ही गेलो जयपूर मधलं अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण पहायला.  

' हवामहल ' - १७९९ मध्ये राजा सवाई प्रतापसिंह यांनी खास राजघराण्यातील स्त्रियांसाठी या महालाची निर्मिती केली. परंतु प्रत्यक्षात हा स्वतंत्र महाल नसून सिटी पॅलेसच्या मागच्या बाजूला बांधण्यात आलेला भाग आहे. राजघराण्यातील स्त्रियांना इथं होणारे नृत्याचे आणि इतर कार्यक्रम आणि शहरातील घडामोडी कुणासमोरही न येता पहाता याव्यात यासाठी हा महाल बांधण्यात आला. या महालाचा आकार एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे कारण राजा प्रतापसिंह श्रीकृष्ण भक्त होते. या पाच मजली महालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात उंच महाल आहे. पाया नसल्यानं हा ८७° अंशात झुकलेला आणि घुमावदार आहे. ९५३ खिडक्या असलेल्या या महालाची लाल आणि गुलाबी बलुआ दगडांपासून निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय सुंदर, देखणा असा हा हवामहल पहायला पर्यटकांची खूपच गर्दी असते. हवामहल पाहून आम्ही पुढे गेलो.

          'आमेर किल्ला' - आमेर किल्ला किंवा अंबर किल्ला जयपूर पासून ११ किमी. अंतरावर एका पर्वतावर भक्कमपणे उभा आहे. महाराज मानसिंह प्रथम यांनी १५९२ साली याची निर्मिती केली. लाल वाळूचा दगड आणि शुभ्र संगमरवर यांच्या मिलाफातून हा किल्ला तयार केला आहे. राजपूत आणि मुघल वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना असलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलं आहे. भव्य महाल, मंदिर यांसह या किल्ल्यातला शीश महल अप्रतिम असाच आहे. या महालात अप्रतिम कलाकुसर केली आहे आणि साऱ्या भिंती आणि छतावर असंख्य आरसे जडवले अहेत. त्यामुळं दिवा लावताच त्यांच प्रतिबिंब त्या सगळ्या आरशात दिसतं आणि लख्ख प्रकाश पडतो. आणि क्षितिजवर असंख्य तारे चमकत असल्याचा भास होतो. याला जरी किल्ला म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा राजवाडाच होता कारण इथं राजपरिवार वास्तव्यास होता. इथं येण्यासाठी 'सुरजपोल' आणि 'चांदपोल' असे दोन दरवाजे आहेत. आतमध्ये जलेब चौक, शीलामाता मंदिर, दिवाणे खास, दिवाणे आम, जनेना देऊरी, गणेश पोल असे भाग पहाता येतात. सर्वत्र नक्षीकाम, कलाकुसर केलेला हा सुंदर किल्ला पाहून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

                गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर अप्रतिम वास्तु सौंदर्यानं सजलेलं आहे. यातील एक सुंदर वास्तू म्हणजे 'जलमहल'. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी १७९९ मध्ये जयपूर मधल्या मानसागर तलावात बांधलेला ५ मजली राजवाडा म्हणजे 'जलमहल'. हा संपूर्ण राजवाडा लाल, गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलाय. राजपूत वास्तूशैलीचं हे एक सुंदर उदाहरण आहे. या मानसागर तलावात बदकांसह इतर पक्षीही जलविहार करत असताना पहायला मिळतात. जलमहल पाहून आम्ही पुढं गेलो.

          आमचं पुढचं स्थान होतं चोखी धाणी. चोखी धाणी हे असं एक स्थान जिथं सारी राजस्थानी संस्कृती पहायला, अनुभवायला मिळते. कठपुतळी नृत्य, राजस्थानी घुमर नृत्य, घोडेस्वारी, हत्तीस्वारी, उंटस्वारी, जादूचे खेळ, कुंभारकाम, या सारख्या अनेक गोष्टी इथं आहेत. कुंभारांबरोबर आपणही मातीची भांडी फिरत्या चाकावर बनवू शकतो. तसंच इथं गंगाघाट आहे जिथं रोज सायंकाळी ७.३० वाजता गंगाआरती केली जाते. आणि इथं नौकानयनाचा आनंद घेता येतो. खरेदीसाठी काही दुकानंही इथं आहेत. राजस्थानच्या प्रसिद्ध कलाकुसरीच्या वस्तू, ब्लॉक प्रिंटिंगचे, बांधणीचे कपडे, साड्या यांची खरेदी इथं करता येते. याचबरोबर इथली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पारंपरिक राजस्थानी भोजन. केर सांगरी, दाल बाटी, चुरमा, गट्ट्याची भाजी, मालपुवा या वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक राजस्थानी पदार्थांसह इतर अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. छान बैठक व्यवस्था, कंदील आणि इतर रोषणाई, सजावट आणि पारंपरिक राजस्थानी पोषाखात आग्रह करकरुन वाढणारे स्थानिक लोकं अशा छान वातावरणात भोजनाचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच. हे सारं अनुभवून, भोजनाचा आस्वाद घेऊन, खरेदी आणि आम्ही स्वतः केलेली मातीची छोटी भांडी घेऊन आम्ही रुमवर परत आलो.

                 दुसऱ्या दिवशी सकाळी जयपूरमधलीच अजून काही प्रसिद्ध ठिकाणं पहायला निघालो. सुरुवातीलाच आम्ही गेलो बाप्पाच्या दर्शनाला. ' मोती डुंगरी गणेश मंदिर ' - १७६१ मध्ये सेठ जय राम पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधण्यात आलं. राजस्थानमधल्या सर्वोत्तम पाषाणाने हे मंदिर ४ महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आलं. याची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, मेवाडचे राजे प्रदिर्घ प्रवास करुन बैलगाडीतून परत जात होते त्यावेळी त्यांच्याबरोबर ही गणेशाची मूर्ती होती. पण ज्या ठिकाणी ही बैलगाडी थांबेल त्याचठिकाणी गणेशाचं मंदिर बांधावं अशी अट होती. ही बैलगाडी डुंगरी टेकडीच्या पायथ्याशी थांबली आणि मग पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली त्याच ठिकाणी गणेशाचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिरात अतिशय रेखीव आणि भव्य गणेश मूर्ती आहे. इथं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या दुसऱ्या मंदिरात गेलो. ' बिर्ला मंदिर ' - २० व्या शतकात बिर्ला कुटुंबियांनी बांधलेलं हे मंदिर ' लक्ष्मी नारायण मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. शुभ्र संगमरवरात कोरीव कामात बांधलेलं हे मंदिर सुंदर आहे. गर्भगृहात लक्ष्मी नारायणाची संगमरवरातली रेखीव मूर्ती आहे. इथून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

' अल्बर्ट हाॅल म्युझियम ' - राज रामसिंह यांनी बांधलेली म्युझियमची ही वास्तू इंडो - सारसेनिक शैलीत आहे. १८८७ साली हे संग्रहालय लोकांना पहाण्यासाठी खुलं करण्यात आलं. इथं स्थानिक शिल्पकारांच्या कलाकृती, विविध चित्रं, गालिचे, धातूच्या वस्तू, मौल्यवान खडे,  पारंपरिक पोशाख, आभुषणं, हस्तीदंती मूर्ती, त्याकाळी चलनात असलेली नाणी हे सारं पहायला मिळतं. हे सगळं बघून पुढं एक विशेष स्थान बघायला गेलो. ' जंतरमंतर ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थांनामध्ये समाविष्ट असलेलं हे स्थान राजा सवाई जयसिंह यांनी १७४३ मध्ये बांधलं. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासाठी ही वेधशाळा बांधण्यात आली. नुसत्या डोळ्यांनीही खगोलीय वेध घेण्यासाठी इथं मोठमोठी २० वेधयंत्र बांधली आहेत. सम्राटयंत्र, दिगंशयंत्र, जयप्रकाश, राशीवलय यंत्र, इत्यादी वेधयंत्रं इथं पहाता येतात. रचनात्मक भव्यता आणि ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र याविषयीची तत्कालीन प्रगती यादृष्टीने जंतरमंतर ला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे सगळं बघून आम्ही पुढे गेलो. 

' सिटी पॅलेस ' - १७३२ मध्ये महाराज सवाई जयसिंह द्वितीय यांनी या राजवाड्याची निर्मिती केली. या राजवाड्यात काही इमारती, विभिन्न प्रांगण, गॅलरी, संग्रहालय यांचा समावेश आहे. संग्रहालयात राजांच्या संग्रहातील अनेकोत्तम कलाकृती, पोषाख, शस्त्रास्त्र पहाता येतात. संपूर्ण राजवाडा गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. अप्रतिम कोरीव काम इथं पहायला मिळतं. या राजवाड्यातले चंद्र महल, मुबारक महल, गोविंद देव मंदिर, संग्रहालय हे विशेष पहाण्यासारखे. या राजवाड्यातल्या काही भागात अजूनही राजपरिवार वास्तव्यास आहे. दिवसभर हे सगळं स्थलदर्शन करुन आम्ही रुमवर परत आलो.

             तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जयपूर सोडून पुढे निघालो. दोन अडिच तासातच आम्ही पोहोचलो ' पुष्कर ' ला. 

' पुष्कर ' - इथं संपूर्ण भारतातलं ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकात बांधलय. मंदिरात ब्रम्हदेवाची, पत्नी गायत्रीसह चतुर्मुखी मूर्ती आहे. आणि मंदिराच्या मागील बाजूस टेकडीवर पत्नी सावित्रीचं मंदिर आहे. या मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की एकदा ब्रम्हदेव आपल्या भक्तांसाठी यज्ञ करायचं ठरवतात. आणि यज्ञाची जागा ठरविण्यासाठी एक कमलपुष्प पृथ्वीवर पाठवतात. ते पुष्प जिथे पडेल ते यज्ञ स्थान. ते पुष्प राजस्थान मधल्या पुष्कर या ठिकाणी पडतं आणि यज्ञाचं स्थान निश्चित होतं. ब्रम्हदेव यज्ञस्थानी पोहोचले. पण त्यांची पत्नी सावित्री योग्य स्थान पोहोचली नाही. यज्ञाचा शुभसमय उलटून चालला होता म्हणून ब्रम्हानी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्रीची निर्मिती केली आणि तिच्याशी विवाह करुन यज्ञाला सुरुवात केली. आणि त्याचवेळी त्यांची पत्नी सावित्री तिथं पोहोचली. यज्ञासाठी ब्रम्हदेवांना दुसऱ्या स्त्रीसमवेत बसलेलं पाहून ती क्रोधित झाली आणि तिनं ब्रम्हदेवांना शाप दिला की संपूर्ण पृथ्वीतलावर तुमची कुठंही पूजा केली जाणार नाही. हा शाप ऐकून साऱ्या देवदेवतांनी सावित्रीला विनंती केली तेव्हा तिनं फक्त या स्थानीच म्हणजे पुष्करमध्येच ब्रम्हदेवांची पूजा केली जाईल असा उ:शाप दिला. त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर पुष्कर सरोवरच्या काठावर आहे. इथं सरोवराकाठी तर्पणादी विधीही केले जातात. हे विधी करुन ब्रम्हदेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचं पुढचं शहर होतं ' बिकानेर '. 

                 बिकानेरला आम्ही आधी एका मंदिरात गेलो. ' करणी माता मंदिर ' - करणी माता ही साऱ्या राजपूतांचं श्रध्दास्थान. बिकानेर मधल्या देशनोक गावात हे मंदिर आहे. २० व्या शतकात बिकानेरचे महाराजा गंगासिंह यांनी हे मंदिर बांधलंय. ' करणी माता मंदिर ' हे ' उंदरांचं मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. करणी मातेचा पुत्र ' लक्ष्मण ' एकदा कपिल सरोवरात जल प्राशन करत असताना सरोवरात पडून त्याचा मृत्यू झाला. करणी मातेला हे कळताच ती यमराजाकडे गेली आणि तिने मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावं असं सांगितलं पण यमराजानं त्याला नकार दिला. मात्र करणी मातेनं लक्ष्मण आणि त्याच्या ४००० वंशजांना उंदीर म्हणून पुनर्जन्म दिला. अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हे मंदिर उंदराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात शब्दशः असंख्य उंदीर आहेत. तरीही दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. आम्ही दोघींनी मात्र या मंदिराच्या थोडं दूरच थांबून तिथूनच करणी मातेला नमस्कार केला. बाकी पाच जणं मंदिरात जाऊन आले. 

            यानंतर आम्ही कॅमल ब्रीडिंग फार्म बघायला गेलो. राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्र - अवाढव्य परिसरात इथं जागोजागी शेडमध्ये खूप सारे उंट ठेवण्यात आले आहेत. दिवसभर चरण्यासाठी त्यांना बाहेर नेलं जातं आणि सायंकाळी परत शेडमध्ये ठेवण्यात येतं. आशियामधलं  उंट प्रजननासाठीचं हे एकमात्र केंद्र आहे. पूर्ण वाढ झालेले उंट, ३-४ महिन्याचे छोटे उंट इथं आहेत. तसंच उंटिणींच्या दुधाची डेअरीही इथं आहे. हे सारं पाहून आम्ही रुमवर गेलो.

             चौथ्या दिवशी आम्ही बिकानेरमधला एक किल्ला बघायला गेलो. ' जुनागढ किल्ला ' - १५९४ मध्ये 'राजा राय सिंह' यांनी 'करण सिंह' यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधला. किल्ल्यात महल, मंदिर आणि संग्रहालय आहे. हे सारं लाल वाळूचा दगड आणि संगमरवर यांच्या मिश्रणातून बांधलंय. संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंमधून महाराजांच्या भव्य जीवनशैलीचा अंदाज येतो. इथं वस्त्रप्रावरणं, आभुषणं, चांदीची तसंच मीनाकारी केलेली विविध भांडी, सिंहासन, लहान मोठी सोन्या चांदीची कलाकुसर असलेली चित्रं, पालख्या, शस्त्रास्त्र अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर फिरुन आम्ही पुढं जैसलमेरला रुमवर पोहोचलो.

- स्नेहल मोडक







      









कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...