Pages

Tuesday, December 3, 2024

खम्मा घणी - १

          अंबाजोगाईला कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आम्ही सोमवारी रात्री घरी परत आलो. आणि लगेच मंगळवारी रात्री उशिरा मोठ्या सहलीसाठी प्रस्थान केलं. बुधवारी भल्या पहाटे निघणाऱ्या विमानानं सकाळी ७ वाजताच आम्ही 'गुलाबी शहर - जयपूर' विमानतळावर उतरलो. आणि आमच्या राजस्थान सहलीला सुरुवात झाली. आमच्या संपूर्ण सहलीसाठी आधीच ठरवलेली ११ सीटर ट्रॅव्हलर विमानतळावर उभी होती. सहलीसाठी आम्ही सारे कुटुंबीय मिळून गेलो होतो. 

            वाटेत नाश्ता करुन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रुमवर पोहोचून आवरुन थोडा आराम करुन फिरायला निघालो. सर्वात आधी आम्ही गेलो जयपूर मधलं अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण पहायला.  

' हवामहल ' - १७९९ मध्ये राजा सवाई प्रतापसिंह यांनी खास राजघराण्यातील स्त्रियांसाठी या महालाची निर्मिती केली. परंतु प्रत्यक्षात हा स्वतंत्र महाल नसून सिटी पॅलेसच्या मागच्या बाजूला बांधण्यात आलेला भाग आहे. राजघराण्यातील स्त्रियांना इथं होणारे नृत्याचे आणि इतर कार्यक्रम आणि शहरातील घडामोडी कुणासमोरही न येता पहाता याव्यात यासाठी हा महाल बांधण्यात आला. या महालाचा आकार एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे कारण राजा प्रतापसिंह श्रीकृष्ण भक्त होते. या पाच मजली महालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात उंच महाल आहे. पाया नसल्यानं हा ८७° अंशात झुकलेला आणि घुमावदार आहे. ९५३ खिडक्या असलेल्या या महालाची लाल आणि गुलाबी बलुआ दगडांपासून निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय सुंदर, देखणा असा हा हवामहल पहायला पर्यटकांची खूपच गर्दी असते. हवामहल पाहून आम्ही पुढे गेलो.

          'आमेर किल्ला' - आमेर किल्ला किंवा अंबर किल्ला जयपूर पासून ११ किमी. अंतरावर एका पर्वतावर भक्कमपणे उभा आहे. महाराज मानसिंह प्रथम यांनी १५९२ साली याची निर्मिती केली. लाल वाळूचा दगड आणि शुभ्र संगमरवर यांच्या मिलाफातून हा किल्ला तयार केला आहे. राजपूत आणि मुघल वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना असलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलं आहे. भव्य महाल, मंदिर यांसह या किल्ल्यातला शीश महल अप्रतिम असाच आहे. या महालात अप्रतिम कलाकुसर केली आहे आणि साऱ्या भिंती आणि छतावर असंख्य आरसे जडवले अहेत. त्यामुळं दिवा लावताच त्यांच प्रतिबिंब त्या सगळ्या आरशात दिसतं आणि लख्ख प्रकाश पडतो. आणि क्षितिजवर असंख्य तारे चमकत असल्याचा भास होतो. याला जरी किल्ला म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा राजवाडाच होता कारण इथं राजपरिवार वास्तव्यास होता. इथं येण्यासाठी 'सुरजपोल' आणि 'चांदपोल' असे दोन दरवाजे आहेत. आतमध्ये जलेब चौक, शीलामाता मंदिर, दिवाणे खास, दिवाणे आम, जनेना देऊरी, गणेश पोल असे भाग पहाता येतात. सर्वत्र नक्षीकाम, कलाकुसर केलेला हा सुंदर किल्ला पाहून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

                गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर अप्रतिम वास्तु सौंदर्यानं सजलेलं आहे. यातील एक सुंदर वास्तू म्हणजे 'जलमहल'. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी १७९९ मध्ये जयपूर मधल्या मानसागर तलावात बांधलेला ५ मजली राजवाडा म्हणजे 'जलमहल'. हा संपूर्ण राजवाडा लाल, गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलाय. राजपूत वास्तूशैलीचं हे एक सुंदर उदाहरण आहे. या मानसागर तलावात बदकांसह इतर पक्षीही जलविहार करत असताना पहायला मिळतात. जलमहल पाहून आम्ही पुढं गेलो.

          आमचं पुढचं स्थान होतं चोखी धाणी. चोखी धाणी हे असं एक स्थान जिथं सारी राजस्थानी संस्कृती पहायला, अनुभवायला मिळते. कठपुतळी नृत्य, राजस्थानी घुमर नृत्य, घोडेस्वारी, हत्तीस्वारी, उंटस्वारी, जादूचे खेळ, कुंभारकाम, या सारख्या अनेक गोष्टी इथं आहेत. कुंभारांबरोबर आपणही मातीची भांडी फिरत्या चाकावर बनवू शकतो. तसंच इथं गंगाघाट आहे जिथं रोज सायंकाळी ७.३० वाजता गंगाआरती केली जाते. आणि इथं नौकानयनाचा आनंद घेता येतो. खरेदीसाठी काही दुकानंही इथं आहेत. राजस्थानच्या प्रसिद्ध कलाकुसरीच्या वस्तू, ब्लॉक प्रिंटिंगचे, बांधणीचे कपडे, साड्या यांची खरेदी इथं करता येते. याचबरोबर इथली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पारंपरिक राजस्थानी भोजन. केर सांगरी, दाल बाटी, चुरमा, गट्ट्याची भाजी, मालपुवा या वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक राजस्थानी पदार्थांसह इतर अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. छान बैठक व्यवस्था, कंदील आणि इतर रोषणाई, सजावट आणि पारंपरिक राजस्थानी पोषाखात आग्रह करकरुन वाढणारे स्थानिक लोकं अशा छान वातावरणात भोजनाचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच. हे सारं अनुभवून, भोजनाचा आस्वाद घेऊन, खरेदी आणि आम्ही स्वतः केलेली मातीची छोटी भांडी घेऊन आम्ही रुमवर परत आलो.

                 दुसऱ्या दिवशी सकाळी जयपूरमधलीच अजून काही प्रसिद्ध ठिकाणं पहायला निघालो. सुरुवातीलाच आम्ही गेलो बाप्पाच्या दर्शनाला. ' मोती डुंगरी गणेश मंदिर ' - १७६१ मध्ये सेठ जय राम पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधण्यात आलं. राजस्थानमधल्या सर्वोत्तम पाषाणाने हे मंदिर ४ महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आलं. याची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, मेवाडचे राजे प्रदिर्घ प्रवास करुन बैलगाडीतून परत जात होते त्यावेळी त्यांच्याबरोबर ही गणेशाची मूर्ती होती. पण ज्या ठिकाणी ही बैलगाडी थांबेल त्याचठिकाणी गणेशाचं मंदिर बांधावं अशी अट होती. ही बैलगाडी डुंगरी टेकडीच्या पायथ्याशी थांबली आणि मग पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली त्याच ठिकाणी गणेशाचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिरात अतिशय रेखीव आणि भव्य गणेश मूर्ती आहे. इथं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या दुसऱ्या मंदिरात गेलो. ' बिर्ला मंदिर ' - २० व्या शतकात बिर्ला कुटुंबियांनी बांधलेलं हे मंदिर ' लक्ष्मी नारायण मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. शुभ्र संगमरवरात कोरीव कामात बांधलेलं हे मंदिर सुंदर आहे. गर्भगृहात लक्ष्मी नारायणाची संगमरवरातली रेखीव मूर्ती आहे. इथून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

' अल्बर्ट हाॅल म्युझियम ' - राज रामसिंह यांनी बांधलेली म्युझियमची ही वास्तू इंडो - सारसेनिक शैलीत आहे. १८८७ साली हे संग्रहालय लोकांना पहाण्यासाठी खुलं करण्यात आलं. इथं स्थानिक शिल्पकारांच्या कलाकृती, विविध चित्रं, गालिचे, धातूच्या वस्तू, मौल्यवान खडे,  पारंपरिक पोशाख, आभुषणं, हस्तीदंती मूर्ती, त्याकाळी चलनात असलेली नाणी हे सारं पहायला मिळतं. हे सगळं बघून पुढं एक विशेष स्थान बघायला गेलो. ' जंतरमंतर ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थांनामध्ये समाविष्ट असलेलं हे स्थान राजा सवाई जयसिंह यांनी १७४३ मध्ये बांधलं. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासाठी ही वेधशाळा बांधण्यात आली. नुसत्या डोळ्यांनीही खगोलीय वेध घेण्यासाठी इथं मोठमोठी २० वेधयंत्र बांधली आहेत. सम्राटयंत्र, दिगंशयंत्र, जयप्रकाश, राशीवलय यंत्र, इत्यादी वेधयंत्रं इथं पहाता येतात. रचनात्मक भव्यता आणि ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र याविषयीची तत्कालीन प्रगती यादृष्टीने जंतरमंतर ला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे सगळं बघून आम्ही पुढे गेलो. 

' सिटी पॅलेस ' - १७३२ मध्ये महाराज सवाई जयसिंह द्वितीय यांनी या राजवाड्याची निर्मिती केली. या राजवाड्यात काही इमारती, विभिन्न प्रांगण, गॅलरी, संग्रहालय यांचा समावेश आहे. संग्रहालयात राजांच्या संग्रहातील अनेकोत्तम कलाकृती, पोषाख, शस्त्रास्त्र पहाता येतात. संपूर्ण राजवाडा गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. अप्रतिम कोरीव काम इथं पहायला मिळतं. या राजवाड्यातले चंद्र महल, मुबारक महल, गोविंद देव मंदिर, संग्रहालय हे विशेष पहाण्यासारखे. या राजवाड्यातल्या काही भागात अजूनही राजपरिवार वास्तव्यास आहे. दिवसभर हे सगळं स्थलदर्शन करुन आम्ही रुमवर परत आलो.

             तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जयपूर सोडून पुढे निघालो. दोन अडिच तासातच आम्ही पोहोचलो ' पुष्कर ' ला. 

' पुष्कर ' - इथं संपूर्ण भारतातलं ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकात बांधलय. मंदिरात ब्रम्हदेवाची, पत्नी गायत्रीसह चतुर्मुखी मूर्ती आहे. आणि मंदिराच्या मागील बाजूस टेकडीवर पत्नी सावित्रीचं मंदिर आहे. या मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की एकदा ब्रम्हदेव आपल्या भक्तांसाठी यज्ञ करायचं ठरवतात. आणि यज्ञाची जागा ठरविण्यासाठी एक कमलपुष्प पृथ्वीवर पाठवतात. ते पुष्प जिथे पडेल ते यज्ञ स्थान. ते पुष्प राजस्थान मधल्या पुष्कर या ठिकाणी पडतं आणि यज्ञाचं स्थान निश्चित होतं. ब्रम्हदेव यज्ञस्थानी पोहोचले. पण त्यांची पत्नी सावित्री योग्य स्थान पोहोचली नाही. यज्ञाचा शुभसमय उलटून चालला होता म्हणून ब्रम्हानी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्रीची निर्मिती केली आणि तिच्याशी विवाह करुन यज्ञाला सुरुवात केली. आणि त्याचवेळी त्यांची पत्नी सावित्री तिथं पोहोचली. यज्ञासाठी ब्रम्हदेवांना दुसऱ्या स्त्रीसमवेत बसलेलं पाहून ती क्रोधित झाली आणि तिनं ब्रम्हदेवांना शाप दिला की संपूर्ण पृथ्वीतलावर तुमची कुठंही पूजा केली जाणार नाही. हा शाप ऐकून साऱ्या देवदेवतांनी सावित्रीला विनंती केली तेव्हा तिनं फक्त या स्थानीच म्हणजे पुष्करमध्येच ब्रम्हदेवांची पूजा केली जाईल असा उ:शाप दिला. त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर पुष्कर सरोवरच्या काठावर आहे. इथं सरोवराकाठी तर्पणादी विधीही केले जातात. हे विधी करुन ब्रम्हदेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचं पुढचं शहर होतं ' बिकानेर '. 

                 बिकानेरला आम्ही आधी एका मंदिरात गेलो. ' करणी माता मंदिर ' - करणी माता ही साऱ्या राजपूतांचं श्रध्दास्थान. बिकानेर मधल्या देशनोक गावात हे मंदिर आहे. २० व्या शतकात बिकानेरचे महाराजा गंगासिंह यांनी हे मंदिर बांधलंय. ' करणी माता मंदिर ' हे ' उंदरांचं मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. करणी मातेचा पुत्र ' लक्ष्मण ' एकदा कपिल सरोवरात जल प्राशन करत असताना सरोवरात पडून त्याचा मृत्यू झाला. करणी मातेला हे कळताच ती यमराजाकडे गेली आणि तिने मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावं असं सांगितलं पण यमराजानं त्याला नकार दिला. मात्र करणी मातेनं लक्ष्मण आणि त्याच्या ४००० वंशजांना उंदीर म्हणून पुनर्जन्म दिला. अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हे मंदिर उंदराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात शब्दशः असंख्य उंदीर आहेत. तरीही दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. आम्ही दोघींनी मात्र या मंदिराच्या थोडं दूरच थांबून तिथूनच करणी मातेला नमस्कार केला. बाकी पाच जणं मंदिरात जाऊन आले. 

            यानंतर आम्ही कॅमल ब्रीडिंग फार्म बघायला गेलो. राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्र - अवाढव्य परिसरात इथं जागोजागी शेडमध्ये खूप सारे उंट ठेवण्यात आले आहेत. दिवसभर चरण्यासाठी त्यांना बाहेर नेलं जातं आणि सायंकाळी परत शेडमध्ये ठेवण्यात येतं. आशियामधलं  उंट प्रजननासाठीचं हे एकमात्र केंद्र आहे. पूर्ण वाढ झालेले उंट, ३-४ महिन्याचे छोटे उंट इथं आहेत. तसंच उंटिणींच्या दुधाची डेअरीही इथं आहे. हे सारं पाहून आम्ही रुमवर गेलो.

             चौथ्या दिवशी आम्ही बिकानेरमधला एक किल्ला बघायला गेलो. ' जुनागढ किल्ला ' - १५९४ मध्ये 'राजा राय सिंह' यांनी 'करण सिंह' यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधला. किल्ल्यात महल, मंदिर आणि संग्रहालय आहे. हे सारं लाल वाळूचा दगड आणि संगमरवर यांच्या मिश्रणातून बांधलंय. संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंमधून महाराजांच्या भव्य जीवनशैलीचा अंदाज येतो. इथं वस्त्रप्रावरणं, आभुषणं, चांदीची तसंच मीनाकारी केलेली विविध भांडी, सिंहासन, लहान मोठी सोन्या चांदीची कलाकुसर असलेली चित्रं, पालख्या, शस्त्रास्त्र अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर फिरुन आम्ही पुढं जैसलमेरला रुमवर पोहोचलो.

- स्नेहल मोडक







      









No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...