प्रचंड उलथापालथ सुरु झालीय
परत एकदा अंतर्मनाच्या गाभाऱ्यात
बदलतायत विचार अगदी क्षणोक्षणी
हवंच असं काही क्षणात नकोसं होतं
कुठलाच निर्णय योग्य वाटत नाहीय
प्रपंच आणि परिवारात असुनही
मन मात्र विरक्तीकडेच धाव घेतय
दिवस सरतो कसाबसा कामात
रात्री गडद वादळात गुरफटतात
सुखाच्या क्षणीही मन भरकटतय
काही कळत नाही असं का होतय
महाकुंभातल्या डुबकीचा परिणाम
कि जड झालेलं अनुभवांचं गाठोडं
माहित आहेत यासाठी काही उपाय
तरीही हे सारं असंच स्विकारलय
जसं नदीचं पाणी कधी गढुळलं तरी
गाळ तळाशी बसल्यावर स्वच्छ होतं
अगदी तसंच अंतर्मनातलं वादळही
काही काळानं आपोआप शांत होतं
व्यक्त होते भावना जशी लेखणीतून
शांत होते मन तसच नामस्मरणातून
घडतंच हे कधी प्रत्येकाच्या आयुष्यात
कुणी लौकिकात कुणी विरक्तीत जगतात
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment