Pages

Saturday, March 27, 2021

रंगपंचमी

                   फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. आणि फाल्गुन वद्य पंचमी म्हणजे रंगपंचमी.

                  बहुतेक ठिकाणी धुलीवंदनाच्या दिवशीच रंग खेळतात. मात्र कोकणाप्रमाणेच अजूनही काही ठिकाणी रंगपंचमीलाच रंग खेळतात. 

                   रंगपंचमी म्हणजेच रंगोत्सव. वृंदावनात श्रीकृष्ण गोपगोपिकांसमवेत रंग खेळत असे. पंचमीच्या दिवशी रंगांची उधळण आणि नृत्य यांनी राधा कृष्णाचा रास रंगत असे. त्याचीच आठवण म्हणूनही आपण रंगपंचमीला रंगाची मुक्त उधळण करतो. अशुभ, वाईट गोष्टींचा नाश होऊन आपलं आयुष्यही सप्तरंगी व्हावं अशी मनोमन प्रार्थना करतो.

                   

रंगला रास गोकुळी राधारमणाचा

संगे जमला मेळा गोपगोपिकांचा

       येताच समीप कान्हा राधा बावरली

       उधळिता रंग श्रीरंगाने ती मोहरली

छेडितो अडवूनी राधेस हरी सावळा

रंगात रंगली राधा अन कान्हा आगळा

        मधुगंधी श्वासात हरीच्या राधा फुलली

        हिंदोळ्यावर स्पर्शाच्या अलवार झुलली

निळ्या आभाळी जणू जाय उंच रासझुला 

सप्तरंगी रंगली राधामोहनाची रासलीला


                                                                                                                   - स्नेहल मोडक 


Saturday, March 20, 2021

शाळा

             आठवली ना प्रत्येकाला आपापली शाळा, अगदी मनचक्षुंसमोर आली ना?

            असंख्य आठवणींचा खजिना म्हणजे शाळा. आपल्या आयुष्याच्या जडण-घडणीमधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे आपली शाळा. शिक्षण संपवून आयुष्यात स्थिरस्थावर झाल्यावर  मात्र शाळेला भेट देणे क्वचितच घडते. पण शाळेच्या नुसत्या उल्लेखानेही खूप साऱ्या आठवणी, घटना नजरेसमोर तरळतात. आणि अर्थातच सगळ्या मित्रमैत्रिणीं आठवून मन हळवं होतं. अशा या शाळेत जाणं जरी क्वचितच जमलं तरी स्वप्नात मात्र अधूनमधून नक्कीच येते, हो ना?

            

स्वप्नात आली काल माझी प्रिय शाळा

दिसला शुभ्र खडू अन फळा काळा

      हळूच डोकावले खोलीत शिक्षकांच्या

      तपासत होते काही वह्या अभ्यासाच्या

मन धावलं मधल्या मैदानात मस्तीत

पण सुरु होती तिथे कवायत शिस्तीत

       मन फिरलं सगळ्या वर्गखोल्यांमधून

       सुरु होते पाठ विविध विषयांमधून

मन शिरलं मग प्रशस्त सभागृहात

सुरु होती कार्यक्रमाची तयारी जोरात

        लावला कान हळूच मग संगीतवर्गाला

        द्यावीशी वाटली दाद त्या सुरेल स्वराला

नंतर मन मोठ्या मैदानावर धावलं

खो-खो अन सोनसाखळीतच रमलं

        सारं फिरुन मन तिथल्या जुईशी थांबलं

        अलवार खुडून फुलांना गजऱ्यात गुंफलं

 गंधात त्या जुईच्या मन माझं मोहरलं

 स्वप्न होतं हे कळताच मात्र बावरलं

              - स्नेहल मोडक

Saturday, March 13, 2021

कुणकेश्वर

           महाशिवरात्र आणि कुणकेश्वर हे साऱ्या कोकणकरांसाठी एक सुंदर समीकरण.

           देवभुमी कोकणातल्या देवगड मधलं एक गांव कुणकेश्वर. इथे असलेलं हे शंभू महादेवाचं प्राचीन आणि भव्य देवालय. आणि या देवालयाच्या बाजूलाच असलेला विस्तिर्ण, स्वच्छ आणि नितांतसुंदर असा सागरकिनारा. महाशिवरात्रीला इथे खूप मोठी यात्रा भरते. ४-५ दिवस चालणारी ही यात्रा म्हणजे जणू पर्वणीच असते. या ४-५ दिवसांच्या यात्रेत व्यापाराची मोठी उलाढाल होतेच पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या निमित्ताने सगळे चाकरमानी शंभू महादेवाच्या दर्शनाच्या आणि यात्रेच्या ओढीने आपल्या घरी येतात. त्यामुळे साऱ्या कोकणात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं.

               खरंतर खूप वर्ष मनात येईल तितक्या असंख्य वेळा श्री कुणकेश्वराच्या दर्शनाचं भाग्य लाभलं पण अजूनही कुणकेश्वर असं नुसतं नांव जरी कानावर आलं तरी मन क्षणात महादेवांच्या चरणी पोहोचतं. नतमस्तक होऊन लगेच शुभ्र लाटांशी खेळायला समुद्र किनारी धावतं. 

            अकराव्या शतकात बांधलेलं, मूळ काळ्या पाषाणातलं, अप्रतिम शिल्पसौदर्याने नटलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे शंभू महादेवाचं देवालय म्हणजे देवभूमी कोकणचा जणू मुकुटमणीच. हे मंदिर  दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय सध्या कोकण पर्यटन वाढल्यामुळे एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ही प्रसिद्ध झालंय.

               या मंदिराबद्दल पूर्वापार एक आख्यायिका सांगितली जाते. एक अरब व्यापारी जहाजातून प्रवास करत असताना या भागात त्याचं जहाज आलं आणि अचानक वादळ सुरु झालं. त्या व्यापाऱ्याला आपण आणि आपलं जहाज वाचणार नाही अशी भीती वाटू लागली. त्याचवेळी त्याचं लक्ष दूरवर भूभागावर लुकलुकणाऱ्या एका दिव्याकडे गेलं. तिथे काही देवस्थान असावं असा विचार करुन त्याने प्रार्थना केली की जर हे वादळ शमलं आणि मी त्यातून वाचलो तर तिथल्या देवाचं मोठं मंदिर बांधेन. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वादळं शमलं आणि तोही सुखरूप राहिला. किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने प्रार्थना केल्याप्रमाणे तिथे शोध घेतला असता शिवलिंग सापडलं. तिथेच मोठं मंदिर बांधून त्यात त्या शिवलिंगाची स्थापना केली. आणि नंतर त्याच मंदिराच्या कळसावरुन उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. जिथे त्याची उडी पडली तिथे नंतर एक समाधी बांधली गेली.

                 नंतर या मंदिराची प्रसिध्दी वाढत गेली आणि इतिहास अभ्यासकांचं लक्ष या मंदिराकडे वळलं. मुसलमानी सत्ता हिंदू साम्राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना एका मुस्लिम व्यक्तीने हे मंदिर कसे बांधले असा प्रश्न अभ्यासकांना पडला आणि मंदिराचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु झाले. १९६० सालच्या सुमारास माननीय बाबासाहेब पुरंदरे यांनी या मंदिराला भेट दिली. आणि अभ्यासाअंती निष्कर्ष काढले आणि पुराव्यानीशी सिध्दही केले. त्यानुसार हे मंदिर कुठल्याही अरब माणसाने बांधलेलं नसून हिंदू साम्राज्य काळात हिंदूनीच बांधलेलं मंदिर असल्याचं स्पष्ट झालं. त्या अरबी व्यापाऱ्याची म्हणून जी समाधी सांगितली जात होती ती प्रत्यक्षात एक मंदिरच असल्याचं सिध्द झालं.

                  मुस्लिम साम्राज्यकाळात सर्वच हिंदू मंदिराचा कमी अधिक प्रमाणात विध्वंस केला गेला. जेव्हा मुसलमान कोकणात येऊन साम्राज्य विस्तार करु लागले तेव्हा हे शिवमंदिर प्रसिद्ध झालं होतं. या मंदिरावर मुसलमानांनी आक्रमण करुन विध्वंस करु नये यासाठी प्रयत्न केले गेले.

                   छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा भाग होता. त्यांची श्री कुणकेश्वरावर अपार श्रध्दा होती. मुस्लिम जेव्हा आक्रमण करीत जवळ येऊ लागले तेव्हा त्यांना मंदिराच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली. आणि त्यातूनच वरिल आख्यायिका पसरवण्यात आली. सध्या समाधी म्हणून जी वास्तू सांगितली जाते ते तेव्हा मंदिरच होते. त्याच्या कळसावरील कोरीवकाम काढून त्याला चुमटाचा आकार दिला. बाहेरुन ती त्या व्यापाऱ्याची समाधी असल्याचं भासावं म्हणून हा प्रयत्न केला होता. जेणेकरून हे मंदिर आक्रमणापासून सुरक्षित राहील. तरीही ते स्वत: आपल्या तुटपुंज्या सैन्यासह मंदिरात रक्षणासाठी सिध्द राहिले. एवढे प्रयत्न करुनही मुस्लिमांनी मंदिरावर आक्रमण केलंच. तुटपुंज्या बळावर मराठ्यांनी जोरदार प्रतिकार केला.पण मुसलमानी सैन्य जास्त असल्याने मराठ्यांचा प्रतिकार कमी पडू लागला. मग स्वत: अमात्यानी मंदिराच्या कळसावरुन हल्ल्यात उडी घेतली. त्यांच्या येण्याने सैन्यात बळ संचारलं आणि त्यांनी अजून जोरदार प्रतिहल्ला केला. अखेर मुस्लिम सैन्याने माघार घेतली. पण या हल्ल्यात मंदिराचा थोडा विध्वंस झालाच. अमात्यांवर या घटनेचा मोठा मानसिक आघात झाला. त्यातून ते सावरलेच नाहीत आणि त्यातच कुणकेश्वर येथेच त्यानी अंतिम श्वास घेतला. त्यांनी युद्धासाठी जिथे उडी घेतली तिथे त्यांची समाधी म्हणून तुळशी वृंदावन बांधण्यात आलं आहे.

                   यानंतर जीर्णोद्धाराचं काम काही काळाने सुरु झालं मात्र प्रत्क्षात १७०० साली हा जीर्णोद्धार पूर्ण झाला. पण जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणाऐवजी तिथे सापडणाऱ्या चिऱ्याच्या दगडांचा उपयोग केला गेला. त्यामुळे मंदिराचे मुळ कोरीवकाम थोड्या प्रमाणातच शिल्लक राहिले आहे. यानतर परत काही काळानंतर मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

                     या मंदिराचे हे सारे ऐतिहासिक संदर्भ आंतरजालाचा थोडा धांडोळा घेतल्यावरही सहज उपलब्ध होतात.

                     इथल्या समुद्रातल्या खडकांवर लाटांच्या विशिष्ट दिशेमुळे अनेक शिवलिंग नैसर्गिकरीत्या तयार झाली आहेत. हे कुणकेश्वरचं अजून एक खास वैशिष्ट्य आहे.

                    असं हे अगदी देखणं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं हे कुणकेश्वराचं देवालय आणि बाजूलाच असलेला नितांत सुंदर सागरकिनारा प्रत्यक्ष पहायलाच हवा.

                                             - स्नेहल मोडक

 

Thursday, March 11, 2021

उष:काल

        उष:काल हा शब्द जितका नादमधुर तितकीच ही वेळही रंगविभोर. रवीराजाच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीनेही उषा अगदी रंगबावरी होते जणू. आणि मग सोनकेशरी रंगाची उधळण करीत रवीराजाची स्वारी हलकेच अवतरते. त्याच्या आगमनाने संपूर्ण चराचरात चैतन्य उमलतं आणि नित्यक्रम सुरु होतो. 

        अतिशय विलोभनीय अशा उष:कालाचे हे काव्यरुप.

        

उष:काल झाला सखे उष:काल झाला

सोनकेशर उधळीत सहस्ररश्मी आला

       नभी मेघाचे कमंडलू हलकेच कलंडले

       अन मखमली हरीततृणांवर दवबिंदू सांडले

नितळ जलाशयी आभाळ केशरी न्याहाळते

वनराईतूनी किरण सोनेरी भूवरी झेपावते

         किलबिलाटाने पक्षी घालती सृष्टीस साद

         राऊळी होतसे देवतार्चन अन घंटानाद

पखरण प्राजक्ताची जणू मौक्तिक विखुरले

मधुगंधी मोगरा जाईजुईने आसमंत दरवळले

          खुडूनी ही विविध पुष्पे ईशचरणी अर्पिते

          लाभो सौख्य आरोग्य सर्वांना हेच मागते


                                               - स्नेहल मोडक

     


  


Saturday, March 6, 2021

लक्ष्मी विलास पॅलेस - वडोदरा

 

                 

                        वडोदरा - बडोदा संस्थानचा मानबिंदू आणि अतिशय देखणी वास्तू म्हणजे लक्ष्मी विलास महाल.

                    सयाजीराव गायकवाड महाराजांनी आपल्या वास्तव्यासाठी १८९० साली बांधलेला हा अप्रतिम महाल.

                    आमच्या माघी पौर्णिमेच्या गिरनार यात्रेनंतर लक्ष्मी विलास महालाला धावती भेट देण्याचा योग आला. वेळेअभावी फक्त मुख्य महालाच्याच वास्तुसौंदर्याचा आस्वाद घेता आला.

                    चार्ल्स माॅंट या ब्रिटिश वास्तुतज्ञाच्या आराखड्यानुसार या महालाची निर्मिती केली गेली. संपूर्ण महाल हा भारतीय, इस्लामिक आणि व्हिक्टोरियन वास्तुशैलीचा एक अनोखा मिलाफ आहे.

                    महालाच्या प्रवेशद्वारासमोरच अतिशय आकर्षक असं कारंज आहे. जे अजूनही व्यवस्थित सुरु आहे. मुख्य महालात प्रवेश केल्यावर  दोन्ही बाजूला सयाजीराव महाराजांच्या माता जमनाबाई गायकवाड आणि पिता खंडेराव गायकवाड महाराज यांची तैलचित्रे पहायला मिळतात. 

                    त्यानंतर आहे महालामधील मुख्य शाही दरबार (गादी हॉल). आत प्रवेश करताच रेखीव घडवंचीवरची शुभ्र धवल वस्त्राने आच्छादित प्रशस्त गादी आणि तक्के, धातूच्या मयुरावर तोललेली नक्षीदार छत्री आपलं लक्ष वेधून घेते. याबरोबरच इथे आहे आपल्या दृष्टीला मोहवणारी अजून एक खास गोष्ट म्हणजे राजा रविवर्मा यांची तैलचित्रं. ही चित्रं काढण्यासाठी राजा रविवर्मा यांनी संपूर्ण देशभ्रमण केलं होतं. अगदी नजर खिळवून ठेवणारी चित्रं आहेत ही.

                    यापुढे आहे राजदरबार. अतिशय प्रशस्त अशा या दरबारहॉलमधे खास व्हेनिसहून आणलेल्या फरशा बसवलेल्या आहेत. या दिवाणखान्याच्या कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलिची यांनी बनवलेले संगमरवरी पुतळे आहेत. राजदरबारातील कारभार आणि इतर कार्यक्रम पहाण्यासाठी राजस्त्रियांना बसण्यासाठी पहिल्या मजल्यावरील दालनाबाहेर खुला कक्ष (गॅलरी) आहे. दालनाच्या समोरच्या बाजूला बेल्जियम काचेची अप्रतिम अशी रंगीत चित्रं आहेत. तर कक्षाच्या बाहेरच्या बाजूला वादन करणाऱ्या अप्सरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत.

                    राजदरबारानंतर आपल्यासमोर येतं ते शस्त्रागार. युद्धकाळात वापरलेल्या विविध तलवारी आणि इतर काही शस्त्रं इथं पहायला मिळतात. त्यात काही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण तलवारी आणि शस्त्रंही इथे आहेत.

                    ७०० एकर परिसरात मध्यभागी बांधलेल्या या राजवाड्यात बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचं निवासस्थान आणि राजदरबार होता. या संपूर्ण महालात १७० खोल्या आहेत. ५०० फूट लांब आणि २०० फूट रुंद अशा राजवाड्याच्या मनोऱ्याची ऊंची २०४ फूट आहे. बंकिगहॅम पॅलेसच्या चौपट मोठा हा राजवाडा आहे.

              

  

                    महालाच्या आजूबाजूला उद्याने, तरणतलाव, गोल्फचे मैदान आहे.हि सारी उद्याने, हिरवळ, कारंजी ब्रिटिश उद्यानतज्ञ विल्यम गोल्डरिग यांनी तयार केली आहेत. या महालात अजून मोतीबाग पॅलेस, माकरपुरा पॅलेस, प्रताप विलास पॅलेस आणि महाराजा फतेह सिंह संग्रहालय या काही ईमारती आहेत.

                    लक्ष्मी विलास पॅलेस पर्यटकांना सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पहाता येतो. २५० रुपये प्रवेश शुल्क आहे. संस्थानने या संपूर्ण महालाची माहिती देण्यासाठी एक उत्तम व्यवस्था केली आहे. कार्यालयातून माहिती ऐकण्यासाठी कानाला लावण्याचं एक छोटंसं यंत्र ( device) दिलं जातं.  याद्वारे आपल्याला हव्या असलेल्या भाषेतून ( मराठी, हिंदी, इंग्लिश आणि गुजराती ) महालाबद्दलचं  निवेदन ऐकायला मिळतं. त्यामुळे आपल्याला संपूर्ण मुख्य महाल सविस्तर माहितीसह पहाता येतो. एकूण सव्वातासाचं हे निवेदन आहे. त्यानंतर किंवा आधी आपण इतर सर्व भाग पाहू शकतो. 

                    राजवाड्याच्या बाहेरील भागाची छायाचित्रं / चित्रण करता येतं. मात्र अंतर्भागात छायाचित्रं किंवा चित्रण करण्यास मनाई आहे. त्यामुळे बडोदा संस्थानची ही अतिशय देखणी ऐतिहासिक वारसा असलेली वास्तु एकदा तरी प्रत्यक्षच पहायला हवी.

                                                          - स्नेहल मोडक 

Wednesday, March 3, 2021

स्वप्न.? अंहं सत्य

              
                

                मार्गशीर्ष, पौष, माघ सलग तीन पौर्णिमा आणि त्या पौर्णिमांना आम्हाला घडलेलं गिरनार दर्शन. खरंच एवढा मोठा योग आमच्या आयुष्यात येईल असं आधी कुणी भविष्य सांगितलं असतं तरी त्यावर विश्वास ठेवावा का असाच प्रश्न मनात उमटला असता. 

               पौष पौर्णिमेला जेव्हा आम्ही गिरनारला मोठा ग्रुप बरोबर घेऊन गेलो होतो तेव्हा गिरनारला अतिशय थंडी आणि वारा होता. सर्वांनाच त्या थंडीचा थोडा त्रास झाला होता. पण मला थोडा जास्तच त्रास झाला. मला पूर्वीपासून असलेल्या त्रासात थंडीमुळे अजून भर पडली. अर्थात घरगुती उपचार आणि आराम हाच त्यावर उपाय होता. पण त्यामुळे पुन्हा लगेच माघी पौर्णिमेला गिरनारला जायचा विचारही मनात नव्हता.

                मात्र माघी पौर्णिमेच्या दोन - तिन दिवस आधी पुर्ण रात्रभर मनचक्षुंसमोर निद्रादेवी ऐवजी फक्त आणि फक्त गिरनार होता. मन केव्हाच गुरुशिखरी पोहोचलं होतं. तब्येतीमुळे मी मनाला आवरण्याचा प्रयत्न करत होते पण मन मात्र गुरुचरणीच तल्लिन झाले होते. अखेर तनमन एक झालं आणि गिरनारला जायचं नक्की केलं. त्याचवेळी गिरनार चढता उतरताना ऊडन खटोला ची (रोप वे) साथ घ्यायची हेही ठरवलं. दर्शनाला जायचंच होतं पण आधीप्रमाणे दहा हजार पायऱ्या चढून जाण्याची शक्ती नसल्यामुळे उडन खटोलाचा आधार घेणं आवश्यक होतं.

                पौर्णिमेच्या आदल्या रात्री तलेटीला पोहोचलो. सकाळी गिरनार दर्शनाला निघालो. जरी उडन खटोलाने जायचं ठरवलं असलं तरी नेहमीप्रमाणे लंबे हनुमानजींच आणि पहिल्या पायरीचं दर्शन आधी घ्यायला गेलो. दर्शन घेऊन प्रार्थना केली चार पायऱ्या चढलो आणि मनात द्वंद्व सुरु झालं, दहा हजार पायऱ्या कि रोप वे. अखेर द्विधा मनस्थितीतच नाईलाजाने रोप वे कडे वळलो. 

                रोप वे ने अंबाजी टुक ला पोहोचलो. अंबामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. अंबाजी टुक पासून एका तासात पाच हजार पायऱ्या पूर्ण करुन आम्ही दत्तगुरुंच्या चरणी लीन झालो होतो. मी दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि क्षणार्धात एका विलक्षण संवेदनेची जाणिव झाली.  स्वयं श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शनाला बोलावलं आणि दर्शन घडवलं याची प्रचिती आली.

                शिखर दर्शन घेऊन परत खाली कमंडलू तीर्थाशी अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. दत्तगुरुंच्या कृपेने अगदी धुनी समोर बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन करायला मिळालं. धुनीचं दर्शन घेऊन प्रसाद घेण्यासाठी गेलो. भोजन प्रसादाची व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. भोजनासाठीचे पदार्थ बघून हा फक्त प्रसाद नसून दत्तगुरुंच्या कृपेने सर्वांनाच छोट्याशा मेजवानीचाच लाभ मिळालाय असंच वाटत होतं. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. अंबाजी टुक पर्यंत येऊन मग रोप वे ने खाली पोहोचलो.

                 सलग तीन पौर्णिमेला गिरनार शिखर दर्शन झाल्याने मन अगदी शांत तृप्त झालंय आणि अर्थातच श्री  दत्तात्रेय पुन्हा केव्हा दर्शनाला बोलावतात याचीही वाट पहातंय. 


                  जरी किती अवघड भासला गिरनार

              गुरुकृपेने दर्शन वारंवार घडणार

                  नित्य नामस्मरणात मन हे रमणार

                  ध्यासात गुरुसेवेच्या 'मी'पण सरणार

               यत्न सदा षडरिपुमुक्तीचा करणार

               जय गिरनार जय जय गिरनार

 

                                                     - स्नेहल मोडक


 


कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...