Pages

Wednesday, March 3, 2021

स्वप्न.? अंहं सत्य

              
                

                मार्गशीर्ष, पौष, माघ सलग तीन पौर्णिमा आणि त्या पौर्णिमांना आम्हाला घडलेलं गिरनार दर्शन. खरंच एवढा मोठा योग आमच्या आयुष्यात येईल असं आधी कुणी भविष्य सांगितलं असतं तरी त्यावर विश्वास ठेवावा का असाच प्रश्न मनात उमटला असता. 

               पौष पौर्णिमेला जेव्हा आम्ही गिरनारला मोठा ग्रुप बरोबर घेऊन गेलो होतो तेव्हा गिरनारला अतिशय थंडी आणि वारा होता. सर्वांनाच त्या थंडीचा थोडा त्रास झाला होता. पण मला थोडा जास्तच त्रास झाला. मला पूर्वीपासून असलेल्या त्रासात थंडीमुळे अजून भर पडली. अर्थात घरगुती उपचार आणि आराम हाच त्यावर उपाय होता. पण त्यामुळे पुन्हा लगेच माघी पौर्णिमेला गिरनारला जायचा विचारही मनात नव्हता.

                मात्र माघी पौर्णिमेच्या दोन - तिन दिवस आधी पुर्ण रात्रभर मनचक्षुंसमोर निद्रादेवी ऐवजी फक्त आणि फक्त गिरनार होता. मन केव्हाच गुरुशिखरी पोहोचलं होतं. तब्येतीमुळे मी मनाला आवरण्याचा प्रयत्न करत होते पण मन मात्र गुरुचरणीच तल्लिन झाले होते. अखेर तनमन एक झालं आणि गिरनारला जायचं नक्की केलं. त्याचवेळी गिरनार चढता उतरताना ऊडन खटोला ची (रोप वे) साथ घ्यायची हेही ठरवलं. दर्शनाला जायचंच होतं पण आधीप्रमाणे दहा हजार पायऱ्या चढून जाण्याची शक्ती नसल्यामुळे उडन खटोलाचा आधार घेणं आवश्यक होतं.

                पौर्णिमेच्या आदल्या रात्री तलेटीला पोहोचलो. सकाळी गिरनार दर्शनाला निघालो. जरी उडन खटोलाने जायचं ठरवलं असलं तरी नेहमीप्रमाणे लंबे हनुमानजींच आणि पहिल्या पायरीचं दर्शन आधी घ्यायला गेलो. दर्शन घेऊन प्रार्थना केली चार पायऱ्या चढलो आणि मनात द्वंद्व सुरु झालं, दहा हजार पायऱ्या कि रोप वे. अखेर द्विधा मनस्थितीतच नाईलाजाने रोप वे कडे वळलो. 

                रोप वे ने अंबाजी टुक ला पोहोचलो. अंबामातेचे दर्शन घेऊन पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला गोरक्षनाथांचे दर्शन घेतले. अंबाजी टुक पासून एका तासात पाच हजार पायऱ्या पूर्ण करुन आम्ही दत्तगुरुंच्या चरणी लीन झालो होतो. मी दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि क्षणार्धात एका विलक्षण संवेदनेची जाणिव झाली.  स्वयं श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शनाला बोलावलं आणि दर्शन घडवलं याची प्रचिती आली.

                शिखर दर्शन घेऊन परत खाली कमंडलू तीर्थाशी अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. दत्तगुरुंच्या कृपेने अगदी धुनी समोर बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन करायला मिळालं. धुनीचं दर्शन घेऊन प्रसाद घेण्यासाठी गेलो. भोजन प्रसादाची व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. भोजनासाठीचे पदार्थ बघून हा फक्त प्रसाद नसून दत्तगुरुंच्या कृपेने सर्वांनाच छोट्याशा मेजवानीचाच लाभ मिळालाय असंच वाटत होतं. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. अंबाजी टुक पर्यंत येऊन मग रोप वे ने खाली पोहोचलो.

                 सलग तीन पौर्णिमेला गिरनार शिखर दर्शन झाल्याने मन अगदी शांत तृप्त झालंय आणि अर्थातच श्री  दत्तात्रेय पुन्हा केव्हा दर्शनाला बोलावतात याचीही वाट पहातंय. 


                  जरी किती अवघड भासला गिरनार

              गुरुकृपेने दर्शन वारंवार घडणार

                  नित्य नामस्मरणात मन हे रमणार

                  ध्यासात गुरुसेवेच्या 'मी'पण सरणार

               यत्न सदा षडरिपुमुक्तीचा करणार

               जय गिरनार जय जय गिरनार

 

                                                     - स्नेहल मोडक


 


No comments:

Post a Comment

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...