Pages

Monday, July 26, 2021

गुरुपौर्णिमा

नर्मदा मैय्या आणि गिरनार

            गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचं दर्शन आपल्याला व्हावं, गुरुपूजन करता यावं, गुरुसेवा घडावी हीच इच्छा असते. आणि गुरुपौर्णिमेला गिरनार शिखरी साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडणं म्हणजे सुवर्ण योगच.

            यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं असं ठरवलं आणि नेमकं मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचं थैमान सुरु झालं. मनात किंचित संभ्रम निर्माण झाला पण श्री दत्तगुरुंना प्रार्थना केली आणि गिरनारला जायचं नक्की केलं.

            गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी आम्ही गिरनारला निघालो. सकाळी निघायच्या आधीपासूनच पाऊस कोसळत होता. त्या पावसातूनच प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पंधरा वीस मिनिटांतच अक्षरशः जादू घडावी तसा पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर पूर्ण प्रवासात पावसाचं विघ्न आलंच नाही.

             आम्ही अंकलेश्वरच्या पुढे पोहोचलो आणि मग सुरु झाली आमची मार्गशोध मोहीम. आम्हाला नर्मदा मैय्याचं किनाऱ्यावरुन प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं. 

             नर्मदा नदी भारतातल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहणारी ही सर्वात मोठी पश्र्चिम वाहिनी नदी.  नर्मदा रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या या नावानींही ओळखली जाते.नर्मदेच्या काठावर मार्कंडेय, भृगु, व्यास, अगस्ती, जमदग्नी, दुर्वास, वशिष्ठ आणि अजून अनेक ऋषींनी तपोसाधना केल्याचं सांगितलं जातं. यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदेच्या उगमापासून ते मुखापर्यंत अनेक तीर्थस्थानं वसलेली आहेत. म्हणूनच नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते. हि नदी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधली सीमारेषा आहे. 

             अशा या पवित्र नदीचं दर्शन आम्हाला गिरनारला जातायेताना घडतंच पण ते फक्त पुलावरुन. म्हणूनच यावेळी गिरनारला जाताना नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर जाऊन प्रत्क्ष दर्शन घ्यायचं ठरवलं. 

              आंतरजालावरुन सारी माहिती आधीच घेतली होती. पण तरी मैय्याच्या किनारी पोहोचण्याचा मार्ग प्रत्यक्षात थोडा बदललेला होता. मात्र त्यामुळे आम्हाला नर्मदा नदीवरील गोल्डन ब्रिजवरुन जाता आलं. अंकलेश्वरहून भरुचला जाण्यासाठी नर्मदा नदीवर १८८१ साली बांधलेला अतिशय सुंदर असा हा गोल्डन ब्रिज. या पुलाच्या बाजूलाच नंतर दुसरा मोठा पुल बांधलाय. गोल्डन ब्रिज ओलांडून आम्ही  तिथे असलेल्या सुरक्षा चौकीत जाऊन मार्गाची चौकशी करुन पुढे निघालो. गावात शिरुन गल्लीबोळातून थोडं फिरुन पोहोचलो ते भृगु ऋषींच्या आश्रमासमोरच. आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबून तिथून बाजूच्याच गल्लीत असलेल्या नर्मदा माता मंदिरात गेलो. या मंदिरात नर्मदामातेची रेखीव मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली तळघरात श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूनेच नर्मदेच्या किनारी जायला वाट आहे. त्या रस्त्याने गाडीनेच किनाऱ्यावर पोहोचलो. काठाशी गेलो आणि नर्मदा मैय्याचं विशाल रुप भान हरपून पहात राहिलो. काही क्षणांनतर मैय्याची पूजा करुन जलस्पर्श केला. आणि काही क्षणांपुरतं का होईना मन शांत झालं. 

                 थोडा वेळ नर्मदा किनारी थांबून पुढील प्रवासाला लागलो. त्यादिवशी वाटेतच एका ठिकाणी मुक्काम केला. 

                   दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारला निघालो. नर्मदा दर्शन झालं होतं, आता वेध लागले होते गिरनार शिखर दर्शनाचे. त्या विचारात दंग असतानाच भ्रमणध्वनी वाजला आणि बातमी कळली ती चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याची. क्षणात चिंतेचं काहुर माजलं मनात. आमच्या जुन्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं. पण बाजूलाच बांधलेल्या नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर आमचे कुटुंबीय सुरक्षित होते. जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांनाही त्यांनी नवीन घरात आणलं होतं. इतर नातेवाईकही सुरक्षित असल्याचं कळलं आणि चिंतेची एक रेघ कमी झाली. कोकणात पावसाने हाहाकार माजवला होता त्यामुळे सारखं मुंबई, ठाण्यात किती पाऊस आहे याचाही अंदाज घेणं सुरु होतं. 

                   या सगळ्या काळजीत गिरनारला उडन खटोलाच्या ( रोप वे ) कार्यालयात भ्रमणध्वनी वरुन चौकशी केली आणि कळलं गेले तीन दिवस उडन खटोला तुफान वारा, पाऊस, धुकं या कारणांमुळे बंद आहे. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच उडन खटोलाचं आरक्षण केलं होतं. आम्हाला गुजरातमध्ये पूर्ण प्रवासात अजिबात पाऊस लागला नाही. पण गिरनारवर मात्र तुफान वारा पाऊस सुरु होता. रोप वे बंद असला तरी दहा हजार पायऱ्या चढून जायचं आम्ही ठरवलंच होतं. आम्ही संध्याकाळी गिरनारला ( तलेटी ) पोहोचायच्या आधी परत उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्ही गिरनारला नंतर यावं नाही तर मग आरक्षणाचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं आणि मग मात्र पहाटेच पायऱ्या चढायला सुरुवात करायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेला रोप वे सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मग रोप वे सुरु होतोय का बघायचं ठरवलं.

                   गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघून रिवाजाप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन, पूजा करुन उडन खटोलाच्या कार्यालयात गेलो. तिथे पाहिलं तर रोप वे हळूहळू सुरु करुन वारा पाऊस धुकं याच्या परिणामाचा अंदाज घेणं सुरु होतं. थोड्या वेळाने लोकांसाठी रोप वे सुरु करायचा निर्णय झाला. आणि पहिल्याच ट्रॉलीमधून आम्हाला जायला मिळालं. सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं पण जेमतेम ७-८ मिनिटांतच वाऱ्याचा जोर वाढलेला जाणवू लागला. आणि काही क्षणातच आमची ट्रॉली धुक्याने वेढली. शुभ्र धुक्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. नेहमी दहा मिनिटांत पोहोचणारी ट्रॉली त्यावेळी पंचवीस मिनीटांनी अंबाजी टुक वर पोहोचली. रोप वे सुरु करुन खूपच जोखीम घेतली होती. निघताना त्यांनी काळजी करु नका काही अडचण येणार नाही आणि आलीच तर ट्रॉलीत लावलेल्या क्रमांकावर संपर्क करायला सांगितलं होतं. रोप वे मधून उतरल्यावरही रोप वे कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.

                    रोप वे मधून उतरुन पायऱ्या चढून वर आलो आणि थक्क झालो. पहाटेच जोरदार पाऊस पडून गेला होता.त्यामुळे संपूर्ण गिरनार सुस्नात होऊन धुक्याची दाट दुलई लपेटून आमच्या स्वागताला उभा होता. शुभ्र दाट धुकं, भन्नाट वारा आणि पावसामुळे ओलावलेला सारा परिसर अतिशय रमणीय दृश्य होतं.  जेमतेम सात-आठ फुटांपर्यंत दिसत होतं तेही किंचित धुसरच. वर्षाऋतूमध्ये खरंतर सगळ्याच पर्वतरांगा धुक्याने वेढलेल्या असतात. पण गिरनारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुफान वाऱ्यातही इथं खूप दाट धुकं असतं. अंबाजी मातेचं मंदिरही धुसरच दिसत होतं. प्रथम मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला पोहोचून गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि कमानीपर्यंत आलो. पौर्णिमा सुरु व्हायला खूपच वेळ होता म्हणून कमानीजवळच बराच वेळ थांबून मग परत चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात शिखरावर पोहोचलो. 

                    मंदिरात प्रवेश केला आणि श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाने साऱ्या जगाचा विसर पडला. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं.

                     दर्शन घेऊन परत  काही पायऱ्या उतरुन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिथे नुकतीच श्री दत्तात्रेयांच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तिथलं दर्शन, प्रसाद घेऊन परत अंबाजी टुक कडे निघालो. रोप वे सुरु होता पण वाईट हवामानामुळे बंद करणार असल्याचं सांगितलं. पण आम्हाला रोप वे ने गिरनारच्या पायथ्याशी परत यायला मिळालं. बहुधा त्यानंतर काही वेळातच रोप वे बंद झाला असावा. 

                     श्री दत्तगुरुंना मी केलेली प्रार्थना पोहोचली असावी. कारण श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा शब्दशः पूर्ण केली. आपण प्रार्थना करावी आणि अगदी लगेच ती शब्दशः पूर्ण व्हावी, गुरुदर्शन घडावं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आम्हाला कायम लाभावं आणि गिरनार दर्शनाचा योग वारंवार यावा हिच श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

- स्नेहल मोडक

 


  

 


Monday, July 19, 2021

वारी

          वारी दोन अक्षरी छोटासा शब्द पण अतिशय ऊर्जेने भरलेला. नुसत्या उल्लेखानेही क्षणात आपल्या नजरेसमोर पंढरीची वारी तरळते आणि दुसऱ्याच क्षणी साकार होतो तो पंढरीचा पांडुरंग.

          शके ११११ मध्ये बांधलेलं पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सुरवातीला छोटंसंच होतं. शके ११९५ मध्ये श्रीरामचंद्र यादव आणि हेमाद्री पंडित यांनी हे मंदिर थोडं वाढवलं. आणि शके १९२५ मध्ये या मंदिराचा बराच विसतार झाला.

          पुंडलिकाच्या काळात पुर्वाभिमुख विठ्ठल मूर्ती आणि समोर भिमेच्या पात्रात पश्चिमाभिमुख हरिमूर्ती होती असं मानलं जातं. ते मंदिर आता वाहून गेलंय पण त्याचा चौथरा शिल्लक आहे. म्हणूनच वारकऱी संप्रदायाच्या घोषवाक्यात 'पुंडलिक वरदा हरि विठ्ठल' असा तीर्थ व क्षेत्र देवतांचा उल्लेख असतो.

          वारीची परंपरा ही फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. संत  ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असत. तसंच संत  तुकाराम महाराज ही वारीला जात असत. नंतर हैबतराव बाबा हे संत ज्ञानेश्वरांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरीला घेऊन जात असत. त्यानंतर १६८५ साली संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव संत श्री नारायण महाराजांनी आळंदी येथून संत ज्ञानेश्वर आणि देहु येथून संत तुकाराम यांच्या पादुका पंढरपूरला नेण्यास सुरुवात केली. या दोन दिंड्याप्रमाणेच इतर अनेक संतांच्या दिंड्या पंढरीस येतात. या सगळ्या दिंड्या वाखरी येथे एकत्र होतात. आणि आषाढ शुद्ध दशमीला सकाळी एकत्र पंढरपूरला निघतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही वेळा वारी निघते. परंतु वारकरी संप्रदायामध्ये आषाढ वारीचे महत्व जास्त आहे.

           वर्षभर सारे व्यवहार नियमित सुरु असतात. विठ्ठलाचे नामस्मरण सुरुच असते. वर्षाऋतू सुरु होताच मात्र साऱ्या वारकरी संप्रदायाला पंढरीचे वेध लागतात. आणि मग सुरु होते आषाढवारीची तयारी. मुखाने विठ्ठलाचा नामजप आणि कानी टाळमृदुंगाची धून वाजू लागते. 

                   पंढरीचा वास घंद्रभागे स्नान

                   आणिक दर्शन विठोबाचे

          याच अपार इच्छेने वारकरी वारीची आसुसून वाट पहात असतात. आणि तो दिवस उजाडतो पालखी प्रस्धानाचा. पालखीचे प्रस्थान म्हणजेही एक सोहळाच. टाळमृदुंगाच्या गजरात आणि पांडुरंगाच्या जयघोषात सोहळा संपन्न होतो. दिंडी पंढरीच्या वाटेवर मार्गस्थ होते. दिवसभर नामस्मरण, भजन यात वारकरी तल्लिनन होतात. अंधार पडल्यावर विश्राम करतात. किर्तन, प्रवचन, एकमेकांच्या सुखदुःखाची देवाणघेवाण करीत निद्रेच्या अधिन होतात. पहाटे उठून आवरुन पुन्हा मार्गस्थ होतात. या वारीचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे रिंगण. हे रिंगण ही  श्रध्देय आणि पवित्र संकल्पना आहे. वारी मार्गात कडुसफाटा,वेळापूर आणि वाखरी इथं रिंगण केलं जातं. मोकळ्या मैदानात वारकरी गोलाकार उभे राहतात, मधल्या मोकळ्या जागेत संत ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व धावतो. स्वत: संत ज्ञानेश्वर महाराज  अश्वारुढ असतात अशी धारणा आहे. त्यामुळे त्याला 'माऊलींचा अश्व ' असं म्हणतात. 

                   मी तूपण गेले वाया

                   पाहता पंढरीच्या राया

                   नाही भेदाचे ते काम

                   पळोनि गेले क्रोधकाम

                   अवघा रंग एक झाला

             या आषाढवारीसाठी कुणी कुणाला आमंत्रण देत नाही. जातपात, उच्च नीच, क्रोध मोह सारं विसरुन लोकं वारीसाठी एकत्र येतात. युगानुयुगे भक्तासाठी वीटेवर उभ्या असलेल्या विठुरायाचं डोळेभरून दर्शन घेणं या एकाच भक्तिभावाने सारे वारकरी एकत्र येतात. आषाढी एकादशी दिवशी वारी पूर्ण करुन चंद्रभागेत स्नान करुन त्या सावळ्याच्या चरणी नतमस्तक होणं म्हणजे आयुष्याचं सार्थकच. 

            पूर्वापार चालत आलेली वारीची ही अतिशय सुंदर परंपरा कोरोना महामारीमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव गेल्या वर्षीपासून खंडित झालीय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यासह इतर पालख्या पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात पण अगदीच थोड्या वारकऱ्यांच्या उपस्थितित आणि त्याही वाहनातून. पण यामुळे सारे वारकरी मनोमनी अतिशय दुखावले आहेत. पण पांडुरंगावरच्या अपार श्रद्धेने नामस्मरणात दंग आहेत. 

                        बोलावा विठ्ठल 

                        पहावा विठ्ठल 

                        करावा विठ्ठल जीवभावे

            साऱ्या जगावरील  महामारीचे हे संकट पुर्णतः नष्ट व्हावं हिच विठ्ठल चरणी मनःपुर्वक प्रार्थना.



खिळ बसली परंपरेला नाही घडली आषाढवारी

पापण्या ओलावल्या अंतर्यामी दुखावला वारकरी

      किती केली प्रार्थना अन आळवणी विठुरायाची

      नाही झाली कामना पूर्ण विठ्ठलाच्या दर्शनाची

नाही झाला गजर टाळमृदुंगाचा चंद्रभागेतीरी

नाही नाचले कुणी घेऊनी तुळशीस डोईवरी

      नाही नाहली पंढरी घोषात विठुमाऊलींच्या

      नाही भिडल्या आसमंती ध्वजा वैष्णवांच्या

घेऊ आता दर्शन देवघरातल्या पंढरीरायाचे

करुया मानसपुजन त्या विठ्ठल रखुमाईचे

    अर्पूनी तुलसीपत्र करु पूजन सावळ्याचे

    कार्तिकवारीस घडावे दर्शन विठुचरणांचे


- स्नेहल मोडक





Sunday, July 11, 2021

आषाढ

              आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन. संस्कृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून कालिदासांना व्यापकपणे ओळखलं जातं. त्यांचं साहित्य प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत यांवर आधारित आहे. हे साहित्य हजारो वर्षांपासून सर्वांना प्रेरणादायी ठरलंय. या साहित्याचा अभ्यास सर्वत्र सातत्याने सुरु आहे. त्यांची सात महाकाव्यं प्रसिद्ध आहेत. त्यातील कुमारसंभवम, रघुवंशम, ऋतुसंहार आणि मेघदूत ही महाकाव्यं आणि शाकुंतल सारखी नाटकं यांमुळे त्यांना विद्वान संस्कृत लेखक, कवी म्हणून मान्यता मिळाली.

           आषाढ म्हटलं कि यातलंच एक महाकाव्य लगेच आठवतं ते म्हणजे मेघदूत.

           आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लीष्ट सानुम् ,

           वप्रक्रिडापरिणतगज प्रेक्षणियं ददर्श...

                 कुठल्यातरी प्रमादाची शिक्षा म्हणून नगराबाहेर काढलेला यक्ष सुरवातीचा काही काळ कसातरी व्यतीत करतो. पण आषाढ सुरु होतो आणि पहिल्याच दिवशी त्याचा संयम संपतो. रामगिरी पर्वतावर मदमस्त गजाप्रमाणे झुकलेल्या त्या कृष्णमेघालाच विरहव्याकुळ यक्ष आपलं कुशल पत्नीपर्यंत पोहोचविण्याची विनंती करतो. या मेघाची दूत बनण्याची अनुमतीही न घेता यक्ष मेघाला अलकापुरीपर्यंतच्या प्रवासासाठी वेगवेगळ्या श्लोकांमधून निसर्गातील रंगचित्रांचं अप्रतिम वर्णन करतो. 

                   म्हणूनच आषाढ म्हटलं कि महाकवी कालिदास आणि त्यांचं मेघदूत हे महाकाव्य मनात रुंजी घालू लागतं

                    आषाढ हा वर्षाऋतूमधला महत्वाचा महिना. ज्येष्ठ महिन्यातल्या कमी अधिक पावसाची उणिव आषाढ भरुन काढतो. धुवांधार आषाढसरींनी आपण आणि वसुंधरा दोघंही तृप्त होतो. पेरलेल्या बियाण्याची रुजवात जरी ज्येष्ठात झाली तरी त्या नाजुक हिरव्या पात्यांना सुफलता देण्याचं काम आषाढच करतो. चिखलभऱ्या भुईत लावणीचं काम  जोशात सुरु होतं ते आषाढातच. कडेकपारीतून फेसाळ धबधबे कोसळू लागतात तेही आषाढातच. आषाढसरींनी धरतीही हिरव्या मखमालीने सजते.

                     आषाढवारी आणि गुरुपौर्णिमा है आषाढ महिन्यातील अजून दोन महत्वाचे दिवस. 

                      याच आषाढाला थोडंसं श्ब्दकाव्यात गुंफून महाकवी कालिदासांना ही काव्यांजली अर्पण…



दिवस खास आषाढाचा पहिला आज

हिरवाईच्या मखमालीचा ल्यायला साज

          निळ्या आभाळी सारे कृष्णमेघ दाटले

          तेच दूत यक्षाने मग अलकेस धाडले

मेघमृदुंगासह बरसल्या रेशीमधारा

अमृत पिऊनी तृप्त झाली अवघी धरा

          थेंबांच्या साजशृंगारे नटल्या तरुवेली

          रानीवनी विविधरंगी फुले उमलली

झऱ्यातूनी येई ऐकू अनाहत नाद

फेसाळ जळात खेळाया घाली साद

         आषाढदिन जन्म महाकवी कालिदासांचा

         गुंफूनी शब्दफुलांना प्रयत्न आदरांजलीचा

 

-स्नेहल मोडक




Friday, July 2, 2021

मी एक झाड - शेवग्याचे

                     ऐका कथन आयुष्याचे

                 माझा जन्म एका मोठ्या गृहसंकुलाच्या आवारात झाला. तिथल्या कसदार मातीत मी छान रुजलो. दिसामाजी वाढू लागलो. बघता बघता माझ्या इवल्याशा रोपट्याचं झाडात रुपांतर होऊ लागलं. आवारात खूप हिरवाई असल्यामुळे विविध पक्ष्यांचा अधिवास होता. मी थोडासा मोठा होताच ते सगळे पक्षी माझ्याही अंगाखांद्यावर खेळू लागले, विसावू लागले. खूप खुश झालो मी. पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटात दिवस कधी संपायचा कळायचही नाही.

                   सरत्या काळाबरोबर मी मोठा होत होतो. माझ्या फांद्याचा विस्तार आणि उंची छान वाढत होती. पक्ष्यांचं विसावणंही वाढलं होतं. त्याचबरोबर माझं अवनीशी जुळलेलं नातंही अधिक घट्ट, खोल झालं होतं.

                  अवघ्या काही काळातच माझं रुपांतर मोठ्ठया झाडात झालं अन एक दिवस माझ्या एका फांदीवर इवलीशी कळी आली. काही दिवसांतच कळ्याफुलांनी मोहरलो मी. आणि मग पक्ष्यांबरोबरच रंगीबेरंगी फुलपाखरं ही माझ्या फुलांभोवती रुंजी घालू लागली. खूपच सुखावलो मी. काही दिवसांनंतर हिरव्या लांबसडक आणि दळदार शेंगांनी अंगोपांग बहरलो.

                  कोवळी पालवी, फुलं आणि शेंगांचे औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित असल्यामुळे इथली लोकं माझ्या पानाफुलांचा आणि शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करत. दिवस खूप छान चालले होते. मी वारंवार शेंगानी बहरत होतो.  पक्षी, फुलपाखरं यांनाही माझा आधार हवासा वाटत असावा. माझ्या एका बाकदार फांदीवर एक बुलबुलची जोडी नियमित बसायची. हिंदोळ्यावर झुलल्यासारखं वाटायचं बहुधा त्यांना. फांदीवर बसून सुरेल कुजन करायची. खूप आवडायचं मला ते ऐकायला.

                  वादळ,वारा,पाऊस झेलत मी मुळं घट्ट रोवून ताठ उभा होतो बरेच वर्ष. अधुनमधून जोरदार वाऱ्यापावसात माझी एखादी फांदी तुटून बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर पडायची. पण कुणाचं काही नुकसान होत नव्हतं.  तसंच त्या घरातील कुणाचीही काही तक्रार नसायची. एकंदरीत माझा कुणाला त्रास नव्हता पण उपयोग मात्र नक्की होता. त्यामुळे माझं जगणं बहरणं सुखनैव सुरु होतं.

नुकत्याच होऊन गेलेल्या मोठ्या वादळानंतरही मी ताठ उभा होतो.

                   अचानक एक दिवस माझ्या बाजूला इमारतीबाहेरच्या जाण्यायेण्याच्या रस्त्याचं काम सुरु झालं. यंत्राच्या सहाय्याने आधीचा कोबा तोडण्याचं काम सुरु झालं. आणि इतकी वर्षं मातीत घट्ट रुजलेल्या माझ्या मुळांना या यंत्राचे हादरे सहन करणं अवघड होऊ लागलं. पण तरीही मी धरणीच्या आधाराने घट्ट उभा होतो. मात्र इथल्या लोकांनाच बहुदा मी नकोसा झालो होतो. काम सुरु असतानाच एक दिवस मला काही कळायच्या आधीच माझी मुळं मातीतून अर्धवट वर काढली गेली आणि मुळांचा आधार सुटल्यामुळे मी बाजूच्या घराच्या खिडकीच्या पत्र्यावर कलंडलो. खरंतर खूप घाबरलो होतो मी पण कशाचातरी आधार देऊन मला परत उभं करतील ती लोकं असं वाटत होतं. पण व्यर्थ होतं ते वाटणं. कारण लगेच त्यांनी माझ्या भोवती जाड दोर गुंडाळला आणि खाली खेचून मला धराशयी केलं. खूप तडफडलो मी पण बाजूच्या घरातल्या लोकांशिवाय इतर कुणालाही माझं तडफडणं जाणवलंही नाही. धराशयी होऊनही आशेवर होतो मी पण काही क्षणातच माझ्या साऱ्या फांद्या माझ्यापासून विलग केल्या गेल्या. आणि जमिनीवर माझा फक्त असहाय्य बुंधा उरला. 

                 मधल्या काळात माझं शेंगांनी बहरणं सुरु असताना माझ्या अगदी जवळच अजून एक माझंच रोप रुजलं होतं. तेही छान वाढत होतं. मी जेव्हा कायमचा उध्वस्त झालो तेव्हा बाजूचं लहान झाड उभं आहे ते तरी मोठं होईल याचं समाधान होतं पण चार दिवसांनीच अचानक ते झाडही माझ्या अजूनही जमिनीवर पडलेल्या बुंध्यावरच तोडून टाकलं आणि काही वेळातच आम्हा दोघांचही अस्तित्व कायमचं संपवलं.


                 वाचलंत ना कथन शेवग्याच्या झाडाचं? एक झाड तोडलं त्याची कसली कथा असा विचार मनात आला असेल ना? पण निसर्गाशी एकरुप होणाऱ्या, हिरवाईचं महत्व जाणणाऱ्या लोकांना असं नक्कीच वाटणार नाही. झाडांनाही भावना, जाणीव असते, त्यांनाही वेदना होतात हेही विज्ञानाने सिध्द केलंय. ' झाडे लावा, झाडे जगवा' याकडे दुर्लक्ष करुन सगळीकडे हिरवाई कमी / नष्ट करण्याचे उद्योग सुरु आहेत. हे गृहसंकुलही याला अपवाद नाही असं खेदाने म्हणावं लागतंय. एवढं मोठं शेवग्याचं झाड तोडण्याचं कारण,' पडायलाच आलं होतं म्हणून पाडलं' असं सांगितल्यावर मनोवेदना अजूनच वाढली. नुकत्याच झालेल्या मोठ्या वादळातही ज्या झाडाची फांदीही न पडता ताठ उभं होतं ते झाड पडायला आलं होतं हे कारण खरं असू शकतं का? त्यानंतर दुसरं लहान झाड कुठलंही कारण न सांगता तोडलं तेव्हाही कुणी काही करु शकलं नाही.

- स्नेहल मोडक

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...