Pages

Thursday, August 19, 2021

ऋतु हिरवा

                    आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.


गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला

         फुलपाखरासम मी वनी विहरले

         तनामनास माझिया जणू पंख लाभले

स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले

जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले

        तरुवेली अन रानफुलांत मी रमले

        मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले

मन होऊन पाखरु आकाशी झेपावले

सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले

        तृप्त मनात अलगद गीत उमलले

        अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले

गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला


-स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...