आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.
गंधाळले मन जणू मोगरा फुलला
संचार मुक्त हिरव्या रानी जाहला
फुलपाखरासम मी वनी विहरले
तनामनास माझिया जणू पंख लाभले
स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले
जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले
तरुवेली अन रानफुलांत मी रमले
मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले
मन होऊन पाखरु आकाशी झेपावले
सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले
तृप्त मनात अलगद गीत उमलले
अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले
गंधाळले मन जणू मोगरा फुलला
संचार मुक्त हिरव्या रानी जाहला
-स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment