वर्षाऋतुचा सांगावा घेऊन आलेला 'ज्येष्ठ' संपलाय. आजपासून आषाढ महिना सुरु झालाय. व्रतवैकल्यांची सुरुवात म्हणून जरी आषाढ महिना ओळखला जात असला तरी आषाढातील पहिला दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो. कालिदासांनी आपल्या मेघदूत या महाकाव्याची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे' अशी केलीय. त्यामुळेच आषाढातील पहिला दिवस त्यांना समर्पित करण्यात आला आहे. प्रेमीजनांची विरहव्याकुळता व्यक्त करणारं मेघदूत हे काव्य आणि त्याचे रचयिते महाकवी कालिदास यांच्या आठवणीचा आषाढ महिना आज सुरु झालाय. आजच्या या दिनी त्यांना मनोमन आदरांजली अर्पण करुया.
दिवस प्रथम असे आषाढाचा आज
सजे आकाशी मेघमल्हाराचा साज
नीलवर्ण गगनीचा लुप्त तो जाहला
अन साऱ्या नभी कृष्णमेघ दाटला
विरही यक्षाला मेघांत मार्ग दिसला
सावळ्या मेघाला दूत तयाने केला
धाडीला निरोप प्रियेला त्या मेघासंगे
तुजविण मम आयुष्याचे चित्र ना रंगे
विरहास यक्षाच्या काव्यातच गुंफले
अन कालिदासांसी मेघदूत ते स्फुरले
महाकाव्य ते मेघदूत खास प्रेमीजनांसी
मम आदरांजली ही कवी कालिदासांसी
- स्नेहल मोडक
No comments:
Post a Comment