प्राण्यांप्रमाणेच सजीवत्वाची सारी लक्षणं झाडातही असतात. म्हणूनच झाडही सजीवच मानलं गेलंय.
जमिनीखाली स्वताभोवतीचं कठीण असं कवच भेदून बीज अंकुरतं. आणि भूवरी अवतरतात ती पोपटी हिरव्या रंगाची नाजूक इवलीशी दोन पर्णं. आणि मग आकाराला येत ते छोटंसं रोपटं. माती आणि हवेतून पाणी आणि अन्नद्रव्यं मिळवत यथावकाश त्याचं रुपांतर मोठ्या वृक्षवेलीत होतं. कालानुरूप फुलाफळांनी ही झाडं वेली बहरतात. कालंतराने सृष्टि नियमानुसार नैसर्गिक किंवा अनैसर्गिकपणे (वृक्षतोड, वादळं) नाशही पावतात. तसंच त्यांच्या बीजापासून नवीन रोपही अकुंरतात. खरंच सजीवत्वाची सारी लक्षणं जनन, पोषण, निर्मिती, अंत ही सारी वृक्षवेलीत आढळतात.
पण सजीवत्वाच्या एका मुख्य लक्षणापासून मात्र या वृक्षवल्ली वंचित आहेत. ते म्हणजे स्थलांतरण. सारे सजीवमात्र स्थलांतर करु शकतात पण झाड मात्र अचल उभं असतं. बीज अंकुरल्यापासून नाश होईपर्यंतचा सारा काळ ते स्थिर उभं असतं. उन,वारा, पाऊस वादळं सारं काही झेलत कणखरपणे वर्षानुवर्ष उभं असतं. आणि अगदी एका जागी उभं राहूनही सदैव फळाफुलांनी बहरत असतं. पक्ष्यांचं आश्रयस्थान आणि वाटसरुंची सावलीही असतं.
तरुवेलींनाही भावना असतात हे सिद्ध झालंय. आपलं अस्तित्व, आपला स्पर्श, आपलं बोलणं त्यांना सहज कळतं हा माझाही अनुभव आहे. मीही घरातल्या कुंड्यांमधल्या झाडांशी रोज नित्यनेमाने बोलते, त्यांना अलवार स्पर्श करते. मग झाडंही छान तरारुन येतात.आपण गावाहून परत आल्यावर पुरेशा पाण्याअभावी झाडं मलूल होतात. पण फक्त अपुरं पाणी एवढंच कारण नसतं तर आपली अनुपस्थितीही झाडांना जाणवते. पाण्याबरोबरच पुन्हा त्यांच्याशी बोलणं, गोंजारणं सुरु केलं की मलुल झालेली झाडं पुन्हा छान टवटवीत होतात. या माझ्या त्यांच्याशी बोलण्यातूनच असेल कदाचित पण झाडांचं अचलत्व मला फार जाणवतं, विचार येतो मनात आपल्याला कधी असं अचल रहाणं जमेल का? वर्षानुवर्ष स्थिर उभं राहूनही आनंदात जगायला ?
यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला दत्तगुरुंच्या दर्शनाला काही कारणाने जायला जमणार नव्हतं. दर्शनाला तर जायचंच होतं पण गुरुपौर्णिमेच्या आधी की नंतर ते ठरत नव्हतं. अखेर अखंड धुनीच्या दर्शनाचा योग साधून दोन दिवस आधीच जायचं ठरवलं.
आषाढी एकादशीचा मुहूर्त साधून फराळाचे पदार्थ तयार करुन घेऊन सकाळी लवकर आम्ही पाचजणं गाडीने निघालो. सुरुवातीलापासूनच रिमझिम पाऊस आम्हाला साथ देत होता. वातावरण अगदी मस्त होतं. प्रवास छान सुरु होता. महाराष्ट्राची सीमा पार करेपर्यंत पाऊस कमी जास्त होता. गुजरातच्या हद्दीत प्रवेश केला आणि मग मात्र पावसाचा जोर वाढत चालला. रस्त्यावर पाणी साचू लागलं. त्यातच वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरु होती. यातूनच आमचा प्रवास सुरु होता. मात्र पाऊस आणि वाऱ्याचा जोर मधेमधे खूपच वाढत होता. जिकडे तिकडे पाणी साठलं होतं. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत थांबत थांबत प्रवास सुरु ठेवला. राजकोटच्या पुढे मात्र पाऊस कमी झाला होता. अखेर साधारण साडेअकरा वाजता आम्ही तलेटी मुक्कामी पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून नित्याप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेतलं. आणि उडन खटोलाजवळ पोहोचलो. खरंतर आदल्या दिवशी प्रवासात असतानाच उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्हाला संपर्क करुन एकादशी दिवशी उडन खटोल वाईट हवामानामुळे बंद असल्याचं सांगण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी हवामान ठिक असेल तर उडन खटोला सुरु होईल असंही सांगितलं होतं. सकाळी आम्ही निघालो तेव्हा पायथ्याशी वारा पाऊस जवळजवळ नव्हता. म्हणून आम्ही उडन खटोला सुरु होईल या अपेक्षेने गेलो परंतु तो सुरु होणारच नव्हता. प्रत्यक्ष गिरनारवर खूप वाईट हवामान आहे. चढून जाणार असल्यास अतिशय सांभाळून जा असा इशाराही तिथले स्थानिक लोकं सगळ्यांनाच देत होते. उडन खटोला बंद असल्याने दहा हजार पायऱ्या चढणे शक्य नाही म्हणून काही भाविक परत फिरत होते. आम्ही चढून जायचं आणि दर्शन घ्यायचंच असं ठरवलं आणि परत पहिल्या पायरीशी येऊन चढायला सुरुवात केली.
पहिल्या दिडदोनशे पायऱ्या चढेपर्यंत वातावरण खूपच सुंदर होतं. अगदी रिमझिम पाऊस, सुखावणारा गार वारा, पुढे धुक्याचा विरळ पडदा आणि जोडीला केकारव... खूप प्रसन्न वातावरणात उत्सहाने आम्ही पायऱ्या चढत होतो. आमच्या मागे पुढे मात्र खूपच कमी भाविक होते. आदल्या रात्री चढायला सुरुवात करुन दर्शन घेऊन परत येणारे लोक भेटत होते. त्यांना पाहून, त्यांच्याशी बोलून वरच्या वाईट हवामानाचा अंदाज आम्हाला येत होताच. अंदाजे तिनशे पायऱ्या चढून गेल्यावर त्याची प्रचिती यायला सुरुवात झाली. आम्ही जवळपास हजारएक पायऱ्यांवर पोहोचेपर्यंत वाऱ्यापावसाचा जोर फारच वाढला. पायऱ्या चढण्याचा आमचा वेग कमी होऊ लागला.
साधारण पंधराशे पायऱ्या चढलो आणि निसर्गाने आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली. इतका वेळ सुसह्य असणारा जोरदार वारा पाऊस वाढला. जोरदार घोंघावणारा वादळी वारा, सन्नाट कोसळणारा पाऊस यामुळे तोल सावरत पायऱ्या चढणं कठिण होऊ लागलं.
जेमतेम दोन तीन फुटांपर्यंतच समोरचं दिसेल एवढा सन्नाट पावसाचा दाट पडदा, पायऱ्यांवरुन खळखळ करत वाहणारं फेसाळतं पाणी आणि काळजात धडकी भरवणाऱ्या आवाजात वाहणारा वादळी वारा, भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातूनच थांबत थांबत आमच्यासह सारेजण पायऱ्या चढतच होते. सुरुवातीपासूनच घातलेल्या रेनकोटमधूनही सगळेजणं नखशिखांत भिजले होते. अतिशय वाईट परिस्थिती होती पण मार्गक्रमण सुरुच होतं.
जैन मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत निसर्गाचा रौद्रावतार वाढतच चालला होता. त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत पोहोचायलाही वेळ लगला होता. हळूहळू मनात साशंकता निर्माण होऊ लागली होती. दर्शन होणार की नाही याची चिंता वाटू लागली. अंबाजी टुकवर पोहोचेपर्यंत परिस्थिती बिकट झाली होती. तिथपर्यंत पोहोचायला वाईट हवामानामुळे आम्हाला नेहमीच्या दिडपट वेळ लागला होता. अंबाजी टुकवर पोहोचत असतानाच इथूनच परत फिरावं असा विचार माझ्या मनात येऊ लागला. कारण मला कळत होतं की या परिस्थितीत दर्शन घेऊन परत पायथ्याशी पोहोचायला आम्हाला खूप रात्र होणार होती. आमच्याबरोबर परतीच्या पायऱ्या उतरताना कुणी सोबत असण्याची शक्यता फारच कमी होती.
तिथल्या दुकानदारांकडून माहिती मिळाली होती की आदल्या दिवशी याहून फारच वाईट परिस्थिती होती. साधारण दोनहजार पायऱ्यांच्या वर पुढे कंबरभर पाणी साठलं होतं. आणि त्या पाण्याला खूप ओढ होती. त्यामुळे सारे लोक, अगदी डोलीवालेही परत फिरले होते. शिखर दर्शन अगदीच कमी लोकांना जे त्यावेळेआधी किंवा नंतर गेले त्यांनाच घडलं होतं. त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो ही मोठीच गोष्ट होती. म्हणून तुम्ही शिखरापर्यंत जाणारच असाल तर खूपच काळजी घ्या असं प्रत्येक दुकानदार आवर्जून सांगत होता.
हे सारं ऐकून आणि वाढत्या रौद्ररूपाचा अंदाज घेऊन आमच्या पुढेमागे असणाऱ्या भाविकांपैकी काही भाविक अंबाजी टुकपासून परत फिरले. त्यामुळे दर्शनाला पुढे जाणारे लोक फारसे नव्हते. काही अगदी तरुण लोकंच पुढे जाताना दिसत होते. मीही अंबाजी टुकपासूनच 'परत फिरुया म्हणजे पूर्ण अंधार पडायच्या आधी तरी आपण पायथ्याशी पोहोचू' असंच म्हणत होते. आमच्या बरोबरच्या एका मित्रांची तब्येत अंबाजी टुकच्या आधीच थोडी बिघडली होती. त्यामुळे डोली मिळाली तर दर्शन घ्यायचं असं त्यांनी ठरवलं होतं. त्यादिवशीही डोलीवाले अगदीच कमी होते. अंबाजी टुकवर डोलीची व्यवस्था झाली आणि ते दर्शनाला गेले. आता आम्ही चौघंच उरलो होतो. पण सगळ्यांच मत होतं दर्शनाला जायचंच. कदाचित पुढे वारा पाऊस थोडा सुसह्य असेल त्यामुळे आपल्याला कमी त्रास होईल, असं मी सोडून सर्वांना वाटत होतं. अखेर सगळ्यांची इच्छा आणि दत्तगुरुंवरील श्रध्दा यामुळे पुढे जायचं ठरवलं. कळत होतं श्री दत्तगुरुच सगळ्यांची परिक्षा घेतायत. त्यामुळे आपण प्रयत्न करायचा, दर्शन देणं न देणं त्यांची इच्छा असा विचार करुन पुढे निघालो. अर्थातच फारच कसोटीची वेळ होती. पण गोरक्षनाथ टुकवर पोहोचेपर्यंत खरोखरच वारा पाऊस थोडा कमी झाला.
गोरक्षनाथ टुकवर पोहोचलो. गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्यांना 'आम्हाला श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडवा' अशी प्रार्थना केली आणि थोडा वेळ तिथे थांबलो. त्या मंदिरासमोरच्या एका छोट्याशा मठीत एक साधक रहातात. त्यांच्याशी थोडं बोलायची संधी मिळाली. त्यांनी आम्हाला थोडं थांबून चहा पिऊन जायचा आग्रह केला. अर्थातच आमच्यासाठी तो प्रसाद होता. चहा तयार होईपर्यंत गिरनारबद्दल काही अनुभूती त्यांच्याकडून ऐकायला मिळाल्या. स्वयं श्री दत्तगुरु आणि गोरक्षनाथ यांचं अजूनही सातत्यानं गिरनारवर येणंजाणं आहे, याची प्रचितीही त्यांना आली आहे. त्यांचं म्हणणं होतं की स्वयं श्री दत्तात्रेय ज्या मार्गाने ये-जा करतात त्या मार्गावर आपल्याला चालायला मिळतंय हि किती भाग्याची गोष्ट आहे. तुम्ही या भयप्रद परिस्थितीतही इथवर आलात हेही श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच. हे सारे अनुभव ऐकून तिथे थांबलेले त्यांचे परिचित आणि आम्ही खरंच भारावलो होतो. माझ्या मनाला आपण दर्शनाला जायचं ठरवलं ते किती योग्य केलं याची जाणीव झाली. खरंच एवढी मोठी कसोटी बघणारे श्री दत्तात्रेयच आणि त्यात यश (दर्शन) देणारेही तेच. त्या साधकांनी खास आमच्यासाठी केलेला वाफाळता चहा पिऊन आम्ही पुढच्या पायऱ्या चढायला (उतरायला) सुरुवात केली.
थोड्या पायऱ्या उतरेपर्यंत जरा कमी असलेला वारा पाऊस आणि धुकं परत वाढलं. पुन्हा सन्नाट पाऊस आणि भणाणता वारा सुरु झाला. पुन्हा एकदा तोल सावरत पुढे जाणं सुरु ठेवलं. कमंडलू कुंडाची कमान ओलांडली आणि परत पावसाचा जोर कमी झाला. आमच्या मागेपुढे इतर कुणीच नव्हतं. पुढच्या पायऱ्या चढताना हळूहळू पाऊस अगदी कमी होत शिखरावर पोहोचेपर्यंत पाऊस जवळजवळ थांबला. आणि आम्ही उरलेल्या पायऱ्या जरा भरभर चढून गेलो आणि मंदिरात पोहोचलो.
मंदिरात प्रवेश केला आणि सर्वात आधी तिथेच कठड्यावर बसलेल्या शुभ्र कबूतराने आमचं स्वागत केलं. गेल्या कित्येक दिवसांपासून ते तिथंच बसल्याचं तिथल्या पुजाऱ्यांनी सांगितलं. मी त्या कबूतराला हळूच स्पर्श केला आणि त्यानेही माझ्या स्पर्शातली माया ओळखून माझं बोट हलकेच चोचीत पकडलं. त्याला धान्याचे दिलेले दाणेही त्याने माझ्या हाताच्या तळव्यावरुन अलगद टिपले. परत एकवार स्पर्श करुन मी पुढे झाले. श्री दत्तगुरुंचे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि नेहमीसारखेच डोळ्यात अश्रू तरळले. एवढी कठीण परिक्षा त्यांनी घेतली होती आणि त्यात यशही त्यांनीच दिलं होतं. पण ही एकच भाग्याची गोष्ट नव्हती तर अजून एक मोठं भाग्य त्याक्षणी आम्हाला लाभलं होतं. मंदिरात आम्ही आणि दोन पूजारी यांच्याव्यतिरिक्त कुणीच माणसं नव्हती त्यामुळे आम्हाला पहिल्यांदाच श्री दत्तगुरुंच्या चरणपादुकांसमोर सात-आठ मिनिटं बसायला मिळालं. खरोखरच आजवरची माझी इच्छा त्याक्षणी स्वयं दत्तात्रेयांनी पूर्ण केली होती. जेवढा वेळ तिथे बसायला मिळालं तेवढा वेळ मला अश्रू अनावर झाले होते. इतक्या भयप्रद परिस्थितीतून पायऱ्या चढताना झालेला त्रास, मनात दाटलेली काळजी सारं एका क्षणात नाहीसं झालं आणि जाणवलं 'याचसाठी केला होता अट्टाहास'... अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं दत्तगुरुंनी. नंतर भाविक दर्शनासाठी येऊ लागले आणि आम्ही प्रसाद घेऊन तिथून निघालो.
थोडं खाली उतरुन अखंड धुनीचं दर्शन घ्यायला गेलो. उडन खटोला बंद असल्याने आम्ही पायऱ्या चढून वर पोहोचेपर्यंत अखंड धुनी प्रज्वलित होऊन गेली होती. त्यामुळे प्रज्वलित धुनीचं दर्शन आम्हाला मिळालच नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे धुनीचं दर्शन घेतलं आणि शिधा, देणगी अर्पण केली. तिथेही इतर कुणी लोकं नसल्याने गुरुचरित्राचं वाचन धुनीसमोरच बसून करायला मिळालं. वाचन करुन भोजनप्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.
पायऱ्या उतरायला (चढायला) सुरुवात केली आणि पुन्हा वाऱ्यापावसाचा जोर वाढला. कमंडलू कुंडापासून गोरक्षनाथ टुकपर्यंत परत थांबत थांबत आलो. पुन्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन त्या साधकांशी थोडं बोलून पुढे निघालो. आता पायऱ्या फक्त उतरायच्या होत्या. पण पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने आम्हाला सावकाश उतरावं लागत होतं. पण हळूहळू पावसाचा जोर कमी झाला आणि आम्हाला पायऱ्या उतरणं थोडं सोपं झालं. पूर्ण अंधार पडण्यापूर्वी शक्य तितक्या पायऱ्या उतरायचा आमचा प्रयत्न सुरु होता. कारण या वादळी पावसामुळे मार्गावरील विद्युतदिवे सुरु असण्याची शक्यता फारच कमी होती. जैन मंदिरापर्यंत बऱ्यापैकी दिसत होत. मग मात्र अंधार पडला आणि आमच्या अंदाजानुसार दिवेही अगदी खूप अंतरावर अधुनमधून सुरु होते. मग भ्रमणध्वनीच्या उजेडात आमचं चालणं सुरु झालं. आम्ही फक्त चौघंच होतो मागेपुढे कुणीच नव्हतं.
अंदाजे हजारएक पायऱ्या उतरायच्या बाकी असताना आम्हाला दोघंजणं भेटले. साधारण सत्तरीच्या वयाचे वडिल आणि आमच्या वयाची त्यांची मुलगी असे ते दोघंच होते. आम्हाला बघून त्यांना हायसं वाटलं. मग तेही आमच्या बरोबर चालू लागले. मधेमधे थांबत पायऱ्या उतरणं सुरुच होतं. मध्येच आमच्या चौघांपैकी दोघंजणं बोलता बोलता थोडं पुढे गेले. आणि वाटेत भेटलेले दोघं सावकाश उतरत असत्याने जरा मागे राहिले. त्यांच्यासाठी आम्ही दोघं जरा एका ठिकाणी थांबलो. जेमतेम बसलो आणि अगदी समोरुन जोराची गुरगुर ऐकू आली. आम्ही दोघंही तटकन उठलो आणि शब्दही न बोलता चालायला लागलो. चार पायऱ्या उतरलो आणि मागून त्या मुलीचा आवाज आला 'ताई थांबा' म्हणून. आम्ही तिथेच थांबलो, ते दोघं आले आणि त्यांनी विचारलं तुम्ही आत्ता काही आवाज ऐकला का? आमच्या लक्षात आलं की तो आवाज त्यांनीही ऐकला होता. जंगलच्या राजाचं गुरगुरणं होतं ते. प्रत्यक्ष दिसला नसला तरी क्षणभर का होईना भीती वाटणं साहजिकच होतं. उरलेल्या पायऱ्या उतरुन अखेर आम्ही पायथ्याशी पोहोचलो. आमचं मुक्कामाचं ठिकाण जवळच असल्याने लगेच तिथे गेलो.
खरंतर उडन खटोला ने जाऊन दर्शन घेऊन परत येऊन दुपारी लगेच परतीच्या प्रवासाला निघायचं ठरवलं होतं. पण दर्शन घेऊन येईपर्यंत रात्र झाली होती त्यामुळे नाईलाजास्तव त्या रात्री तलेटीलाच मुक्काम करुन तिसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला निघालो. निघतानाच भेटलेल्या काही परिचितांकडून आदल्या दिवसापासून गुजरातमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तुफान वारा पाऊस आहे अशी माहिती मिळाली होती. तरीही शक्यतो घरी पोहोचायचंच असं ठरवून निघालो. पण आमची परिक्षा अजून संपली नव्हती. धुवांधार पाऊस, वादळी वारा सुरुच होता. रस्त्यावर पाणी साचत होतं. त्यातूनच हळूहळू आम्ही पुढे जात होतो. पण नंतर वाहनकोंडीत अडकणं सुरु झालं. रस्त्यावर लहान गाड्यांपेक्षा अवजड वाहनंच खूप होती.
अशाच एका अवजड ट्रकच्या बाजूने आमची गाडी जात असताना त्या ट्रकमधून अचानक गाडीच्या टपावर खूपच जोरात काहीतरी आपटलं. एवढा मोठा आवाज ऐकून आम्ही सगळेच हादरलो. पण गडी थांबवून पहाणं अशक्य होतं. वाहनकोंडीतून गाडी थोडी बाहेर आल्यावर लगेच बाजूला थांबवली. टपावर नीट पाहिलं असता एखादी अणुकुचीदार वस्तू जोरात आपटल्यावर जसे खड्डे पडतील तसे दोन लहानशा खुणा टपावर पडलेल्या दिसल्या. गाडीला किंवा कुणालाच काही इजा झाली नाही ही गुरुकृपाच.
थोडा थोडा वेळ करत किमान चार तास तरी आमचे त्या वाहनकोंडीत वाया गेले आणि आमचा उशिरा का होईना घरी पोहोचण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. अखेर महामार्गावरच निवास व्यवस्था शोधून तिथेच मुक्काम केला.
चौथ्या दिवशी पहाटेच पुढचा प्रवास सुरु केला. सुरुवातीपासूनच पाऊस होता. रस्त्यावरील पाण्याचा, खड्ड्यांचा अंदाज घेत पुढे जात होतो. महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचलो तरीही पाऊस सुरुच होता. साधारण साडेतीन तासांच्या प्रवासानंतर सांभाळून गाडी चालवत असतानाच एका खड्ड्याने प्रसाद दिलाच. गाडीचं मागचं चाक पूर्ण फाटलं. सुदैवाने जवळच वाहनदुरुस्तीच दुकान होतं. तिथल्या माणसाने लगेच चाक बदलून दिलं. अर्ध्या तासात गाडीचं चाक बदलून आम्ही पुढे निघालो. पुढच्या दिडदोन तासात घरी पोहोचणार असतानाच पुन्हा एकदा खड्ड्याचा प्रसाद मिळाला.
पुढच्या अर्ध्या तासात गाडीचं पुढचं चाक खराब झालं. आणि तेही अशा ठिकाणी की जवळपास दुरुस्तीची सोयच नव्हती. पाऊस थांबायचं चिन्ह दिसत नव्हतं. सुदैवाने जवळच एक घर होतं. तिथे जाऊन चौकशी केली असता कळलं की आठ दहा किलोमीटर अंतरावर दुरुस्तीचं काम होऊ शकतं. मग त्या घरातल्या माणसानेच एक रिक्षा बोलावली. आमच्या बरोबरचे रिक्षा घेऊन त्या कामासाठी गेले. आम्ही दोघं त्या घरात बसलो. या सगळ्यात तासाभरापेक्षा जास्त वेळ गेला. तेवढा वेळ आम्ही त्या घरात बसलो होतो. घर अगदी साधं चिव्याचं मातीनं लिंपलेल्या भिंती आणि वर पत्रे असंच होतं. आदली रात्र त्या घरातल्या लोकांनी जागून काढली होती. वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून गेले तर काय या चिंतेने ते झोपू शकले नव्हते. पण अशा घरात रहाणारी माणसं मनाने मात्र श्रीमंत होती. कुठलीही ओळख नसताना अगदी सहज मदत केली होती त्यांनी आम्हाला. जोराच्या वाऱ्यापावसात बाहेर उभं राहू न देता आम्हाला घरात बसायला सांगितलं होतं. आपली कामं बाजूला ठेवून आमच्याशी छान गप्पाही मारल्या. चहा नाश्तयाचाही आग्रह केला पण आम्ही वाटेत नाश्ता करुन निघालो होतो. आणि त्यांना आम्ही गेल्या गेल्याच थोडाफार खाऊ दिला होता.
गाडीचं चाक नवीनच लावलं, आणि त्या घरच्या लोकांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. पुढचा उरलेला प्रवास फारच सावधपणे आणि सावकाश करुन अखेर दुपारी उशीराने घरी पोहोचलो.
यावेळची गिरनार यात्रा म्हणजे आमची खरंच कसोटी होती. अर्थातच श्री दत्तगुरुंनीच परिक्षा घेतली आणि त्यांनीच आम्हाला या मोठ्या परिक्षेत उत्तम यश दिलं आणि सुंदर दर्शन घडवलं.
पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होऊन वारकऱ्यांच्या बरोबरच भान हरपून विठुरायाच्या गजरात, भजनात तल्लीन व्हावं, श्वासागणिक विठुरायाचा नापजप करावा, आणि वारी प्रत्यक्ष अनुभवावी ही अनेकांप्रमाणेच माझीही इच्छा. अर्थात या वर्षीही ही इच्छा पूर्ण होता होता राहिली. पण माऊलींच्या कृपेने हा योग नक्की कधीतरी येईल हा विश्वास आहे. मात्र या निमित्ताने एक अनुभव शब्दबद्ध करावा असं वाटलं आणि मी व्यक्त झाले.
खूप वर्षांपूर्वींची गोष्ट आहे ही. इथल्याच एका आयोजकांनी आयोजित केलेल्या यात्रेला आम्ही दोन कुटुंबं गेलो होतो. बरोबर इतर यात्रेकरुही होतेच. दोन सतरा आसनी गाड्यांमधून आम्ही सारे यात्रेकरु गेलो होतो. गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, सोलापूर, गोंदवले इ. स्थानदर्शन अशी ती यात्रा होती.
पंढरपूरला पहाटे पोहोचलो. सगळं आवरुन विठुरायाच्या दर्शनाला निघालो. कार्तिकी एकादशीचा तिसराच (तृतीया) दिवस होता. चंद्रभागेचा तीर भाविकांच्या गर्दीने, उत्साहाने आणि विठ्ठलाच्या जयघोषने फुलून गेला होता. आम्ही सगळेही त्याचाच एक भाग होऊन दर्शन रांगेत सहभागी झालो. सकाळी आठ वाजता आम्ही रांगेत उभे होतो. पण एकूण गर्दी बघता दर्शनाला साधारण किती वेळ लागेल याची चौकशी केली असता 'काळजी करु नका दोन तीन तासात दर्शन होईल' अशीच उत्तरं मिळाली. आणि आम्ही रांगेत थांबायचं ठरवलं. निर्णय घेतला खरा पण आजूबाजूची परिस्थिती अतिशय किळसवाणी होती. सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं होतं. अगदी खरं सांगायचं तर नाक मुठीत धरुन आणि डोळ्यांना झापडं लावूनच आम्ही उभे होतो. साधारण तासाभरात आम्ही रांगेतून एका इमारतीत प्रवेश केला. सुरुवातीला वाटलं आता थोड्याच वेळात आपल्याला विठुरायाचं दर्शन घडेलं. पण मग लक्षात आलं ही रांग प्रचंड मोठी आहे. त्या इमारतीचे काही मजले रांगेतून गेल्यावर मग मुख्य मंदिरातल्या रांगेत आम्ही पोहोचणार होतो. आणि प्रत्येक मजल्यावर ती रांग फिरवत फिरवत खाली आणलेली होती. ही परिस्थिती लक्षात आल्यावर मग मात्र आम्हाला खूपच काळजी वाटायला लागली. त्या इमारतीतही बिलकुल स्वच्छता नव्हती. जिकडे तिकडे कचरा, पान खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या अशी गलिच्छ अवस्था होती. केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी आम्ही हे सारं सहन करायचा प्रयत्न करत होतो. साधारण दोन मजले रांगेतून फिरत फिरत गेल्यावर मात्र माझा आणि माझ्या मैत्रिणीचा संयम संपला. दर्शन राहुदे आपण परत जाऊया असं वाटायला लागलं. कारण आमच्या बरोबर आमची मुलंही होती. आणि तीही इतकी लहान की अगदी कडेवर, हाताशी अशी परिस्थिती होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दर्शनाला एवढा वेळ लागेल याची पूर्वकल्पना नसल्याने मुलांसाठी खाऊ पाणी हेही फारसं बरोबर घेतलेलं नव्हतं. अखेर मैत्रिणीच्या कुटुंबाने परत फिरायचा निर्णय घेतला पण आम्ही मात्र कसे कोण जाणे पण दर्शनासाठी थांबलो.
रांग पुढे सरकत होती वेळ जात होता तसतसं मुलींना सांभाळणंही कठीण होऊ लागलं होतं. मुलींना कडेवर घेऊन हात आणि सतत उभं राहून पायही बोलायला लागले. मुलींची तहानभूक पुरवायलाही काही नव्हतं. बरोबरचा खाऊही संपला. तिथे काही खाऊ मिळणंही शक्य नव्हतं. मग मात्र माझा संयम पूर्णच संपला. मनोमनी मी त्या विठुरायाला बोल लावू लागले, तुझं दर्शन घेण्यासाठी तू आम्हाला थांबवलंयस पण त्याचा नको इतका त्रास माझ्या अगदी लहान मुलींनी का सोसायचा? आम्ही तुझ्या दर्शनासाठी कितीही त्रास सहन करु शकतो पण मुलींना आज जो त्रास होतोय तो माझ्या सहनशक्ती पलिकडचा आहे, आणि त्याला माऊली तुच जबाबदार आहेस. असे बोल लावतच मी मुलींना सांभाळत रांगेत उभी होते. कधी एकदा दर्शन घेऊन बाहेर पडतो असं झालं होतं.
अखेर नऊ तासांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सायंकाळी पाच वाजता आम्हाला पंढरीरायानं दर्शन घडवलं. तिथे असलेले गुरुजी प्रत्येक भाविकाला दर्शन घेताच बकोटीला धरुनच बाजूला करत होते. क्षणभरही थांबू देत नव्हते. ते बघून माझा त्रागा अजूनच वाढला. पण बहुदा त्या लोभस सावळ्या रुपालाच आम्हाला सुंदर दर्शन घडवायचं होतं. त्यामुळे असेल कदाचित पण त्या गुरुजींनी बिलकुल घाई केली नाही, आणि शांतपणे दर्शन घेऊ दिलं. माऊलींच्या चरणी मी नतमस्तक झाले आणि नकळतच डोळे भरुन आले. बाजूला होऊन मनोमनी दर्शन घडल्याचा आनंद व्यक्त केला पण त्याचवेळी त्या माऊलींना व्यथित मनाने सांगितलं आज दर्शन घडवलंत पण मुलींना झालेला त्रास मी विसरु शकत नाही. मुलींना असा त्रास होणार असेल तर आम्हाला दर्शनाला यायची बिलकुल इच्छा नाही. दर्शन घेऊन आम्ही परत फिरलो. दिवसभर जवळजवळ उपवास घडला होता तो चार घास भोजन ग्रहण करुन सोडला, आणि एक नकोसा अनुभव घेऊन पुढील प्रवासाला निघालो.
आम्ही दरवर्षी दीपावली नंतर अंबाजोगाईला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जातो. तिथून मग आजूबाजूला फिरुन परत येतो. त्याप्रमाणे तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट इ. ठिकाणी जाऊन दर्शन घेत होतो. पण पंढरपूरच्या पहिल्यावहिल्या दर्शनाच्या नकोशा अनुभवानंतर पंढरपूरला परत दर्शनाला जायचं नाही हे ठाम ठरवलं होतं. त्यामुळे पंढरपूरला जात नव्हतो.
काही वर्षांनी असंच अंबाजोगाईहून परत येताना आमच्याबरोबर असलेल्या सगळ्यांची इच्छा म्हणून परत एकदा पंढरपूरला गेलो. मंदिराजवळ पोहोचलो आणि आधी दर्शनाला किती वेळ लागेल याची पूर्वीप्रमाणेच चौकशी केली. तेव्हाही दोन तीन तासात दर्शन होईल असंच उत्तर मिळालं आणि मी लगेच दर्शन न घेता परत निघुया असं म्हटलं. तेव्हा तिथला एक फुलवाला म्हणाला आलाच आहात तर मुखदर्शन तरी घ्या. मग विचारलं तर म्हणाला ते दर्शन लगेच होईल. म्हणून मग मुखदर्शन घेण्यासाठी गेलो. अर्थात तिथेही रांग होतीच. पण पंधर वीस मिनिटांत मुखदर्शन घेता आलं. तेवढ्यावरच समाधान मानून सारे परत फिरलो. मुलींना तासनतास रांगेत उभं रहायला लावून, त्रास देऊन दर्शन घ्यायचं नाही या माझ्या निर्णयावर मी ठाम होते. त्यामुळे चटकन मुखदर्शन करुन परत एकदा विठुरायाला माझा तो निर्णय परत एकदा सांगून मी मंदिराबाहेर आले. अर्थात समोरुन नाही तर एवढं तरी दर्शन घडल्याचा आनंद सगळ्यांना झाला होता.
त्यानंतर परत एक वर्षी अंबाजोगाईला आमच्याबरोबर आलेल्या नातेवाईकांना पंढरपूरला जायचंच होतं. म्हणून परत एकदा नाईलाजाने आणि रांग असेल तर आम्ही थांबणार नाही या अटीवरच आम्ही पंढरपूरला गेलो. आधीप्रमाणेच दर्शनासाठी किती वेळ लागेल याची चौकशी केली. तेव्हा पहिल्यांदाच असं कळलं की दर्शनाला अजिबात गर्दी नाहीय. मग मात्र आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि मी जागीच स्तब्ध झाले. मंदिरात तो जगन्नियंता राजस विठुराया आणि आम्ही यांच्याव्यतिरिक्त फक्त गुरुजी होते. अक्षरशः भान हरपून मी फक्त त्या पांडुरंगाकडे पहात होते. काही क्षणांनी त्याच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन एकदम शांत झालं. अश्रुभरल्या डोळ्यात ते लोभस रुप साठवत बाजूला झाले. त्यादिवशी माऊलींनी माझी इच्छा पूर्ण केली होती. क्षणभरही वाट पहायला न लावता थेट दर्शन घडवलं होतं. पहिल्यांदा दर्शन घेताना माझी झालेली तडफड माऊलींनी जाणली होती. काही वर्षांनंतर का होईना आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. मन तृप्त तृप्त झालं होतं.
दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला आणि अर्थातच एरवीही या अनभुवांची परत परत आठवण येते आणि जाणवतं किती जपतो आपल्या प्रत्येकाचं मन तो जगन्नियंता. त्याच्या कुठल्याही निर्गुण रुपासमोर आपण अनन्यभावाने शरण गेलो तर तो यथावकाश सारं काही मनासारखं घडवतो हे नक्की.