Pages

Thursday, November 6, 2025

गिरनार परिक्रमा

नि:शंक हो निर्भय हो मना रे |

प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ||

      या तारकमंत्राची प्रत्येक दत्तभक्ताला अगदी ठायी ठायी प्रचिती येत असते. आपण पूर्ण श्रद्धेने घातलेली प्रत्येक साद, केलेली प्रार्थना 'श्री दत्तात्रेयां'पर्यंत पोहोचते आणि त्वरित ते आपल्या हाकेला धावून येतात आणि आपल्या चिंतेचं निवारण करुन आश्वस्त करतात. म्हणूनच तर त्यांना 'स्मर्तृगामी' म्हणतात. त्यामुळेच 'श्री दत्तात्रेयांचं' 'गिरनार' हे अक्षयस्थान दत्तभक्तांसाठी विशेष महत्वाचं स्थान. प्रत्येक भक्त गिरनार दर्शनाबरोबरच वर्षातून एकदाच करता येणाऱ्या 'गिरनार परिक्रमेची' अतिशय आसुसून वाट बघत असतो. 

         आम्हीही दरवर्षी प्रमाणे या वर्षीही परिक्रमेची ४-६ महिने आधीपासूनच तयारी सुरु केली होती. यावेळी तीन वेगवेगळ्या तारखांना मिळून जवळपास दिडशेच्या वर भाविक आमच्याबरोबर परिक्रमेला येणार होते. त्यानुसार जय्यत तयारीनिशी ३१ ऑक्टोबरला पहिला ५४-५५ भाविकांचा ग्रुप घेऊन आम्ही जुनागढला प्रस्थान केलं.

        खरंतर यावर्षी दीपावलीनंतरही पावसाचा मुक्काम संपला नव्हता. त्यात भर म्हणून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ आणि त्याचवेळी अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळं भारतातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला होता. महाराष्ट्रासह संपूर्ण गुजरात मध्ये हीच परिस्थिती होती. त्यामुळं यावर्षीच्या गिरनार परिक्रमेवर पावसाचं, वादळाचं सावट होतं. 31 तारखेला प्रवास सुरू केला तेव्हा मार्गात मध्ये पाऊस पडत होता. एक तारखेला पहाटे जेव्हा आम्ही जुनागढ ला पोहोचलो तेव्हा मात्र पाऊस थांबला होता. जुनागढला उतरुन रिक्षाने तलेटीला मुक्कामी पोहोचलो. त्यावेळी पाऊस नुकताच पडून गेला होता पण अतिशय जोरदार वारा सुटला होता. प्रवासात असतानाच गिरनार वरच्या एकूण परिस्थितीची खात्रीशीर माहिती मिळाली होतीच. 

       मुक्कामी पोहोचल्यावर भराभर आन्हिकं आवरुन सगळेच गिरनार दर्शनासाठी निघालो. चार दिवसांपासून वादळी हवेमुळे रोपवे बंदच होता. त्यामुळे रोपवेची तिकिटं आधीच काढलेली असूनही उपयोग नव्हता. तुफान वारा आणि पाऊस यामुळं रोपवे सुरु होण्याची शक्यता नव्हतीच. म्हणून आम्ही सगळेच भाविक श्री दत्तात्रेयांच्या दर्शनला दहा हजार पायऱ्या चढून उतरुन जायच्या तयारीनेच निघालो होतो. संपूर्ण गिरनार पर्वत खालपर्यंत उतरलेल्या शुभ्र ढगांमध्ये हरवला होता. वारा आणि पाऊस असल्यानं जास्तीच्या आधारासाठी म्हणून यावेळी इतरांबरोबरच आम्ही दोघांनीही काठी घेतली. नेहमीप्रमाणं लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन प्रार्थना करुन पायऱ्या चढायला सुरुवात केली. भाविकांच्या अतिशय गर्दीतच आम्हीही चढत होतो. सुदैवानं पाऊस नव्हता पण वारा मात्र जोरदार होता. अर्थात आम्हाला या परिस्थितीची थोडी सवय असल्यानं काळजी नव्हती. पण बऱ्याच भाविकांना या परिस्थितीत एवढं चढण्या उतरण्याची थोडं काळजी वाटत होती. पण रोपवे सुरु नसल्यानं चढून जाणं किंवा डोली ने जाणं एवढेच पर्याय होते. 

      साधारण ५०-६० पायऱ्या चढून गेलो आणि अचानक आम्हाला रोपवे सुरु होणार असल्याची बातमी कळली. मग होतो तिथंच थांबून बातमीची खात्री करुन घेतली. रोपवे आणि पायऱ्या हे दोन्ही मार्ग वेगवेगळे असल्यानं पूर्ण खात्री केल्याशिवाय परत फिरुन उपयोग नव्हता. रोपवे सुरु होण्याची खात्री झाल्यावर मात्र सगळ्यांना संपर्क करुन रोपवे जवळ यायला सांगितलं. जाता जाता वाटेत घेतलेल्या काठ्या परत केल्या. रोपवे जवळ गेल्यावर कळलं ज्यांनी आधीच तिकिटं काढली आहेत त्यांनाच फक्त रोपवेने सोडणार आहेत. त्यामुळं पुढल्या १०-१५ मिनीटांतच आमचा नंबर लागला आणि आम्ही अगदी अनपेक्षितपणे रोपवेने 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ पोहोचलो. दहा हजार पायऱ्या चढून उतरायची मानसिक तयारी केलेली असताना अचानक रोपवे ने जायला मिळालं म्हणून सारेच खुष झाले. अर्थात जाताना रोपवे ने जाता आलं तरी परत येताना रोपवे मिळेलच याची शाश्वती नव्हती. 'अंबा मातेचं' दर्शन घेऊन पायऱ्या चढायला सुरुवात केली. सन्नाट वारा सुटला होता. संपूर्ण गिरनारने शुभ्र मेघांची दुलई लपेटली होती. अतिशय अप्रतिम दृश्य दिसत होतं. ८-१० फुटांपलिकडे काहीच दिसत नव्हतं. अगदी जुलै, ऑगस्ट मध्ये असते तशीच परिस्थिती होती. सन्नाट वाऱ्यात स्वतः ला सावरत पुढे जाणं म्हणजे कसरतच होती. पण एकूणच नयनरम्य अशा वातावरणात चढताना किंचितही श्रम जाणवत नव्हते.

       काही मिनीटांतच आम्ही 'गोरक्षनाथ' मंदिरात पोहोचलो. 'गोरक्षनाथांचं' दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण करुन पुढे निघालो. थोड्या पायऱ्या उतरलो आणि तिथूनच दर्शन रांग सुरु झाली. दरवर्षी पेक्षा यावर्षी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी होती. खरंतर परिक्रमेच्या काळात बहुसंख्य भाविक हे चार दिवस जंगलात वास्तव्य करुन परिक्रमा पूर्ण करुन अखेरच्या दिवशी दर्शनाला जातात. पण एक तारखेला परिक्रमा वादळी पावसामुळे सुरु न झाल्यानं सारेच भाविक दर्शनासाठी आले होते. साहजिकच त्यामुळे दर्शन रांग प्रचंड मोठी होती. त्याच रांगेतून आम्ही कमानी पर्यंत पोहोचलो. तिथे नतमस्तक होऊन त्याच रांगेतून प्रत्यक्ष मंदिरापर्यंत पोहोचलो. मंदिरात प्रवेश केला आणि मी 'श्री दत्तात्रेयांच्या' चरण पादुकांसमोर नतमस्तक झाले.‌ त्याक्षणी मनाची पाटी अगदी कोरी होती. कुठलाच विचार, प्रार्थना मनात नव्हती. अतिशय शांत तृप्त मनानं नैवेद्य अर्पण करुन पाणावलेल्या डोळ्यांनी परत एकवार नमस्कार करुन मी पुढे प्रदक्षिणा घालून मंदिराबाहेर आले. एरवी सतत श्री दत्तगुरुंशी संवाद करणारं मन प्रत्यक्ष दर्शन घेताना मात्र नि:शब्द होतं. काही मागणं उरतच नाही. 

      चरण पादुकांचं दर्शन घेऊन परत निघालो तेही रांगेतूनच. नेहमीच्या ठिकाणी बसून गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं आणि अखंड धुनीच्या दर्शनाला गेलो. तिथं दर्शन घेऊन, देणगी देऊन भोजनप्रसाद घेतला. परत रांगेतूनच खाली उतरायला सुरुवात केली. 'अंबा मातेच्या' मंदिराजवळ आलो आणि तिथे अलोट गर्दीत अडकलो. पायथ्यापासून चढून येणारे, रोपवे ने येणारे आणि दर्शन घेऊन परत जाणारे यांची प्रचंड गर्दी झाली होती. एकमेव पोलिस तिथे उभा होता. त्याला एकट्याला या गर्दीवर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. त्या चेंगराचेंगरीत काहीही होऊ शकलं असतं. अखेर २०-२५ मिनिटांनी आम्हाला रोपवे कडे जायला वाट मिळाली. परत येतानाही रोपवे सुरु होता आणि गर्दीही नव्हती. त्यामुळं आम्ही पुढल्या १५-२० मिनिटांतच पायथ्याशी पोहोचलो. तिथेच असलेल्या उपाहारगृहात थोडं खाऊन मुक्कामी परत आलो. रोपवे सुरु झाल्यानं एवढ्या प्रचंड गर्दीतही आम्ही दुपारी १२.३० वाजताच दर्शन घेऊन परत आलो होतो. साधारण साडेतीन चार च्या दरम्यान कळलं की मधल्या वेळेत रोपवे बंद झाला होता. पुन्हा सुरु होईल याची शाश्वती नव्हती. पण आम्हाला मात्र दोन्ही वेळा रोपवेने जायला मिळालं. तुफान वारा असला तरी पाऊस बिलकुल पडला नाही ही  केवळ दत्तगुरुंची कृपाच. चार दिवस बंद असलेला रोपवे जणू आमच्या साठीच सुरु झाला होता. कारण त्यानंतर २-३-४ तारखेलाही परत रोपवे बंद केला होता. फक्त परत येण्यासाठी रोपवे सुरु ठेवला होता तोही हवामानुसार मधेमधेच. 

      ज्या परिक्रमेसाठी गिरनारला भाविकांनी अलोट गर्दी केली होती ती परिक्रमा मुळात एक तारखेला रात्री सुरु होणार होती. पण पाऊस पूर्ण थांबला नव्हता. आणि आधी चार दिवस झालेल्या धुवांधार पावसाने परिक्रमा मार्ग पूर्ण क्षतिग्रस्त झाला होता. प्रचंड चिखल झाला होता, मध्ये मध्ये मार्ग वाहून गेला होता जेवढ्या मार्गापर्यंत वाहने जातात तीही चिखलात रुतून बसण्याची शक्यता होती. त्यामुळं नाईलाजास्तव एक तारखेला परिक्रमा रद्द करण्यात आली. नंतर जर तिथली परिस्थिती सुधारणं शक्य झालंच तर परिक्रमा सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल असा निर्णय झाला. आम्ही दोन तारखेलाच भल्या पहाटे परिक्रमा सुरु करणार होतो पण परिक्रमाच रद्द केल्यानं दोन तारखेला आम्ही सगळे मोकळे होतो. मग संध्याकाळी आम्ही 'भवनाथ' च्या दर्शनाला गेलो आणि परत येऊन दोन तारखेला द्वारका, बेट द्वारका इथं दर्शनाला जाण्यासाठी बसेस उपलब्ध होतील का याची बरीच चौकशी केली. सगळ्या नेहमीच्या ट्रॅव्हल्स कडे चौकशी केल्यावर अखेर तीन बसेस उपलब्ध झाल्या. 

        दोन तारखेला पहाटे सारं आवरुन आमचा ५४-५५ जणांचा ग्रुप घेऊन द्वारकेला निघालो. चहा नाश्त्यासाठी वाटेत थांबून ट्रॅफिक जॅम मधून द्वारकेला पोचायला खूपच वेळ लागला. मंदिर दर्शनासाठी १२ ते ५ यावेळेत बंद असतं. म्हणून त्या आधी दर्शन मिळणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आधीच तिथल्या एका पंडितजींबरोबर बोलणं केलं होतं. त्यामुळं दर्शन रांगेत उभं रहायला मिळालं. इथंही अलोट गर्दी होती दर्शनासाठी. आणि अतिशय चीड आणणारी गोष्ट म्हणजे दर्शनाला रांग, शिस्त याचा संपूर्ण अभाव होता. प्रचंड लोटालोट सुरु होती. 'द्वारकाधीशा' ला नैवेद्य अर्पण करेपर्यंत जवळपास अर्धा तास दर्शन बंद होतं. त्यानंतर दर्शन सुरु झालं आणि अक्षरशः धक्काबुक्की करत भाविक दर्शन घेत होते. अर्थातच नाईलाजाने आम्हालाही असंच दर्शन घ्यावं लागलं. पण प्रत्यक्षात अतिशय छान दर्शन झालं. मन अगदी तृप्त झालं. काही क्षण का होईना 'द्वारकाधीशा'समोर उभं राहून नतमस्तक होता आलं. 

       दोन तारखेला म्हणजेच 'कार्तिकी एकादशीला' आम्हाला 'द्वारकाधीशाचं' दर्शन घडलं होतं. आम्हा सर्वांसाठी ही अतिशय भाग्याची गोष्ट होती. 'आषाढी एकादशीला' 'भगवान विष्णू' योग निद्रेत जातात आणि 'चातुर्मास' संपल्यावर म्हणजे 'कार्तिकी एकादशीला' योग निद्रेतून बाहेर येऊन सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात. म्हणून या एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी', 'देव उठनी एकादशी' असंही म्हणतात. अशा या अतिशय महत्वाच्या एकादशी दिवशीच आम्हाला 'द्वारकाधीशाच्या' दर्शनाचा सुंदर योग आला. 

       द्वारकेहून आम्ही पुढे निघालो. वाटेत जेवून आम्ही 'बेट द्वारकेला' निघालो. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी उद्घाटन झालेल्या २३२० मीटर लांबीच्या 'सुदर्शन सेतु' वरुन आम्ही द्वारका बेटावर पोहोचलो. हा द्वारका बेटा ते ओखा यांना जोडणारा सेतु आहे. इथल्या मंदिरातही प्रचंड आणि बेशिस्त अशी गर्दी होती. दर्शन सायंकाळी ४.३० वाजता सुरु होणार असल्याने बराच वेळ वाट बघावी लागली. दर्शन सुरु झाल्यावर आधी सारखंच ढकलाढकली करतच पण इथंही अतिशय सुंदर असं दर्शन घडलं. मुख्य मंदिर आणि आजूबाजूची दर्शनं घेऊन आम्ही परत निघालो. द्वारका आणि बेट द्वारका या दोन्ही मंदिरात नेहमीच भाविकांची प्रचंड गर्दी असते. आम्हाला या बेशिस्त गर्दी चा वारंवार अनुभव आला आहे. परंतु या बेशिस्त बेदरकार गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही सुरक्षा यंत्रणा इथं नाही.  या गर्दीत चेंगराचेंगरीत काहीही दुर्दैवी घटना घडल्यास त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचीही कुठलीही व्यवस्था इथं उपलब्ध नाही. स्थानिक प्रशासनानं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. परंतु या अतिशय महत्त्वाच्या गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं जात असल्याचं खेदानं म्हणावं लागतय. 

         तिथून परतीच्या प्रवासात मार्गातच 'नागेश्वर' मंदिरात दर्शनासाठी गेलो. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे एक 'नागेश्वर ज्योतिर्लिंग'. इथं मात्र फार गर्दी नव्हती. आणि इथं कितीही जास्त गर्दी असली तरी दर्शन अगदी शिस्तीत रांगेतून घेतलं जातं. इथलं दर्शन घेऊन आम्ही रात्री उशिराने तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

          तीन तारखेला सकाळी लवकरच सारं आवरुन मुक्काम सोडून सगळेजणं आधीच ठरवलेल्या बसने 'सोरटी सोमनाथ' ला निघालो. वाटेत नाश्ता करुन 'सोमनाथ' ला पोहोचलो. सोमवार असल्यानं दर्शनाला बऱ्यापैकी गर्दी होती. पण इथंही व्यस्थित रांगेतून दर्शन होत असल्यानं फार वेळ न लागता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत फिरुन वाटेतच असलेल्या 'भालका तीर्थ' चं दर्शन घेतलं. त्यानंतर नेहमीच्या हाॅटेलमध्ये जेवण करुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. राजकोटहून आमची परतीची ट्रेन होती. त्यामुळं वेळेत पोहोचणं गरजेचं होतं. सोमनाथ ते राजकोट रस्त्याचं काम अजूनही सुरु असल्यानं खूप वाहतूक कोंडी होते. त्यामुळं प्रवसाचा वेळ वाढतो. म्हणून मग इतर कुठं न जाता सरळ राजकोटला वेळेतच पोहोचलो. 

         'गिरनार परिक्रमा' रद्द झाल्यामुळं खरतर प्रत्येकालाच रुखरुख लागली होती. कारण आता एकदम पुढल्या वर्षी ही परिक्रमा करता येणार आहे. पण तरीही कार्तिकी एकादशीला घडलेलं 'द्वारकाधीशाचं' दर्शन आणि सोमवारी घडलेलं 'सोमनाथाचं दर्शन' यामुळं मनाला खूप समाधानही वाटत होतं. मनाच्या या द्विधा अवस्थेतच आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

          माझा सहचर जरी सेवा म्हणूनच या यात्रेचं आयोजन करीत असला तरी त्याच्या सहकारी मित्रांची त्याला लाभणारी साथ ही अतिशय महत्वाची असते. त्यांच्या सहकार्यामुळे आणि 'श्री दत्तात्रेयांच्या' कृपेनेच ही यात्रा यशस्वी होते.  आणि प्रत्येक यात्रेत एक नवीन ऊर्जा प्रत्येकाला लाभते. 

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...