Pages

Wednesday, January 18, 2023

सागरतीरी

                   दुपारचं उन सरतं आणि सायंकाळ अवतरते. सारी पश्चिमा नीलरंगातून सोनकेशर रंगात रंगते. अस्ताचलास जाणारा कनकगोल‌ सागरावरही सोनकेशराची उधळण करतो. आणि त्या चमकत्या सोनेरी जळावरलं रवीराजाचं प्रतिबिंब लाटांवर स्वार होतं. काही वेळातच हा रंगखेळ संपून गडद सांज होते. मग मात्र सगळ्या प्राणिमात्रांची लगबग उडते ती आपापल्या घरट्याकडे परतण्याची. त्याचवेळी आपलं मनही किंचित हळवं कातर होतं. असंख्य विचारांची वावटळ उठते. पण काही वेळातच अवनीवर चांदणसडा पसरतो आणि आपलं मनही शांत होतं, सुखावतं. अशा शांत नीरव रात्री कधीतरी सागरकिनारी बसावं आणि मनातली वादळं शमवत त्या नीरव शांततेत हरवून जावं. अतिशय वेगळ्या पण हवाहव्याशा वाटणाऱ्या अशा या अनुभवाने तनमन सुखावतंच.


उसळती शुभ्र फेसाळ निळ्या सागरलाटा

अवतरते सांज सुरेख गोजीरी सागरतटा

होतसे अधीर कनकगोल हा सागरभेटीस

रंगविभोर होई पश्चिमा रवी येता दिठीस

झेपावती विहग घरट्याकडे आपल्या

सांजरंगात साऱ्या सावल्या दाटल्या

सळसळते बन ते माडांचे होतसे शांत

गजबजला सागरकिनारा होई निवांत

अंधारल्या सागरतीरी मग एकले बसावे

अन गाजेसंगे भावलहरीत तल्लीन व्हावे

विध्द जाहल्या मनास हलकेच सावरावे

होऊनी कुंचला भावचित्र सुरेख रंगवावे

पुनवेच्या चांदव्याने मग नभी अवतरावे

अन अवकाशीचे ते चांदणे मनी उतरावे

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

माघ पौर्णिमा

              माघ पौर्णिमा ही अध्यात्मिक आणि ज्योतिष शास्त्रानुसार महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते. यावेळीही आम्ही चौघांनी माघी पौर्णिमेला म...