Pages

Monday, December 30, 2024

वर्ष

बघता बघता अजून एक वर्ष सरले

कुणास ठाऊक कलियुग किती उरले

     सरत्या वर्षात सारे जुने मैत्र दुरावले

     परि जीवनप्रवासात नवे स्नेह जुळले

सुखाचे कधी दुःखाचे पारडे जड झाले 

विसरुन वेदना त्या मन निर्विकार बनले 

     बऱ्या वाईट अनुभवांचे चित्र रंगले

     भविष्याचे सप्तरंग नजरेत सामावले

खोल घाव किती काळजावरी जाहले

सरला काळ अन हळवे मन सावरले

     कालचक्र फिरले वर्ष एक आले गेले 

     नववर्ष स्वागता मन पुन्हा सिध्द झाले

- स्नेहल मोडक

Sunday, December 8, 2024

खम्मा घणी - २

               दिवस पाचवा - सकाळीच मुक्कामाचं ठिकाण सोडून जैसलमेर मधलं स्थलदर्शन करायला निघालो. जैसलमेर हे ' गोल्डन सिटी ' म्हणून ओळखलं जातं. पिवळ्या वाळूच्या दगडांनी बांधलेले पॅलेस आणि किल्ले सूर्यप्रकाशात सोनेरी रंगात चमकतात म्हणून या शहराला ' गोल्डन सिटी ' - ' सुवर्ण शहर ' म्हणतात. 

              ' गड़ीसर लेक ' - ११५६ मध्ये जैसलमेरचे संस्थापक 'राजा रावल जैसल' यांनी या तलावाची निर्मिती केली. त्याकाळी संपूर्ण जैसलमेर शहरासाठी पाणी पुरवठा करणारा हा एकमेव विस्तीर्ण जलाशय होता. त्यावेळी हा तलाव जैसलसर तलाव या नावानं ओळखला जात होता. नंतर १३६७ च्या दरम्यान राजा गड़सीसिंह यांनी या तलावाची पुनर्निर्मिती केली. तेव्हापासून हा तलाव ' गड़ीसर लेक ' म्हणून प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर आणि विस्तीर्ण अशा या जलाशयाच्या काठावर शानदार स्मारकं, तीर्थस्थळं, लहानलहान मंडप आणि मंदिरंही आहेत. हा तलाव म्हणजे जैसलमेरचा इतिहास आणि संस्कृती दर्शवणारं संग्रहालयच आहे. इथं सातत्यानं पारंपरिक उत्सव, कार्यक्रम आयोजित केले जातात. सकाळच्या सोनकिरणांनी चमकणारा हा सुंदर तलाव पाहून आम्ही पुढं गेलो.

              गोल्डन फोर्ट ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत समाविष्ट असणारा हा ' सुवर्ण दुर्ग ' ११५६ मध्ये 'महाराज रावल जैसर सिंह' यांनी बांधलाय. सद्यस्थितीतही जैसलमेरच्या एकूण लोकसंख्येच्या १/४ लोकसंख्या या किल्ल्यात वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या वाळूच्या दगडांनी बांधलेल्या विशाल भिंती सूर्योदयाच्या वेळी गहिऱ्या पिवळ्या रंगांनी चमकतात. आणि सायंकाळी सुर्यास्तसमयी सोनसळी रंगानी चमकत इथल्या सोनेरी वाळूत मिसळून जातात. म्हणून याला ' सुवर्ण दुर्ग ' हे नाव मिळालय. हा किल्ला त्रिकुटा टेकडीवर थार वाळवंटात स्थित आहे. १५०० फुट लांब आणि ७५० फुट रुंदीचा हा किल्ला टेकडीवर २५० फुट उंचावर वसलाय. याच्या सुरक्षेसाठी ३० मीटर उंचीची भिंत बाहेरच्या बाजूला आहे. तसंच संपूर्ण किल्ल्यात ९९ बुरुज आहेत. या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ४ विशाल प्रवेशद्वारं आहेत जी मुख्य प्रवेशद्वाराला जोडतात. या किल्ल्यात ' राज महल पॅलेस -' जैसलमेरच्या महारावल यांचा पूर्वनिवास, ' बारी हवेली' - ब्राह्मण पुजाऱ्यांची हवेली, जैन मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, नाथ हवेली, आणि अनेक व्यापाऱ्यांच्या हवेली हे सारं‌ पहाता येतं. संग्रहालयात पारंपरिक राजस्थानी पोषाख, आभुषणं, चांदीची, काचेची भांडी, शस्त्रास्त्रं हे सारं आहे. किल्ल्याच्या साऱ्या भिंती आणि महाल अप्रतिम कलाकुसरीने नटलेले आहेत. संपूर्ण राजस्थान मध्ये प्रत्येक हवेली, महाल आणि इतर वास्तू या सर्व ठिकाणी अतिशय नाजूक आणि अप्रतिम कोरीवकाम केलेलं आपल्याला पहायला मिळतं. यानंतर आम्ही अजून एक हवेली बघायला गेलो.

                ' पटवा हवेली ' -  सोन्या चांदीच्या व्यापारातील एका प्रमुख जैन पटवा परिवाराने बांधलेली ही ५ मजली 'पटवा हवेली'. ही हवेली पटवा परिवाराच्या समृद्धीचं आणि यशाचं प्रतिक आहे. याची निर्मिती जवळपास पाच दशकांत करण्यात आली आणि पाचही भावंडांनी आपापल्या हिश्शयाची निर्मिती केली. राजपूत आणि मुघल शैलीचं मिश्रण असलेली ही हवेली  पिवळ्या वाळूच्या दगडांचं नाजूक नक्षीकाम, कोरीव काम याने सजलेली आहे. यातल्या काही भागात अजूनही पटवा परिवार वास्तव्यास आहे. पिवळ्या रंगाच्या दगडांमुळे सूर्यकिरणात ही हवेली सुंदर दिसते. हवेलीच्या एका भागात संग्रहालय आहे. 'पटवा हवेली' बघून आम्ही पुढं एक जैन मंदिर बघितलं आणि मग गेलो एक विशेष स्थान बघायला. 

               ' कुलधरा गांव ' - एक झपाटलेलं गांव. जैसलमेर पासून १८ किमी. वर असलेलं हे कुलधरा गांव १२९१ मध्ये पाली भागातून आलेल्या कधान नावाच्या व्यक्तीनं वसवलं. मोठा तलाव खणला. हळूहळू ८४ गावं इथं वसली. पाली भागातून आलेले ब्राह्मण म्हणून यांना पालीवाल ब्राह्मण म्हणलं गेलं. कष्ट आणि तंत्रज्ञान विकासीत केल्यानं या लोकांनी कृषी क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आणि त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जलसिंचनाचा उपयोग केला. हळूहळू प्रगती होत होती. गायी म्हशी पालन, मातीची भांडी बनवणं, इतर विविध व्यापार यांमुळे इथले लोक राजाला सर्वात जास्त कर देत होते. कुलधरामधल्या लोकांना लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेला होता. साधारण २०० वर्षांपूर्वी गावाचा दिवाण सलीम सिंह याची वाईट नजर कुलधरा गावातील पुजाऱ्याच्या सुंदर मुलीवर पडते. आणि तिला पौर्णिमेच्या आत आपणासमोर हजर करावं असा आदेश तो देतो. कुलधराच्या आजूबाजूची ८४ गावं विभागलेली असली तरी एकी होती. सगळ्या गावाची पंचायत बसली. संकट एका गावावर असलं तरी सगळ्यांनी एका रात्रीत निर्णय घेतला. जिथं आपल्या मुली सुरक्षित नाहीत त्या गावाचा त्याग करायचा. शेती, व्यापार सारं सोडून, बरोबर नेता येईल तेवढंच सामान, गायीगुरं बरोबर घेऊन ८४ गावातील सगळ्या लोकांनी एका रात्रीत गाव सोडलं. एका रात्रीत गाव रिकामं करताना तडफडलेल्या गावकऱ्यांनी 'पुन्हा या गावात कुणीही वसू शकणार नाही' असा शाप दिला. आता इथली ओस पडलेली, अर्धवट कोसळलेली घरंदारं पहायला जगभरातून पर्यटक येतात पण सायंकाळी ६ वाजल्यानंतर मात्र इथं कुणीही राहू शकत नाही. ती ओसाड घरं रात्री तिथं थांबणाऱ्यांना भितीदायक अनुभव देतात. कुणीतरी कुजबुज करताना जाणवणं, अचानक आपल्या जवळून कुणी गेल्याचा भास होणं, घुंगरांचा, भांड्यांचा आवाज येणं असे भितीदायक अनुभव रात्री इथं येतात. त्यामुळं सायंकाळी ६ नंतर इथं कुणालाही थांबायची परवानगी नाही. गावातली ओस पडलेली घरं पहाताना त्या काळाची जाणीव होते. काही घरं अजूनही सुस्थितीत आहेत. पण बऱ्याचशा घरांची मात्र आता पडझड झाली आहे. अतिशय कष्टानं उभी केलेली आणि सुखसमृद्धीत नांदणारी घरं एका रात्रीत कायमची सोडून जाताना गावकऱ्यांना किती कठीण गेलं असेल याची त्या ओसाड गावात फिरताना सहज कल्पना येते. अशा परिस्थितीत हे गाव ' झपाटलेलं ' म्हणून ओळखलं जाणं साहजिकच आहे. हा एक वेगळा अनुभव घेऊन आम्ही पुढं एक छान अनुभव घेण्यासाठी निघालो.

           'डेझर्ट कॅम्पिंग' - थरच्या वाळवंटामधल्या जैसलमेरमधलं डेझर्ट कॅम्पिंग अतिशय प्रसिद्ध आहे. या वाळवंटात कापडी तंबूमध्ये रहाण्यासाठी अनेक ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणापासून दूर या सॅन ड्युन्स मध्ये कॅम्प मध्ये रहाणं हा एक अतिशय वेगळा आणि सुंदर अनुभव आहे. दूरवर पसरलेल्या या सोनेरी वाळवंटात साहसी खेळ, उंट सफारी, जीप सफारी यांचा मनमुराद आनंद घेता येतो. आम्ही इथं पोहोचलो आणि आपापल्या तंबूमध्ये सामान ठेवून ताजतवानं होऊन उंट सफारीला गेलो. उंटावर बसण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता. काश्मीर, वैष्णोदेवी, केदारनाथ आणि अशाच काही ठिकाणी जाऊन आल्यानं घोड्यावर बसायची थोडीफार सवय झाली आहे. पण उंटावर बसणं हा वेगळाच भाग आहे. आम्ही उंटावरुन  वाळवंटातच लांबवर गेलो. इथून सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा पहाता येतो. पण सूर्यास्ताला खूप वेळ असल्यानं आम्ही लगेच जीप सफारीला जायचं ठरवलं. जीपनेही खूपच लांबपर्यंत फिरवून आणतात. तिथे दुरवर ' बजरंगी भाईजान ' या चित्रपटाचं थोडं चित्रीकरण झालं होतं ते ठिकाण जीपने जाऊन पहाता येतं. मात्र हा प्रवास अतिशय चित्तथरारक असतो. मार्गातल्या वाळुच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवरुन या जीप सुसाट नेतात. खूप वेगळा आणि खास अनुभव असतो हा. ही जीप सफारी करुन परत आम्हाला उंटांनी जिथं सोडलं होतं तिथं आलो. इथल सूर्यास्त पहाणं हाही एक विशेष अनुभव असतो. साधारणपणे आपण सूर्यास्त सागरकिनारी, किंवा डोगराआड होतानाच पहातो. पण दूरवर पसरलेल्या सोनेरी वाळवंटातल्या सूर्यास्ताचं दृश्य वेगळच, भान हरपवणारं असतं. जसजसा तो कनकगोल अस्ताचलास जातो. तसतसं सारं वाळवंट सोनकिरणात चमकतं. सूर्यास्ताचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवून आम्ही तंबूत परत गेलो. 

              ' डेझर्ट कॅम्पिंग ' मध्ये रात्री पर्यटकांसाठी गायन वादन आणि नृत्याचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. आम्ही तिथं होतो त्या रात्रीही असाच कार्यक्रम आयोजित केलेला होता. यात आधी खास राजस्थानी संगीताचा कार्यक्रम झाला. आणि त्यानंतर नृत्याचा कार्यक्रम होता. या नृत्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका वेगळ्या व्यक्तीमत्वाला जवळून पहायची बोलायची संधी मिळाली. नृत्य सुरु झालं आणि कलाकाराला पाहून हे काही वेगळंच आहे याची जाणीव झाली. सुरवातीला राजस्थानी नृत्याचं ' एकावर एक ठेवलेल्या मातीच्या घटांची उतरंड ' घेऊन सादरीकरण केलं. अतिशय बहारदार अशा नृत्यानंतर त्या व्यक्तीनं आपली ओळख दिली ती ऐकून आम्ही अक्षरशः थक्क झालो. नृत्य करणारा कलाकार हे आर्मी काॅलेज मध्ये हिंदी भाषा हा विषय शिकवतात. नृत्यासंदर्भात जपानसह अजून ४-५ देश ते फिरुन आले आहेत. स्वतः विविध शैलीच्या आणि शास्त्रीय नृत्याचं प्रशिक्षण देतात. याचबरोबर अनेक समारंभ, कॅम्पिंग साईटस् अशा ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करतात. हिंदी भाषेचे प्राध्यापक असूनही स्वानंदासाठी हा वेगळा छंद ते जोपासतात ही खरच अत्यंत कौतुकाची आणि प्रेरणादायी गोष्ट आहे हे नक्की. त्यांनी केलेली मशाल नृत्य आणि विविध साधनांह केलेली इतर नृत्य सारीच अप्रतिम. सायंकाळपासूनची उबदार थंडी एव्हाना वाढलीच होती त्यामुळं त्या थंडीत मोकळ्या प्रांगणात चमचमत्या ताऱ्यांसह ही नृत्य पहाणं हा खूप छान अनुभव होता. आजूबाजूचं सारं वातावरण सुंदरच होतं. या कार्यक्रमानंतर गरमागरम राजस्थानी भोजनाचा आस्वाद घेऊन आजूबाजूला थोडं फिरुन आम्ही टेन्टमध्ये गेलो. 

               सहाव्या दिवशी सकाळी तिथंच गरमागरम नाश्ता करुन टेन्ट सोडून निघालो. आमचं पुढचं शहर होतं जोधपूर'. वाळवंटाच्या मधोमध जोधपूर शहर वसलंय. त्यामुळं इथल्या अति उष्णतेपासून सुरक्षित रहाण्यासाठी आणि थंडाव्यासाठी इथल्या वास्तू, घरं निळ्या रंगात रंगवतात. आणि म्हणून या शहराला ' ब्लू सिटी ' म्हणतात. जैसलमेर हून जोधपूरला पोहोचल्यावर आम्ही एक पॅलेस बघायला गेलो. ' उमेद भवन पॅलेस ' - जोधपूरचे महाराज ' उमेद सिंह ' यांनी १९४३ मध्ये हा राजवाडा बांधलाय. या राजवाड्याच्या निर्मितीचा इतिहास एका संतांने त्याकाळी दिलेल्या शापाशी निगडित आहे. एका संत महात्म्याने राठोड काळात जोधपूर मध्ये दुष्काळ पडेल असा शाप दिला होता. त्याप्रमाणे महाराज प्रतापसिंह यांचा ५० वर्षांचा शासनकाळ संपल्यावर जोधपूर मध्ये लगेच पुढची ३ वर्षं सलग भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तिथल्या जनतेनं तत्कालीन महाराज उमेद सिंह यांच्याकडे रोजगार देण्याची मागणी केली होती. तेव्हा महाराजांनी लोकांना रोजगार मिळावा म्हणून या राजवाड्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. वर्तमान स्थितीत या राजवाड्यात ३४७ खोल्या आहेत. हा राजवाडा ताज हॉटेल चाच एक भाग आहे. या वाड्यात ३ भाग आहेत. एका भागात ताज हॉटेल आहे, एकात संग्रहालय आहे आणि एका भागात शाही परिवार वास्तव्यास आहे. सद्यस्थितीत या राजवाड्याचे मालक  ' गज सिंह ' आहेत.  इथल्या संग्रहालयात काचेची, चिनी मातीची भांडी, कलात्मक वस्तू, अतिशय सुंदर अशी मोठमोठी भित्तीचित्रं, जभरातून जमवलेली कलात्मक अशी वेगवेगळी जुनी घड्याळं, शस्त्रास्त्र यांचा समावेश आहे. याशिवाय इथं पूर्वीच्या काळातल्या गाड्यांचं ' व्हिंटेज कार्स ' चं स्वतंत्र संग्रहालय आहे. ज्यात रोल्स राईस, मर्सिडीज-बेंज, ऑस्टिन मार्टिन सारख्या गाड्या पहाता येतात. अतिशय सुंदर असा राजवाडा पाहून आम्ही मुक्कामी गेलो.

              सातव्या दिवशी सकाळी मुक्काम सोडून जोधपूरमधलंच स्थलदर्शन करायला निघालो. ' जसवंतसिंह समाधी ' - महाराज सरदार सिंह यानी १८९९ मध्ये आपले पिता ' जसवंतसिंह ' यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधलं. समाधीचा मुख्य हाॅल हा मंदिरासारखा बांधलाय. इथं नित्यनेमानं पूजा केली जाते. आवारात राजपरिवारीतल इतर काही व्यक्तींच्याही समाधी आहेत. 'जसवंतसिंह' यांच्या चितेत एका मयुराने उडी घेऊन अग्नीर्पण केलं होतं. त्या मयुराची समाधधीही सुरुवातीलाच आहे.  या स्मारकाच्या आधी एक तलाव आहे. आणि त्याच्यासमोरच ' महाराज जसवंतसिंह ' यांचा अश्वारूढ पुतळा आहे. हे समाधीस्थळ बघून आम्ही पुढं गेलो.

             ' मेहरानगढ किल्ला ' - १४५९ मध्ये राठोड राजा ' राव जोधा ' यांनी हा किल्ला बांधला. किल्ला ज्या टेकडीवर बांधला तिथं आधी एक ' चिडियानाथ बाबा ' नावाचे साधू वास्तव्यास होते. राजाला त्याच जागी किल्ला बांधायचा असल्यानं त्यानं साधूला ती जागा सोडून जायला सांगितलं. साधूनं नकार देताच त्याला तिथून जबरदस्तीनं निघून जायला लावलं आणि तिथं किल्ल्याचं बांधकाम सुरु केलं. मात्र साधूच्या तपश्चर्येत विघ्न आल्यानं त्यांनं राजाला कधी सौख्य लाभणार नाही कारण त्याला जोधपूर मध्ये पाणीच मिळणार नाही असा शाप दिला. अखेर राजानं त्या साधूच्या कुटीजवळ एक कुंड आणि शिवमंदिर बांधलं. जवळपास ११ मजल्यांएवढ्या उंचीचा हा किल्ला अप्रतिमच आहे. या किल्ल्यात वेगवेगळे महाल बांधलेत. ' फुल महल ' - अतिशय नाजूक अशा कलाकुसरीने सजलेला हा एक प्रशस्त हाॅल आहे. ' शीश महल ' - या महालात संपूर्ण छत आणि भिंतींवर आरसे लावलेत . इथही एक दिवा लावला की त्याची अनेक प्रतिबिंब आरशात दिसतात आणि पूर्ण महाल लख्ख उजळतो. ' झांकी महल ' - राजघराण्यातील स्त्रिया या महालात रहात. आणि या महालाच्या झरोक्यांमधून बाहेर होणारे कार्यक्रम पहात असत. याचबरोबर मोती महल, दौलत खाना, जनाना देवडी, चामुंडा माता मंदिर या किल्ल्यात आहे. एका भागात मोठं संग्रहालय आहे. किल्ल्याच्या बाहेरचा भाग स्थानिक कलाकारांना दुकानांसाठी दिलाय. खूप उंच असणारा हा किल्ला पहायला पायी चढून जाता येतं तसंच आता तिथं लिफ्टची व्यवस्था केली आहे. संपूर्ण राजस्थानमधले अत्यंत नाजूक अशा कोरीव कामानं आणि कलाकुसरीनं सजलेले अवाढव्य राजवाडे, महल, किल्ले पाहून या साऱ्यांच्या निर्मितीसाठी तिथल्या कलाकारांनी किती प्रचंड मेहनत घेतली असेल याचाच विचार मनात येतो. अतिशय सुंदर असा हा किल्ला बघून आम्ही जयपूरला निघालो. रात्री जयपूरला पोहोचलो. भोजन करुन परतीच्या प्रवासासाठी विमानतळावर गेलो. 

               पिंक सिटी जयपूर, गोल्डन सिटी जैसलमेर आणि ब्लू सिटी जोधपूर याबरोबरच पुष्करसह बिकानेर अशी राजस्थानची अतिशय सुंदर, अविस्मरणीय सहल मनात आणि छायाचित्रात साठवून आठव्या दिवशी सकाळी विमानानं आम्ही परतीचा प्रवास केला.

- स्नेहल मोडक






   









   


Tuesday, December 3, 2024

खम्मा घणी - १

          अंबाजोगाईला कुलस्वामिनीचं दर्शन घेऊन आम्ही सोमवारी रात्री घरी परत आलो. आणि लगेच मंगळवारी रात्री उशिरा मोठ्या सहलीसाठी प्रस्थान केलं. बुधवारी भल्या पहाटे निघणाऱ्या विमानानं सकाळी ७ वाजताच आम्ही 'गुलाबी शहर - जयपूर' विमानतळावर उतरलो. आणि आमच्या राजस्थान सहलीला सुरुवात झाली. आमच्या संपूर्ण सहलीसाठी आधीच ठरवलेली ११ सीटर ट्रॅव्हलर विमानतळावर उभी होती. सहलीसाठी आम्ही सारे कुटुंबीय मिळून गेलो होतो. 

            वाटेत नाश्ता करुन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. रुमवर पोहोचून आवरुन थोडा आराम करुन फिरायला निघालो. सर्वात आधी आम्ही गेलो जयपूर मधलं अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण पहायला.  

' हवामहल ' - १७९९ मध्ये राजा सवाई प्रतापसिंह यांनी खास राजघराण्यातील स्त्रियांसाठी या महालाची निर्मिती केली. परंतु प्रत्यक्षात हा स्वतंत्र महाल नसून सिटी पॅलेसच्या मागच्या बाजूला बांधण्यात आलेला भाग आहे. राजघराण्यातील स्त्रियांना इथं होणारे नृत्याचे आणि इतर कार्यक्रम आणि शहरातील घडामोडी कुणासमोरही न येता पहाता याव्यात यासाठी हा महाल बांधण्यात आला. या महालाचा आकार एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे कारण राजा प्रतापसिंह श्रीकृष्ण भक्त होते. या पाच मजली महालाला भक्कम पाया नाही. त्यामुळे पायाशिवाय बांधलेला हा जगातील सर्वात उंच महाल आहे. पाया नसल्यानं हा ८७° अंशात झुकलेला आणि घुमावदार आहे. ९५३ खिडक्या असलेल्या या महालाची लाल आणि गुलाबी बलुआ दगडांपासून निर्मिती करण्यात आली आहे. अतिशय सुंदर, देखणा असा हा हवामहल पहायला पर्यटकांची खूपच गर्दी असते. हवामहल पाहून आम्ही पुढे गेलो.

          'आमेर किल्ला' - आमेर किल्ला किंवा अंबर किल्ला जयपूर पासून ११ किमी. अंतरावर एका पर्वतावर भक्कमपणे उभा आहे. महाराज मानसिंह प्रथम यांनी १५९२ साली याची निर्मिती केली. लाल वाळूचा दगड आणि शुभ्र संगमरवर यांच्या मिलाफातून हा किल्ला तयार केला आहे. राजपूत आणि मुघल वास्तुशैलीचा अप्रतिम नमुना असलेल्या या किल्ल्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलं आहे. भव्य महाल, मंदिर यांसह या किल्ल्यातला शीश महल अप्रतिम असाच आहे. या महालात अप्रतिम कलाकुसर केली आहे आणि साऱ्या भिंती आणि छतावर असंख्य आरसे जडवले अहेत. त्यामुळं दिवा लावताच त्यांच प्रतिबिंब त्या सगळ्या आरशात दिसतं आणि लख्ख प्रकाश पडतो. आणि क्षितिजवर असंख्य तारे चमकत असल्याचा भास होतो. याला जरी किल्ला म्हणत असले तरी प्रत्यक्षात हा राजवाडाच होता कारण इथं राजपरिवार वास्तव्यास होता. इथं येण्यासाठी 'सुरजपोल' आणि 'चांदपोल' असे दोन दरवाजे आहेत. आतमध्ये जलेब चौक, शीलामाता मंदिर, दिवाणे खास, दिवाणे आम, जनेना देऊरी, गणेश पोल असे भाग पहाता येतात. सर्वत्र नक्षीकाम, कलाकुसर केलेला हा सुंदर किल्ला पाहून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

                गुलाबी शहर म्हणून ओळखलं जाणारं जयपूर अप्रतिम वास्तु सौंदर्यानं सजलेलं आहे. यातील एक सुंदर वास्तू म्हणजे 'जलमहल'. महाराजा सवाई प्रतापसिंह यांनी १७९९ मध्ये जयपूर मधल्या मानसागर तलावात बांधलेला ५ मजली राजवाडा म्हणजे 'जलमहल'. हा संपूर्ण राजवाडा लाल, गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलाय. राजपूत वास्तूशैलीचं हे एक सुंदर उदाहरण आहे. या मानसागर तलावात बदकांसह इतर पक्षीही जलविहार करत असताना पहायला मिळतात. जलमहल पाहून आम्ही पुढं गेलो.

          आमचं पुढचं स्थान होतं चोखी धाणी. चोखी धाणी हे असं एक स्थान जिथं सारी राजस्थानी संस्कृती पहायला, अनुभवायला मिळते. कठपुतळी नृत्य, राजस्थानी घुमर नृत्य, घोडेस्वारी, हत्तीस्वारी, उंटस्वारी, जादूचे खेळ, कुंभारकाम, या सारख्या अनेक गोष्टी इथं आहेत. कुंभारांबरोबर आपणही मातीची भांडी फिरत्या चाकावर बनवू शकतो. तसंच इथं गंगाघाट आहे जिथं रोज सायंकाळी ७.३० वाजता गंगाआरती केली जाते. आणि इथं नौकानयनाचा आनंद घेता येतो. खरेदीसाठी काही दुकानंही इथं आहेत. राजस्थानच्या प्रसिद्ध कलाकुसरीच्या वस्तू, ब्लॉक प्रिंटिंगचे, बांधणीचे कपडे, साड्या यांची खरेदी इथं करता येते. याचबरोबर इथली सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पारंपरिक राजस्थानी भोजन. केर सांगरी, दाल बाटी, चुरमा, गट्ट्याची भाजी, मालपुवा या वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक राजस्थानी पदार्थांसह इतर अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येतो. छान बैठक व्यवस्था, कंदील आणि इतर रोषणाई, सजावट आणि पारंपरिक राजस्थानी पोषाखात आग्रह करकरुन वाढणारे स्थानिक लोकं अशा छान वातावरणात भोजनाचा आस्वाद घेण्याची मजा वेगळीच. हे सारं अनुभवून, भोजनाचा आस्वाद घेऊन, खरेदी आणि आम्ही स्वतः केलेली मातीची छोटी भांडी घेऊन आम्ही रुमवर परत आलो.

                 दुसऱ्या दिवशी सकाळी जयपूरमधलीच अजून काही प्रसिद्ध ठिकाणं पहायला निघालो. सुरुवातीलाच आम्ही गेलो बाप्पाच्या दर्शनाला. ' मोती डुंगरी गणेश मंदिर ' - १७६१ मध्ये सेठ जय राम पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधण्यात आलं. राजस्थानमधल्या सर्वोत्तम पाषाणाने हे मंदिर ४ महिन्यात बांधून पूर्ण करण्यात आलं. याची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, मेवाडचे राजे प्रदिर्घ प्रवास करुन बैलगाडीतून परत जात होते त्यावेळी त्यांच्याबरोबर ही गणेशाची मूर्ती होती. पण ज्या ठिकाणी ही बैलगाडी थांबेल त्याचठिकाणी गणेशाचं मंदिर बांधावं अशी अट होती. ही बैलगाडी डुंगरी टेकडीच्या पायथ्याशी थांबली आणि मग पल्लीवाल यांच्या देखरेखीखाली त्याच ठिकाणी गणेशाचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिरात अतिशय रेखीव आणि भव्य गणेश मूर्ती आहे. इथं दर्शन घेऊन आम्ही जवळच असलेल्या दुसऱ्या मंदिरात गेलो. ' बिर्ला मंदिर ' - २० व्या शतकात बिर्ला कुटुंबियांनी बांधलेलं हे मंदिर ' लक्ष्मी नारायण मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. शुभ्र संगमरवरात कोरीव कामात बांधलेलं हे मंदिर सुंदर आहे. गर्भगृहात लक्ष्मी नारायणाची संगमरवरातली रेखीव मूर्ती आहे. इथून आम्ही पुढचं ठिकाण पहायला गेलो.

' अल्बर्ट हाॅल म्युझियम ' - राज रामसिंह यांनी बांधलेली म्युझियमची ही वास्तू इंडो - सारसेनिक शैलीत आहे. १८८७ साली हे संग्रहालय लोकांना पहाण्यासाठी खुलं करण्यात आलं. इथं स्थानिक शिल्पकारांच्या कलाकृती, विविध चित्रं, गालिचे, धातूच्या वस्तू, मौल्यवान खडे,  पारंपरिक पोशाख, आभुषणं, हस्तीदंती मूर्ती, त्याकाळी चलनात असलेली नाणी हे सारं पहायला मिळतं. हे सगळं बघून पुढं एक विशेष स्थान बघायला गेलो. ' जंतरमंतर ' - युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थांनामध्ये समाविष्ट असलेलं हे स्थान राजा सवाई जयसिंह यांनी १७४३ मध्ये बांधलं. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासाठी ही वेधशाळा बांधण्यात आली. नुसत्या डोळ्यांनीही खगोलीय वेध घेण्यासाठी इथं मोठमोठी २० वेधयंत्र बांधली आहेत. सम्राटयंत्र, दिगंशयंत्र, जयप्रकाश, राशीवलय यंत्र, इत्यादी वेधयंत्रं इथं पहाता येतात. रचनात्मक भव्यता आणि ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्र याविषयीची तत्कालीन प्रगती यादृष्टीने जंतरमंतर ला ऐतिहासिक महत्त्व आहे. हे सगळं बघून आम्ही पुढे गेलो. 

' सिटी पॅलेस ' - १७३२ मध्ये महाराज सवाई जयसिंह द्वितीय यांनी या राजवाड्याची निर्मिती केली. या राजवाड्यात काही इमारती, विभिन्न प्रांगण, गॅलरी, संग्रहालय यांचा समावेश आहे. संग्रहालयात राजांच्या संग्रहातील अनेकोत्तम कलाकृती, पोषाख, शस्त्रास्त्र पहाता येतात. संपूर्ण राजवाडा गुलाबी वाळूच्या दगडांनी बांधलेला आहे. अप्रतिम कोरीव काम इथं पहायला मिळतं. या राजवाड्यातले चंद्र महल, मुबारक महल, गोविंद देव मंदिर, संग्रहालय हे विशेष पहाण्यासारखे. या राजवाड्यातल्या काही भागात अजूनही राजपरिवार वास्तव्यास आहे. दिवसभर हे सगळं स्थलदर्शन करुन आम्ही रुमवर परत आलो.

             तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही जयपूर सोडून पुढे निघालो. दोन अडिच तासातच आम्ही पोहोचलो ' पुष्कर ' ला. 

' पुष्कर ' - इथं संपूर्ण भारतातलं ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर आहे. हे मंदिर १४ व्या शतकात बांधलय. मंदिरात ब्रम्हदेवाची, पत्नी गायत्रीसह चतुर्मुखी मूर्ती आहे. आणि मंदिराच्या मागील बाजूस टेकडीवर पत्नी सावित्रीचं मंदिर आहे. या मंदिराची पौराणिक कथा अशी आहे की एकदा ब्रम्हदेव आपल्या भक्तांसाठी यज्ञ करायचं ठरवतात. आणि यज्ञाची जागा ठरविण्यासाठी एक कमलपुष्प पृथ्वीवर पाठवतात. ते पुष्प जिथे पडेल ते यज्ञ स्थान. ते पुष्प राजस्थान मधल्या पुष्कर या ठिकाणी पडतं आणि यज्ञाचं स्थान निश्चित होतं. ब्रम्हदेव यज्ञस्थानी पोहोचले. पण त्यांची पत्नी सावित्री योग्य स्थान पोहोचली नाही. यज्ञाचा शुभसमय उलटून चालला होता म्हणून ब्रम्हानी नंदिनी गायीच्या मुखातून गायत्रीची निर्मिती केली आणि तिच्याशी विवाह करुन यज्ञाला सुरुवात केली. आणि त्याचवेळी त्यांची पत्नी सावित्री तिथं पोहोचली. यज्ञासाठी ब्रम्हदेवांना दुसऱ्या स्त्रीसमवेत बसलेलं पाहून ती क्रोधित झाली आणि तिनं ब्रम्हदेवांना शाप दिला की संपूर्ण पृथ्वीतलावर तुमची कुठंही पूजा केली जाणार नाही. हा शाप ऐकून साऱ्या देवदेवतांनी सावित्रीला विनंती केली तेव्हा तिनं फक्त या स्थानीच म्हणजे पुष्करमध्येच ब्रम्हदेवांची पूजा केली जाईल असा उ:शाप दिला. त्यानंतर हे मंदिर बांधण्यात आलं. हे मंदिर पुष्कर सरोवरच्या काठावर आहे. इथं सरोवराकाठी तर्पणादी विधीही केले जातात. हे विधी करुन ब्रम्हदेवाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. आमचं पुढचं शहर होतं ' बिकानेर '. 

                 बिकानेरला आम्ही आधी एका मंदिरात गेलो. ' करणी माता मंदिर ' - करणी माता ही साऱ्या राजपूतांचं श्रध्दास्थान. बिकानेर मधल्या देशनोक गावात हे मंदिर आहे. २० व्या शतकात बिकानेरचे महाराजा गंगासिंह यांनी हे मंदिर बांधलंय. ' करणी माता मंदिर ' हे ' उंदरांचं मंदिर ' म्हणूनही ओळखलं जातं. करणी मातेचा पुत्र ' लक्ष्मण ' एकदा कपिल सरोवरात जल प्राशन करत असताना सरोवरात पडून त्याचा मृत्यू झाला. करणी मातेला हे कळताच ती यमराजाकडे गेली आणि तिने मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या पुत्राला पुनर्जीवित करावं असं सांगितलं पण यमराजानं त्याला नकार दिला. मात्र करणी मातेनं लक्ष्मण आणि त्याच्या ४००० वंशजांना उंदीर म्हणून पुनर्जन्म दिला. अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून हे मंदिर उंदराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात शब्दशः असंख्य उंदीर आहेत. तरीही दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते. आम्ही दोघींनी मात्र या मंदिराच्या थोडं दूरच थांबून तिथूनच करणी मातेला नमस्कार केला. बाकी पाच जणं मंदिरात जाऊन आले. 

            यानंतर आम्ही कॅमल ब्रीडिंग फार्म बघायला गेलो. राष्ट्रीय उष्ट्र अनुसंधान केंद्र - अवाढव्य परिसरात इथं जागोजागी शेडमध्ये खूप सारे उंट ठेवण्यात आले आहेत. दिवसभर चरण्यासाठी त्यांना बाहेर नेलं जातं आणि सायंकाळी परत शेडमध्ये ठेवण्यात येतं. आशियामधलं  उंट प्रजननासाठीचं हे एकमात्र केंद्र आहे. पूर्ण वाढ झालेले उंट, ३-४ महिन्याचे छोटे उंट इथं आहेत. तसंच उंटिणींच्या दुधाची डेअरीही इथं आहे. हे सारं पाहून आम्ही रुमवर गेलो.

             चौथ्या दिवशी आम्ही बिकानेरमधला एक किल्ला बघायला गेलो. ' जुनागढ किल्ला ' - १५९४ मध्ये 'राजा राय सिंह' यांनी 'करण सिंह' यांच्या देखरेखीखाली हा किल्ला बांधला. किल्ल्यात महल, मंदिर आणि संग्रहालय आहे. हे सारं लाल वाळूचा दगड आणि संगमरवर यांच्या मिश्रणातून बांधलंय. संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंमधून महाराजांच्या भव्य जीवनशैलीचा अंदाज येतो. इथं वस्त्रप्रावरणं, आभुषणं, चांदीची तसंच मीनाकारी केलेली विविध भांडी, सिंहासन, लहान मोठी सोन्या चांदीची कलाकुसर असलेली चित्रं, पालख्या, शस्त्रास्त्र अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात. हा संपूर्ण परिसर फिरुन आम्ही पुढं जैसलमेरला रुमवर पोहोचलो.

- स्नेहल मोडक







      









Tuesday, November 19, 2024

डोंगर तुकाई

           गिरनार दर्शन आणि परिक्रमा पूर्ण करुन घरी आलो आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आम्ही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी अंबाजोगाईला निघालो. दरवर्षी दीपावली नंतर कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी आम्ही जातोच. गेली कित्येक वर्षं आम्ही दर्शनासाठी जातोय. योगेश्वरी देवीच्या दर्शनाबरोबरच परळी वैजनाथाचंही दर्शन घेतोच. या प्रघाताप्रमाणेच यावेळीही अंबाजोगाईला निघालो. लवकर पोहोचणार असल्यानं आधीच परळी वैजनाथाचं दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं. परळीला पोहोचायच्या थोडं आधी अचानक मनात कधीपासून जायचं असलेल्या एका स्थानी आधी जावं असं आलं. त्या स्थानाबद्दल माहिती होती पण ते नक्की कुठे आहे हे माहित नव्हतं. मग लगेच आंतरजालावर थोडा धांडोळा घेतला आणि तिथं जायचं नक्की केलं. 

             परळी वैजनाथ पासून ४ किमी. अंतरावर चांदापूर गावाच्या पश्चिमेला असलेलं हे स्थान म्हणजे ' डोंगर तुकाई '. हे स्थान ' डोंगर तुकाई ' किंवा ' अंबा भवानी आरोग्य मंदिर ' या नावानं ओळखलं जातं. इथं पार्वती मातेचं मंदिर आहे. इथं पार्वती मातेच्या दोन आख्यायिका प्रचलित आहेत. प्रभू श्रीराम वनवासात असताना परळी वैजनाथ येथे काही काळ वास्तव्यास होते. त्यावेळी एकदा त्यांच्या एकपत्नीत्वाची परिक्षा घेण्यासाठी देवी पार्वती सीतामाईचं रुप घेऊन श्रीरामांसमोर आली. मात्र श्रीरामांनी आपल्या ज्ञानचक्षूद्वारे ती पार्वती माता असल्याचं ओळखलं आणि त्यांच्या मुखातून ' तू का आई ' असे शब्द बाहेर पडले. तेव्हापासून तिथं  ' पार्वती माता ' ' तुकाई ' या नावानं ओळखली जाते. दुसऱ्या आख्यायिकेनुसार परळी वैजनाथ मधील ' आयाजीत ' नावाचा एक ब्राह्मण भक्त तुळजापूरला ' भवानी ' मातेच्या वारीस नित्यनेमानं जात असे. मात्र वृध्दापकाळामुळे त्याला वारीला जाणं शक्य होईना तेव्हा देवीनं ' मीच तुझ्याकडे येईन ' असं सांगितलं. तिनं अट घातली की ' तू पुढं चालत रहा, मागं वळून बघायचं नाही '. त्याप्रमाणं हे चालत डोंगर तुकाई पर्यंत आले. इथं देवीच्या खडावांचा आवाज बंद झाला म्हणून त्या ब्राह्मणानं मागं वळून पाहिलं आणि त्याक्षणी देवी अदृश्य होऊन मूर्ती रुपात तिथंच विराजमान झाली. या आख्यायिकांमुळं हा डोंगर ' डोंगर तुकाई ' म्हणून ओळखला जातो. तसंच या मंदिराचं दुसरं नांव ' अंबा आरोग्य भवानी मंदिर ' हे इथं असलेल्या अनेक औषधी वनस्पतींमुळं मिळालंय. या डोंगरावर खूप वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत आणि संजीवनी वनस्पतीही इथं होती असं सांगतात.

           तुकाई देवी बरोबरच हे मंदिर दत्तभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.  या स्थानी 'श्री दत्तात्रेयांचे' द्वितीय अवतार ' नृसिंह सरस्वती ' हे एक वर्ष गुप्त रुपात राहिले होते. या मंदिरात तुकाई देवीची मूर्ती आहे. आणि तिच्या डाव्या बाजूला एक भुयार आहे. या भुयारातून ४-५ दगडी पायऱ्या उतरुन एकावेळी एक व्यक्तीच खाली जाऊ शकते. पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर अगदी छोटसं गर्भगृह आहे. या ठिकाणी छोट्या पाषाणी शिवलिंगावर ' नृसिंह सरस्वती ' यांच्या पादुका आणि त्यामागे मूर्ती विराजमान आहे. या गर्भगृहात एकावेळी जेमतेम २-३ व्यक्तीबसू शकतील एवढीच जागा आहे. हे स्थान प्रति गाणगापूर म्हणूनही ओळखतात. श्री नृसिंह सरस्वती या ठिकाणी गुप्त रुपात राहिल्यानं श्री दत्तात्रेयांच्या इतर स्थानांइतकंच हे स्थानही महत्त्वाचं आहे. 

              आम्ही कित्येक वर्षं परळी वैजनाथाच्या दर्शनाला जातोय. पण ' श्री नृसिंह सरस्वतींच्या ' या स्थानी जाण्याचा योग यावेळी आला. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सायंकाळ होत आली होती. मंदिरात नित्यपुजा करणाऱ्या माऊलीं व्यतिरिक्त कुणीच नव्हतं. आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तुकाई देवीचं दर्शन घेऊन बाजूच्या  भुयाराच्या पायऱ्या जपून उतरुन खाली गर्भगृहात गेलो. मी चरणपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं. अगदी अचानकच मनात इथं यावं असं आलं आणि सुंदर दर्शन घडलं. इथं दर्शनाला यायचं ऐनवेळी ठरवल्यानं आणि तिथं आजूबाजूला काहीच न मिळाल्यानं नैवेद्य अर्पण करता आला नाही. पण तिथल्या माऊलींनीच आम्हाला प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं आणि खूप समाधान वाटलं. 

                  ' नृसिंह सरस्वतींचं ' दर्शन घेऊन आम्ही ' परळी वैजनाथाचं ' दर्शन घ्यायला गेलो. नुकतीच त्रिपुरी पौर्णिमा झाल्यानं इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण रांगेतून जाऊन 'वैजनाथाचं' सुंदर दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही अंबाजोगाईला मुक्काम केला.

                  दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरात गेलो. मंदिरात लवकर गेल्यामुळं गर्दी नव्हती. इथं नेहमीप्रमाणं देवीला अभिषेक करुन दर्शन घेऊन आम्ही परत मुक्कामाच्या ठिकाणी आलो. आता अंबाजोगाईला सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. निवासाची आणि भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. त्यामुळं आता भाविकांचा ओघही वाढलाय. आम्ही दर्शन घेऊन परत रुमवर येताना दरवर्षी प्रमाणं सीताफळं खरेदी केली. इथली सीताफळं अतिशय मधुर चवीची असतात. अंबाजोगाई श्री योगेश्वरी देवीच्या मंदिराबरोबरच सीताफळांसाठीही प्रसिद्ध आहे. सीताफळ घेऊन आवरुन लगेचच आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

- स्नेहल मोडक

    






Sunday, November 17, 2024

गिरनार परिक्रमा

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

             साधारणपणे जुलै महिना सुरु झाला की दत्तभक्तांना वेध लागतात ते गिरनार परिक्रमेचे. रेल्वेचं आरक्षण ४ महिने आधी होत असल्यानं सारे भक्त त्या तारखेकडे अगदी पूर्ण लक्ष ठेवून असतात. कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा या ४-५ दिवसातच करता येणारी गिरनार परिक्रमा ही दत्तभक्तांसाठी पर्वणीच असते. त्यामुळे मिळेल त्या रेल्वेचं आरक्षण या महिन्यात केलं जातं. आणि परिक्रमा काळात तलेटीमध्ये मुक्काम करण्यासाठी हाॅटेल, आश्रम यांचंही आरक्षण खूप आधीच करावं लागतं. त्यासाठी आम्ही जानेवारी महिन्यापासूनच‌ आरक्षणाच्या प्रयत्नात असतो. दीपावलीची धामधूम संपता संपता परिक्रमेचे खरे वेध लागतात. दर्शन आणि परिक्रमेच्या प्रवासाची तयारी सुरु होते आणि प्रत्यक्ष प्रवासाचा दिवस येतो.

             आम्हाला थेट जुनागढचं रेल्वे आरक्षण मिळालं नव्हतंच. त्यामुळं आम्ही सारे १२ तारखेला रेल्वेने आधी गांधीनगरला पोहोचलो. तिथून दुसऱ्या रेल्वेने जुनागढसाठी रवाना झालो. पहाटे जुनागढला उतरलो. परिक्रमेला भाविकांची अलोट गर्दी होत असल्यानं तलेटीला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी वाहनांना परवानगी नसते. त्यामुळं थोड्या अंतरापर्यंत वाहनानं आणि पुढं चालत आम्ही सारे मुक्कामी पोहोचलो. सारी आन्हिकं आवरुन दर्शनासाठी निघालो. रोपवेसाठी अर्थातच प्रचंड गर्दी होती. मात्र सारी व्यवस्था एकदम छान होती. रांगेतून पुढे सरकत अखेर रोपवेने आम्ही अंबाजी मंदिरापर्यंत पोहोचलो. तिथून लगेचच पायऱ्या चढायला सुरुवात केली. गोरक्षनाथांच दर्शन घेऊन कमंडलू कुंडाच्या कमानीच्या थोडं पुढे गेलो आणि तिथूनच दर्शनासाठी रांग सुरु झाली. रांगेतून शिखरावर पोहोचून मंदिरात प्रवेश केला आणि नैवेद्य आणि इतर वस्तू अर्पण केल्या. हे सारं करेपर्यंत नजरेसमोर फक्त श्री दत्तात्रेयांच्या चरण पादुकाच होत्या. ज्या क्षणी नतमस्तक झाले त्याक्षणी पापण्या ओलावल्याच. सलग दोन पौर्णिमेनंतर दर्शन घडलं होतं. अर्थात कोजागिरी पौर्णिमेला माउंट अबू मधल्या गुरुशिखराचं सुंदर दर्शन घडलंच होतं. पण गिरनारचं स्थान आमच्यासाठी अत्यंत विशेष आहे. नेहमीप्रमाणं आमचं दर्शन घेऊन होईपर्यंत तिथले पंडितजी एकदम शांत होते. त्यामुळं किंचितही घाईगडबड न होता शांतपणे सुंदर दर्शन घडलं. गिरनारला जायच्या २-३ दिवस आधी माझ्या मनात नेहमीप्रमाणं नैवेद्यसाठी काय न्यायचं असा विचार आला आणि क्षणात मनोमनी उत्तर मिळालं बुंदीचे लाडू. खरंतर दीपावली नुकतीच संपली होती त्यामुळं मनात फराळाच्या पदार्थांपैकी काही न्यावं असं आलं असतं तर ते अगदी साहजिक होतं. पण बुंदीचे लाडू न्यावे ही दत्तगुरुंचीच इच्छा. कारण नेहमीच मी दत्तगुरुंना विचारुनच नैवेद्य नेते. मनातला हा विचार मी नंतर विसरुन गेले. निघायच्या आदल्या दिवशी दुग्धालयातून इतर वस्तूंबरोबर काजू कतली नैवेद्यासाठी घेतली. नंतर अजून काही खाऊ घेण्यासाठी दुसऱ्या दुकानात गेले तर तिथे समोरच सुरेख केशरी बुंदी लाडवांचं पाकिट दिसलं आणि क्षणात जाणीव झाली की हेच तर दत्तगुरुंना हवय. तेच बुंदीचे लाडू घेऊन गिरनारला प्लास्टिक बंदी असल्यानं छान डब्यातून मी गुरुशिखरावर श्री दत्तात्रेयांच्या चरणी अर्पण केले. श्री दत्तात्रेयांच्या इच्छेनुसार नैवेद्य नेता आला या अतीव समाधानातच ओलावलेल्या पापण्यांनी मी तिथं बसलेल्या पंडितजींना नमस्कार केला त्यावर त्यांनी ' माताजी परिक्रमा हो गयी? ' असं विचारल्यावर मी 'कल करेंगे' असं सांगितलं. तर 'आरामसे जाके आओ' म्हणाले. सहसा न बोलणाऱ्या पंडितजीनी एवढी चौकशी केल्यावर मला आशीर्वाद मिळाल्यासारखं खूप छान वाटलं. दर्शन घेऊन थोड्या पायऱ्या उतरुन एका ठिकाणी थांबून गुरुचरित्राचं नित्याचं वाचन केलं. नंतर परत थोडं खाली उतरुन अखंड धुनीचं दर्शन आणि प्रसाद घेतला आणि अंबाजी मंदिराजवळ येऊन रोपवेनं दुपारी १२ वाजताच पायथ्याशी आलो.‌

              गिरनार दर्शन हा दत्तभक्तांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय. तिथं अनेक भाविक सेवेसाठीही जातात. अर्थात त्यासाठी त्यांना ३० ते ५१ दिवसांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्यानंतर त्यांना सेवेसाठी बोलावतात. मात्र गेल्या काही पौर्णिमांपासून अखंड धुनीजवळ सेवेसाठी येणाऱ्या सेवेकऱ्यांची भाविकांना मदत होण्याऐवजी मनस्ताप होऊ लागलाय. अलीकडे या सेवेकऱ्यांच्या अरेरावीच्या, उर्मटपणाच्या आणि मग्रुरीच्या वागण्या-बोलण्यामुळे आपलं डोकं आपण कितीही शांत ठेवायचा प्रयत्न केला तरीही ते शक्य होत नाहीय. कितीही शांत राहिलं तरी सेवेकऱ्यांच्या उद्दामपणामुळे अखेर शाब्दिक चकमक होतेच. माझ्यासह खूप भाविकांचा कल आता असं पौर्णिमेला किंवा गर्दीच्या वेळेला गिरनार दर्शनाला न येण्याकडे होऊ लागलाय. श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाच्या सौख्यापेक्षा या सेवेकऱ्यांमुळे होणारा मनस्ताप जास्त त्रासदायक ठरतोय. सेवेकऱ्यांना भाविकांना ज्या सुचना द्यायच्या असतात त्या नम्रपणे देऊ शकतात ज्यामुळे वादविवादाची वेळ येणार नाही. पण त्यांना साधं सरळ  बोलणं जमत नाही नम्रपणा दूरची गोष्ट.  

             आमचा एक ग्रुप ११ तारखेलाच गिरनारला पोहोचल्यानं त्यांचं त्यादिवशी दर्शन आणि १२ तारखेला परिक्रमा पूर्ण झाली होती. आणि त्यादिवशी परिक्रमेला भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी रात्रीच परिक्रमा सुरु करावी का विचार करत होतो पण वेळेचा अंदाज घेता रात्रीच्या अंधारातच आम्ही दुसऱ्या डोंगरावर आम्ही पोहोचू आणि तिथे बिलकुल विद्युत दिवे नसल्यानं चढायला त्रास होईल हे लक्षात आलं. हा डोंगर अगदी खडा आणि मोठमोठ्या दगडांनी भरलेला आहे. त्यातून मार्ग काढत पुढे जावं लागतं. त्यामुळं पहाटे २-३ वाजेपर्यंत परिक्रमा सुरु करायची असं ठरलं. त्या सायंकाळी तिथेच आजूबाजूला फिरुन भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन रात्रीचं भोजन करुन थोडं निद्राधीन झालो. रात्री १ वाजता उठून आन्हिकं आवरुन परिक्रमेला निघालो. 

             प्रत्यक्ष परिक्रमा जिथून सुरु होते तिथून आम्ही पहाटे ३ वाजता परिक्रमेला सुरुवात केली. सुरुवातीला अगदी २-४ भाविक परिक्रमेला निघालेले दिसत होते. पहिल्या ३-४ किमी. चढावाच्या रस्त्यानंतर तर काही वेळ आम्ही दोघंच मार्गक्रमण करत होतो. मधेच २-४ जणं पुढे निघून जात होते. नीरव शांतता, मिट्ट काळोख, आजूबाजूला जंगल आणि त्यात टाॅर्चच्या थोड्याशा प्रकाशात चालणारे आम्ही, अतिशय सुंदर वातावरण होतं. काही वेळानंतर मात्र आमच्या मागेपुढे काही भाविक चालत होते. दुसरा डोंगर चढून उतरताना हळूहळू पूर्वेला केशर ऊधळत रवीराजाचं आगमन होऊ लागलं. पहिले दोन डोंगर पार करेपर्यंत भाविकांची फारशी गर्दी नव्हती त्यामुळं आम्हाला जरा भरभर चालत येत होतं. कालिमातेच्या मंदिरात पोहोचून तिचं दर्शन घेऊन पुढे निघालो आणि इथून गर्दीचा ओघ वाढला. मग चालण्याचा वेग आपोआपच मंदावला. पण  दमल्यावर वाटेत थांबत थांबत कलिंगड, लिंबू सरबत, शहाळं, उसाचा रस, यांचा आस्वाद घेत तिसरा डोंगर चढून उतरुन आमची परिक्रमा दुपारी २ वाजता अतिशय सुंदर रितीने पूर्ण झाली. परिक्रमा करत असताना गतवर्षीच्या आठवणीनंही अंगावर शहारा येत होता. गतवर्षी आम्ही ज्या दिवशी परिक्रमेला गेलो होतो त्याचदिवशी बिबट्यानं एका लहान मुलीवर हल्ला केल्यानं ती मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळं सारी परिक्रमा काही वेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळं अलोट गर्दी झाली आणि सगळ्यांनाच आत्यंतिक त्रास झाला होता. ते सारं या परिक्रमेत आठवत होतं. खरंतर त्यावेळीच मी दत्तगुरुंना सांगितलं होतं की इतका शारीरिक आणि मानसिक त्रास झालाय की आम्ही  पुढल्या वर्षी परिक्रमेला बिलकुल येणार नाही. पण आपली इच्छा आणि दत्तगुरुंची इच्छा नेहमी एकच नसते. मी कितीही येणार नाही म्हणलं तरी स्वयं श्री दत्तगुरुंनी यावर्षीही ३८ किमी. अंतराची ही परिक्रमा घडवलीच. तीही कुठलाही त्रास होऊ न देता. ही परिक्रमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती कारण ही आमची पाचवी परिक्रमा होती. आणि ही पाचवी परिक्रमा दत्तात्रेयांनी अतिशय सुंदर रितीने घडवली होती. मुक्कामी पोहोचल्यावर थोडा आराम करुन सायंकाळी परत थोडं फिरुन आलो. 

             यावर्षी आमच्याबरोबर दोनशेहून अधिक भाविक २ ग्रुपमध्ये विभागून दर्शन आणि परिक्रमेसाठी आले होते. एवढ्या मोठ्या यात्रेचं नियोजन जरी माझा सहचर करत असला तरी त्याच्या सहकारी मित्रांची अमुल्य साथ ही अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्या सहकार्यामूळेच ही यात्रा उत्तम रित्या पूर्ण होते. आणि आमच्यासह बरोबरच्या साऱ्या भाविकांना दर्शन आणि परिक्रमा करणे सहजशक्य होते. 

             त्रिपुरी पौर्णिमेला सकाळी लवकर तलेटीहून निघून सोरटी सोमनाथच्या दर्शनासाठी दोन मोठ्या बसने निघालो. सोमनाथ दर्शन घेऊन येताना भालका तीर्थ, नाग मंदिर इथंही दर्शन घेऊन रात्री राजकोटला पोहोचलो. तिथून रात्रीच्या रेल्वेने प्रवास सुरु केला आणि यात्रेची सांगता केली.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक




Monday, November 11, 2024

मंदिर

उजळली ज्योत निरांजनात

जागले चैतन्य तनामनात

     दर्शन त्रैमूर्ती नी पादुकांचे 

     सौख्यनिधान श्रध्देयाचे

दीपतेज ते लखलखले

तेजात गुरुमंदिर उजळले

     प्रसन्नचित्ते कर जुळती

     कुशलमंगल सदा प्रार्थती

मिटल्या नेत्री त्रैमूर्ती दिसे

मनी निरंतर श्रध्दा वसे

     पहाटसमय शुभ जाहला

     सदनी अष्टभाव दाटला

- स्नेहल मोडक



Tuesday, November 5, 2024

खिडकी

कधी सोनवर्खी कवडसे पाहते

अन वंदन त्या भास्करास करते

कधी मंजुळ किलबिलाट ऐकते

चिमणचारा मग तयांस घालते

सरतो दिन अन पश्चिमा रंगते

थकली काया क्षणभर दंगते

पुनवेस टिपूर चांदणे दिसते

आठवांची माळ हळूच ओघळते

थेंब पावसाचे ओंजळीत धरते

तुषारांनी मुखकमल हे भिजते

गुज मनीमानसीचे कधी करते

हळव्या कातर भावनाही जाणते

रात्रंदिन बारोमास साथ करते

  ती माझी हक्काची खिडकी असते

    ती माझी हक्काची खिडकी असते

- स्नेहल मोडक

Monday, October 21, 2024

कोजागिरी - माउंट अबू

                   या कोजागिरी पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं नव्हतं. पण पौर्णिमा जवळ आली आणि माझं मन श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आसुसलं. पण यावेळी गिरनारला न जाता दुसऱ्या गुरुशिखराचं दर्शन घडावं अशी इच्छा होती. त्यानुसार माउंट अबूमधल्या गुरुशिखराचं दर्शन घ्यायला जायचं ठरवलं. पण कोजागिरी जेमतेम १०-१२ दिवसांवर आली होती. त्यामुळे रेल्वेचं थेट माउंट अबूचं तिकीट मिळत नव्हतं. विमानानं जायचं तर उदयपूर ला जावं लागणार होतं. तिथून गाडीची व्यवस्था करावी लागणार होती. मग त्यातून मार्ग काढत अहमदाबाद पर्यंत रेल्वेने जायचं आणि तिथून पुढं गाडीनं फिरायचं ठरवलं आणि तशी तिकीटं काढली. 

                   ठरल्याप्रमाणं रात्रीच्या ट्रेनने आम्ही लेकीसह अहमदाबादला निघालो. सकाळी लवकर अहमदाबादला पोहोचलो. तिथं गाडी आधीच तयार होती. त्या गाडीने लगेच पुढल्या प्रवासाला सुरुवात केली. एवढ्या लवकर मार्गात कुठेच चहा नाश्त्यासाठी हाॅटेल किंवा ढाबे सुरु नसल्यानं उशिराच चहा नाश्ता मिळाला. तो करुन माउंट अबूमधल्या हाॅटेलच्या रुमवर पोहोचलो. थोडं आरामात आन्हिकं आवरलीजेवण केलं आणि माउंट अबू फिरायला निघालो.

                   सर्वात आधी आम्ही इथल्या अतिशय प्राचीन अशा मंदिरात दर्शनासाठी गेलो. ' सर्वेश्वर रघुनाथ मंदिरमाउंट अबूमधलं ५५०० वर्षं प्राचीन मंदिर. या मंदिरात एकट्या श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. तसंच श्री रामराय इथं तपस्व्याच्या वेषात विराजमान आहेत. त्यामुळं रामानंद संप्रदायाच्या सांधूंकडून इथली पूजा केली जाते. या मंदिराची रचना एखाद्या महालासारखी आहे. य मंदिराच्या प्रांगणात एक जलकुंड आहे. श्री रामरायानी इथं स्नान केलं होतं त्यामुळं हे जल औषधी आहे अशी मान्यता आहे. आम्ही इथं दर्शनासाठी आलो तेव्हा फारशी गर्दी नव्हती त्यामुळं शांत वातावरणात अतिशय सुंदर असं श्रीरामरायाचं दर्शन घडलं. 

                   रघुनाथ मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पुढं मंदिराजवळच असलेला 'नक्की लेकबघायला गेलो. पण तापत्या उन्हामुळं तलावाजवळ पर्यटकांची वर्दळ तर नव्हतीच पण आजूबाजूची बरीचशी दुकानंही बंदच होती. त्यामुळं तिथं एक फेरी मारुन आम्ही पुढं निघालो. माउंट अबूमधल्या एका शक्तीपीठाच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. पण तिथंही खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागणार होतं. त्यामुळं पायथ्याशी थोडं थांबून पुढं निघालो. इथून आम्ही वन्यजीव अभयारण्य बघायला गेलो. 

                   'वन्यजीव अभयारण्यआणि ' ट्रेव्हर्स टॅंक' - माउंट अबूमधलं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण. 'सिरोहीचे तत्कालीन महाराज 'महाराव केसरी सिंहजी बहादुरयांनी ही भूमी आपला ब्रिटिश इंजिनिअर मित्र ' ट्रेव्हर ' याला भेट दिली होती. त्याच ट्रेव्हर यांनी त्या भूमीत वन्यजीव अभयारण्याची निर्मिती केली आणि त्यातच एक विशाल जलाशय १८९७ साला मध्ये बांधला. त्यांच्या नावावरुनच या जलाशयाला 'ट्रेव्हर्स टॅंकहे नांव देण्यात आलं. हा जलाशय मगरींसाठी संरक्षित आहे. या अभयारण्यात बिबट्यास्लाॅथबियरजंगली अस्वलंचिंकाराकाळ्या रंगाचे कोल्हे असे विविध प्राणी पहायला मिळतात. तसंच अनेकविध पक्षी आणि वृक्ष वनस्पती बघायला मिळतात. इथं प्रवेशफी भरुन प्रवेश मिळतो. तसंच वेगळी प्रवेशफी भरुन आपली गाडी घेऊनही अभयारण्यात फिरता येतं. त्याप्रमाणं आम्ही आमच्या गाडीनंच अभयारण्यात फिरलो. आतमध्ये असलेल्या 'ट्रेव्हर्स टॅंकजवळ पोहोचलो. त्या जलाशयाजवळ आमच्याशिवाय कुणीही नव्हतं. साहजिकच आम्हाला तिथली असीम शांतता अनुभवायला मिळाली. त्या शांततेत मधूनच ऐकू येणारा पक्ष्यांचा किलबिलाट अगदी ऐकत रहावा असाच. अगदी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याचा एक सुंदर अनुभव. विस्तिर्ण जलाशय आणि त्यात असलेले रंगबिरंगी कोई मासे आणि त्या जलाशयात काठावरच्या वृक्षराजींचं पडलेलं सुंदर प्रतिबिंब अगदी मंत्रमुग्ध होऊन बघत होतो आम्ही. कितीही वेळ बघितलं तरी समाधान होतच नव्हतं. अखेर अभयारण्य बंद होण्याची वेळ होत आली आणि आम्ही तिथून परत आलो. 

                   यानंतर आम्ही परत 'नक्की झीलइथं गेलो. या नक्की तलावाच्या निर्मिती बद्दल काही आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार देवांनी आपला शत्रू बश्कली राक्षसापासून वाचण्यासाठी या तलावाची निर्मिती केली. तर दुसरी आणि सुरस अशी आख्यायिका सांगितली जाते. ५,००० वर्षांपूर्वी राजाने आपल्या राजकुमारीच्या विवाहासाठी अशी अट ठेवली होती की जो कुणी एका रात्रीत आपल्या नखांनी खोदून तलाव निर्माण करेल त्याच्याशी राजकन्येचा विवाह होईल. 'रसिया बालमयाने ही अट पूर्ण केली आणि तलावाची निर्मिती केली. म्हणून या तलावाला 'नक्की तलावहे नाव मिळालं. आम्ही इथं पोहोचलो तेव्हा सायंकाळ झाली होती आणि त्यामुळं पर्यटकांची गर्दी झाली होती. मग अगदी थोडावेळ तिथं थांबून आम्ही हाॅटेलमध्ये परत आलो.

                   पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे १७ तारखेला सकाळी लवकरच आम्ही गुरुशिखराच्या दर्शनासाठी निघालो. 'गुरुशिखर' - 'राजस्थानमधल्या 'अरवलीपर्वतरांगेमधलं 'माउंट अबूहे सर्वात उंच थंड हवेचं ठिकाण. इथून १५ किमी.अंतरावर 'सिरोहीगावात ५६५० फूट ऊंचावर असलेलं हे 'गुरुशिखर'. अशी मान्यता आहे की श्री दत्तात्रेयांनी आपलं पहिलं पाऊल इथं ठेवलं होतं आणि काही काळ इथं तपस्या केली होती. त्यामुळं श्री दत्तात्रेयांच्या चरणस्पर्शानं पावन पवित्र असं हे स्थान सर्व दत्त भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पायथ्यापासून अगदी शिखरापर्यंत हिरवीगार वृक्षराजी इथं आहे. अतिशय उंचावर असल्यानंच राजस्थानमधल्या तप्त वातावरणातही हे एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. गुरु शिखराच्या पायथ्यापर्यंत वाहनानं जाता येतं. तिथून वरती शिखरावर ३०० पायऱ्या चढून जावं लागतं. आम्ही आमच्या गाडीने पायथ्याशी पोहोचलो. साधारण पन्नास एक पायऱ्या चढून गेलो आणि मंदिराच्या समोरच पोहोचलो. इथं श्री दत्तात्रेयांचं मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर लक्षात आलं की हे मंदिर गुहेतच आहे. अतिशय भव्य अशा पाषाणातल्या या मंदिरात जाण्यासाठी कपारीतच १०-१२ पायऱ्या तयार केल्यात. त्या चढून गेल्यावर छोटासा गाभारा आणि त्यात विराजमान असलेली श्री दत्तात्रेयांची रेखीव मूर्ती. असं या मंदिराचं वेगळंच स्वरुप आहे. आम्ही मंदिरात पोहोचलो आणि श्री दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक झालो. मन अपार शांत झालं. श्री दत्तात्रेयांच्या मूर्ती बरोबरच तिथं भगवान महादेवही विराजमान आहेत. समोर नंदीही आहे. अतिशय शांत पवित्र अशा स्थानाचं दर्शन घडल्यानं मन अगदी प्रसन्न झालं. डाव्या बाजूला श्री दत्तात्रेय विराजमान आहेत आणि खाली उतरुन उजव्या बाजूला अखंड धुनी आहे. दोन्ही दर्शन घेऊन पुढे उरलेल्या अडिचशे पायऱ्या चढून प्रत्यक्ष गुरुशिखरावर पोहोचलो. इथं एका पाषाणातच लहानसं घुमटाकार मंदिर आहे. या मंदिरात श्री दत्तात्रेयांच्या चरणपादुका आहेत. श्री दत्तात्रेयांची चांदीची मूर्ती आणि मूर्तीपुढे कुंकुम विलेपित चरणपादुका आहेत. मंदिर अगदी छोटंसं असल्यानं आतमध्ये जाता येत नाही दारातूनच दर्शन घ्यावं लागतं. प्रत्येक दत्तभक्तासाठी हे चरणपादुकांचं दर्शन अतिशय महत्त्वाचं असतं. आम्ही सकाळी लवकरच गेल्यानं तिथं फारसे भाविक नव्हते. त्यामुळं आम्हाला अतिशय सुंदर दर्शन घडलं. मी चरणपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि दत्तगुरुंनी सुंदर दर्शन घडवल्याच्या जाणीवेनं मन तृप्त झालं. माउंट अबूमधल्या गुरुशिखराच्या दर्शनाची आस कोजागिरी पौर्णिमेला स्वयं श्री दत्तगुरुंनी पूर्ण केली होती. या मंदिराच्या थोडं पुढे अत्रिऋशी आणि अनुसया माता यांची मंदिरं आहेत. पण तिथपर्यंत जाण्यासाठीचा मार्ग सध्या चांगला नसल्याचं पंडितजीनी सांगितलं. त्यामुळं त्या मंदिरात न जाता शिखरावरुनच नमस्कार केला. मंदिराबाहेरचा परिसर मोठा आहे. इथं असलेल्या भव्य घंटेचा तीनदा नाद केल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. घुमटीबाहेर आम्ही नेहमीप्रमाणं थोडं गुरुचरित्राचं वाचन केलं. त्या शांत पावन पवित्र मंदिरातून परत निघावसंच वाटत नव्हतं. बराचवेळ तिथं थांबून अखेर परत निघालो.

                   गुरुशिखर दर्शन घेऊन आम्ही तिथून ७ किमी. अंतरावर असलेल्या एका 'पार्कमध्ये गेलो. 'ब्रमहकुमारी पीस पार्क' - गुरुशिखर आणि अचलगड या दोन पर्वतांच्या मध्ये वसलेलं हे पार्क ब्रम्हकुमारी मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर आहे. शहरी गजबजाटापासून दूर शांत वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी याची निर्मिती केली आहे. इथं प्रवेश करताच एक राॅक गार्डन समोर येतं. इथं राज योग ध्यानाची माहिती लघु चित्रणाद्वारे तसंच ब्रम्हकुमारींद्वारे दिली जाते. आम्ही इथं गेलो आणि थोडी माहिती ऐकून पुढे निघालो. इथं बाबा अमरनाथ गुंफा आणि शिवलिंग तयार केलंय ते पाहून पुढं बागेत फिरायला गेलो. बागेत फिरायला छान पायवाट आहे आणि तिच्या दोन्ही बाजूला उंच उंच वाढलेल्या जास्वंदीचं दाट कुंपण आहे. गुलाब वाटिकाही सुंदर आहे. शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. एका भागात मुलांसाठी खेळण्याची साधनं आहेत. अतिशय सुंदर स्वच्छ आणि रंगबिरंगी फुलांनी सजलेली ही बाग पहाण्यासारखीच आहे.

                   यानंतर आम्ही माउंट अबू मधला एक प्राचीन किल्ला बघायला गेलो. 'अचलगड किल्ला' - परमार वंशाच्या राजानी ९०० ई. मध्ये हा किल्ला बांधला. त्यानंतर १५ व्या शतकात मेवाडचे प्रसिद्ध राजा महाराणा कुंभा यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. मात्र आता किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार सोडल्यास आतमध्ये किल्ल्याचा कुठलाच भाग शिल्लक नाही. प्रवेशद्वार मात्र अजूनही सुस्थितीत आहे. इथूनच आत जाऊन दो किमी.वर साधारण ४०० पायऱ्या चढून 'चामुंडा मातामंदिर आहे. हे जवळपास ५,००० वर्षं पुरातन मंदिर आहे. इथून जवळच डोंगरात 'कालीमातेचही मंदिर आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तिथल्या स्थानिक लोकांच्या जीपने किंवा चालत जाता येतं. मात्र रस्ता खडी चढण आणि अरुंद आहे. आम्ही जीपने मुख्य प्रवेशद्वारापर्यंत गेलो. किल्ल्याचं प्रवेशद्वार बघून पुढे चामुंडा माता मंदिरात ४०० पायऱ्या चढून दर्शनासाठी गेलो. इथही गर्दी नसल्यानं चामुंडा मातेचं खूप छान दर्शन झालं. दर्शन घेऊन पायऱ्या उतरुन प्रवेशद्वाराजवळ आलो आणि जीपने परत खाली आलो. 

                   किल्ल्याच्या पायथ्याशी जवळच असलेल्या अजून एका प्राचीन आणि अबूमधल्या अतिशय महत्त्वाच्या मंदिरात गेलो. 'अचलेश्वर महादेव मंदिर'- पौराणिक कथेनुसार माउंट अबूच्या सिरोही गावातील अचलगढ हे ऋषी वसिष्ठ यांचं तपस्थान. असं सांगतात कि त्या पौराणिक काळात अचलगड इथं मोठी ब्रह्मखाई होती. आणि ऋषी वसिष्ठ यांच्याकडची गाय या खाईत पडली. म्हणून ऋषींनी देवांना ही खाई बुजविण्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा देवांच्या आज्ञेनुसार अर्बुद नावाच्या नागानं ती खाई बुजविण्यासाठी अख्खा पर्वत आपल्या पाठीवरून नेला. पण त्याला त्या गोष्टीचा गर्व झाला आणि त्यामुळं तो पर्वत हलू लागला. ऋषीगणांनी तो पर्वत स्थिर रहाण्यासाठी पुन्हा देवांना प्रार्थना केली. तेव्हा महादेवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं तो पर्वत तोलून स्थिर केला. या मंदिरातही एक नैसर्गिक खड्डा आहे आणि त्यात महादेवांच्या पायाच्या अंगठ्याचा पाषाणाचा आकार आहे जो अंगठा महादेवांनी काशीमध्ये बसून पर्वताला लावला होता. आणि यावरुन या स्थानाला 'अचलगडहे नाव मिळालं. मंदिरात प्रवेश करण्याआधी प्रांगणात पंचधातूचा चार टन वजनाचा भव्य नंदी आहे. आम्हाला इथंही महादेवाचं खूप छान दर्शन झालं. 

                   इथून जवळच एक तलाव आहे. कथेनुसार हा शुध्द तुपाचा तलाव होता. त्यावेळी केल्या जाणाऱ्या यज्ञात या तलावातील तुपाची आहुती दिली जात असे. पण तीन राक्षस महिषी रुप धारण करुन रोज रात्री या तलावातील तुप प्राशन करत असत. जेव्हा राजा आदिपाल याला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने एका रात्री एकाच बाणात त्या तिन्ही राक्षसांना मारलं. आता तो तलाव पाण्यानं भरलेला असून एका काठावर तीन महिषींच्या मूर्ती ठेवल्या आहेत. आम्ही हे सगळं बघून आम्ही हाॅटेलमध्ये परत गेलो. 

                   परत सायंकाळी अर्बुदा देवीच्या दर्शनासाठी निघालो. आदल्या दिवशी पायथ्याशी जाऊन परत आलो होतो. आता मात्र मंदिरात निघालो. मंदिरात पोहोचायला ४०० पायऱ्या चढून जावं लागतं. हे मातेचं शक्तीपीठ आहे. सतीचे अधर इथं पडल्यानं या मंदिराला 'अधरदेवीमंदिर असं म्हणतात. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात 'कात्यायनीदेवीची गुप्त पूजा केली जाते. कारण अधरदेवीला कात्यायनीचं शक्तीपीठ असंही म्हणतात. या मंदिराची कहाणी दोन बहिणींशी जोडलेली आहे. अधरदेवी देवीचं सहावं रुप कात्यायनी आणि अबूच्या पुढे गुजरातच्या सीमेजवळची अंबाजी माता हेही शक्तीपीठ आणि देवीचं आठवं रुप महागौरी म्हणून ही दोन्ही स्थानं एकमेकांशी संबंधित आहेत. इथही फारशी गर्दी नव्हती. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. 

                   यानंतर आम्ही 'दिलवाडा जैन मंदिर' बघायला गेलो. हे मंदिर बघून या मंदिराच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यानं जवळजवळ दोन किमी. आत चालत जाऊन अजून मंदिरं बघितली. इथं नक्की तलावाची निर्मिती करणाऱ्या रसिया बालम आणि राजकन्या सिध्देश्वरी यांची समोरासमोर मंदिरं आहेत. तसंच भगवान विष्णूंचं ५००० वर्षं प्राचीन लहानसं मंदिर आहे. आम्ही या मंदिरात पोहोचलो तेव्हा बाहेर हलका संधीप्रकाश होता आणि मंदिरात एक कमी उजेडाचा दिवा. यामुळं हे प्राचीन मंदिर पहाताना काही वेगळीच जाणीव होत होती. मंदिरात आमच्याशिवाय कुणीच नव्हतं. इथं दर्शन घेऊनरसिया बालम चं दर्शन घेऊन सिध्देश्वरी मंदिरात गेलो. राजानं राजकन्येच्या विवाहासाठी एका रात्रीत नखांनी तलाव खोदायचा आणि सुर्योदयापूर्वी विवाहासाठी उपस्थित रहायचं अशी अट घातली होती ती पूर्ण करुन रसिया बालम राजाकडे येत असतानाच राणीला हा विवाह मान्य नसल्यानं तिनं विघ्न आणण्यासाठी कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला आणि सूर्योदय झाला अस समजून हा विवाह झालाच नाही. हे दोघं शिव पार्वती किंवा विष्णुचा अंश मानले जातात. त्यामुळं इथं विवाहेच्छुक युवक युवती आवर्जून दर्शनासाठी येतात. 

                   तिसऱ्या दिवशी १८ तारखेला सकाळी आम्ही हाॅटेल सोडून निघालो. तिथून दिड तासावर राजस्थान गुजरात सीमेवर असणाऱ्या अजून एका मोठ्या शक्तीपीठाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो : 'अंबाजी मातामंदिर - इथं सतीदेवीचं हृदय पडलं असं मानतात. त्यामुळं या मंदिरात देवीची मूर्ती नाही तर श्रीयंत्र आहे. या देवीचं मूळपीठ स्थान गब्बर पर्वतावर आहे. या पर्वतावरील मंदिरात जाण्यासाठी एक हजार पायऱ्या चढून जावं लागतं. किंवा रोपवेनं जाता येतं. आम्ही रोपवेनंच या मंदिरात गेलो. इथं भाविकांची थोडी गर्दी होती पण तरीही शांतपणे खूप छान दर्शन झालं. इथं दर्शन घेऊन आम्ही अहमदाबादला निघालो. इथूनच आमची परतीची ट्रेन होती. 

                   माउंट अबूला गुरुशिखर दर्शनासाठी जायची इच्छा तर दत्तगुरुंनी पूर्ण केली होतीच पण त्याचबरोबर देवीच्या दोन शक्तीपीठांचंही दर्शन घडवलं होतं. आणि माउंट अबूमधल्या स्थलदर्शनाचाही आनंद मिळाला होता.

- स्नेहल मोडक



  

  

  

  


  


  


कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...