Pages

Monday, March 28, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ४

                 आठव्या दिवशी दुपारी आम्ही उज्जैन ला पोहोचलो. मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर उज्जैन (उज्जयिनी). क्षिप्रा नदीतीरावर वसलेलं हे ऐतिहासिक शहर पूर्वी विक्रमादित्य राजाची राजधानी म्हणून ओळखलं जात होतं. तसंच महाकवी कालिदासांची ही नगरी. सम्राट विक्रमादित्य राजाच्या नवरत्नांपैक एक कालिदास. त्यांना उज्जयिनी नगरी अतिशय प्रिय होती. मेघदूतामध्ये कालिदासांनी उज्जैनचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. 

                 मंदिरांचं शहर म्हणूनही उज्जैन ओळखलं जातं. कारण इथे अनेक प्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर मंदिरं आहेत. दर १२ वर्षांनी इथं सिंहस्थ कुंभमेळा भरतो. त्यासाठी जगभरातून लोक येतात. इथलं सर्वात महत्त्वाचं मंदिर म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महाकालेश्वराचं मंदिर. हे मंदिर रुद्रसागर सरोवराच्या किनारी आहे. असं म्हटलं जातं की अधिष्ठ देवता भगवान शिव स्वत: या लिंगात स्वयंभू रुपात स्थापित आहेत.म्हणून या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवपुराणानुसार एकदा ब्रम्हा, विष्णू आणि महेश याच्याच चर्चा सुरु होती. तेव्हा भगवान शंकरांच्या मनात ब्रम्हा आणि विष्णूची परिक्षा घ्यावी असा विचार आला. त्यांनी दोघांना प्रकाशाचा अंत कुठे ते शोधण्यास सांगितलं. त्यासाठी शंकरानी एक स्तंभ उभा केला व त्याचं टोक शोधण्यास सांगितलं. दोघांनी खूप प्रयत्न केला. अखेर विष्णूंनी हार मान्य केली. पण ब्रम्हा खोटं बोलले. शंकरानी त्यांना तुझी कुणीही पूजा करणार नाही असा शाप दिला. ब्रम्हानी क्षमायाचना केल्यावर शिव स्वत: त्या स्तंभात विराजमान झाले. हा स्तंभ म्हणजेच ज्योतिर्लिंग.या स्तंभाचं शिवलिंगात रुपांतर झालं आणि त्यास विशेष महत्व प्राप्त झाल.

                याशिवाय इथे असलेलं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे मंगळ ग्रहाचं मंगळनाथ मंदिर. या मंदिरात 'भात पूजा' केल्यास मंगळ ग्रहाचे कुंडलीत असलेले सारे दोष नाहीसे होतात अशी श्रद्धा आहे. अजून एक महत्त्वाचं स्थान म्हणजे सांदिपनी आश्रम. कृष्ण आणि बलराम मथुरेहून सांदिपनी ऋषींच्या या आश्रमात अध्ययनासाठी आले होते. ६४ कला आणि १६ विद्या यांचं ज्ञान कृष्णाने ६४ दिवसांत घेतलं असं मानतात. गुरु सांदिपनी स्नानासाठी रोज त्यावेळच्या लखनौ येथे गोमती नदीवर जात असत. म्हणून कृष्णाने बाण मारुन कुंड निर्माण केलं आणि मग त्यात गोमती नदी अवतीर्ण झाली. हे पवित्र कुंड आजही आश्रमात आहे.  

              याशिवाय इथलं अजून एक महत्त्वाचं मंदिर म्हणजे कालभैरव मंदिर. पौराणिक कथेनूसार ब्रम्हदेवाने शिवशंकरांचा अपमान केला. त्यामुळं क्रोधित झालेल्या शिवाच्या क्रोधातून काळ्या रंगाच्या भैरवाची उत्पत्ती झाली. भैरवानं शिवनिंदा करणारं ब्रम्हाचं पाचवं मस्तक छाटलं. त्यामुळे ब्रम्हहत्येचं पातक घडलं. त्यातून मुक्ती मिळण्यासाठी भैरव ते शीर तळहातावर घेऊन सर्व तीर्थक्षेत्र फिरले. अखेर काशीला गेल्यावर त्यांच्या हातून ते शीर गळून पडलं आणि त्यांना ब्रम्हहत्येच्या पापातून मुक्ती मिळाली. जिथं ते शीर गळून पडलं ते स्थान कपालमोचनतीर्थ म्हणून ओळखलं जातं. काशीला गेल्यावर आधी कालभैरवाचं दर्शन घेऊन मग महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि परत कालभैरवाचं दर्शन घ्यायचं अशी प्रथा आहे. त्याच कालभैरवाचं मंदिर उज्जैनला आहे. तसचं बऱ्याच ठिकाणी कालभैरव मंदिर आहे. 

               याचबरोबर क्षिप्रा नदीघाट, सिध्दवट मंदिर, गढ कालिकामाता मंदिर, हरसिध्दी मंदिर अशी बरीच मंदिरं उज्जैन मध्ये आहेत त्या सर्वांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.

               परिक्रमा सुरु होऊन आठ दिवस झाले. खरंच कधी संपले हे आठ दिवस कळलंही नाही. रोज नवं स्थलदर्शन, तिथलं स्थानमहात्म्य, प्रत्येक ठिकाणी मैयाचं बदलतं तरीही हवंहवंसं वाटणारं रुप, सगळेजणं परिक्रमेत इतके दंग झालो होतो की वाढत्या उन्हातही सगळीकडे उत्साहाने फिरत होतो. सुरुवातीचे ५-६ दिवस उन सुसह्य होतं. आता मात्र उन्हाचा तडाखा फारच वाढायला लागला होता. गाडीतून उतरलं की सगळ्यांच्या नजरा जणू अगदी काकदृष्टीने दुकानं शोधत असत. फळं, ताक, लस्सी, सरबत, उसाचा रस जे मिळेल ते घेऊन उन्हाची तलखी कमी करण्याचा सतत प्रयत्न करत होतो. अजून जवळपास अर्धी परिक्रमा बाकी असल्याने कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत होतो. वाढत्या उन्हाचा आम्हाला जरी त्रास होत असला तरी सृष्टीला मात्र वसंताची चाहूल लागली होती. रखरखत्या उन्हात आजूबाजूला खूप सारे पलाशवृक्ष बहरलेले दिसत होते. पेटत्या ज्वालेसारखी केशररंगी फुलं उन्हातही अतिशय सुंदर दिसत होती.  बोगनवेलीही रंगिबेरंगी फुलांनी बहरल्या होत्या. आम्रमोहोराचा मंद गंध दरवळत होता. पहाटसमयी कोकळकुजनही ऐकू येत होतं.रस्त्याच्या दोन्ही बाजूला नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेली गव्हाची कापणीला आलेली सोनेरी शेती होती. वाऱ्यावर डोवणारं ते सोनसळी पिक नजरेलाही सुखावत होतं. अर्थातच आमचा उत्साहही त्यामुळे वाढत होता.

               नवव्या दिवशी सकाळी आम्ही पोहोचलो नेमावरला. पुराणकाळात नेमावर नाभीपूर या नावानं ओळखलं जात होतं. नर्मदेचं हे नाभिस्थान मानलं जातं. इथे अतिशय प्राचीन असं सिध्दनाथ मंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्थापना सत्ययुगात  ऋषी सनक, सनन्दन, सनातन आणि सनतकुमार या ऋषींनी केली होती, त्यावरुनच सिध्दनाथ हे नांव मिळालं. पापनाशन करणारं सिध्दनाथ तीर्थस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या वरच्या बाजूला ओंकारेश्वर आणि खालच्या बाजूला महाकालेश्वर हि मंदिरं येतात. आजुबाजुच्या पर्वतातील गुहा, कपारी मध्ये साधना करणारे साधक इथे नर्मदा स्नानासाठी येतात. इथे नर्मदेचं अतिशय विशाल, शांत सुंदर पात्र आहे. इथून पुढे सलकनपूरला देवीचं प्रसिद्ध मंदिर आहे. रोपवेने किंवा जीपने किंवा पायऱ्या चढून इथं जाता येतं. माॅं विजयासन देवीचं हे सुंदर मंदिर आहे. आम्ही रोपवेने जाऊन या देवीचं दर्शन घेऊन परत आलो.

  

  

  

  

- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...