Pages

Wednesday, March 30, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग ६

               बाराव्या दिवशी सकाळी दिड किमी अंतर चालून माई का बगिया येथे गेलो. ही बाग नर्मदा मैयाला समर्पित केलेली आहे. अतिशय सुंदर घनदाट अशी ही बाग आहे. या बागेत आंबा, जांभूळ यासारखी फळझाडं, औषधी वृक्ष आणि वनस्पती, आणि विविध फुलझाडं आहेत.  

              यातलं सगळ्यात महत्त्वाचं फुलं म्हणजे गुलबकावली. याची निर्मिती इथं झाली असं म्हणतात. हे डोळ्यांच्या आजारांवर तसंच इतर रोगांवर अतिशय औषधी म्हणून उपयुक्त आहे. हे हळद, आलं या वनस्पती कुळातलं झाड आहे. याला आपल्याकडे सोनटक्का या नावानं ओळखलं जातं. अतिशय सुगंधी आणि विविध रंगातली ही फुलं सायंकाळी उमलून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोमेजून जातात. औषधीद्रव्यांबरोबरच या फुलांपासून सुगंधी द्रव्यंही बनवतात.

              या बागेतच तिथल्या गुरुजींकडुन आम्ही मैयाची पूजा आरती केली. कन्यापूजन केलं आणि तटपरिवर्तनही केलं. 

               तटपरिवर्तन करुन सिध्द शोणाक्षी दर्शन घेतलं. सिध्द शोणाक्षी हे एक शक्तिपीठ आहे. प्रजापती दक्ष यांची कन्या सती हिचा विवाह भगवान शंकरांबरोबर झाला. राजा दक्ष यानी आरंभलेल्या एका यज्ञात त्यानी शिवांना आमंत्रित न करुन अपमानित केलं. हा अपमान सतीमातेला  सहन झाला नाही आणि तिने प्रज्वलित यज्ञात उडी घेतली.भगवान शंकराना हे कळताच त्यांनी वीरभद्र  गणांना पाठवून यज्ञ स्थान नष्ट केलं आणि राजा दक्षांचा शिरच्छेद केला. आणि भगवान शिव सतीचा यज्ञात जळालेला देह हातावर घेऊन शोकातिरेकाने सैरावैरा फिरु लागले. त्यावेळी सतीमातेच्या देहाचे अवयव आणि अंगावरील आभुषणे ज्या ज्या स्थानी पडली त्या त्या स्थानी सतीमातेचं एकेक शक्तिपीठ निर्माण झालं. अमरकंटकमधील नर्मदेच्या उगम स्थानी शोणदेश या स्थळी सतीमातेचं उजवं नितंब पडलं आणि तिथे तिचं शक्तिपीठ निर्माण झालं, अशी पुराणकथा आहे. या शक्तिपीठाजवळच शोण नदीचं तीर्थस्थान आहे.

               या शक्तिपीठाजवळ एक हनुमान मंदिरही आहे. या त्रिलोचन संकटमोचन हनुमानाचं दर्शन घेऊन आम्ही दक्षिण तटावरुन परिक्रमा सुरु केली. 

               परत एकदा नर्मदा उगम मंदिरात जाऊन दक्षिण बाजूने दर्शन घेतलं. आदल्या दिवशी सायंकाळी या मंदिराच्या अर्ध्या भागातील मंदिरात गेलो होतो. आता उरलेल्या अर्ध्या भागातील मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि पुढे निघालो.

              मंडला शहरातील महाराजपूरम इथे बंजारा, नर्मदा आणि गुप्त सरस्वती या नद्यांचा संगम आहे. या त्रिवेणी संगमावरही सुंदर घाट आहे. नर्मदेच्या पलिकडच्या तीरावर मंडला किल्ला आहे. मात्र त्याची आता पडझड झाली आहे. घाटाच्या जवळच बुढी माता मंदिर आहे. घाटापासून थोड्या अंतरावर एक छानसं कृष्ण मंदिर आहे. हे सारं पाहिलं. मैयाची नित्यपूजा आरती केली. आणि पुढील प्रवासाला लागलो.

                रात्रभर प्रवास करुन तेराव्या दिवशी सकाळी नर्मदापूरम (होशंगाबाद) इथं पोहोचलो. नर्मदा नदीच्या दक्षिण तटावर हे शहर वसलंय. १५ व्या शतकांपूर्वी हे शहर नर्मदापुरम याच नावानं ओळखलं जात होतं. पण १५ शतकात मांडू या शहरातून इथे आलेल्या मुघल शासक होशंगशाह याच्या नावावरुन हे शहर होशंगाबाद या नावानं ओळखलं जातं होतं. मात्र मार्च २०२१ मध्ये भारत सरकारनं या शहराचं नर्मदापुरम असं पून्हा नामांतर केलं. 

                नर्मदेवर बांधलेल्या सुंदर घाटांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. सेठानी घाट हा त्यातील प्रसिद्ध घाट आहे. नर्मदा जयंतीला इथे खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करतात. भारतीय चलनी नोटांसाठी वापरला जाणारा कागद प्रामुख्यानं इथं बनवला जातो. इथे जवळच छोटी पर्वतराजी आहे. त्या पर्वतांमधल्या गुहांमध्ये शैलचित्रांची निर्मिती केलेली आहे. 

                नर्मदापुरमला मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन सारं आवरुन आम्ही शहरात फिरुन आलो. सायंकाळी सेठानी घाटावर नर्मदा आरतीसाठी गेलो. या घाटावरही रोज सायंकाळी नर्मदा मैयाची आरती केली जाते. तिथं पूजा आरती करुन परत आलो, मुक्काम केला.

                चौदाव्या दिवशी सकाळी सारं आवरुन ओंकारेश्वर ला निघालो. वाटेत खांडवा येथे दादाजी धुनीवाले यांच्या समाधीचं दर्शन घेतलं. 

                दादाजी (केशवानंदजी महाराज) यांचा मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील साईखेडा या छोट्याशा गावात एका वृक्षातून जन्म झाला असं सांगतात. त्यांनी नुसत्या हाताने पवित्र अग्नी ( धुनी ) प्रज्वलित केला होता असं सांगतात. नंतर ते साईखेडाहून खांडवा येथे आले. तिथेही त्यांनी धुनी प्रज्वलित केली होती. देशासाठी धर्मजागृती करणं हे त्यांचं जिवीत कार्य होतं. ते सदैव अखंड धुनीसमोरच बसलेले असत. त्यावरुनच त्यांना धुनीवाले दादाजी हे नांव मिळालं. समाधीचं दर्शन घेऊन पुढे आम्ही ओंकारेश्वर ला पोहोचलो.

                मैयाची पूजा आरती करायला वेळ असल्याने आम्ही ओंकारेश्वर शहरात थोडसं फिरुन आलो. ओंकारेश्वरलाच मुक्काम केला.




- स्नेहल मोडक

No comments:

Post a Comment

कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...