Pages

Friday, December 29, 2023

दत्तजयंती

                 मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती, साऱ्या दत्तभक्तांसाठी पर्वणी.  या जन्मसोहळ्याची आतुरतेनं वाट पहात असतात सारे दत्तभक्त. यावर्षी आलेल्या अधिक महिन्यामुळे आम्हाला दोन वेळा दत्तजयंतीला दर्शन घडलं. आमच्या गावाला टिळक पंचांग वापरत असल्यानं तिथला दत्तजन्मसोहळा एक महिना आधीच नोव्हेंबरमध्ये संपन्न  झाला होता. आणि निर्णयसागर पंचांगानुसार दत्तजयंती डिसेंबर महिन्यात नुकतीच संपन्न झाली. त्यामुळे आम्हाला यावर्षी आधी गावाला आणि आता गिरनारला दत्तजयंतीला जाण्याचं भाग्य लाभलं. गेल्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये गिरनार गुरुशिखर दर्शन, परिक्रमा, दत्तजयंती आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन एवढं एकत्र मोठं भाग्य आम्हाला लाभलं होतं. 

                  गिरनारसाठी ठरल्याप्रमाणे दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही रेल्वेने जुनागढला निघालो. यावेळी आम्हा सर्वांचीही तिकीटं RAC होती. त्यामुळे पूर्ण प्रवास थोडासा त्रासदायकच झाला. पहाटे नेहमीच्या वेळेत जुनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला मुक्कामी गेलो. 

                  नित्याप्रमाणे पहिली पायरी आणि लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यामुळे रोपवे साठी प्रचंड मोठी रांग लागली होती. रोपवे च्या प्रवेशद्वाराच्या बाहेर रस्त्यावर एक मोठा मंडप उभारण्यात आला होता. त्यात दिडशे-दोनशे लोकांना रांगेत बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तो मंडप पूर्ण भरुन बाहेर भलीमोठी रांग होती. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरही बरंच फिरुन मग ती रांग ट्राॅलीजवळ पोहोचत होती. हे सारं पाहून आम्हाला रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचायला किती वाजणार अशी काळजी वाटत असतानाच आमचे काही परिचित रांगेत खूप पुढे उभे होते त्यांच्याबरोबर जायची परवानगी आम्हाला मिळाली आणि आम्ही लवकरच अंबाजी टुकवर पोहोचलो.

                  नेहमीप्रमाणेच यावेळीही गिरनार अप्रतिम सौंदर्याने सजला होता.  उदयाचली आदित्यराजाचं नुकतच आगमन झालं होतं. सारी पर्वतशिखरं सोनकिरणानी चमचमत होती. क्षितिजरेखा आणि पर्वतांच्या मध्ये एक दाट पांढराशुभ्र पट्टा तयार झाला होता. अतिशय वेगळं दृश्य होतं ते. हा अद्भुत नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात साठवतच 

अंबामातेचं दर्शन घेऊन पुढे चालायला सुरुवात केली.

                   गेल्या महिन्यातील परिक्रमेनंतर याची तब्येत तितकीशी ठिक नव्हती. वाढलेल्या रक्तदाबामुळे सरळ रस्त्याने चालतानाही अधुनमधून झोक जात होता. इथे तर पायऱ्या चढा-उतरायच्या होत्या. त्यामुळे पायऱ्यांच्या बाजूचा कठडा आणि माझा आधार घेत सावकाश पायऱ्या चढायला सुरुवात केली. अगदीच झेपत नाही असं वाटलं तर डोली करायची असही ठरवलं. पण हळूहळू चढत गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. तिथे दर्शन घेऊन पुढे पायऱ्या उतरायला लागलो. थोड्या पायऱ्या उतरल्यानंतर उतरताना त्रास कमी होतोय असं त्याच्या लक्षात आलं आणि मग नेहमीसारखं सहज पायऱ्या उतरु लागलो. अंबामाता मंदिरापासून गोरक्षनाथ मंदिरापर्यंत पायऱ्या चढताना जो त्रास होत होता त्यामुळे माझ्या मनात मात्र त्रास असाच सुरु असेल तर पुढल्या पौर्णिमेला यावं की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. या विचारातच मी चालले होते. आणि अचानक समोरच्या दृश्याने माझं मन क्षणात भानावर आलं. माझ्या पुढेच एक नेत्रविहिन भाविक एका हातात त्यांची विशेष ओळख असलेली धातूची काठी आणि दुसरा हात सहचराच्या हाती धरुन अगदी सहजतेने पायऱ्या उतरत होती. मी अक्षरशः खिळून पायरीवरच थांबले. मी किती व्यर्थ चिंता करत होते याची क्षणात जाणीव झाली आणि माझी मलाच लाज वाटली. स्वयं श्री दत्तात्रेय काळजी घेत असताना आपण चिंता करायची बिलकुल गरज नाही याची जाणीव झाली. दुसऱ्याच क्षणी मी त्या भक्तांशी बोलून आदर व्यक्त करुन आणि मनोमन नमस्कार करुन पुढे गेले. केवळ कल्पनेनेच आणि थोडंसं स्पर्शाने सारं जग पहात असणारी ती गिरनारला एवढ्या पायऱ्या चढून केवळ मन:चक्षूंसमोर दिसणाऱ्या श्री दत्तात्रेयांच्या दर्शनासाठी आली होती. आपल्याला पादुका आणि त्रिमूर्तीचं दर्शन तर प्रत्यक्ष घडतं. पण मला वाटतं अशा व्यक्तींना घडणारं निर्गुण निराकार दर्शन हे जास्त सुंदर असतं कारण ते त्यांच्या अंतर्चक्षुंना दिसत असतं. केवळ अपार श्रद्धा, भक्ती आणि आनंद याच भावना त्यात असतात. आजवर गिरनारला अनेक वयोवृद्ध, अधू, अपंग भक्त दर्शनासाठी येताना पाहिले होते. पण नेत्रहिन भक्त याचवेळी पाहिला आणि खरंच आपण किती अकारण चिंता करतो, श्री दत्तगुरु सारी काळजी घेत असतानाही, या जाणीवेने क्षणभर अपराधीच वाटून गेलं. अध्यात्म आणि भक्तीच्या महासागरातील एक थेंब तरी आपण आहोत का हा प्रश्नच मनात आला.

                याच विचारात आम्ही कमानीच्या थोडं पुढे गेलो आणि दर्शनासाठी रांग लागली. रांगेतून हळूहळू पुढे चढून जात होतो. साधारण पाऊण तासातच आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. आत प्रवेश केला आणि मी पाणावलेल्या डोळ्यांनींच नतमस्तक झाले. बरोबर नेलेला नैवेद्य, पितांबर आणि अष्टगंध अर्पण केलं प्रसाद घेतला आणि क्षणार्धात आम्हाला एक गोष्ट जाणवली. श्री दत्तात्रेयांच्या पादुका नेहमीच अष्टगंध विलेपित असतात. यावेळी मात्र पादुकांना अष्टगंध विलेपन केलेलं नव्हतं. मी जेव्हा दत्तगुरुंना अर्पण करण्यासाठी पितांबर घेतला तेव्हा मला अष्टगंधही घ्यावं अशी मनात जाणीव झाली आणि मी तेही अर्पण करण्यासाठी घेतलं होतं. त्यादिवशी असलेल्या अष्टगंध विरहित पादुका आणि मी अर्पण केलेलं अष्टगंध याचा परस्परसंबंध आम्हा दोघांनाही जाणवला आणि अक्षरशः डोळ्यात पाणीच आलं. अशीच सेवा सदैव आमच्याकडून करुन घ्या अशी दत्तगुरुंना प्रार्थना करतच आम्ही बाहेर आलो. खरंतर अष्टगंध विलेपन करायचं राहून गेलं होतं. कारण मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस एक छोटीशी शिला आहे त्यासमोरच एक प्लास्टिक बाटली कापून त्यात थोडं अष्टगंध ठेवलेलं होतं. आणि अखंड धुनीजवळही भक्तांसाठी अष्टगंध आणि भस्म नेहमीप्रमाणे ठेवलेलं होतंच. पण मला जेव्हा ते घेऊन जायची आतून जाणीव झाली तेव्हा असं काही असेल अशी तीळमात्रही कल्पना नव्हती. 

                    दर्शन घेऊन थोड्या पायऱ्या उतरुन मध्ये एका ठिकाणी थोडीशी बसण्यासाठी जागा आहे तिथे गुरुचरित्राचं थोडं वाचन केलं. नंतर अखंड धुनीजवळ पोहोचलो. दत्तजयंतीच्या निमित्ताने इथली श्री दत्तात्रेयांची मूर्ती  भव्य आणि अप्रतिम अशा रजतसिंहासनी आसनस्थ झाली आहे. इथे दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही परत गोरक्षनाथ मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढायला सुरुवात केली. कमानीपर्यंत चढून आल्यावर याला पायऱ्या चढताना होणारा त्रास खूप कमी झाल्याचं जाणवलं. मग जरा भरभरच पायऱ्या चढून गोरक्षनाथ मंदिरात पोहोचलो. दर्शन घेऊन अंबाजी टुकवर आलो. पायथ्याशी जाण्यासाठी रोपवे ला गर्दी कमी होती त्यामुळे फार वेळ थांबावं न लागता लवकरच पायथ्याशी पोहोचलो. मात्र आम्ही दर्शन घेऊन पायऱ्या उतरायला सुरुवात केली तेव्हा दर्शन रांग कमानीच्या आधीच सुरु झाली होती आणि नंतर ती अंबामातेच्या मंदिरापासूनच सुरु झाली होती. 

                      पायथ्याशी पोहोचल्यावर भोजन करुन, रुमवर जाऊन थोडा आराम करुन सायंकाळीच परतीच्या प्रवासाला लागलो.

                       वर्षानुवर्षं दर पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी असंख्य दत्तभक्त जात असतात. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच आमचंही जाणं होत आहे. तब्येतीच्या किंवा इतर कुठल्याही कारणाने यात खंड न पडता गिरनार दर्शन असंच घडत रहावं, नित्य सेवा घडावी हीच दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Thursday, December 21, 2023

सख्य

कधी शांत नीरव रात्री मिटल्या नेत्री

स्वप्नांच्या दुनियेत फेर धरती नातीमैत्री

आकाशीचा चांदवा मीच मजला भासे

चमचमत्या चांदण्यांची सुंदर साथ असे

जाग येताच उघड्या नयनी उमगे सत्य

तारका होती विलग चंद्र एकलाच नित्य

कधी सांजवेळी मन हळवे कातर होते

अलगदच आठवांच्या गुंत्यात अडकते

कडुगोड आठवांचे पदर सोडवू पाहते

परि मनोवेदनेने गंगायमुनाच अवतरते

कधी निवांत क्षणी उलगडतो स्नेहमेळ

रंगतो सुरेख भावबंधांचा तयात खेळ

मनास लागता अवचित चाहूल कुठली

जाणवते हाती रिक्त ओंजळच उरली

अतीव जिव्हाळ्याचे सगेसोयरे असती

वाटे सुखदुःखात सारे सदैव साथ देती

परि आठवण आपली कुणासच नसते

परकेपणाच्या जाणीवेतच सख्य सरते

- स्नेहल मोडक

Wednesday, December 6, 2023

शब्द

शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी

भावनांचे अमृतकण गंधाळल्या शब्दावरी

कधी घालिती शब्द घाव हळव्या भावनांवरी

कधी घालिती शब्दच फुंकर विध्द मनावरी

शब्दातूंन शब्द वाढतो पडते नात्यात अंतर

शब्दांवीणच संवाद घडतो अन जुळते मैतर

कोलाहलातच शब्दांच्या मन होतसे व्याकूळ

कुजबुजती शब्दच अन मन होतसे घननीळ 

कधी शब्दच होती लाह्या अन तडतड उडती

कधी होती शब्द प्राजक्त हळूच सडा घालती

कधी शब्दच विद्युल्लता मनभावना जाळती

कधी होती शब्दच वीणा सप्तसूर झंकारती

शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी

भावनांचे अमृतकण गंधाळल्या शब्दावरी

- स्नेहल मोडक

Thursday, November 30, 2023

परिक्रमा

              जून महिन्याच्या सुरुवातीला जशी सगळेजणं वर्षाऋतूच्या आगमनाची चातकासारखी वाट पहात असतात तशीच जुलै महिना सुरु होताच साऱ्या दत्तभक्तांना ओढ लागते ती गिरनार परिक्रमेची

             दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही जून महिन्याअखेर पासूनच गिरनार दर्शन आणि परिक्रमेला जाण्यासाठी दत्तभक्त याच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधू लागले. प्रत्यक्ष परिक्रमा ही दीपावली नंतर कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीतच असली तरीही रेल्वेचं रिझर्व्हेशन चार महिने आधीच होतं. त्यामुळे जुलै महिन्यात हे रिझर्व्हेशन करावं लागतं. यावेळी आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांची संख्या जरा जास्तच झाली होती. एवढ्या भाविकांची सारी व्यवस्था करणं परिक्रमा काळात थोडं कठीण काम असतं. कारण या परिक्रमेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे तलेटीमधील साऱ्याच साधनांवर खूपच ताण येतो. एवढ्या साऱ्या भाविकांची रहाण्याची, जेवणखाण्याची उत्तम व्यवस्था होणं अशक्य असतं. त्यामुळे आम्ही आमच्या बरोबर येणाऱ्या भाविकांसाठी ही व्यवस्था वर्षभर आधीपासूनच करण्याच्या प्रयत्नात असतो. यावर्षी आमच्या बरोबर एकूण दोनशे भाविक येणार होते. जुलैमध्येच त्या साऱ्यांचं रेल्वेचं रिझर्व्हेशन केलं होतं. जुनागढला जाणारी एकमेव ट्रेन असल्याने अक्षरशः पाचव्या मिनिटाला रिझर्व्हेशन फुल होतं. यावेळी आमच्या बरोबर येणारे भाविक चार वेगवेगळ्या तारखांना येणार होते. त्यामुळे ज्यांना थेट जुनागढची तिकीटं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी दोन टप्प्यांत तिकीटं काढावी लागली.

             कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशीच एक गट जुनागढ तलेटीला पोहोचला. आम्ही कार्तिकी एकादशीच्या दिवशीच पहाटे जुनागढला पोहोचलो. परिक्रमा काळात होणाऱ्या अतिप्रचंड गर्दीमुळे वाहनं जुनागढहून तलेटीपर्यंत थेट जाऊ शकत नाहीत. एका ठराविक अंतरावर सारी वाहनं थांबवून परत पाठवतात. तिथून पुढे आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणी २-३ किमी अंतर पायी जावं लागतं. ही सारी कसरत करत आम्ही रुमवर पोहोचलो. आन्हिकं आवरुन लगेचच गुरुशिखर दर्शनासाठी निघालो. रिवाजानुसार लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे कडे गेलो. रोपवे ला बिलकुल गर्दी नसल्याने पाच मिनिटांतच आम्हाला रोपवे ने निघता आलं. अंबाजी टुकवर पोहोचलो तर तिथे मात्र प्रचंड गर्दी होती. शिखर दर्शन करुन येईपर्यंत ही गर्दी वाढतच होती. आम्ही कमानीपासून थोडं वर पोहोचल्यावर दर्शनासाठी रांगच सुरु झाली. रांगेतून हळूहळू पुढे जात मंदिरात प्रवेश केला. अतिशय गर्दीमुळे तिथले पंडितजी, पोलिस सारखं 'पुढे चला' चा गजर करत होते. पण का कुणास ठाऊक आम्ही दत्तात्रेयांसमोर येताच ते पंडितजी नेहमीप्रमाणेच शांत झाले. आम्ही पादुकांसमोर नतमस्तक झालो, नैवेद्य अर्पण केला आणि तृप्त मनाने पुढे सरकलो. एवढ्या गर्दीतही अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. दर्शन घेऊन खाली उतरुन अखंड धुनीजवळ आलो. तिथेही सुंदर दर्शन घडलं. दर्शन आणि प्रसाद घेऊन परत रोपवे जवळ आलो. पायथ्याशी पोहोचण्यासाठी मात्र मोठी रांग होती. पण आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलावलं त्यामुळे लगेचच रोपवेने जायला मिळालं.‌ रुमवर येऊन थोडा आराम केला. सायंकाळी भवनाथ महादेवाचं दर्शन घेऊन थोडं फिरुन आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे परिक्रमेसाठी जायचं असल्याने जरा लवकरच निद्रा देवीची आराधना केली. 

               कार्तिकी एकादशीला आम्हाला गुरुशिखर दर्शन घडलं होतं. दुसऱ्याच दिवशी आमची परिक्रमा होती. रात्री अडीच वाजताच उठून सारं आवरुन गटातील इतर साऱ्या भाविकांसह परिक्रमेसाठी निघालो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून परिक्रमेचं प्रवेशद्वार जवळपास दोन किमी वर होतं. सारेजणं एकत्र जमून तिथे पोहोचेपर्यंत नेहमीप्रमाणे वेळ गेलाच. त्यामुळे प्रत्यक्ष परिक्रमेसाठी सुरुवात करायला साडेचार वाजून गेलेच. परिक्रमेला सुरुवात केली आणि नेहमीपेक्षा जास्त गर्दी असल्याचं लक्षात आलं. गर्दीमुळे सुरुवातीपासूनच थोडं हळूहळू चालावं लागत होतं. मिट्ट काळोखात टाॅर्चच्या उजेडात एवढ्या गर्दीत सगळ्यांना एकत्र चालणं अशक्य होतं. साहजिकच सगळे हळूहळू मागेपुढे झाले. परिक्रमेच्या सुरुवातीचा ६-७ किमी. चा मार्ग गाडीरस्ताच आहे. पण चांगला चढाव आणि मग एकदम तीव्र उतार आहे. गर्दी आणि अंधार यामुळे हे चालणं थोडं त्रासदायक असतं. पण सवयीमुळे असेल कदाचित आम्हाला अजिबात त्रास न होता आम्ही हा टप्पा सहज पार करुन पुढच्या मातीच्या रस्त्याला लागलो. वाढत्या गर्दीमुळे भरभर चालण्यासाठी कसरतच करावी लागत होती. उजाडल्यावर गर्दीतून चालणं थोडं सोपं होईल असं वाटत होतं पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. 

               उजाडल्यावर साधारण ७.३० वाजता आम्ही थोडं बाजूला थांबून बरोबर नेलेला थोडासा कोरडा खाऊ खाल्ला आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. गर्दी बिलकुल कमी होत नव्हती. आमच्या मागून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच होती. आम्ही जीनाबाबा की गढीच्या आधी साधारण दिड किमी अंतरावर पोहोचलो आणि दिसली ती अजिबात पुढे न सरकणारी प्रचंड गर्दी. साहजिकच आम्हीही त्या गर्दीचा एक भाग झालो आणि गर्दी पुढे सरकण्याची वाट पहात, इकडून तिकडून काही मार्ग मिळतोय का पहात थांबलो. किमान अर्धा तास यात गेल्यावर गर्दी हळूहळू पुढे सरकू लागली. थोडं पुढे येताच नेहमीच्या जागेवर नागा साधू बसलेले दिसले. त्यांना चुकवत चुकवत कसंबसं पुढे गेलो. परिक्रमेच्या काळात खूप मोठ्या संख्येनं हे नागा साधू परिक्रमा मार्गात त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी येऊन बसतात. त्यांना चुकवत पुढे जाणं हे जरा कठीणच काम असतं. तिथून पुढे निघालो पण एकूणच गर्दी किंचितही कमी होत नव्हती. या गढीच्या पुढचा सारा रस्ता पूर्ण घनदाट जंगलातून जातो. मोठमोठ्या दगडधोंड्यातून मार्गक्रमण करावं लागतं. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि इथेही तीच परिस्थिती होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अलोट गर्दी होती. चालणं अशक्य होतं. मग आमच्या सह बऱ्याचजणांनी मुख्य पायवाट सोडून डोंगरात वरवर चढायला सुरुवात केली. अर्थात हा मार्ग अतिशय अवघड होता. वर चढताना वाटेतले दगडधोंडे चुकवत, मातीतून पाऊल घसरणार नाही याची काळजी घेत, काठीचा आणि वाटेतल्या झाडाझुडुपांचा आधार घेत आम्ही वर जात होतो. जिथे अजून वर चढणं अशक्य होतं तिथे कसरत करत खाली उतरत होतो. परत मुळ मार्गावरील गर्दीत सामील होत होतो. पण ती गर्दी पुढे सरकेनाशी झाली की परत डोंगरावर चढून भलत्याच मार्गाने प्रयत्नपूर्वक पुढे जात होतो. कितीतरी वेळ आम्ही फक्त वर चढतच होतो. डोंगर चढून उतरायला कधी सुरुवात करणार काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्या प्रचंड आणि दाट जंगलात जिकडे तिकडे माणसंच माणसं दिसत होती. अतिशय अवघड अशी चढण चढत चढत अखेर एकदाचे आम्ही डोंगर उतारावरच्या मार्गावर पोहोचलो.  पण गर्दी हलतच नसल्याने पुन्हा तिथेही असंच अवघड मार्गाने खाली उतरु लागलो. अशातच एका ठिकाणी पायऱ्या सुरु झालेल्या आम्हाला कळल्या आणि आम्ही त्या गर्दीत पायऱ्या उतरायचा प्रयत्न केला पण तिथेही उतरणं कठीणच होतं. हळूहळू कसंबसं तिथून निघून पुढे आलो. 

               दुसऱ्या डोंगरावर चढायलाही अलोट गर्दी होती. ती गर्दीही पुढे सरकत नसल्यानं पुन्हा द्राविडी प्राणायाम करत अतिशय अवघड मार्गाने वर पोहोचलो आणि तिथेच साऱ्या गर्दीला पोलिसांनी अडवलं. पुढेही अफाट गर्दी असल्याने किमान दोन तास थांबायला सांगितलं. पण जरावेळ थांबून लोकांनी  हळूहळू जमेल तसं पुढे जायला सुरुवात केली. आम्हीही त्यांच्याबरोबर पुढे जात पुन्हा पायऱ्यांजवळ पोहोचलो. त्या पायऱ्या गर्दीच्या रेट्याबरोबरच कशाबशा उतरलो. पुन्हा मुख्य मार्ग सोडून वरवर चढत उतरत पुन्हा मुख्य मार्गावर आलो. परत अवघड वाटेने चढत पुढच्या पायऱ्यांजवळ गर्दीत शिरलो. तासभर थांबूनही गर्दी इंचभरही पुढे सरकेना मग पुन्हा अवघड वाटेने त्या पायऱ्या जिथे उतरायला सुरुवात होते त्याच्या जवळ पुन्हा गर्दीत शिरलो. त्या गर्दीत शिरलो आणि पायऱ्यांवर पूर्णपणे अडकलो. पुढचे चार तास एकाच जागी उभं रहावं लागलं. पुढे पोलिसांनी लोकांना पूर्ण अडवून थांबवून ठेवलं होतं. श्वास घेणंही मुश्किल होत होतं. जवळपास सगळ्यांकडचं पिण्याचं पाणी संपलं होतं. घशाला कोरड पडत होती पण पाणी कुठेच मिळत नव्हतं. या परिस्थितीतच एका माणसाला श्वासाचा खूपच त्रास होऊ लागला म्हणून त्याला उपचारासाठी त्या गर्दीतून कसंबसं बाहेर नेलं. त्याचवेळी त्या गर्दीतल्या लोकांकडून कळलं की सकाळीच परिक्रमेच्या मार्गात‌ एका बिबट्याने दर्शन दिलं होतं. त्यामुळे थोडं तणावाचं वातावरण होतं. आम्हाला त्या गर्दीत होऊ शकणाऱ्या चेंगराचेंगरीची भिती वाटायला लागली होती. चार तास इंचभरही पुढे न सरकता आम्ही उभे होतो. सगळ्यांंचीच मनस्थिती बिघडली होती. अशातच थोडंसं जरी इकडे तिकडे झालं असतं तरी मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता होती. अखेर चार तासांनी जेव्हा हळूहळू चालायला सुरुवात करता आली तेव्हा प्रयत्नपूर्वक आम्ही त्या गर्दीतून बाहेर पडलो. पून्हा पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने झाडांच्या आधाराने वर चढत गेलो. नंतर मात्र एका ठिकाणी वर चढायची मला हिंमत होईना मग पुन्हा त्या गर्दीत घुसलो. पण तोपर्यंत लोकं हळूहळू पुढे सरकायला लागले होते. त्यातूनच थोडं पुढे जाऊन पून्हा सारी लोकं अडकली. दोन पावलंही पूढे जाणं शक्य नव्हतं. अशातच लोकांचा आरडाओरडा सुरु झाला. चेंगराचेंगरीच्या भीतीने पून्हा आम्ही हळूहळू बाजूला होत कसंबसं कठड्यावर बसलो. आणि आता गर्दी पूर्ण पूढे सरकून कमी झाल्याशिवाय इथून हलायचं नाही असं ठरवलं. एव्हाना सांजावलं होतं. रात्री गर्दी कमी होईल अशी आशा आम्हांला वाटत होती. 

              पण आम्ही तिथे बसलो आणि पाचच मिनिटांत एका पोलिसांनी आम्हाला तिथून उठायला सांगीतलं , थांबायचं असेल तर एकदम बाजूला जाऊन थांबायला सांगितलं. पण जिथे तो जायला सांगत होता तिथे चढून जायची मला हिंमत होत नव्हती. अतिशय खडा चढ तोही मातीचा चढून जाणं मला शक्य नव्हतं. आणि पायऱ्यांच्या बाहेरच्या बाजूने मातीचा तीव्र उतार उतरायचीही मला भिती वाटत होती. त्याक्षणी मला अक्षरशः रडू येत होतं. अखेर याच्या आधाराने मी जीव मुठीत धरुन थोडं खाली उतरले. नंतर तिथे  आमच्या पुढे उतरत असलेली लोकं पुन्हा गर्दीत घुसत होती मग आम्हीही तेच केलं. पण सुदैवाने तोपर्यंत लोकं हळूहळू का होईना पुढे सरकत होती. अखेर तसंच हळूहळू चालत पायऱ्या पूर्ण संपून उताराचा रस्ता लागला आणि आम्ही अक्षरशः सुटकेचा निःश्वास सोडला. आता त्या गर्दीतूनच पण पुढे सरकता येत होतं. एव्हाना रात्रीचे ८.३० वाजून गेले होते. परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यातील ८-९ किमी अंतर सरळ रस्ता आहे. त्यामुळे गर्दी असली तरी काही अपघात घडण्याची भिती वाटत नव्हती. अखेरचं ४-५ किमी अंतर राहिलं असताना आम्हांला कलिंगड, उसाचा रस प्यायला मिळाला. मग मात्र पुढे न थांबता गर्दी बरोबर चालत राहीलो आणि रात्री ११ वाजता परिक्रमा पूर्ण करुन गेटमधून बाहेर आलो. 

              मुळात ३८-४० किमीची परिक्रमा आमच्या साठी त्याहून खूप जास्त अंतराची झाली होती. आमच्या शारीरिक क्षमतेचा अंत पहाणारी ही परिक्रमा केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच पूर्ण झाली होती. आमच्या गटातील बऱ्याच जणांना ही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पहाटेचे  ४ वाजले. सगळेचजणं वेगवेगळ्या वेळी ही परिक्रमा पूर्ण करुन रुमवर परतले.

              तिसऱ्या दिवशी दुपारी आमची परतीची ट्रेन होती. त्या प्रवासाला सुरुवात केली आणि एवढ्या अफाट गर्दीचं खरं कारण कळलं‌ आणि आम्ही हादरलोच. एक अतिशय दुःखद आणि भितीदायक घटना घडली होती. आम्ही जेव्हा परिक्रमेला सुरुवात केली होती तेव्हा काही वेळानंतर परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यावरील बोरदेवी मंदिराजवळ रात्री वस्ती केलेल्या परिक्रमावासींपैकी एका अकरा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. सकाळी ६ वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर शोधाशोध केल्यावर ८ वाजता ती मुलगी सापडली. पण तोपर्यंत ती मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे त्या भागात परिक्रमा थांबवण्यात आली होती. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले. त्याला पकडण्यात आलं. आम्ही परिक्रमेत असताना बिबट्या दिसला एवढंच कळलं होतं. याच कारणामुळे शब्दात वर्णनही करता येणार नाही अशी गर्दी झाली होती. त्याच बरोबर ज्या माणसाला श्वासाचा त्रास होत होता म्हणून उपचारासाठी बाहेर नेलं त्याचा आणि अजून एका अगदी लहान बाळाचाही मृत्यू झाल्याचं कळलं. तसंच अजून २-३ लोकांनाही डोली करुन घाईघाईने उपचारासाठी नेल्याचं आम्ही स्वतःच बघितलं होतं.इतक्या वर्षात पहिल्यांदाच अशा भितीदायक आणि दुःखद घटना परिक्रमेच्या दुसऱ्याच दिवशी घडल्या होत्या. 

             यावरुन पुढील वर्षापासून परिक्रमेवर काही निर्बंध आणणं, काही नियमावली तयार करणं आणि ते कसोशीनं पाळणं ही आत्यंतिक गरजेची गोष्ट झाली आहे. मुळात जंगली श्वापदांच्या हक्काच्या अधिवासावर आपण अतिक्रमण करत असू तर अशा काही घटना यापुढेही घडणं स्वाभाविकच आहे. त्यासाठीच परिक्रमावासींच्या संख्येवर , जंगलातील वास्तव्यावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पहिल्या दोन दिवसांची परिक्रमा भाविकांसाठी अतिशय अवघड ठरली होती. तिसऱ्या दिवशी मात्र भाविकांना दरवर्षी प्रमाणे सहज परिक्रमा करता आली.  चौथ्या दिवशी पहाटे खूप पाऊस पडल्याने परिक्रमा उशिरा सुरु करण्यात आली. आणि पाचव्या म्हणजेच शेवटच्या दिवसाची परिक्रमा पावसामुळे रद्दच करण्यात आली. 

               आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला सकाळी घरी पोहोचलो. आणि पुन्हा सारं आवरुन दुपारी लगेचच घरच्या गाडीने गावाला निघालो. गावाला टिळक पंचांगानुसार त्याचदिवशी श्री दत्त जयंती होती. त्यामुळे श्री दत्तात्रेयांच्या जन्मसोहळ्यासाठी आम्ही गावाला निघालो. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. श्री दत्तात्रेय जन्म सोहळा आमच्या गावाला रात्री १२ वाजता साजरा केला जातो. आम्ही घरी पोहोचल्यावर जेवून थोडा आराम करुन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मंदिरात गेलो. डोळ्यांचं पारणं फिटेल अशा या सुंदर जन्मसोहळ्यात गतवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्हाला केवळ श्री दत्तात्रेयांच्या कृपेनेच सहभागी होता आलं होतं. हा सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री १ वाजता आम्ही घरी परतलो. पहाटे लवकर उठून आवरुन पुढील प्रवासाला लागलो.

               आम्ही पहाटे प्रवासाला सुरुवात केली ती गोव्याला जाण्यासाठी. गोव्याला आमच्या घरच्याच एका विवाहसमारंभासाठी आम्हाला जायचं होतं. गोव्याला दुपारी पोहोचलो. थोडा आराम करुन श्री शांतादुर्गा देवीचं दर्शन घ्यायला गेलो. देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं. तिथून श्री मंगेश मंदिरात जाऊन तेही दर्शन घेतलं. तिथून विवाहसमारंभासाठी गेलो. सायंकाळी काही कार्यक्रम होते त्याला उपस्थित राहिलो. दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष विवाहसमारंभ होता. समारंभ पार पडल्यावर परतीच्या प्रवासाला लागलो. सुशेगाद गोव्यात आम्ही जेमतेम २४ तासच होतो त्यामुळे आमची मात्र खूप धावपळ झाली.

                गोव्यापासून साधारण दोन अडीच तासावर असलेल्या माणगांव ला आम्हाला जायचं होतं. परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांचं हे जन्मस्थान. श्री दत्तात्रेयांचे प्रात: स्मरणीय चतुर्थावतार म्हणजे श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी. वेदशास्त्रसंपन्न हरिभट्टांचे पुत्र श्री गणेशभट्ट आणि त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दांपत्य माणगांवी वास्तव्यास होते. त्यावेळी श्री गणेशभट्ट आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच श्री दत्तात्रेयांची सेवा करण्यासाठी गाणगापूरला १२ वर्षं जाऊन राहिले. एक दिवस त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यात श्री दत्तगुरुंनी आम्ही तुमच्याकडे पुत्ररुपाने जन्माला येणार आहोत म्हणून त्यांनी माणगांवी परत जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारावा असं सांगितलं. त्यानुसार ते माणगांवला परतले. श्रावण कृ.५ ई.सन १८५४ यादिवशी त्यांना पुत्ररत्न झालं. त्याचं वासुदेव असं नामकरण करण्यात आलं. त्यानीही दत्तभक्तीचा वारसा पुढे चालवत नृसिंहवाडीस जाणं, वास्तव्य करणं वाढवलं. काही काळानंतर त्यांना नृसिंहसरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली की माणगांवी जाऊन दत्तमंदिर स्थापन करावे. त्यानुसार माणगांवला जाताना वाटेत कागल येथील एका मूर्तीकाराकडे ही दत्तमूर्ती मिळाली. मंदिर बांधून त्यात याच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लाकडी खांब आहेत. ते महाराजांनी अभिमंत्रित केले आहेत. त्यांच्या स्पर्शानेही बाहेरची बाधा दूर होते. 

               या मंदिरासमोरच पुरातन यक्षिणी मंदिर आहे.यक्षिणी महात्म्यात महाराजांनी दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यासाठी वासुदेवांचा जन्म माणगांवी झाला. हे यक्षिणी मंदिर अतिशय जागृत देवस्थान आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला वासुदेवानंदांचे जन्मस्थान आहे. तिथे त्यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. तसंच अहिल्यादेवी होळकर यांनी वासुदेवानंदांच्या पायाच्या मापाच्या योगचिन्हांकित पादुका स्थापन केल्या आहेत. वासुदेवानंद सरस्वती यांचं कर्तृत्व आणि महत्व खूपच मोठं आहे. पीठापूर, कुरवपूर, कारंजा ही स्थानं शोधून ती भक्तांसाठी त्यांनी खुली केली आहेत. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' हा मंत्र त्यांनी जगाला दिलाय. अतिशय विपुल अशी ग्रंथसंपदा त्यांनी निर्माण केलीय. सप्तशतीगुरूचरित्र, श्रीदत्तपुराण, श्री दत्त महात्म्य, श्री घोरात्कष्टोधरण स्तोत्र, करुणात्रिपदी ही त्यातीलच ग्रंथसंपदा. 

               अशा या परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन घ्यायची कधीपासूनची आमची इच्छा यावेळी पूर्ण झाली होती. अतिशय शांत प्रसन्न आणि उर्जेने भरलेल्या या मंदिरात आम्हाला अतिशय छान दर्शन घडलं. तिथे देणगी देऊन प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. 

                यावर्षीची गिरनार परिक्रमा आमच्यासाठी अतिशय वेगळा अनुभव देणारी ठरली. गिरनार गुरुशिखर दर्शन, अत्यंत अवघड अशी परिक्रमा, श्री दत्तात्रेयांचा जन्मसोहळा आणि वासुदेवानंद सरस्वती यांच्या जन्मस्थानाचं दर्शन म्हणजे आमच्यासाठी खूपच मोठी पर्वणी ठरली. श्री दत्तात्रेयांच्या कृपेमुळेच हे सारं भाग्य आम्हाला लाभलं. श्री दत्तात्रेयांची अशीच कृपा सर्वांनाच कायम लाभावी हिच त्यांच्या चरणी प्रार्थना.

|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ||

|| जय गिरनारी ||

- स्नेहल मोडक

Monday, November 20, 2023

दर्या

             समुद्र असा शब्द जरी ऐकू आला तरी आपल्या नजरेसमोर अवतरतो तो अथांग निळा सागर आणि त्याच्या शुभ्र फेसाळत्या लाटा. प्रत्यक्षातही आपल्याला समुद्र एवढाच दिसत असला तरी त्याच्या तळाशी मात्र अफाट खजिना दडलेला असतो. विविध प्रकारचे असंख्य जलचर या सागरात आपल्याला आढळतात. या सगळ्यांना आपल्यात सामावून घेत असतानाच नकोशा गोष्टी मात्र आपल्या लाटांबरोबर किनाऱ्यावर ढकलून देण्याचं काम मात्र समुद्र सातत्यानं करत असतो. हे असंच वागायचं आपल्या मनानही ठरवलं तर ?


आपल्या मनातही एक दर्या असावा

   सुखाच्या शुभ्र लाटांनी उसळणारा

   दु:खाला लाटेसरशी नाहीसं करणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   किनाऱ्यावर अवखळ खळखळणारा

   अंतर्यामी अथांग खोल गूढ असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   कधी नीलरंगी कधी केशररंगी दिसणारा

   परी अंतरी निर्मळ नितळ जल असणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

   अंधारराती गूढ गंभीर अशांत भासणारा

   परि मनास भेटीची नित्य ओढ लावणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या सुखदुःखाना सहज सामावणारा

   फेसाळ लाटांनी निखळ आनंद देणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा

   साऱ्या आठवणी अंतर्यामी साठवणारा

   अन नात्यांचे रेशीमबंध सदैव जपणारा

आपल्या मनातही एक दर्या असावा 

आपल्या मनातही एक दर्या असावा 

- स्नेहल मोडक

Wednesday, November 1, 2023

कोजागिरी

            या वर्षातलं अखेरचं ग्रहण नेमकं कोजागिरी पौर्णिमेला आलं. आणि मग कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री पूर्ण कलांनी विलसणारा शीतल शशिकर आणि चमचमतं पुनवचांदणं यांच्या साक्षीने दुग्धप्राशन करायचं की वेधारंभापासून ग्रहणाचे नियम पाळून निर्जल उपवास करायचा असा प्रश्न निर्माण झाला. अर्थात प्रत्येकानी त्यावर आपापल्या परीने मार्ग काढला.

            आम्हालाही नेहमीप्रमाणे पौर्णिमेला गिरनार दर्शनासाठी जायची इच्छा होतीच. पण काही अपरिहार्य कारणास्तव जायला मिळेल की नाही हे आधीच ठरवता येत नव्हतं. अखेर ऐनवेळी गिरनारला जायला मिळणार हे नक्की झालं म्हणून मग घरच्या गाडीनेच जायचं ठरवून रात्री उशिरा प्रवासाची तयारी केली. आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी पहाटे निघालो. मध्ये मध्ये थांबत रात्री तलेटीला मुक्कामी पोहोचलो.

            पौर्णिमेच्या दिवशी पहाटे लवकरच आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. लंबे हनुमानजीचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन रोपवे जवळ पोहोचलो. तिथे पोहोचलो आणि क्षणात मन खट्टू झालं. तिथे ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकिटांच्या दोन भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. आमचं जाणं ऐनवेळी ठरल्यामुळे आम्हाला ऑनलाईन तिकीटं मिळाली नव्हती. पहिल्यांदाच असं झालं होतं आणि नेमकी ऑफलाईन तिकिटांसाठी खूपच मोठी रांग होती. आता आपल्याला तिकीट कधी मिळणार आणि आपण रोपवे ने अंबाजी मंदिरापर्यंत कधी पोहोचणारी याची काळजीच निर्माण झाली. पण सदैव आमच्या बरोबर असणाऱ्या याच्या मित्राने आमच्या स्वानुभवावरुन कुणाकडे जास्तीची ऑनलाईन तिकिटं आहेत का अशी चौकशी करायला सुरुवात केली. आणि एका ग्रुपकडे ५-६ जास्तीची तिकीटं असल्याचं कळलं. त्यांच्या ग्रुपमधल्या काही जणांनी ऐनवेळी चढून जायचं ठरवल्यामुळे तिकीटं उरली होती. आम्हाला चारच तिकिटं हवी असल्याने त्यांनी ती ताबडतोब आम्हाला देऊ केली आणि आम्ही त्यांच्या ग्रुपमध्ये सामील झालो. दत्तगुरुंच्या कृपेने आमची काळजी मिटली आणि पुढच्या अर्ध्या तासात आम्ही रोपवे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. 

            कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने गिरनार दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती. तरीही आम्ही नेहमीपेक्षा जरा आधीच मंदिरात पोहोचलो. एवढी गर्दी असूनही प्रत्यक्ष मंदिरात दर्शनासाठी बिलकुल गर्दी नव्हती. आम्हाला मंदिरात अतिशय शांतपणे दर्शन घ्यायला मिळालं. मी दत्तगुरुंसमोर नतमस्तक झाले आणि क्षणार्धात असं वाटलं की समोर साक्षात स्वयं दत्तात्रेय आणि नतमस्तक मी, आजूबाजूला कुणीच नाही, आहे ती फक्त प्रसन्न शांतता .अवघ्या काही क्षणांची ही जाणीव एक वेगळीच अनुभूती देऊन गेली. 

            दर्शन घेऊन थोडं खाली उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. नित्याप्रमाणे आधी वाचन करुन दर्शन घेतलं. बाहेर भाविकांची खूप गर्दी असूनही प्रसादालयात मात्र गर्दी कमी होती. भाविकांची प्रचंड गर्दी आणि ग्रहण या दोन्ही कारणांमुळे भोजनप्रसादाऐवजी शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद देण्यात येत होता. प्रसाद ग्रहण करुन आम्ही परत निघालो. गोरक्षनाथ आणि अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोपवे जवळ गेलो. परतीची तिकीटं काढण्यासाठी बिलकुल गर्दी नसल्याने लगेच तिकीटं मिळाली आणि १५-२० मिनिटांतच रोपवे ने आमही पायथ्याशी पोहोचून‌ मुक्कामी गेलो. भोजन आणि थोडा आराम करुन लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

            खरंतर गिरनारला दत्तगुरुंनी अतिशय सुंदर दर्शन घडवलं होतं. त्यामुळे मन तृप्त होतंच पण तरीही मनात किंचितशी रुखरुख होती. गिरनारला आम्ही जेव्हा जेव्हा गाडी घेऊन जातो तेव्हा तेव्हा परत येताना काही मंदिर दर्शनं‌ आणि स्थलदर्शन करुनच येतो. त्याचप्रमाणे यावेळीही  फिरत फिरत यायचं होतंच. नेहमी आम्ही वडोदरा ला मुक्काम करुन तिथून फिरत फिरत घरी येतो. यावेळी माझ्या मनात जरा वेगळं, जिथे जावंसं वाटत होतं ते मी प्रवासाला निघायच्या आधीच याला सांगितलं. पण का कुणास ठाऊक, कारणं सांगत त्याने माझा बेत उडवून लावला होता. पण घरुन निघताना मात्र मी श्री दत्तगुरुंना तशी प्रार्थना केली होती. आणि आता परतीच्या प्रवासात मला तीच रुखरुख लागली होती. पण मी दत्तगुरुंची इच्छा असा विचार करुन शांत होते. साधारण ४ तासांच्या प्रवासानंतर अचानक याने मला कर्नाळीला मुक्कामाला जायचं ना असं विचारलं आणि मला आश्चर्यच वाटलं. लगेचच आमच्या नेहमीच्या हॉटेलमध्ये फोन करुन रुम उपलब्ध आहेत का याची चौकशी केली आणि रात्री उशिरा तिथे मुक्कामाला येत असल्याचं सांगितलं. माझी इच्छा पूर्ण होणार म्हणून खूप खुश झाले होते मी. रात्री ११ वाजल्यानंतर  आम्ही कर्नाळी ला रुमवर पोहोचलो. 

            पहाटे लवकर उठून आवरुन आम्ही त्रिवेणी संगमावर स्नानासाठी निघालो. आम्ही जिथे राहिलो होतो तिथून जवळच हा संगम आहे. वडोदरा जिल्ह्यातलं  डभोई तालुक्यातलं हे कर्नाळी गांव. इथे नर्मदा, गुप्त सरस्वती आणि ओरसंग या तीन नद्यांचा संगम आहे. या संगमावर स्नान करणं अतिशय पुण्यप्रद मानलं जातं. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेलाच ग्रहण होतं. आणि रात्री उशिरा ग्रहण समाप्ती होती. त्यानंतर एखाद्या तीर्थक्षेत्री स्नान करणं विशेष महत्त्वाचं मानतात. आणि म्हणूनच या योगावर त्रिवेणी संगमावर स्नान करायला मिळावं अशी माझी इच्छा होती. 

            आम्ही स्नानासाठी निघालो तेव्हा पहाट हलकेच उमलत होती. सहस्त्ररश्मीचं आगमन होण्यापूर्वीच उषा सोनकेशरी झाली होती. संगमावरचं दृश्य अप्रतिम होतं.  एकीकडे सोनकेशरी उषा, दुसरीकडे अस्ताचलास जाणारा शशिकर आणि समोर पसरलेलं चमचमतं नर्मदाजल.  आणि हे अप्रतिम दृश्य नेत्रात साठवण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी संगमावर गेलेलो आम्ही चौघंच. खूपच सुंदर अनुभव होता. हवेत चांगलाच गारवा होता, पण मैयाच्या जलात पाऊल टाकलं आणि अतिशय उबदार स्पर्शाने तनमन मोहोरलं. स्नानासाठी पाण्यात शिरलो आणि बाहेर पडावसंच वाटेना. पण वेळेअभावी तिथून निघावच लागलं. ग्रहणसमाप्तीनंतर मैयाच्या जलात स्नान करण्याचा योग आल्याने खूप समाधान वाटत होतं.

            रुमवर येऊन सामान घेऊन आम्ही  कुबेर भंडारी च्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिरही आम्ही राहिलो तिथून अगदी जवळच आहे. 

            कुबेर भंडारीचं हे मंदिर साधारण २५०० वर्षं पुरातन आहे. कुबेर हा विश्रवस ऋषींचा पुत्र आणि रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हा देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा देव दिक्पाल आणि यक्षांचा अधिपती आहे. त्याने ब्रम्हदेवाची उपासना केली तेव्हा ब्रम्हदेवाने प्रसन्न होऊन त्याला अमरत्व, लंकेचं राज्य आणि पुष्पक विमान बहाल केलं. नंतर रावणाने कुबेरावर स्वारी करुन लंका आणि पुष्पक विमानावर कब्जा केला. मग कुबेराने भगवान शिवाची आराधना केली असता शंकराने प्रसन्न होऊन कुबेराला देवांचा खजिनदार केलं. तेव्हापासून त्याला कुबेर भंडारी या नावानंही ओळखतात. अशा या कुबेराचं मंदिर इथं आहे. या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे.  तसंच गणपती, महाकाली, हनुमान आणि रणछोडराय यांचीही मंदिरं आहेत. इथे प्रत्येक अमावास्येला दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी असते. आम्ही या मंदिरात सकाळी लवकरच गेल्याने बिलकुल गर्दी नव्हती. कुबेर भंडारी आणि इतर देवदेवतांचं छान दर्शन आम्हाला मिळालं. दर्शन आणि प्रसाद घेऊन आम्ही पुढे निघालो. 

            कुबेर भंडारीच्या मंदिरापासून साधारण ३७ किमी अंतरावर असलेल्या गरुडेश्वर मंदिरात आम्ही पोहोचलो. गरुडेश्वर - वासुदेवानंद सरस्वती यांचं हे समाधी स्थान. इथे प्रशस्त असं दत्तमंदिर आणि त्यापुढे स्वामींचं समाधी मंदिर आहे. नर्मदा मैयाच्या किनारी वसलेलं हे स्थान अतिशय सुंदर, शांत, पवित्र  असंच आहे. या मंदिरातही सुंदर दर्शन घडलं. दत्तगुरुंचं आणि समाधी स्थानी स्वामींचं दर्शन घेऊन नर्मदा मैयाचं दर्शन घ्यायला थोडं खाली गेलो. इथे मैयाचं पात्र विशाल आहे. त्याच पात्रात एक बंधाराही बांधलेला आहे. दर्शन घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला. साधारण सव्वा तासानी आम्ही भालोद येथे पोहोचलो.

            भालोदचं दत्तमंदिर एकमुखी दत्तमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. १४०० व्या शतकातील ही शाळिग्रामातील दत्त मूर्ती उजेडात किंवा अंधारातही पाहिली असता पोटावरील गोमुख स्पष्ट दिसतं. हे मंदिर प्रतापे महाराजांनी बांधलंय. वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या स्वप्न  दिक्षेनंतर पू. शरदचंद्र प्रतापे महाराजांच्या दोन नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्या आणि त्यांना भालोद इथे रहाण्याचा आदेश मिळाला.  याचदरम्यान बडोदा येथील काशिताई निरखे यांच्याकडील ही दत्तमूर्ती पू. प्रतापे महाराजांच्याकडे  आली. आणि त्यानंतर भालोदला या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन मंदिर बांधण्यात आलं. तसंच नर्मदा परिक्रमावासी आणि दत्तभक्त यांच्यासाठी आश्रम बांधण्यात आला. मंदिर आणि आश्रम परिसर अतिशय रमणीय आहे समोरच नर्मदा मैयाचं विशाल पात्र आहे. सदैव मयुरांचा वावर असणाऱ्या या आश्रमात कन्यापूजन हा विधी केला जातो. तसंच गुरुचरित्र पारायण आणि परिक्रमावासी यांच्या वास्तव्याची व्यवस्था इथे केली जाते.  इथून नर्मदा नदीच्या विशाल पात्रातून नावेने श्रीक्षेत्र नारेश्वर इथं जाता येतं.

            आम्ही या मंदिरात जाऊन श्री दत्तात्रेयांचं दर्शन घेतलं आणि पू. प्रतापे महाराजांना भेटण्यासाठी थांबलो. ते आश्रमात कुठेच नव्हते. आम्ही त्यांची वाट पहात मंदिरातच थांबलो. सोज्वळ, सात्विक आणि प्रचंड उर्जेने भरलेल्या पू.साधक प्रतापे महाराजांना भेटणं हा प्रसन्न अनुभव असतो. थोड्या वेळाने आम्हाला ते नर्मदा तीरी गेले असल्याचं कळलं म्हणून आम्ही तिथे जायला निघालो असता ते स्वतःच समोर आले. त्यांच्याशी  बोलतच आम्ही मंदिरात आलो. त्यांना नमस्कार करुन थोडं बोलून निघणार तेवढ्यात त्यांनी आम्हाला प्रसाद घेऊन जायला सांगितलं. गेल्यावेळी  आम्ही सायंकाळी इथं आलो होतो तेव्हाही त्यांनी प्रसाद घेऊन जायला सांगितलं होतं पण तेव्हा वेळेअभावी आम्ही थांबू शकलो नव्हतो. यावेळी मात्र आम्ही थांबलोच. त्यांनी सांगितलं आज कन्यापूजन आहे तर आधी कन्यांचं भोजन होऊदे मग आपण भोजन करु. मी हे ऐकलं आणि मला खूपच आनंद झाला. मी मलाही कन्यापूजन करायचय असं महाराजांना सांगितलं. आणि आम्ही त्यांचं भोजन होईपर्यंत नर्मदा तीरावर गेलो. मुलींच भोजन झाल्यावर महाराज स्वतः मला कन्यापूजनासाठी बोलवायला आले. आम्ही वर आलो तर मंदिरात साऱ्या कन्यका बसल्या होत्या. आमचं अचानक जाणं झाल्याने मी पूजनासाठी कुठलीही तयारी नेली नव्हती. पण ऐनवेळी आलेला हा योग खूपच मोठा होता. त्यामुळे फक्त दक्षिणा देऊन का होईना मी साऱ्या कन्यांचं पूजन केलंच. एकाचवेळी १९-२० कुमारिकांचं पूजन करण्याचं भाग्य  आम्हाला लाभलं होतं.  कन्यापूजन करुन आम्ही भोजनप्रसाद घेतला. मधल्या वेळेत आम्हालाही मंदिराबाहेर मयुराचं छान दर्शन झालं होतं. प्रसाद घेऊन महाराजांचा निरोप घेऊन आम्ही परत प्रवास सुरु केला आणि रात्री वेळेत घरी पोहोचलो.

            यावेळी अगदी ऐनवेळी  गिरनार यात्रा ठरली होती. त्यामुळे गाडीने जावं लागलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी गिरनार दर्शन घडावं ही आमची प्रार्थना श्री दत्तगुरुंनी ऐकली होती आणि आम्हाला सुंदर दर्शन घडवलं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी माझ्या सगळ्या इतर इच्छाही पूर्ण केल्या होत्या. त्रिवेणी संगमावर स्नान, कुबेर भंडारी, गरुडेश्वर यांच दर्शन, भालोदला श्री दत्तात्रेयांचं दर्शन आणि महाराजांची भेट आणि या सर्वावर कळस म्हणजे भालोदला एवढ्या मोठ्या कन्यापूजनाचं लाभलेलं भाग्य सारंच अनुभूतीपूर्ण. यावेळची कोजागिरी पौर्णिमा ग्रहणातही आमच्यावर दत्तकृपेचं चांदणं बरसून गेली.

            || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||

.

दत्तच माझे आनंदनिधान

दत्तनामात हरपते भान

   दैवत माझे दत्तदिगंबर

   ब्रम्हा विष्णू सवे महेश्वर

दत्तनामाची लागता गोडी

क्रोध मोह सारे बंध तोडी

   दत्तनामाचा करता जागर

   पार होईल हा भवसागर

दिठीतूनी करता प्रार्थना

पूर्ण होतसे मनोकामना

   श्वासासंगे गुरुनाम घ्यावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

   दत्त कृपेने पावन व्हावे

- स्नेहल मोडक

Monday, October 30, 2023

जय माता दी - २

           तिसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरुन कटराहून आम्ही स्थलदर्शनासाठी धरमशाला इथे निघालो. मार्गात असणारी मंदिरं आणि इतर ठिकाणं पहात धरमशाला ला पोहोचायचं ठरवलं होतं. 

           त्यानुसार आम्ही एका मंदिरात दर्शनासाठी थांबलो. देवीमातेच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक नाभा माता मंदिर. अतिशय वेगळं आणि सुंदर असं हे मंदिर मिलीटरीच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे अतिशय स्वच्छ, सुरक्षित आणि कमी गर्दी असणारं हे मंदिर आहे. प्राचीन काळी राजा दक्षाने एकदा एक मोठा यज्ञ केला होता. त्यावेळी त्याने आपली कन्या सती आणि जावई भगवान श्री शंकर महादेव यांना आमंत्रित केलं नाही. तरीही सती यज्ञस्थानी गेली असता राजा दक्षाने श्री शंकर महादेवांचा उचित सन्मान न केल्याने अपमानित होऊन सतीने त्याच यज्ञात उडी घेतली. महादेवानी क्रोधित होऊन सतीचा जळता देह उचलला आणि ते सैरावैरा पळू लागले. श्री विष्णूनी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी सुदर्शनचक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले. हे अवयव जिथं जिथं पडले ती सारी स्थानं मातेची शक्तीपीठं  म्हणून ओळखली जातात. या ठिकाणी मातेची नाभी पडल्याने या स्थानाला नाभा माता मंदिर ओळखलं जातं. हे मंदिर गुहेत असून इथे १२ ही महिने अखंड जलधारा स्त्रवत असतात. हे जलप्राशन केल्यास अनेक व्याधी दूर होतात अशी मान्यता आहे. इथे मातेच्या दर्शनाआधी शेषनागाचं स्थान आहे. हे दर्शन घेऊन मग चार पायऱ्या चढून वर मातेचं दर्शन घेतात. इथे वारंवार प्रत्यक्ष नागराजाचं दर्शन होतच असतं. इथे पडणाऱ्या जलधारेचं जल शेषनाग, शिवपिंडी आणि नाभा माता यांना चढवलं जातं. आम्हीही दर्शन घेऊन जल चढवून बाहेर आलो. हे जल आपल्याला तीर्थ स्वरूपात बरोबर नेता येतं. आम्हीही ते जल तिथेच विकत मिळणाऱ्या कॅनमध्ये भरुन घेतलं. तिथे कर्तव्य बजावत असेलल्या सैनिकांशी थोडा संवाद साधला आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. आमच्या गाडीच्या  पूर्वपरिचित ड्रायव्हरने आम्हाला या मंदिराची माहिती दिली आणि त्यामुळेच आम्हाला हे नाभा मातेच दर्शन घडलं होतं.

           आमच्या मार्गातलं दुसरं ठिकाण होतं ते म्हणजे अटल सेतु. पठाणकोट जवळ रावी नदीवर बांधण्यात आलेला ५९२ मीटर लांबीचा हा पुल आहे. हा पुल बशोली (कठुआ) ते दुनेरा (पठाणकोट) या मार्गावर आहे. या पुलामुळे पंजाब, जम्म-कश्मीर आणि हिमाचल प्रदेश ही तीन राज्य जोडली गेली आहेत. २४ डिसेंबर २०१५ रोजी माजी संरक्षणमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आलाय. केबल स्टेड पध्दतीचा हा पुल पहाण्यासाठी आम्ही गाडी थांबवली आणि पायी चालत पुलावरून फिरुन छायाचित्रं काढली आणि मग पुलावरूनच पलीकडे पठाणकोटवरुन पुढे निघालो. 

           इथून पुढे जाईपर्यंत सूर्यास्ताची वेळ होत आली होती म्हणून आम्ही आधी गेलो ते नड्डी सनसेट पाॅईंटला. आम्ही पोहोचलो आणि पुढच्या १५-२० मिनिटांतच सुंदर असा सूर्यास्त पहायला मिळाला. नड्डी पाॅईंटला जाण्याआधी जवळच दल लेक आहे. साधारण आयताकृती आकाराचा हा सुंदरसा तलाव आहे. सूर्यास्ताची वेळ होत आल्याने तलाव गाडीतून बघितला आणि पुढे नड्डी पाॅईंटला गेलो. 

            हे सगळं पहात, थांबत, फिरत गेल्यामुळे धरमशाला ला पोहोचेपर्यंत तिन्हीसांज होऊन गेली. मग मात्र मुक्कामाच्या ठिकाणीच गेलो.

           चौथ्या दिवशीही सकाळी लवकरच आवरुन आम्ही फिरायला बाहेर पडलो. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून जवळचंच स्थलदर्शन करायचं असल्याने चालत निघालो. 

           जेमतेम ५-७ मिनीटात आम्ही पोहोचलो ते भागसूनाग मंदिरात. हे एक प्राचीन शिवमंदिर आहे. याची एक कथा सांगितली जाते ती अशी - द्वापारयुगात मध्य काळात असुरांचा राजा भागसू याची अजमेर ही राजधानी होती. एकदा राज्यात प्रचंड दुष्काळ पडला. पिण्यासाठीही पाणी मिळेनासं झालं तेव्हा प्रजेनं राजाला ताबडतोब पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा आम्ही हे गांव सोडून इतरत्र निघून जाऊ असं सांगितलं. राजानं त्याना पाण्याची व्यवस्था करतो असं सांगून तो पाण्याच्या शोधात निघाला असता इथल्या नागदेवांच्या प्रदेशात पोहोचला. या भागसूनाग पासून साधारण १८,००० फूट उंचावर धौलाधार पर्वत शिखरावर एक सरोवर त्या राजाला दिसलं. त्या  'नागडल' नावाच्या एकांत सरोवराचं जल मायावी भागसूने आपल्या कमंडलूमध्ये भरलं आणि तो परत निघाला. चालता चालता अंधार झाला म्हणून या स्थानी तो विश्रांतीसाठी थांबला. इकडे आपलं सरोवर कोरडं पडल्याचं नागांच्या ध्यानी आलं आणि ते शोध घेत भागसूजवळ आले. याठिकाणी नाग आणि भागसू यांच्यात तुबळ युद्ध झालं. त्यात कमंडलु मधील जल खाली पडलं आणि तेव्हापासून या ठिकाणी निरंतर जलधारा वहात आहेत. नागानी भागसूला पराजित केलं. नागही शिवभक्तच आहेत हे भागसूच्या ध्यानात आलं. त्याने पराजय स्वीकारुन शिवाला प्रार्थना केली की माझा मृत्यू निश्चित आहे पण मी हे माझ्या प्रजेसाठी केलंय तेव्हा शिव शांत झाले. भागसूने हे जल प्रजेपर्यंत पोहोचून त्यांचं रक्षण व्हावं आणि शिवाच्या हातून आपल्याला मुक्ती मिळावी अशी प्रार्थना करुन आपलं आयुष्य संपवलं. मग नागराजांनी जलवर्षा करुन प्रजेचं रक्षण केलं आणि आपल्या नावाआधी भागसूचं नावं जोडून त्याला अमरत्व प्रदान केलं.  अशा या सुंदर प्रशस्त मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतलं. जलधारेजवळच असलेल्या शिवपिंडीवर जल चढवलं. 

           मंदिर दर्शन करुन आम्ही तिथून पुढे असलेला धबधबा पहायला गेलो. पण धबधब्याला पाणी कमी असल्याने फार पुढे न जाता परत निघालो. या संपूर्ण मार्गात अनेक दुकानं आहेत. तिथे थांबून खरेदी केली. खूप सारी खरेदी करुन पुढचं ठिकाण पहाण्यासाठी निघालो. 

           आम्ही चालतच पोहोचलो ते मॅक्लोडगंजला. मॅक्लोडगंज हे धरमशालेचं उपनगर. तिबेटी लोकांच्या मोठ्या लोकसंख्येमुळे याला 'लिटिल ल्हासा' म्हणूनही ओळखलं जातं. धरमशालेपासून ९ किमी अंतरावर हे नगर वसलंय. या गावात बौद्ध धर्मातील काही महत्त्वाचे मठ आहेत. नामग्याल, त्सुग्लागखांग हे त्यातलेच मठ. दलाई लामा जेव्हा भारतात आले तेव्हा वास्तव्यासाठी त्यांनी धरमशालेची निवड केली आणि तेव्हापासून हिमालयाच्या धौलाधार पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या गावाचा संपूर्ण कायापालट झाला. या गावाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं. या दलाई लामांचा मठही मॅक्लोडगंज मध्येच आहे. अतिशय प्रशस्त, देखणा आणि एकदम शांत असा हा मठ आम्ही पहायला गेलो. मठात सर्वत्र असते तशीच गौतम बुद्धांची भव्य मूर्ती आहे. अतिशय शांत आणि प्रसन्न वातावरण आहे. दलाई लामांचं वास्तव्य त्याच मठात होतं. अर्थात सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पहाणं, भेटणं अशक्यच होतं. तिथून निघून परत मार्केटमध्ये गेलो. मॅक्लोडगंजचं मार्केट खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तिबेटियन हस्तकलेच्या वस्तू तसंच कपडे आणि इतर वस्तू मिळतात. तसंच तिबेटियन लोकांच्या खानावळीही इथं आहेत. त्यात मोमोज, ठुक्का असे पदार्थ विशेषकरून मिळतात.

           हे सारं फिरुन पाहून आम्ही गाडीने पुढे निघालो आणि पोहोचलो ते चहाच्या मळ्यात. अगदी रस्त्याच्या कडेलाच असलेला हा चहाचा मळा खूप मोठ्या परिसरात पसरला होता. चहाची झुडुपं साधारण तीन फुटांवर वाढली की वरच्या पानांची तोडणी केली जाते. मग ही पानं वाळवून त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करुन त्या पानांची पावडर तयार केली जाते. साधारण १०० किलो चहाच्या पानांपासून २० किलो पावडर तयार होते. मग टेस्टर या चहाचा दर्जा ठरवतात. चहाची चव , रंग, वास यावर चहाची प्रत ठरते. आणि किंमत ठरवण्यासाठी चहाचा लिलाव केला जातो. जगभरात एकूण १३ ठिकाणी ही लिलाव केंद्र आहेत. या झुडुपावर पांढऱ्या रंगाची आणि पिवळे केसर असलेली नाजूक छोटी फुलं येतात. आम्ही जो मळा बघायला गेलो होतो त्यातील अर्ध्या भागातील पानांची तोडणी झाली होती. पण फक्त वरच्या भागातीलच पानं तोडली जात असल्याने एकूण मळा अतिशय हिरवागारच दिसतो. मळ्यात थोडं फिरुन समोरच असलेल्या त्यांच्या चहाच्या दुकानात गेलो. त्या फॅक्टरी आउटलेट मध्ये त्यांच्याकडे तयार होणारे चहाचे सर्व प्रकार विक्रीसाठी उपलब्ध होते. तिथे खरेदी करुन आम्ही पुढे निघालो.

           आमचं पुढचं ठिकाण होतं हिमाचल प्रदेशचं राज्य युद्ध स्मारक. १९४७, १९६२, १९६५ आणि १९७१ साली झालेल्या युध्दात ज्या सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या साऱ्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे स्मारक बांधण्यात आलंय. इथे प्रत्येक सैनिकाचं नांव आणि त्याची बटालियन कोरण्यात आलंय. तसंच काही तोफा, विमान, लहान रणगाडे, विक्रांत ची प्रतिकृती इ. ठेवण्यात आलंय. हे सारं पाहून आम्ही परत मुक्कामी पोहोचलो. पाचव्या दिवशी सकाळी आरामात आवरुन धरमशालेचा मुक्काम संपवून आम्ही जम्मूला परत निघालो. दुपारीच जम्मूला मुक्कामी पोहोचलो. 

           थोडा आराम करुन सायंकाळी बाहु किल्ल्यामधील महाकाली मातेच्या दर्शनासाठी जायचं ठरवलं. त्यादिवशी सप्तमी असल्याने मंदिरात दर्शनासाठी खूपच गर्दी असेल अशी माहिती आम्हाला मिळाली होती. पण तरीही आम्ही जायचं ठरवलं खूपच मोठी रांग असेल तर कळसाचं दर्शन घेऊन परत यायचं असं ठरवून निघालोच. मंदिराच्या आवारात पोहोचल्यावर प्रचंड गर्दी जाणवली नाही. मग पुढे जाऊन दर्शनासाठी रांगेत उभं राहिलोच. महाकाली माता ही इथे बावे वाली माता या नावानंही ओळखली जाते. हे वैष्णोदेवीच्या नंतरचं दुसरं तीर्थ स्थल मानलं जातं. त्यामुळे इथे भाविकांची सतत अतिशय गर्दी असते. महाराजा गुलाब सिंह यांनी १८२२ साली या मंदिराची निर्मिती केली. पौराणिक कथेनुसार याआधी ३०० वर्षांपूर्वी महाकाली देवीने पंडित जगत राम शर्मा यांना स्वप्न दर्शन दिलं आणि आपण या पर्वतावर शीळेच्या रुपात उपस्थित असल्याचं सांगितलं.  त्यानंतर काही काळातच अशी शीळा सापडली आणि याठिकाणीच हे मंदिर महाराजा गुलाब सिंह यांनी बांधलं. मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेली महाकाली मातेची मूर्ती आहे. दर रविवारी आणि मंगळवारी देवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रातही खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. खूप मोठ्या संख्येने यावेळी भाविक उपस्थित असतात. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा तिळमात्रही अंदाज नसताना आम्ही रांगेत उभं राहिलो होतो. मात्र देवीच्या कृपेने अगदी अर्ध्या तासातच आम्हाला मातेचं सुंदर दर्शन घडलं, प्रसादही मिळाला. मनाला अतिशय समाधान लाभलं. दर्शन घेऊन आम्ही बाजूच्या दुसऱ्या मंदिरात गेलो. इथे गर्दी कमी असल्याने दर्शन, प्रसाद घेऊन मातेसमोरच जरावेळ बसलो. मी  मनोमन श्रीसुक्त म्हणत डोळे मिटले आणि एका क्षणी माझ्या डोळ्यांसमोर साक्षात महालक्ष्मी उभी राहिली. लाल रंगाची नऊवारी साडी, सुवर्णाची आभुषणं ल्यायलेली देवी महालक्ष्मी मला मिटल्या नेत्री दिसत होती. मी नमस्कार केला आणि जाणवलं देवीचं निर्गुण रुप माझ्यासमोर सगुण साकार झालं होतं. दिवसभर मनात असलेली रुखरुख क्षणात नाहीशी झाली. आणि डोळ्यात आसू तरळलेच. त्यादिवशी सप्तमी होती. सायंकाळी महालक्ष्मी उभी रहाणार होती आणि आम्ही त्यावेळी जम्मू ला असल्याने आम्हाला महालक्ष्मीचं प्रत्यक्ष दर्शन होणार नव्हतं. हिच रुखरुख दिवसभर मनात होती. पण माझी दर्शनाची इच्छा देवी महालक्ष्मीने अतिशय वेगळ्या रितीने का होईना पूर्ण केली होती. मन अगदी प्रसन्न झालं. दर्शन घेऊन आम्ही रुमवर परत आलो.

           सहाव्या दिवशीही सकाळी लवकर आवरुन परत रघुनाथ मंदिरात जायचं ठरवलं. आम्ही रघुनाथ मंदिराच्या अगदी जवळच राहिलो होतो. त्यामुळे सकाळी लवकर दर्शनासाठी गेलो. मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. अतिशय सुंदर दर्शन घडलं. श्री रामरायाचं दर्शन घेऊन बाजूच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि आरती सुरु झाली. मुख्य मंदिरात आरती सुरु करुन भोवतीच्या सगळ्या मंदिरात ती आरती फिरवतात. झांज आणि घंटेच्या नादात ती आरती पहाण्याचा अनुभव सुंदरच असतो. आरती संपेपर्यंत आमचंही बऱ्याच मंदिरात दर्शन घेऊन झालं होतं. या मंदिरांमध्येच देवीचंही मंदिर आहे. यात देवीची नऊ रुपं साकारली आहेत. त्यादिवशी अष्टमी होती. आणि आम्हाला देवीचं अतिशय सुंदर दर्शन घडलं होतं. आरती संपली आणि पंडीतजीनी आम्हाला आरती घ्यायला बोलावलं. आरती घेऊन आम्ही परत मंदिरात दर्शनासाठी गेलो. परत एकदा डोळे आणि मन भरुन श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि पंडितजीनी गरमागरम कढाईप्रसाद हातावर ठेवला. आरतीच्या वेळेस नुकताच नैवेद्य दाखवून झाला होता आणि आम्हाला लगेचच तो प्रसाद मिळाला हा योग आमच्यासाठी खूपच खास होता. अष्टमीच्या दिवशीच सकाळी खूप सुंदर दर्शन घडल्यामुळे मन अगदी प्रसन्न झालं होतं. मंदिरातून परत फिरावसंच वाटत नव्हतं. पण परतीच्या प्रवासाची वेळ होत आली होती. त्यामुळे इथेही पून्हा दर्शनाचा योग यावा अशी मनोमन प्रार्थना करुन रुमवर परत आलो. 

           माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी वर्षभरात केव्हाही गेलं तरी मन अगदी तृप्त होतंच पण नवरात्रीत घेतलेल्या दर्शनाने मनाबरोबरच आपले नेत्रही तृप्त होतात. कारण नवरात्रीत वैष्णोदेवीच्या दर्शनमार्गावर केली जाणारी अतिभव्य आणि अप्रतिम अशी पुष्पसजावट इतरत्र कुठे केली जात नाही.

           यात्रा पूर्ण करुन सगळं आवरून सामान घेऊन जम्मू विमानतळावर पोहोचलो. तिथून विमानाने  सायंकाळी घरी पोहोचलो.

- स्नेहल मोडक







Friday, October 27, 2023

जय माता दी - १

             गतवर्षी नवरात्रातही माता वैष्णोदेवीच्या दर्शनाचा सुंदर योग आला होता आणि माता वैष्णोदेवीचं छान दर्शन घडलं होतं. परत यावर्षीही नवरात्रात असा योग यावा आणि मातेचं दर्शन घडावं अशी तीव्र इच्छा होती. पण काही कारणास्तव हे आधीपासून ठरवता आलं नाही. पण मनापासून असलेली इच्छा आणि प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेची कृपा यामुळे उशिरा का होईना आम्ही तिच्या दर्शनाला जायचं ठरवलंच. 

           ठरल्याप्रमाणे नवरात्र सुरु झाल्यानंतर दोन दिवसांनंतर विमानाने जम्मूला पोहोचलो. तिथून पुढे जाण्यासाठी आधीच गाडी ठरवली होती, त्या गाडीने निघालो. 

           जम्मूला आम्ही पोहचण्याआधीच पाऊस सुरु झाला होता. जोरदार पाऊस पडत होता आणि त्यामुळे थंडीही खूप होती पण एकूण वातावरण मात्र  छान आल्हाददायक होतं. घटस्थापनेपासून तिथे रोज पाऊस पडतच होता. वैष्णोदेवीलाही २-३ दिवस जोरदार पाऊस  पडत होता. त्यामुळे सगळीकडेच कडाक्याची थंडी पडली होती. पण एवढ्या थंडी पावसातही भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती.

           आम्ही त्या पावसातच पोहोचलो ते रघुनाथ मंदिरात. जम्मू विमानतळापासून ६-७ किलोमीटरवर असलेलं हे प्राचीन रघुनाथ मंदिर. जम्मू शहराच्या जून्या भागात आणि तावी नदीच्या उत्तरेला वसलेलं हे श्रीराम मंदिरांमधील एक प्रमुख मंदिर. अतिशय भव्य आणि अप्रतिम असं हे मंदिर डोगरा समाजात फार महत्त्वाचं मानलं जातं. हे विशाल मंदिर पूर्ण होण्यास २५ वर्षं लागली. १८३५ मध्ये महाराजा गुलाब सिंह यांनी समर्थ श्री रामदास स्वामींच्या प्रेरणेने या मंदिराची निर्मिती सुरु केली आणि १८६० मध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या काळात हे मंदिर बांधून पूर्ण झालं. समर्थ श्री रामदास स्वामी अयोध्येहून जम्मूला भगवान श्रीरामांच्या आदर्शांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आले होते. त्यांनी महाराजा गुलाब सिंह हे राजा होतील अशी केलेली भविष्यवाणीही सत्य झाली होती. वास्तूकलेचा अतिशय सुंदर नमुना असलेल्या या मंदिराच्या गर्भगृहातील भिंतींना सुवर्णाचा मुलामा देण्यात आला आहे. गर्भगृहात श्रीराम, सीतामाई आणि लक्ष्मण यांच्या रेखीव मूर्ती आहेत. तसंच या मंदिरात सात धार्मिक स्थळं आहेतच त्याशिवाय अनेक देवदेवतांच्या रेखीव मूर्तींनी प्राणप्रतिष्ठित छोटी मंदिरं आहेत. त्याचबरोबर ३३ कोटी देव हे लिंग स्वरूपात इथे प्रतिष्ठित आहेत. मुख्य मंदिराच्या चार बाजूंनी चारधाम म्हणजेच रामेश्वर, द्वारकाधीश, बद्रीनाथ आणि केदारनाथ हेही दर्शन आपल्याला घडतं. त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची सतत गर्दी असतेच. श्रीरामनवमीला इथे खूप मोठा सोहळा होतो. अशा या ऐतिहासिक मंदिरावर २००२ सालच्या मार्च आणि नोव्हेंबर महिन्यात आतंकी हल्ला झाला होता. त्यानंतर हे मंदिर बराच काळ भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं. २०१३ साली पून्हा हे मंदिर पूर्ण सुरक्षेत भाविकांसाठी उघडण्यात आलं. आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा दुपारची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे लगेच दर्शन घेता आलं. श्रीरामरायासमोर नतमस्तक झालो आणि अतिशय सुंदर दर्शन घडलं. नंतर इतर साऱ्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पुढे निघालो. 

           महाराजा हरि सिंह यांचा राजवाडा म्हणजेच अमर महाल पहाण्यासाठी आम्ही थांबलो होतो. हा राजवाडा जम्मू काश्मीर चे अखेरचे राजा महाराजा हरि सिंह यांच्यासाठी विसाव्या शतकात बांधण्यात आला होता. फ्रेंच वास्तुविशारदाच्या योजनेनुसार फ्रेंच शैलीत याचं बांधकाम करण्यात आलंय. १९९० साली या अमर महालात संग्रहालय आणि ग्रंथालय सुरु करण्यात आलंय. या संग्रहालयात महाराजा हरि सिंह यांच १२० किलो वजनाचं सुवर्ण सिंहासन आजही आपल्याला पहायला मिळतं.

           राजवाडा बघून आम्ही निघालो देवीच्या मंदिरात. कोल कंडोली माता मंदिर. वैष्णोदेवीच्या यात्रेत ५ मुख्य स्थानं आहेत. बाणगंगा, चरणपादुका, अर्धकुमारी, भवन आणि भैरवनाथ. पण या यात्रेच्या आधी पहिलं दर्शन कोल कंडोली मातेचं घ्यावं अशी मान्यता आहे. जशी भैरवनाथाच्या दर्शनाशिवाय वैष्णोदेवीची यात्रा अपूर्ण मानली जाते तशीच सुरुवातही कोल कंडोली मातेच्या दर्शनानेच केली जाते. हे मंदिर जम्मू पासून १५ किमी. अंतरावर नगरोटा या गावात आहे. कोल म्हणजे कटोरा आणि कंडोली म्हणजे कवड्या. कोल कंडोली मातेने एकूण चार वेळा या स्थानी चांदीचे कटोरे उत्पन्न केले होते. तसंच माता इथल्या स्थानिक कुमारिकांबरोबर कवड्या आणि इतर खेळ खेळत असे. यावरुनच या देवीला कोल कंडोली माता हे नाव रुढ झालं. पौराणिक कथेनुसार माता वैष्णोदेवी द्वापारयुगात पाच वर्षीय कन्येच्या स्वरुपात इथे प्रकट झाली होती. याच स्थानी माता वैष्णोदेवीने १२ वर्षं तपस्या केली आणि त्याच स्थानी  पिंडी स्वरुपही धारण केलं. आणि त्याच काळात माता कोल कंडोलीने विश्वशांतीसाठी होमहवन केलं होतं. आणि चांदीचा कटोरा निर्माण करुन त्यात विविध पदार्थ निर्माण करुन ३३ कोटी देवांना भोजन दिलं होतं. आम्ही या मंदिरात दर्शनासाठी गेलो तेव्हा तिथेही फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे शांतपणे मातेचं दर्शन घेता आलं सुंदर दर्शन घडलं, पंडीतजींनी सगळ्यांना प्रसादही दिला. हे मंदिरही प्रशस्त आहे आणि परिसरही छान आहे. म्हणूनच जम्मूला गेल्यावर रघुनाथ मंदिर, पॅलेस, कोल कंडोली माता मंदिर या ठिकाणी आम्ही  जातोच.

           कोल कंडोली मातेचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या मुक्कामी कटरा ला पोहोचलो. जम्मूला विमानतळावर उतरल्यानंतर वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आवश्यक अशा RFID card बद्दल चौकशी केली असता ते रात्री ९ नंतर मिळेल असं सांगितलं होतं. कटराला पोहोचल्यावर फ्रेश होऊन आम्ही परत ते कार्ड घेण्यासाठी बाहेर पडलो. RFID card counter वर गेल्यावर मात्र लगेच ते कार्ड मिळालं. 

           दुसऱ्या दिवशी पहाटे आन्हिकं आवरुन माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालो.

           भारतातील हिमालय पर्वतरांगेतील वैष्णोदेवी हे अतिशय पवित्र आणि लोकप्रिय असं श्रध्दास्थान. जम्मूमधल्या कटरा शहरातील त्रिकुट पर्वतावर हे वैष्णोदेवीचं स्थान आहे. दुर्गादेवीचा एक अवतार म्हणजे वैष्णोदेवी. जम्मू पासून ४५ किलोमीटरवर असलेल्या कटरा शहरापासून १४ किलोमीटरची चढाई करुन वैष्णोदेवीच्या दर्शनाला जावं लागतं. ज्यांना हे संपूर्ण अंतर पायी चालणं शक्य नाही त्यांच्यासाठी घोडा, पालखी, पिठ्ठू असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर कटरा ते सांजीछत अशी हेलिकॉप्टर सेवाही उपलब्ध आहे. जाता - येता दोन्ही वेळा किंवा एकच वेळ अशी हेलिकॉप्टरची सेवा आहे. 

        त्रिकुट पर्वतावर असलेलं हे वैष्णोदेवी मंदिर एका गुहेमध्ये स्थित आहे. भैरवनाथाने वैष्णोदेवीचा आदिशक्तीला वश करण्यासाठी पाठलाग केला. माता वैष्णोदेवी या त्रिकुट पर्वतावर आली आणि एका ठिकाणी थांबून तिने भैरवनाथ मागोमाग येत असल्याची खात्री करुन घेतली. त्या स्थानाला चरणपादुका दर्शन असं नांव आहे.  

         माता ज्या गुहेत जवळपास ९ महिने राहिली त्या गुहेला 'गर्भजून' किंवा अर्धकुमारी गुंफा म्हणून ओळखतात. वैष्णोदेवी मातेबरोबरच हनुमानजी तिच्या रक्षणासाठी उपस्थित होते अशी मान्यता आहे. हनुमानजीना तहान लागली म्हणून वैष्णोदेवीने बाण मारुन पर्वतामध्ये जलधारा उत्पन्न केली आणि या धारेत मातेनं आपले केस धुतले. आता ही जलधारा बाणगंगा या नावाने ओळखली जाते. या जळात स्नान केल्याने किंवा हे जल प्राशन केल्याने श्रध्दावानांचा सारा थकवा आणि अडचणी दुर होतात असं म्हणतात.

         ज्याठिकाणी वैष्णोदेवी मातेने भैरवनाथांचा वध केला होता त्या ठिकाणाला भवन म्हणून ओळखलं जातं. भैरवनाथांचा वध केल्यावर त्याचं शिर दूरवर जाऊन पडलं. तिथं भैरवनाथ मंदिर बांधण्यात आलं आहे. त्यालाच भैरोघाटी असंही म्हणतात.

          भैरवनाथांचा वध केल्यानंतर त्याना आपली चूक कळली आणि त्यांनी वैष्णोदेवी मातेची क्षमायाचना केली. तेव्हा मातेने त्यांना क्षमा करुन सांगितलं की माझं दर्शन घेतल्यानंतर तुझं दर्शन घेतल्याशिवाय माझं दर्शन पूर्ण होणार नाही. भैरवनाथ मंदिर दर्शनासाठी ३ किलोमीटर अंतर चढून जावं लागतं. त्यासाठी पायऱ्या, आणि साधा रस्ता अशी दोन्ही प्रकारची व्यवस्था आहे. त्याशिवाय घोडा, पालखीचीही सोय आहे. आणि गेल्या काही वर्षांपासून भवन ते भैरवनाथ अशी रोपवे ची ही व्यवस्था करण्यात आली आहे.

          वैष्णोदेवीच्या दर्शनाला जायचं खूपच उशिरा ठरल्यामुळे आम्हाला विमानाची तिकिटं मिळाली तरी कटरा ते सांजिछत ही हेलिकॉप्टरची तिकीटं मिळाली नव्हती. त्यामुळे दर्शनासाठी एक तर पायी चढून जाणं किंवा घोड्यावरुन जाणं हेच पर्याय होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी बघता दर्शनाला लागणाऱ्या वेळेचा विचार करुन आम्ही घोड्यावरुन जायचं ठरवलं. २-३ दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे घोड्यावरुन जाणं थोडं त्रासदायक वाटत होतं. कारण पावसाने मार्ग निसरडा होतो आणि घोड्यावरुन जाणं किंवा चालणंही त्रासाचं होतं. पण आम्ही वेळेअभावी घोड्यावरुनच जायचं ठरवलं. पहाटे निघालो तेव्हा बिलकुल पाऊस नव्हता. असाच दिवस पूर्ण कोरडा असावा आणि मातेचं छान दर्शन घडावं अशी प्रार्थना करुन प्रत्यक्ष यात्रेला सुरुवात केली. थोडं थांबत थांबत साधारण ३ तासांनी आम्ही वरती घोडेतळावर पोहोचलो. तिथून चालायला सुरुवात केली आणि एका क्षणी खिळून थांबलोच. कारण आमच्यासमोर होता विविधरंगी ताज्या फुलांच्या सजावटीचा अप्रतिम नजारा. दरवर्षी नवरात्रात भवनच्या दर्शनमार्गावर ही सजावट केली जाते. जागोजागी देवदेवतांच्या मूर्ती आणि ही अप्रतिम पुष्परचना केली जाते. अगदी खरं सांगायचं तर ही देखणी आरास पाहून आपले नेत्र थकतात पण मन काही भरत नाही. ही आरास पहाताना ती करणाऱ्या कलाकारांचं आपण मनोमन कौतुकच करत असतो.

           अशी ही अप्रतिम सजावट पहात, छायाचित्रं काढतच आम्ही दर्शनासाठी रांगेत उभं राहिलो. जेमतेम दिड तासाच्या प्रतिक्षेनंतर आम्ही प्रत्यक्ष वैष्णोदेवी मातेच्या दरबारात पोहोचलो. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे मातेसमोर जेमतेम २ क्षणच उभं रहाता येतं तेवढ्या वेळेतच डोळे भरुन दर्शन घ्यावं लागतं अर्थातच मन काही भरत नाही. पण त्या २ क्षणांच्या दर्शनाने मन प्रसन्न होतंच आणि जाणवतं याचसाठी केला होता अट्टाहास. मनोमन असाच वारंवार दर्शनाचा योग यावा अशी प्रार्थना करत मातेचं दर्शन घेऊन परत फिरलो आणि देणगी अर्पण करुन प्रसाद घेतला. थोडंसं चालत जिथे आमचे घोडे थांबले होते तिथे पोहोचलो. परत घोड्यावर बसून भैरवनाथाच्या दर्शनासाठी निघालो. भवनपासून ३ किमी. अंतरावर भैरवनाथ मंदिर आहे. मंदिरात दर्शनासाठी खडी चढाई चढून जावं लागतं. त्यामुळे आम्ही परत घोड्यावर बसूनच दर्शनाला गेलो. तिथेही २०-२५ मिनिटं रांगेत उभं राहिल्यानंतर भैरवनाथाचं छान दर्शन घडलं. दर्शन घेऊन आम्ही घोड्यावरुनच पुन्हा कटरा इथे जायला निघालो. परतीचा मार्ग उताराचा असल्याने यावेळी  वाटेत कुठेही न थांबता २.३० तासात कटरा ला पोहोचलो. तिथून पुढं एक दिड किमी. अंतरावर असलेल्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी चालत गेलो. जाता - येता दोन्ही वेळा घोड्यावरुन जाऊनही खूप थकवा आला होता. एवढा वेळ घोड्यावर बसायची बिलकुल सवय नसल्याने त्रास होत होता पण वैष्णोदेवी मातेचं सुंदर दर्शन घडल्यामुळे मन मात्र प्रसन्न होतं.

- स्नेहल मोडक

   




   



Wednesday, October 11, 2023

आठवणी

सुखद आठवणीच जमा करायच्या

नकोशा आठवणी मात्र विसरायच्या

छानशा आठवणींचा गोफ विणायचा

अन स्मितहास्याचा गोंडा लावायचा

वाईट आठवणी मनी खोल ठेवायच्या

अन मनोबंधनाच्या कड्या लावायच्या

सदैव साथ देणाऱ्याना नित्य जपायचं

बाकी कोण कसं वागलं हे विसरायचं

एकांतात आठवांची कवाडं उघडतात

मिटल्या पापण्यांतून आसू ओघळतात

मनमुक्त बोलायला कुणीच साथ नसतं

मग स्वतःच स्वतःला सावरायचं असतं

क्षणी आनंदाच्याही आठवणी दाटतात

अन भावनांच्या हिंदोळ्यावर झुलतात

मन जणू आठवांचा खोल डोह असतो

हलक्या स्पर्शानेही त्यावरी तरंग उठतो

- स्नेहल मोडक

Thursday, October 5, 2023

गिरनार आणि उपरकोट - सप्टेंबर २०२३

             भाद्रपद पौर्णिमा - ज्या दिवसाची आम्ही दोघं आसुसून वाट पहात होतो ती ही पौर्णिमा. या आधीच्या सलग तीन पौर्णिमांना केवळ माझ्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आम्हाला गिरनार गुरुशिखर दर्शन घडलं नव्हतं. त्यामुळे ही पौर्णिमा आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. यावेळीही तब्येतीचा थोडा त्रास होणार हे माहित असूनही जायचंच असं ठरवलं होतं. 

             रेल्वेचं आरक्षण आधीच केलं असल्याने ती चिंता नव्हती. नेहमीसारखं पौर्णिमेच्या आदल्या दिवशी 'यावेळी निर्विघ्न आणि सहजसुंदर दर्शन घडवा' अशी श्री दत्तगुरुंना प्रार्थना करुन निघालो. जूनागढला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढून स्थानापन्न झालो.  प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या ट्रेनमध्ये गिरनारला जाणारे दत्तभक्तच मोठ्या संख्येने असतात. त्यामुळे रेल्वेच्या बहुतेक सर्वच डब्यांमध्ये अतिशय छान वातावरण असतं. यावेळीही आमच्या बाजूच्या लोकांशी आमचा संवाद सुरु झाला आणि कळलं ते सगळेजण याच्याच ऑफिसमधील एका सहकारी मित्राबरोबर गिरनारला निघाले आहेत. मात्र ते सहकारी मित्र त्यावेळी इतर लोकांची व्यवस्था बघण्यासाठी दुसरीकडे फिरत होते. 

             साधारण १५-२० मिनिटांनी आमच्या गप्पा सुरु असतानाच सदैव आमच्या समवेत असणारे याचे मित्र आणि ते सहकारी मित्र असे दोघंही अचानक आमच्या समोर आले आणि 'तुम्हाला काहीतरी द्यायचंय' असं म्हणत त्या सहकारी मित्रांनी आमच्या दोघांच्याही हातात एक-एक माळ दिली. आणि या माळा गिरनारचे पीठाधिपती महंत श्री महेश गिरी बापूंनी पूजा करुन, गुरुपादुकांना स्पर्श करुन दिल्या आहेत असं सांगितलं. मला बोलायला शब्दच सुचत नव्हते. डोळ्यांत येणारं पाणी अडवत माळ भाळी लावली.

              हा दिवस होता अनंत चतुर्दशीचा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचं म्हणजेच श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने चौदा विश्वं निर्माण केली होती. या विश्वाच्या देखभाल आणि संरक्षणासाठी तो चौदा रुपात प्रकट झाला म्हणजे अनंत रुपात प्रकट झाला म्हणून अनंत चतुर्दशीला श्री विष्णूंचं पूजन केलं जातं. म्हणूनच अनंत चतुर्दशी हा दिवस जसा गणेशोत्सवाचा अखेरचा, बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस तसंच श्री विष्णूंच्या पूजनाचा दिवस.

              भगवान श्री विष्णू -देवी श्री लक्ष्मी आणि राधाकृष्ण यांना अतिशय प्रिय असलेली एक वस्तू म्हणजे वैजयंती माळ. भगवान श्रीकृष्ण नेहमीच ही माळ धारण करीत. वैजयंती  म्हणजे विजय मिळवून देणारी, यश संपादन करुन देणारी माळ. वैजयंती ही एक वनस्पती आहे. यावर लाल आणि पिवळ्या रंगाची सुंदर आणि सुंगधी फुलं येतात. याच्या बियांपासून ही माळ तयार करण्यात येते. चकचकीत अशा या बिया कधीही सडत किंवा तुटत नाहीत. काही विद्वानांच्या मते या माळेत पाच प्रकारचे मणी गुंफले जातात, जे पंचमहाभूतांचे प्रतिक असतात. ही माळ धारण करणं अतिशय शुभ फलदायी असतं. आणि आम्हाला प्रसाद म्हणून अशी वैजयंती माळच मिळाली होती. भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असलेली ही वैजयंती माला अनंत चतुर्दशीच्या शुभदिनी आम्हाला प्रसाद स्वरूपात मिळाली ही खूप भाग्याची गोष्ट आहे .स्वप्नातही न येता, न मागता स्वयं श्री दत्तात्रेयांनी आम्हाला एवढी मोठी प्रसाद भेट दिली होती. गिरनार प्रवासाची सुरुवातच शुभ संकेताने झाली होती.

              पहाटे जूनागढला पोहोचून रिक्षाने तलेटीला गेलो. मुक्काम स्थानी जाऊन सारी आन्हिकं आवरुन दर्शनाला निघालो. पहिल्या पायरीचं, लंबे हनुमानजीचं दर्शन घेऊन रोप वे ने अंबाजी टुकवर पोहोचलो. तिथून पुढे पायऱ्या चढून गुरुशिखरावर गेलो. मंदिरात प्रवेश करुन गुरुपादुकांसमोर नतमस्तक झाले आणि डोळ्यात पाणी आलंच. सलग तीन पौर्णिमेनंतर श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडलं होतं. त्यामुळे दर्शन घडल्यावरही मन शांत व्हायला काही क्षण लागलेच. दर्शन घेऊन परत खाली कमंडलू कुंडाजवळ गेलो. पोथीचं वाचन, दर्शन, प्रसाद घेऊन परत खाली निघालो. गोरक्षनाथ, अंबामाता यांचं दर्शन घेऊन रोप वे जवळ पोहोचलो. आमच्या बरोबर असलेले काही जणं थोडं मागे राहिले होते. त्यामुळे त्यांची वाट पहात थांबलो. कारण रोप वे ने एकत्रच जायचं होतं. 

              १५-२० मिनिटं झाली आणि रोपवे चे अधिकारी येऊन सांगू लागले की ज्यांना रोपवेने पायथ्याशी जायचं आहे त्यांनी लगेच चला. वातावरण बिघडलं आहे , त्यामुळे रोपवे कुठल्याही क्षणी बंद करावा लागेल. झालं, आमची काळजी वाढली.  मागे राहिलेल्यांना लवकर बोलावण्यासाठी सतत फोन करु लागलो. अखेर ते रोप वे जवळ आले आणि आम्ही निघालो. ट्राॅलीमध्ये बसलो आणि जेमतेम २-३ मिनिटं ट्राॅली नेहमीच्या वेगाने पुढे गेली आणि अचानक वेग एकदम कमी झाला. इतका की नक्की आपली ट्रॉली पुढे जातेय कि नाही असं वाटत होतं. ट्राॅली ५-७ मिनिटं अशीच हळूहळू सुरु असतानाच एका क्षणी पूर्ण थांबली. आणि बाहेरच्या वाऱ्यामुळे हेलकावे घेऊ लागली. आम्हाला याचा पूर्वानुभव असल्याने फारशी काळजी वाटली नाही. काही मिनिटांतच ट्राॅली पून्हा हळूहळू सुरु झाली. आणि परत एकदा पूर्णपणे थांबली. परत आधीसारखे हेलकावे घेऊ लागली. आता मात्र आमच्या बरोबर असलेल्यांना किंचित काळजी वाटली. काही मिनिटांतच पून्हा ट्राॅली सुरु झाली. आणि आता मात्र नेहमीच्या वेगाने पायथ्याशी निघाली. जेमतेम १० मिनिटांत पायथ्याशी पोहोचणारी ट्राॅली यावेळी २५-३० मिनिटांनी पोहोचली होती.

              मुक्कामी येऊन थोडी विश्रांती घेऊन सोमनाथला निघालो. नेहमीसारखंच आधी भालका तीर्थाचं दर्शन घेण्यासाठी गेलो. यावेळीही मंदिराच्या आवारात खूपच गर्दी होती. नुकताच कुठलातरी कार्यक्रम संपला तरी होता किंवा पावसामुळे थांबवावा लागला होता. त्यामुळे गर्दी होती पण मंदिरात दर्शनासाठी मात्र फार लोकं नव्हती. त्यामुळे सुंदर दर्शन घडलं. या मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे. खूप सुंदर दर्शन झालं पण माझं मन तृप्त झालं नव्हतं. इथून पुढे आम्ही गीता मंदिरात दर्शनासाठी गेलो.

              हिरण्या नदीतीरी वसलेलं हे गीता मंदिर. इथे काही मंदिरांचं संकुल आहे. मुख्य मंदिरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि भिंतींवर गीतेतील अध्याय श्रीकृष्णाच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगासह चितारले आहेत. बाजूला श्रीराम -सीता , लक्ष्मी- नारायण अशी मंदिरं आहेत. मुख्य मंदिरात दर्शन घेऊन लक्ष्मी - नारायण मंदिरात प्रवेश केला आणि काही क्षण भान हरपून उभीच राहिले. काही क्षणांनी नतमस्तक झाले आणि मन एकदम तृप्त, शांत झालं. गिरनारला येण्याआधी काही दिवसांपूर्वी मला राधाकृष्णाचं सुंदर असं स्वप्नदर्शन घडलं होतं. तेव्हापासून प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि ती माझी इच्छा इथे पूर्ण झाली होती. गिरनारला गेल्यावर भालका तीर्थ, गीता मंदिर, त्रिवेणी संगम आणि सोमनाथ या साऱ्या स्थानी दर्शनासाठी आम्ही जातोच. पण तरीही स्वप्नदर्शन झाल्यापासून प्रत्यक्ष दर्शनाची आस लागली होती ती अखेर पूर्ण झाली. तिथून पुढे सोमनाथांचं दर्शन घेऊन परत मुक्कामी आलो.

              दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच सारं आवरुन भवनाथ मंदिरात शंभू महादेवाच्या दर्शनासाठी गेलो. लवकर गेल्यामुळे मंदिरात बिलकुल गर्दी नव्हती. शांतपणे अतिशय सुंदर असं दर्शन घेता आलं. तरी इथेही मन थोडं बेचैन होतं. दर्शन घेऊन मृगी कुंडाजवळ गेलो. गर्दी नसल्याने मृगी कुंडाभोवती प्रदक्षिणा घालता आली. आणि त्या मार्गात असलेल्या मोठ्या शिवपिंडीचं दर्शन स्पर्श करुन घेता आलं. त्यावेळी मात्र अर्पण करण्यासाठी बिल्वदल नसल्याची मला फारच रुखरुख लागली. शिवपिंडीवर जल चढवून नमस्कार करुन मंदिराबाहेर आलो. बाहेर आलो आणि मी अक्षरशः थक्क झाले. मंदिराबाहेर फुलवाला नुकताच येऊन फुलं विक्रीसाठी लावत होता. बिल्वदलंही अजून पिशवीतच होती. मी लगेच खूपशी बिल्वदलं विकत घेतली आणि आम्ही पून्हा मंदिरात गेलो. मृगी कुंडाच्या बाजूला असलेल्या शिवपिंडीवर बिल्वदलं अर्पण करुन नतमस्तक झाले आणि पुन्हा माझे डोळे ओलावले. तिथून परत मुख्य मंदिरात आलो तोपर्यंत तिथे आरती सुरु झाली होती. हाही सुंदर योग होता. इतक्या सुंदर रितीने माझी दुसरी इच्छाही पूर्ण झाली होती.

               राधाकृष्णाचं स्वप्नदर्शन होण्याआधी दोन दिवस २४ तासांच्या आत मला शंभू महादेवांनी तीन वेळा अतिशय सुंदर स्वप्नदर्शन दिलं होतं. त्यातील एका स्वप्नात मी खूप सारी बिल्वदलं अर्पण केल्याचं मला दिसलं होतं. म्हणूनच प्रत्यक्षात जेव्हा मला बिल्वदलं अर्पण करता आली तेव्हा डोळे पाणावलेच. त्या स्वप्नांमुळेच शंभू महादेवांनाही प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडावं अशी प्रार्थना मी करत होते आणि इथे माझी तीही इच्छा पूर्ण झाली होती. खरंतर स्वप्नात घडलेल्या दर्शनानेच मन खूप सुखावलं होतं आणि नंतर प्रत्यक्ष मंदिरात दर्शन घडलं हे फारच भाग्याचं, मन अगदी प्रसन्न झालं होतं.

              भवनाथ मंदिराचं दर्शन घेऊन नाश्ता करुन आम्ही, गेली ४ वर्षं ज्याची प्रतिक्षा केली होती तो जुनागढचा उपरकोट किल्ला बघायला गेलो. अनंत चतुर्दशीच्या दिवशीच या किल्ल्याचं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. आणि त्या दिवसापासून हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. गेली ४ वर्ष हा किल्ला दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. 

             मौर्य साम्राज्याच्या काळात गिरनार पर्वताच्या पायथ्याशी एक किल्ला आणि शहर वसवले गेले. गुप्त काळापर्यंत याचा वापर केला जात होता. नंतर जूनागढहून राजधानी वल्लभी येथे हलविण्यात आल्यावर या किल्ल्याचं महत्त्व कमी झालं. नंतर १० व्या शतकातील चुडासामा राजा ग्रहरिपु यानी हा किल्ला जंगलापासून मुक्त केला. त्यानंतर १८९३-९४ मध्ये जुनागढ राज्याचे दिवाण हरिदास विहिरीदास यांनी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला.

             उपरकोट किल्ला अतिशय भव्य आणि सुंदर आहे. शहराच्या पलीकडे पूर्वेकडील भिंतींमध्ये या किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. एकात एक असे तीन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या भिंती ६०-७० फुट उंचीच्या आहेत. याच्या आतील बाजूस खोल खंदक सुरक्षेसाठी खणलेले होते. तर या उंच भिंतीवर टेहळणी बुरूज आहेत. या किल्ल्यात 'अडी वाव' आणि 'कडी वाव' अशा दोन मोठ्या आयताकृती विहिरी आहेत. जवळपास ७०-७५ पायऱ्या उतरुन खाली गेल्यावर या विहिरी पहाता येतात. तसंच गोलाकार पायऱ्या उतरुन खाली एक 'नवघन कुवा' आहे. दुसऱ्या - तिसऱ्या शतकातील बौद्ध लेणीही या किल्ल्यात आहेत. ही दुमजली गुंफा आहे, प्राचीन काळी बौद्ध भिक्षूंनी या गुंफांचा उपयोग केला होता. या गुंफा पहाण्यासाठी नाममात्र प्रवेशफी आहे. 

             राणी राणक देवीचा प्रशस्त महालही सुंदर आहे. खूप मोठा बगीचाही इथे आहे. नवाबी तलावही मोठा आणि पहाण्यासारखा आहे. खूप जून्या काळातील काही तोफा इथे ठेवल्या आहेत. त्यातील दोन मोठ्या तोफा नीलम आणि माणेक या नावाने ओळखल्या जातात. किल्ल्यात लेझर शो आणि वस्तुसंग्रहालयही सुरु करण्यात येणार आहे. तसंच हा भव्य किल्ला पहाण्यासाठी बॅटरी कार ही सुरु करण्यात येणार आहे. 

             ४ वर्षांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेल्या या किल्ल्यात आता जागोजागी पिण्याचे पाणी, उपहारगृह, स्वच्छतागृहं, या साऱ्यांची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण किल्ला पायी फिरून पहाण्यासाठी किमान ३ तासांचा अवधी आवश्यक आहे. 

             जुनागढ आणि आसपासच्या इतर प्रेक्षणीय स्थळांमध्ये आता या उपरकोट किल्ल्याचा समावेश नक्कीच करावा लागेल. आवर्जून एकदा तरी पहावा असा हा किल्ला आहे. इथे पूर्ण एक दिवसही थांबता फिरता येईल एवढा हा किल्ला भव्य आणि प्रेक्षणीय आहे. जागोजागी सविस्तर माहिती फलकही लावण्यात आले आहेत. त्यामुळे सारा किल्ल्याचा इतिहास आपल्याला सहज जाणून घेता येतो. 

             किल्ला बघून रुमवर परत येऊन आवरुन पुन्हा ट्रेनने परतीच्या प्रवासाला लागलो.

- स्नेहल मोडक

     

    
    






        


कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...