Pages

Saturday, December 25, 2021

वर्ष सरताना...

              आपल्या आयुष्यातलं हे वर्ष सरत आलय. एक जानेवारीला सध्याच्या दिनदर्शिकेच्या जागी एक नवीन दिनदर्शिका येईल. आणि पुन्हा दर महिन्याला त्या दिनदर्शिकेचं एक-एक पान उलटलं जाईल. आपलं आयुष्य ही इतकं सहजसोपं असतं का हो?

              सरत्या वर्षाबरोबरच आपलं अनुभवांचं, सुखदु:खाचं गाठोडंही मोठं होत असतं. त्यातूनच आपण नवीन वर्षाचे काही संकल्प करतो. अर्थात काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण...


अजून एक वर्ष सरत आलय

आठवणी साऱ्या ठेवून जातय

मोती खास मैत्रीचे काही विखुरले

नव मैत्रीचे बंध ते अलगद जुळले

सुटले काही दूरच्या नात्यांचे बंध

जुळले काही नवागतांशी संबंध

आले रागरुसवे झाले गैरसमज

जाणले कुणी भाव मनीचे सहज

घडल्या भेटी कुणी झाले मनमुक्त

टाळूनी भेट राहिले कुणी अव्यक्त

स्वप्नफुले काही सहजच उमलली

असूनी निगराणी काही कोमेजली

सरत्या वर्षाचा हा आलेखच असे

मनी नववर्षाचे कल्पनाचित्र वसे

चुका अन गैरसमज ते विसरुया

अन नात्यांचे भावबंध घट्ट विणूया

स्वप्नपंख लेऊनी नभी विहरुया

नववर्षाचा हाच संकल्प करुया

- स्नेहल मोडक


Monday, December 6, 2021

झिम्मा

              सहज बोलता बोलता अचानक लेक म्हणाली 'आई आपण झिम्मा बघुया'. क्षणभर ती काय म्हणतेय ते मला कळलंच नाही. मग तिने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्याची झलक असलेली चित्रफितही दाखवली आणि मलाही हा चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली. खरंतर चित्रपट आणि मालिका यांच्याशी माझं सख्य जरा कमीच. मात्र खास विषयांवर आधारित चित्रपट मी नक्की पाहते. ठरवल्यानुसार हा चित्रपट पाहिला आणि त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं.

              इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट 'झिम्मा'. यातील उत्तम कलाकार आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर असा अभिनय आणि संपूर्ण चित्रपटात असलेली नयनरम्य अशी लंडनची पार्श्वभूमी यामुळे जणू आपणही या चित्रपटाबरोबर लंडनचा प्रवास करुन येतो.

             इरावती कर्णिक यांचं , 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो' हे एक वाक्यच संपूर्ण चित्रपटाचं सार सांगून जातंं. स्वतः ला किंवा इतरांना समजून घेण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी पर्यटन हे अतिशय सुंदर माध्यम आहे. एकट्याने प्रवास करताना आपण स्वताच स्वताला नव्याने गवसतो. तर बरोबर कुणी असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाबरोबर त्या व्यक्तीला अतिशय जवळून ओळखताही येतं. कधी कधी आपणच आपल्यावर विनाकारण अनेक बंधनं घालून घेतलेली असतात. कधी काही घटनांचा खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून आपण आपलं अस्तित्वही विसरुन गेल्यासारखं जगत असतो. या साऱ्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी पर्यटन हा एक छान उपाय आहे.

               रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वताला थोडं बाहेर काढून सात स्त्रिया लंडन प्रवासाला निघतात. या साऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातल्या , वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या अशा आहेत. इंग्लंड सहलीच्या निमित्ताने या सगळ्या जणी एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट या सहलीदरम्यान घडणाऱ्या धमाल, मजामस्तीच्या चित्रांनी सजलाय अर्थात त्या सगळ्या चित्रांना प्रत्येकीच्या आयुष्यातील हळव्या घटनांची किनारही आहे.

              कुठल्याही स्त्रीला बाहेर पडताना खूप वेगवेगळ्या पातळ्या ओलांडाव्या लागतात. मुळात तिने स्वतावर जी बंधनं घालून घेतलेली असतात त्यातून मार्ग काढणं तिला जरा कठिणच होतं. पण कधीतरी तिलाच या बंधनातून मुक्त व्हावसं वाटतं आणि मग मात्र ती 'स्व' च्या शोधासाठी नक्की बाहेर पडते. आणि यासाठी पर्यटन हा एक सुंदर मार्ग आहे. अशा प्रवासातच तिला स्वतः ची नव्याने ओळख होते. सगळ्यांबरोबरच स्वताच्या मनाचाही विचार ती आवर्जून करु लागते. कधी एखाद्या घटनेचा आपण किती खोलवर विचार करत असतो, विनाकारण एखाद्या गोष्टीची अतिकाळजी करत असतो, कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या जबाबदारीत नको इतके अडकलेले असतो या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला होते. आणि त्यातून ती स्वतःच्या मनाला हळूहळू पण निश्चितपणे बाहेर काढते. अशा प्रवासात नव्या मैत्रीणी मिळवते. तर प्रवासात बरोबर एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. अशा पर्यटनाला निघताना जरी तिची द्विधा मनस्थिती असली तरी नंतर मात्र ती प्रवासातल्या अनुभवातून अतिशय उत्साहात, आनंदात आपल्या रोजच्या कामात दंग होते. 

               माझ्यासाठीही पर्यटन हा नेहमीच एक आनंदानुभव असतो. अर्थात एकटीने प्रवास करायची वेळ सहसा माझ्यावर येत नाही. कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी बरोबर असतातच. पण प्रत्येकवेळी मी माझी मलाच नव्याने उलगडत जाते. एखाद्या गोष्टीबद्दलचं अज्ञान, भिती, समज गैरसमज दूर होतात. स्वत: च्या क्षमतेची जाणीव होते.

               या प्रवासाचाच 'झिम्मा' या चित्रपटात अतिशय सहज सुंदर खेळलाय. मनमुक्त हसवणारा पण मध्येच हळवं करणारा, अगदी आवर्जून पहावा आणि आपल्यातल्या 'स्व' ला आपणही असंच जपावं याची सहज जाणीव करुन देणारा हा चित्रपट आहे.

- स्नेहल मोडक

Saturday, December 4, 2021

मनोमनी

              कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही एखादी घटना घडते किंवा कधी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि आपली मनस्थिती द्विधा होते. आजूबाजूला सारं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असतं, आपणही यांत्रिकपणे वावरत असतो पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसतं. या सगळ्यांपासून कुठतरी दूर जावं एकटं शांत बसावं असं काहीसं वाटत असतं. कुणाला त्रास होऊ नये, काही जाणवू नये म्हणून आपण सहज वावरायचा प्रयत्न करत असतो पण मन मात्र भावनांचा गोफ विणतच रहातं.


कधी वाटते एकलेच तळ्याकाठी बसावे

शांत जलाशयासम स्तब्ध नि:शब्द रहावे

        जसे पर्ण तरंगे संथ नितळ जळावरी

        उठती भावनांचे तरंग जणू मनावरी

कधी वाटते एकलेच फिरावे काजळ राती

होऊनी अंधारसावली विसरावी सारी भीती

        जावे विसरुन सारी जणू फसवी नातीगोती

        विणावा कोष हा निर्विकारतेचा मनाभोवती

कधी वाटते एकलेच पावसात भिजावे

कुणास नकळत आसवांचे पाट वहावे

        भिजूनी पाऊसधारात तनमन शांतवावे

        कल्लोळ भावनांचे हृदयातून संपवावे

कधी वाटते फिरावे घनदाट अरण्यात

हलके ओघळावे दु:ख दाटल्या पापण्यांत

        वाढली जरी किती ऊंची स्पर्श धरेचा असावा

        पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

             पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

- स्नेहल मोडक

Wednesday, November 24, 2021

गिरनार दर्शन आणि परिक्रमा

              गिरनार परिक्रमा वर्षातून फक्त एकदाच कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात करता येते. गतवर्षी कोविड निर्बंधांमुळे परिक्रमा होऊ शकली नाही. त्यामुळे या वर्षीच्या परिक्रमेची सारेच दत्तभक्त आसुसून वाट पहात होते. 

             आम्हीही वेळेतच रेल्वेचं आरक्षण केलं होतं. यावेळी आमच्याबरोबर आधीपेक्षा जास्त लोकं दर्शन आणि परिक्रमेसाठी येणार होती. साहजिकच सर्वाच्या एकत्रित यात्रेची सर्व व्यवस्थाही आधीच केली. आणि यात्रेला जायच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पण यावर्षीही परिक्रमेला परवानगी नसल्याचं स्पष्ट झालं आणि मन थोडं नाराज झालं. त्याच नाराजीतून एक दिवस मनात परिक्रमा नसेल तर यात्रा करण्यात काय अर्थ आहे असा विचार आला. कारण इतर वेळी दर्शन घडत असतंच. फक्त परिक्रमा वर्षातून एकदाच. मन बेचैन असतानाच 'सारं मनासारखं होईल, दर्शनाला ये' अशी जाणीव मनाला कुणीतरी करुन दिली, आणि तो भास होता कि अजून काही हा विचार न करता यात्रेला जायचं नक्की ठरवलं. 

             ठरलेल्या दिवशी रेल्वेने सर्वांचा एकत्रित प्रवास सुरु झाला. आमच्याबरोबर काही सहकारी मित्र यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच त्यांच्या सहकार्यामुळेच एवढ्या लोकांच्या यात्रेचे सेवा म्हणून आयोजन करणं शक्य होतं. 

             प्रवासातील सर्वांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ती जबाबदारीही एका मित्रानी घेतली होती. पण काही कारणानं ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि आमची गाडी सुटली. पुढील स्थानकात ही गाडी गाठण्यासाठी ते निघाले पण गर्दीमुळे तिथेही ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि त्या स्थानकावरुनही आमची गाडी पुढे निघून गेली. मग मात्र बाकिच्या सहकाऱ्यांची काळजी वाढली. एवढ्या लोकांसाठी बनवलेलं अन्न तर वाया जाणार आणि त्या मित्राची यात्राही चुकणार असं वाटू लागलं. मग ते अन्न तिथेच संस्था, मंदिर अशा ठिकाणी देऊन त्यांनी तरी दुसऱ्या गाडीने जुनागढला पोहोचावे असा विचार करत असतानाच दुसऱ्या गाडीची माहिती मिळाली. ती गाडी लगेच सुटणारी होती. ताबडतोब ते सहकारी सामानासहित त्या गाडीजवळ पोहोचले. त्या गाडीत चढायला आजूबाजूला असलेल्या लोकांनी  आपणहून मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार वाटेत ती गाडी आमच्या गाडीच्या पुढे निघून गेली, आणि आम्हाला थोडं बरं वाटलं. सुरतला ते सामानासहित आमच्या गाडीत चढले आणि सर्वांची काळजी संपली. सर्वांनीच मनापासून श्री दत्तगुरुंना नमस्कार केला. पहिल्यांदा जेव्हा त्यांना गाडी चुकली तेव्हाच साऱ्यांना काळजी वाटू लागली होती. दुसऱ्या स्थानकातही जेव्हा गाडी गाठणं त्यांना अशक्य झालं तेव्हा सर्वांच्या काळजीची जागा चिंतेनं घेतली होती. पण का कुणास ठाऊक मी मात्र शांत होते. माझं अंतर्मन मला सांगत होतं ते सहकारी जेवणासहित वेळेत आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. दुसऱ्यांदाही गाडी गाठता आली नाही मग आता ते कसे आपल्यापर्यंत पोहोचणार याची यत्किंचितही कल्पना मला नव्हती पण ते पोहोचणार याची मनाला खात्री होती आणि अगदी तसंच घडलं ते वेळेतच आमच्यापर्यंत जेवणासहित पोहोचले ही श्री दत्तगुरुंनी दिलेली एक अनुभूतीच. 

             दुसऱ्या दिवशी पहाटे जुनागढला पोहोचलो. तिथून भवनाथ तलेटी येथे आम्ही आधी आरक्षित केलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सारं भराभर आवरुन लगेच गुरुशिखर दर्शनाला निघालो.

             गुरुशिखरावर दर्शनाला जाण्यासाठी उडन खटोलाचंही आधीच आरक्षण केलं होतं. पण तिथे जाण्याआधी रिवाजाप्रमाणे पहिल्या पायरीजवळ जाऊन श्री मारुतीरायाचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन आणि पूजा, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ आलो. खूपच गर्दी होती पण आधी आरक्षण केलं असल्याने लगेचच आम्हाला उडन खटोलाने अंबाजीटुक पर्यंत जायला मिळालं. अंबाजीटुकला पोहोचलो, अंबामातेचं दर्शन घेऊन लगेच पुढे निघालो. थोड्याच वेळात गोरक्षनाथटुक ला पोहोचलो. त्याचदिवशी गोरक्षनाथ जयंती होती. अतिशय छान योगायोग होता. गोरक्षनाथांचं अतिशय छान दर्शन घडलं. तिथं जरा थांबून परत पुढे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. श्री दत्तात्रेयाच्या चरणी नतमस्तक झाले आणि साऱ्या देहात चैतन्याची सुक्ष्म थरथर जाणवली. साऱ्या चिंता थकवा क्षणात नाहीसा झाला. गर्दी खूपच होती तरीही अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि तृप्त झाले. नंतर पायऱ्या उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. तिथे प्रत्यक्ष पादुकांवर मस्तक टेकवून दर्शन घेता येतं. ते दर्शन घेऊन अन्नछत्रासाठी धान्य, रक्कम अर्पण करुन प्रसाद घेण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. तिथे सकाळची वेळ असल्याने शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद ग्रहण करुन वरच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या सभागृहात आलो. पण काही कामासाठी ते सभागृह बंद होते त्यामुळे त्याबाहेर बसूनच थोडंसं गुरुचरित्र वाचन केलं आणि प्रसन्न चित्ताने परतीच्या मार्गाला लागलो. परत एकदा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक पर्यंत आलो. अंबामातेचं दर्शन घेऊन उडनखटोलाने तलेटी मुक्कामी पोहोचलो. अतिशय सुंदर दर्शन आणि प्रसाद मिळाल्यामुळे जेवायची इच्छाच नव्हती. त्यामुळे थोडा आराम केला.

             संध्याकाळी पुढील दर्शनासाठी सोरटी सोमनाथ ला निघालो. त्याआधी मार्गातील भालका तीर्थ इथे दर्शनाला गेलो. वृक्षतळी विश्रांतीसाठी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या पावलाला एका पारध्याने मारलेला बाण चुकून लागला आणि मानवदेहधारी श्रीकृष्णानी तिथेच अंतिम श्वास घेतला ती जागा म्हणजेच भालका तीर्थ. तिथे आता तलाव म्हणजेच तीर्थ आणि बाजूलाच प्रशस्त रेखीव मंदिर आहे. मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेले असताना बाण लागलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे आणि पायाशी मस्तक झुकवलेल्या अवस्थेतील पारध्याची मूर्ती आहे. हे दर्शन करुन पुढे सोरटी सोमनाथांचं दर्शन घेतलं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे सोमनाथ मंदिर. हे दर्शन करुन तलेटी मुक्कामी परत आलो.

             कार्तिकी एकादशीच्या आधी पंधरा दिवसांपर्यंत यावर्षीही परिक्रमेला परवानगी नव्हती. पण आठवडाभर आधी निर्णय बदलला आणि फक्त साधू - संत अशा चारशे लोकांनाच परिक्रमा करता येईल. फक्त तीन दिवस आणि पहाटे चार ते सात या वेळेत च परिक्रमेला सुरुवात करता येईल असं जाहीर करण्यात आलं. पण त्यात बाकी लोकांना जायला मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळे सगळेच भाविक नाराज होते. माझ्या मनात मात्र परिक्रमेविषयी संदेह नव्हता. आमची यात्रा द्वादशीला सुरु होणार होती. त्यामुळे तोपर्यंत नक्की काहीतरी श्री दत्तगुरु कृपेने घडणार आणि ते आमच्याकडून परिक्रमा पूर्ण करुन घेणार यावर माझा विश्वास होता. परिक्रमा एकादशी ला रात्री बारा वाजता सुरु होते. त्याआधी रात्री अकरा वाजता आम्हाला निरोप मिळाला. आम्ही ज्या आश्रमात उतरणार होतो तिथल्या प्रमुखांनी परिक्रमेला सर्व लोकांना परवानगी मिळाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या बरोबर येणाऱ्या सर्वाना ही बातमी कळवली आणि सर्वांच्या मनात उत्साह संचारला. 

             गुरुशिखर दर्शन आणि सोमनाथ दर्शन करुन दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पहाटे चार ते सात यावेळेतच सुरु करायला परवानगी देण्यात आली होती. दरवर्षी परिक्रमेत भाविक चार दिवस वास्तव्य करतात. परिक्रमा मार्गात खाऊ आणि पाणी मिळण्यासाठी छोटी दुकानं असतात. पण यावर्षी ही दुकानं आणि वास्तव्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानगी नव्हती. दोन वर्षांच्या निर्बंध काळात मानवी हस्तक्षेप नसल्याने जंगलातील प्राणी मुक्त संचार करत होते. अशात परिक्रमेच्या निमित्ताने लोक जंगलातून फिरताना एखाद्या प्राण्याने हल्ला करण्याची शक्यता असल्याने वास्तव्यास परवानगी देणे योग्य नव्हते. म्हणून फक्त दिवसभराच्या परिक्रमेला परवानगी मिळाली. वाटेत खाणं पिणं मिळणार नसल्यामुळे बरोबर खाऊ पाणी घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. आदल्या दिवशी परिक्रमा करताना कुणालातरी सिंहाचं दर्शन झालं होतं अशी बातमी आम्हाला मिळाली होती. त्यामुळे एकट्या दुकट्याने न जाता समुहाने मार्गक्रमणा करावी असं सुरुवातीलाच सगळ्यांना सांगीतलं. सुरुवातीचा सात आठ किमी चा उंच चढावाचा गाडीरस्ता संपला आणि पायवाटेला सुरुवात झाली. आजूबाजूचं जंगल न्याहाळत आरामात चालणं सुरु होतं. बघता बघता समोर पूर्व दिशा सोनकेशरी रंगांनी उजळली. आणि केशररंगी रविराजाचं सुरेख आगमन झालं. सूर्योदयाचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात बध्द करित आम्ही पुढे चालत होतो.

             सिंह आणि इतर प्राणी दिसण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही जंगलात नीट पहात कोनोसा घेतच चाललो होतो. पायवाटेने चालत असतानाच दाट जंगल सुरु झालं आणि आमचं निरिक्षणही वाढलं. काही वेळाने अचानक थोडी खसफस ऐकू आली आणि आम्ही शांत उभं राहून पाहू लागलो आणि झाडीतून हरणं पळताना दिसली. पण ती आमच्यापासून लांब होती आणि चटकन निघून गेली त्यामुळे छायाचित्र घेणं शक्य झालं नाही. पण त्यानंतर मात्र माझी उत्सुकता खूपच वाढली. आणि आज मला सिहांचं दर्शन व्हायलाच हवं आहे असं मोठ्यांदा बोलून गेले. पुढे मी जंगलात जास्तच निरखून बघत चालू लागले. थोडा वेळ गेला आणि मला बाजूच्या जंगलात कुणीतरी प्राणी गेल्याचं दिसलं. कुठला प्राणी असावा हे पहाण्यासाठी मी थोडी पुढे जाणार तोच दोघंतिघं तिथंच उभे असलेले दिसले. त्यांनीही खूणेनच कुणाचीतरी चाहूल लागल्याचं सांगितलं. आम्ही तिथे असलेले सारे क्षणात स्तब्ध राहून निरखू लागलो आणि अचानक अगदी काही फुटांवर आम्हा सर्वांना तिचं दर्शन झालं. तिथे वनराणी निवांत बसली होती. आम्ही अतिशय स्तब्धतेनं तिला पहात होतो. नजरेला जरी ती स्पष्ट दिसत असली तरी दाट झाडीमुळे छायाचित्र मात्र किंचित अस्पष्टच येत होतं. आम्ही पहात असताना जरी शांत असलो तरी बहुधा तिला आमची चाहूल लागली असावी. तिने हलकेच मान वळवून आमच्या दिशेने काही क्षण बघितलं आणि पून्हा मान फिरवून निवांत बसली. आम्ही शांतपणे सिंहिणीला पहात असतानाच एका जंगल अधिकाऱ्याची गाडी तिथे आली. आम्हाला पाहून लगेच गाडी थांबवून ते उतरले आणि आम्हाला तिथे थांबू नका असं सांगितलं. अर्थात आमच्या सुरक्षेसाठीच त्यांनी आम्हाला थांबू दिलं नाही. पण आमची सिंह पहाण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली. लेकराने मायपित्याजवळ एखादा लडिवाळ हट्ट करावा आणि त्यांनी तो लगेच पूर्ण करावा, तद्वत माझा हट्ट श्री दत्त गुरुनी सहज पूर्ण केला होता. अतिशय आनंदात आणि भारावलेल्या अवस्थेत मी पुढे चालू लागले. 

             परिक्रमा मार्गात तीन डोंगर चढून उतरावयाचे आहेत. साधारण अर्ध्या अंतरावर भगवती मातेचे मंदिर आहे. आदल्या दिवशी मार्गात कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही असं कळलं होतंच. परंतु आम्ही भगवती मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तिथे भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली दिसली. कुणाला पूर्ण भोजन नको असेल तर गोड बुंदी आणि गाठी असा प्रसादही दिला जात होता. आम्हीही बुंदी आणि गाठींचा थोडासा प्रसाद घेऊन पुढे निघालो. 

             परिक्रमेला सुरुवात केल्यावर काही तासांनी पाऊस गुलाबपाणी शिंपडून गेला होता. मात्र भगवती मंदिरानंतर साधारण तासाभरात जोरदार पाऊस सुरु झाला. वाटेत कुठेही थांबण्यासारखी परिस्थिती नसल्याने आम्ही भिजतच चालत राहिलो. वीस - पंचवीस मिनिटं पडलेल्या जोरदार पावसामुळे आम्ही नखशिखांत भिजलो होतो. परंतु परिक्रमा पूर्ण होण्यासाठी बरंच अंतर चालायचं असल्यामुळे फारसं न थांबता चालतच राहिलो. भिजलो असलो तरी गारव्यामुळे चालताना त्रास कमी होत होता. सारे चढ उतार पार करत, जंगलाचा, पावसाचा आनंद घेत, नामस्मरण करीत अखेर शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. शेवटचा सात - आठ किमीचा रस्ताही गाडीरस्ता आहे. चांगला रस्ता असूनही दिवसभराच्या चालण्यामुळे तो रस्ता संपता संपेनासा होतो. अखेर सावकाश चालत उरलेला रस्ता चालत गेलो आणि ज्याची अगदी आसुसून वाट पाहिली होती ती परिक्रमा पूर्ण झाली. 'सारं मनासारखं होईल दर्शनाला ये' ही मला झालेली जाणीव श्री दत्तात्रेयांच्या कृपेने शब्दशः खरी ठरली होती.स्वयं श्री दत्तगुरुंनी आम्हाला दर्शन आणि परिक्रमा घडवली होती. ही परिक्रमा आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लावणारी आहे पण मला मात्र श्री दत्तगुरु बरोबर असल्याची जाणीव सतत होत होती.

             बाहेर आल्यावर सर्वात आधी चहा प्यायला गेलो. चहा पिऊन परत ताजंतवानं होऊन मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. 

             दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन सर्वजणं बेट द्वारकेला निघालो. द्वारकेला पोचायला साधारण तासभर असताना धुवांधार पाऊस सुरु झाला. मात्र ओखा येथे पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. आम्ही सारी लोकं येईपर्यंत धक्क्यावर नौका ठरवण्यासाठी पुढे गेलो आणि पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. आम्ही मागे फिरुन इमारतीमध्ये पोहोचेपर्यंत चिंब भिजलो. पाऊस थांबल्यावर नौकेतून बेट द्वारकेला पोहोचून मंदिरात‌गेलो. मंदिरात आरती सुरु असल्याने दर्शन बंद होतं. आरती संपल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर दर्शनासाठी चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं. तिथून नौकेतून आम्ही परत फिरलो. आणि त्या परतीच्या प्रवासात समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे आम्हाला नखशिखांत समुद्र स्नान घडलं. आधी पावसात चिंब भिजलो होतोच ते कमी कि किय म्हणून परत समुद्र स्नानही घडलं होतं. थंडीने गारठलो होतो पण तरीही खूप छान वाटत होतं.  तिथून निघून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. नंतर तिथून द्वारकेला जाऊन पुन्हा द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तलेटीला परतलो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.

               अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

- स्नेहल मोडक

Monday, November 1, 2021

दीपावली

                 दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांमधून झालीय. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ याचा संपूर्ण अर्थ म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजेच दीपावली. दीपावलीस अजूनही वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. निलमत पुराणात हा सण दीपमाला या नावाने ओळखला जातो. दीपावलीचं मूळ नांव यक्षरात्र होतं असं हेमचंद्रानी नोंदवलंय. कनोजचा राजा हरिश्चंद्र यानी दीपप्रतिपदुत्सव असं या सणाला नांव दिलं होतं.

                 अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस दिवाळी सणाचे असतात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. तिमीर दूर करुन प्रकाश देणारा दीप मांगल्याचं प्रतिक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्याही जीवनातील अंध:कार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. आनंद, कृतज्ञता, सौख्य समृध्दी यांच प्रतिक म्हणजे दीपावली. रंगावली, पणत्या, आकाशकंदील, रोषणाई या साऱ्यांनी घर सुशोभित करतात. गोड अन खमंग फराळाचे पदार्थ नैवेद्यासाठी आणि सर्वांसाठी केले जातात.

                अश्विन वद्य द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखला जातो. वसु म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे म्हणजे द्वादशी. यादिवशी सवत्स धेनूची पूजा करुन पुरणाचा नैवेद्य दिला जातो.

                अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी म्हटलं जातं. यादिवशी घरातील द्रव्यायालंकारांची पूजा करतात. अपमृत्यू टळावा यासाठी यादिवशी यमदीपदान केलं जातं म्हणजे सायंकाळी दाराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावतात. या दिवसाला धन्वंतरी दिन म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजनही केलं जातं.

                दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करुन प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं होतं त्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहाटे अभ्यंगस्नान करतात. तैलमर्दन करुन, सुवासिक उटणं लावून सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. अलक्ष्मीचं मर्दन करुन आपल्यातील अहंभाव नष्ट होऊन आत्मतेज पसरावं हा उद्देश असतो.

                अश्विन अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मी ही चंचल आहे असा समज आहे. ती स्थिर रहावी म्हणून तिचं पूजन केलं जातं. द्रव्य आणि सुवर्णालंकारांची पूजा यादिवशी केली जाते.

                कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा करतात. यादिवशी बलीराजाची पूजा करुन  इडा पिडा टळो आणि बलीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. तसंच यादिवशी सुवासिनी पतीला औक्षण करतात. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.

                कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भावाबहिणीच्या अतूट रेशमी नात्याचं प्रतिक असा हा सण. या दिवशी यम आपली बहिण यमी हिच्याकडे जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया या नावानंही ओळखतात. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते आणि भाऊ औक्षणानंतर ओवाळणी देऊन बहिणीचा सन्मान करतो.

                रात्रभर जागून सर्वांनी मिळून तयार केलेला आकाशकंदील आणि फराळ, सगळीकडे केलेली पण्त्या आणि रांगोळ्यांची आरास, भल्या पहाटे उठून केलेलं अभ्यंगस्नान, मंदिरात जाऊन घेतलेलं देवदर्शन आणि त्यानिमित्ताने पाहिलेले सगळीकडचे आकाशकंदील, फटाक्यांची आतिषबाजी, पहाटे आकाशवाणीवरुन ऐकलेली दिवाळीची विशेष गाण्यांची मैफल यात कालानुरुप थोडा बदल झालाय खरा. पण तरीही अतिशय उत्साहाचा, सौख्य समृध्दीचा असा सण म्हणजेच दीपावली.

                 अंध:काराचा नाश करुन तेजाने लखलखणारी, सौख्यमयी, आनंदमयी हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी. आपल्या सर्वांच्या जीवनात हा तेजाचा लखलखाट सदैव रहावा.

        ..

सरले नवरात्र अश्विनही सरत आला

लक्ष लक्ष दीप लावित कार्तिक आला

उष्णवात संपूनी शीतलता आली

रखरखती अवनी शांत जाहली

आकाशदिव्यांनी आसमंत सजले 

दीप रंगावलीने अंगणही उजळले

खमंग मधुर फराळाचे ताट भरले

आस्वाद घेण्या गणगोत हे जमले

सुरु होतसे दीपावली अभ्यंगस्नाने

होते धनवृद्धीही मंगल लक्ष्मीपूजने

बली प्रतिपदा हा कार्तिक प्रथमदिन

औक्षणे पूजने मागावे नित्य सुदिन

बहिणभावाच्या घट्ट रेशमी नात्याचा

दिवस असे तो खास भाऊबीजेचा 

फराळ आतिषबाजी लक्ष दिवे रंगावली

भासते उत्फुल्ल नित्य नवी दीपावली

- स्नेहल मोडक



Sunday, October 24, 2021

सफर लेह लडाखची...

            लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. याआधी तो जम्मू काश्मीर चा एक भाग होता. लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे असून ते पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.

           हिमालयातील चहूबाजूंनी दिसणारी उंचच उंच हिमाच्छादीत गिरीशिखरं, खोल दऱ्या, त्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या नितळ निळ्या पाण्याच्या नद्या, अवतीभवती असलेली हिरवाई, दुर्गम रस्ते, अनोखी भूरुपे अशा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा लेह लडाख. याचमुळे लडाखला गेल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव येतो.

           सुर्योदयाचा अप्रतिम नजारा पहात आम्ही पहाटे लेह विमानतळावर उतरलो. कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणारी बर्फाच्छादीत गिरीशिखरं पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. विमानातून उतरण्याआधीच लेहचं तापमान ६ अंश असल्याचं सांगितलं होतं. अर्थात आम्ही थंडीपासून संरक्षण करण्याच्या पूर्ण तयारीनेच गेलो होतो. विमानतळावरुन आम्ही रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आणि तो संपूर्ण दिवस आराम केला. संध्याकाळी अर्धातास जवळच्या भागात थोडंसं फिरुन आलो. ११५०० फुट उंचीवर असलेल्या लेह मध्ये रहाण्यासाठी आपलं शरीर अनुकूल होणं ( high altitude acclimatization) गरजेचं असतं. एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी थोडी कमीच असते. त्यामुळे लेहला पोचल्यावर एक दिवस संपूर्ण आरामाची गरजच असते.

           दुसऱ्या दिवसापासून आमचं स्थलदर्शन सुरु झालं. सर्वात आधी लेहमधल्या हेमिस येथील बौद्ध मठ पहायला आम्ही गेलो. हा मठ लेहपासून साधारण ४५ किमी अंतरावर आहे. अकराव्या शतकातील हा मठ लडाखमधील सर्वात श्रीमंत मठ समजला जातो. दरवर्षी इथे जूनमध्ये हेमिस फेस्टिव्हलचे आयोजन केलं जातं. त्यावेळी हजारो पर्यटक इथे हजेरी लावतात. हा मठ पहायला बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं. लाकडी कोरीव काम केलेल्या इमारती, शांत पवित्र वातावरण अगदी अनुभवण्यासारखं.

 
           हेमिसचा मठ पाहून पुढे थिकसे येथील मठ पहायला गेलो. ११८०० फुट उंचीवर असलेल्या या मठातून आपल्याला इंडस खोरं पहायला मिळतं. या मठात जाण्यासाठीही खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. इथे आपल्याला अप्रतिम असा ४९ फुट उंचीचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा पहायला मिळतो. १९७० मध्ये १४ व्या दलाई लामा यांनी या मठाला भेट दिली होती. सगळ्या मठांमध्ये आपल्याला बुध्दाच्या विविध मुर्ती, पुतळे, भित्तीचित्रं पुराणकालीन हस्तलिखितं, पोथ्या हे सारं पहायला मिळतं.

           यानंतर आम्ही पोहोचलो शे पॅलेस पहायला. इथेही खूप वरपर्यंत पायऱ्या चढून जावं लागतं. १६ व्या शतकातली मठ आणि बाजूलाच खास उन्हाळ्यात रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा असं याचं स्वरुप आहे. इथे शाक्यमुनी बुध्दाची लडाखमधील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची रेखीव मूर्ती आहे. सोनं आणि तांबं या धातूंच्या मिश्रणातून ही मूर्ती घडवली आहे. या मठाच्या बाजूलाच असलेला पॅलेस राजा नामग्याल यांनी बांधलाय. मात्र आता तिथे खूप काही पहाण्यासारखं नाही.

           प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, आदराने मान झुकवावी अशी लेहमधील वास्तू म्हणजे हाॅल ऑफ फेम. भारतीय सैनिकांना दिलेली मानवंदना म्हणजे हाॅल ऑफ फेम. या दुमजली इमारतीमध्ये भारत पाकिस्तान युद्धाची माहिती, पाकिस्तानी सैनिकांनी युध्दात वापरलेली शस्त्रास्त्रं, युद्धकालीन कागदपत्रं, सैनिकांना मिळालेली सन्मान चिन्हं, लडाखचा इतिहास, लेहमधील जीवनशैली, सियाचीन मध्ये उणे तापमानात सैनिकांना वापरावे लागणारे पोशाख आणि इतर साहित्य हे सर्व पहाता येतं. त्याचबरोबर रोज सायंकाळी इथे कारगिल युध्दाची अर्ध्या तासाची चित्रफित आणि थोडं सादरीकरण दाखवण्यात येतं. 

            हे सारं पाहून त्यादिवशी लेहमध्येच मुक्काम केला.

            दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो नुब्रा खोऱ्याकडे. इथे जाण्यासाठी खारदुंग-ला ही सर्वात उंच खिंड पार करावी लागते. वाहनाने जाता येईल अशी ही सर्वात उंचावर असलेली, श्योक खोरं आणि नुब्रा खोरं यांना लेह शहराशी जोडणारी ही खारदुंग-ला खिंड वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. १८००० फूट ऊंचीवर असलेल्या या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असल्यामुळे इथे १५-२० मिनीटांवर थांबणं अशक्य असतं.

             ही खिंड पाहून पुढे गेल्यावर येतो तो दिस्किट मठ. इथेही खूप साऱ्या पाय-या चढाव्या लागतात. १४ व्या शतकातील या मठातही अतिशय शांत पवित्र वातावरण आहे. या मठात बुध्दाचा ३२ मी. उंचीचा सुवर्ण पुतळा आहे. या मठाच्या जवळच मोकळ्या जागेवर मैत्रेय बुध्दाचा १०६ फुट उंचीचा सुंदर पुतळा आहे.

              यानंतर‌ आम्ही पोहोचलो ते नुब्रा खोऱ्यातील वाळवंटात. ज्याला हिमालयातील थंड वाळवंट म्हटलं जातं ते सॅन ड्यून किंवा कोल्ड डेझर्ट. अतिशय अप्रतिम आणि विस्तिर्ण असं हे वाळवंट. फक्त इथेच आपल्याला भारतातील एक आश्चर्य पहायला मिळतं ते म्हणजे मंगोलियन जातीचे दोन कुबड असलेले उंट. हे उंट पहायला आणि त्यावर बसून फिरायला पर्यटक इथं नेहमीच गर्दी करतात. हे सारं पाहून आम्ही जवळच असलेल्या हुंदेर या छोट्या गावातील रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.

              सकाळी लवकर निघालो भारत पाकिस्तान सीमारेषेवरचं शेवटचं थांग हे गाव पहायला. या छोट्या गावातून पायवाटेने चालत या गावतील घरं, लोकं, त्यांचं रहाणीमान हे सारं पहात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. तिथून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला भारत-पाक सीमारेषा पहाता येते.

                ते पाहून आम्ही थांग जवळच्या तुरतुक या भारत पाक सीमारेषेवरच्या दुसऱ्या गावात पोहोचलो. हे भारतातील शेवटची चौकी असलेलं ठिकाण आहे. यापुढे पाकिस्तान मधील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग सुरु होतो. १९४७ च्या युध्दात तुरतूक गावावर पाकिस्तानने कब्जा केला होता. नंतर १९७१ साली झालेल्या युध्दात भारताने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. श्योक नदीवरील पूल पार करुन गावातून पायवाटेने चालत इथल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता येतं. इथंही दुर्बिणीच्या सहाय्याने भारत पाक सीमारेषेवरच्या दोन्ही देशांच्या चौक्या पहाता येतात. हे एकच ठिकाण असं आहे की जिथे पाकिस्तानची चौकी आपल्या चौकीपेक्षा थोडीशी उंचावर आहे. ते पाहून परत फिरताना वाटेत एक छोटं संग्रहालय आहे. त्यातून बाल्टि लोकांच्या संस्कृतीचा परिचय होतो. पुलाच्या दुसऱ्या बाजूला अजून एक लहानसं संग्रहालय आहे. मुळात तो एक लहानसा राजवाडा होता. तोच आता संग्रहालय म्हणून ओळखला जातो. बाल्टिस्तानच्या राजाने खास उन्हाळ्यात फक्त ३ महिने रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा. आता तिथे त्या काळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, राजगादी हे पहायला मिळतं. हे पाहून आम्ही परत हुंदेरमधल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.   

                  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच पॅनगाॅंग लेक च्या दिशेने निघालो. याआधीच्या साऱ्या प्रवासातले रस्ते अतिशय वळणाचे, चढ उताराचे, एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या असे असले तरी ठिक होते पण पॅनगाॅंग सरोवराकडे जाणारा रस्ता मात्र फारच खराब होता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही तर नुसत्या दगडातूनच जावं लागतं. अर्थात याला तिथली परिस्थिती कारणीभूत आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ता नीट राहणं अशक्यच. तसंच रस्त्याचा काही भाग प्रत्क्ष नदीपात्रातून जात असल्यामुळेही नुसता दगडाळ आहे. पण तरीही विलक्षण अशा निसर्ग सौंदर्यामुळे हा त्रास बिलकुल जाणवत नाही. हिवाळ्यात बर्फवृष्टीत मात्र हा मार्ग बंद होतो. थोडं आधीपासूनच आपल्याला पॅनगाॅंग सरोवराचं दर्शन घडू लागतं. जेव्हा प्रत्यक्ष त्या सरोवरापाशी आपण पोहोचतो तेव्हा अक्षरशः भान हरपून पाहत राहतो. स्फटिकासारखं नितळ निळंशार पाणी आणि एका बाजूने असलेल्या पर्वतरांगा असलेलं हे अतिशय अप्रतिम असं हे सरोवर साऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे सरोवर खाऱ्या पाण्याचं असूनही हिवाळ्यात पूर्णपणे गोठतं. या सरोवराचा ३० टक्के भागच आपल्या भारतात आहे , उर्वरित ७० टक्के भाग चीनमध्ये आहे. हे अप्रतिम सरोवर पाहून आम्ही लेह येथे मुक्काम करण्यासाठी निघालो. पॅनगाॅंग सरोवर पाहून लेह ला येताना चांगला खिंड पार करावी लागते. ही खिंडही १७००० फूट उंचीवर आहे. इथेही ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे १५-२० मिनीटांपेक्षा जास्त थांबणं‌ शक्य होत नाही. 

                  लेह ते नुब्रा व्हॅली या संपूर्ण प्रवासात आपल्याला श्योक नदी सदैव साथ देते.

                पॅनगाॅंग सरोवर ते लेह या पूर्ण प्रवासात लांब पर्वतमाथ्यांवर उतरलेले ढग आणि सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. लेहला लवकर पोहोचलो म्हणून खरेदीसाठी मार्केटमध्ये जायचं ठरवलं पण पूर्ण प्रवासातलं ढगाळ वातावरण लेहमध्ये ही अवतरलं होतं. तिथेही दूरवरच्या डोंगरात सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी दिसत होती. गार वारा सुटलेला व थंडीचा कडाका वाढला होता. रात्रीतून तापमान उणे अंशात जाणार असल्याचं जाणवलं आणि मार्केटला जाणं रद्द केलं.

                पुन्हा सकाळी लवकर उठून निघालो ते थेट लेह-श्रीनगर मार्गावरील द्रास येथे. इथे जाताना दोन खिंडी लागतात - फोटू-ला खिंड (१३५०० फूट) आणि नामिका-ला खिंड (१२२०० फूट). द्रास हे भारतीय युध्दसैनिकांना दिलेली मानवंदना व युध्दाचा इतिहास सांगणारं हे युध्द स्मारक. १९९९ साली झालेल्या भारत - पाक कारगिल युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पवित्र स्मृती म्हणून इथे अखंड ज्योत तेवत असते. इथे सैनिकांना अभिवादन करुन आम्ही कारगिल येथे रिसॉर्टमध्ये मुक्काम करण्यासाठी आलो. त्या रात्री तापमान -२ अंशावर उतरलं होतं. अर्थात ही सुरुवात होती. द्रास कारगिलमध्ये हिवाळ्यात तापमान -४० अंशावर येतं. हिवाळ्यात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीचे हे सहा महिने इथल्या लोकांसाठी अतिशय त्रासदायक असतात. ज्या लोकांना शक्य असतं ते जम्मू, गोवा, नेपाळ किंवा इतरत्र स्थलांतर करतात. पण ज्यांना हे शक्य नाही ते लोकं आणि आपले भारतीय सैनिक मात्र अतिशय कष्टप्रद जीवन जगतात.

                कारगिलहून सकाळी लवकर निघून पोहोचलो लामायुरु मठात. हा मठही खूप पूर्वीच्या काळातील आणि सर्वात मोठा आहे. इथे सर्वात जास्त प्रमाणात बौद्ध भिक्षू वास्तव्यास आहेत. या मठात जाण्यासाठी मात्र अगदी थोड्याच पाय-या चढाव्या लागतात.

 

                लामायुरु आणि आसपासचा भाग मूनलॅण्ड म्हणून ओळखला जातो. इथल्या अविश्वसनीय अशा वेगळ्या भौगोलिक रचनेमुळे या भागाला मूनलॅण्ड म्हणतात. अतिशय वेगळ्या प्रकारचे पर्वत आणि दरीखोरं इथे पहायला मिळतं.

                कारगिल हून येताना आधीच्या रात्री झालेल्या बर्फवृष्टी मुळे सारे पर्वत शुभ्र बर्फाची दुलई लपेटून बसलेले दिसत होते त्यामुळे वाटेत थांबून त्या बर्फात थोडंसं खेळायचा मोह आवरता आला नाही आणि ती हौसही पूर्ण झाली.

                यानंतर आम्ही पोहोचलो संगम येथे. इंडस आणि झंस्कार या दोन नद्यांचा हा संगम अतिशय सुंदर आहे. या संगमाच्या बाजूला उथे आहेत थंड वाळवंटातील पर्वत. इंडस ही संपूर्ण उत्तर भारतातून वाहणारी नदी आणि तिला मिळणारी लडाखमधील झंस्कार नदी. हा संगम लडाखमधील निमू गावात होतो. ही झंस्कार नदी हिवाळ्यात जेव्हा पूर्ण गोठते तेव्हा तिच्यावरुन पूर्ण चालत जाता येतं. हा चादर ट्रेक या नावानं प्रसिद्ध आहे. यासाठी दरवर्षी इथे खूप लोक जातात.

                तिथून पुढे निघून पोहोचलो ते मॅग्नेटिक हिल येथे. लेह- श्रीनगर मार्गावरील उंच सखल भूपृष्ठ असलेलं हे ठिकाण आहे. इथे उताराच्या दिशेने गियर विरहित स्थितीत उभी केलेली गाडी चढावाच्या दिशेने जाताना पहायला मिळते. चमत्कारारीक आणि दृष्टीभ्रम अशी वाटणारी ही घटना पहाण्यासाठी पर्यटक इथे येतात.

                लेह ते द्रास या पूर्ण प्रवासात आपल्याला इंडस नदीचं सुंदर दर्शन होत रहातं.

                 यानंतर परत आम्ही लेहला मुक्काम करण्यासाठी आलो. 

                दुपारीच लेहला पोहोचलो होतो. त्यादिवशी वातावरणही एकदम ठिक असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणं शक्य झालं. लेहचं मार्केटही पहाण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. अतिशय गजबजलेल्या या मार्केटमध्ये स्थानिक लोकांबरोबर पर्यटकही आवर्जून खरेदी करतात. इथे तिबेटी कलाकुसरीच्या विविध वस्तू, चांदी व इतर धातूंच्या वस्तू,  मूर्ती, पश्मिना शाली, जर्दाळूचं तेल व जाम, सुकवलेले जर्दाळू, इतर सुकामेवा, गालिचे, ध्यानधारणेसाठी उपयुक्त धातूचे सिंगींग बाऊल्स इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

                 संपूर्ण प्रवासात प्रचंड थंडी होती. ६ अंशापासून सुरु झालेलं तापमान कारगिल मुक्कामात -२ अंशावर आलं होतं. परंतु आम्ही पूर्ण तयारीनिशी गेल्यामुळे थंडीचा आणि कमी ऑक्सिजन पातळीचा आम्हाला बिलकुल त्रास झाला नाही. आणि त्यामुळेच लेह लडाखचं विलक्षण पण नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य आम्हाला मनसोक्त अनुभवता आलं. 

                  पुन्हा पुन्हा जावं असं वाटणारं लेह लडाख म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. प्रत्येकाने किमान एकदातरी नक्की अनुभवावं.

- स्नेहल मोडक



Wednesday, September 22, 2021

आयुष्यात कधी...

                    आपल्या सगळ्यांचच आयुष्य ‌असंख्य स्वप्नांनी भरलेलं असतं. अर्थातच त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात तर काही मात्र अपूर्णच राहतात. पण काहिही झालं तरी आपण मात्र 'मी' 'माझं' या कोषातंच गुंतून रहातो. खरंतर निसर्गही आपल्याला 'मी' पण विसरुन जगायची शिकवण देत असतो. निसर्ग स्वत: रिक्त होऊन आपल्याला सारं काही भरभरून देत असतो. आपल्यालाही असं 'मी' पण विसरुन जगता आलं तर...

  

आयुष्यात कधी पान अळवाचे व्हावे

विसरुन मानापमान सारे निर्लेप व्हावे

  आयुष्यात कधी नितळ जल‌ व्हावे

  सुखदुःखात अलगद विरघळावे

आयुष्यात कधी अथांग सागर व्हावे

जीवन भरती ओहोटीसम जाणावे

        आयुष्यात कधी झाड प्राजक्ताचे व्हावे

        लयलूट सुगंधाची करुनी रिक्त व्हावे

आयुष्यात कधी स्वच्छंद विहग व्हावे

क्रोध मोह सोडूनी मनमुक्त विहरावे

       आयुष्यात कधी छान फुलपाखरू व्हावे

       रंग ठेवूनी मनामध्ये क्षणात उडूनी जावे

  - स्नेहल मोडक

Wednesday, September 8, 2021

बाप्पा

           श्रावणाचा मास सरे भादवा आला

           खरंच श्रावण सरता सरता आपण सर्वजण भाद्रपद महिन्याची अतिशय आतुरतेने वाट पहात असतो. खरंतर सण आणि व्रतवैकल्यांनी श्रावण भरलेला असतो. पण आपल्या लाडक्या आराध्यदैवताचा, बाप्पाचा उत्सव भाद्रपद महिन्यात असतो. म्हणूनच आपण गणेश चतुर्थीसाठी, बाप्पाच्या सोहळ्यासाठी आसुसलेले असतो. 

           श्रावण संपायच्या आधीच गणरायाच्या स्वागताची तयारी सुरु झालेली असते. अगदी घराच्या साफसफाई पासून फराळाचे पदार्थ करणे, बाप्पासाठी सुंदर मखर, आरास करणे, पुजेची तयारी करणे सारं काही उत्साहात सुरु असतं.


           भाद्रपद सुरु होतो आणि आधी येतं हरितालिका व्रत. भाद्रपद तृतीयेला हे व्रत करतात. पार्वतीमातेनं भगवान महादेव आपल्याला पती म्हणून लाभावेत यासाठी बारा वर्षं अरण्यात राहून कठोर तपस्या केली. भाद्रपद तृतीयेला नदीतीरी वाळूचं शिवलिंग स्थापून विविध फुलं, पत्री अर्पून पूजन केलं. उपवास, जागरण केलं. तिच्या या तपाने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार केला.

           म्हणून भाद्रपद तृतीयेला सुवासिनी आणि कुमारिका सकाळी लवकर हरितालिका पुजन, दिवसभराचा उपवास, रात्री परत पुजन आणि थोडे खेळ खेळून, जागरण करुन हे व्रत करतात.

            आणि मग वेध लागतात ते गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेचे. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केलं जाणारं हे महत्त्वाचं धार्मिक व्रत आहे. गणपतीच्या अवतारांपैकी गणेश या अवताराचा जन्म यादिवशी झाला असं मानलं जातं. या दिवशी गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. षोडशोपचारी पूजा करुन विविध फुलं दुर्वा, पत्री वाहिल्या जातात. 

            

            भाद्रपद चतुर्थीला सकाळी लवकर गणरायाची अशी षोडषोपचारी पूजा संपन्न होते. आणि मग अथर्वशीर्षांच्या आवर्तनांच्या तालावर मोदक करुन होतात. एकवीस मोदकांसह नैवेद्याचं सुरेख ताट बाप्पाला अर्पण केलं जातं. सकाळ संध्याकाळ बाप्पाची पूजाअर्चा, नैवेद्य अशी यथासांग सेवा सुरु असते.

           हरितालिकेच्या आणि गणपतीच्या पूजेला विविध फुलं, दुर्वा, पत्री लागतात. त्या खुडण्याच्या निमित्ताने आपलं निसर्गाच्या सान्निध्यात जाणं होत. या साऱ्या पत्रींमध्ये औषधी गुणधर्म असतात त्याचीही माहिती होते. श्रावण सरींनी मखमली हिरवाईची दुलई ल्यायलेल्या धरतीचं सुंदर रुप या निमित्ताने अनुभवता येतं. 

           गणांचा अधिपती अशा या गणपतीचा उत्सव सार्वजनिक स्वरुपात लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये सुरु केला. 

           काळाच्या ओघात गणेशोत्सव दिड, पाच, सात किंवा दहा दिवस साजरा केला जातो.

           गणरायाची सेवा उत्साहात सुरु असतानाच आगमन होतं गौरींच. आणि मग बाप्पाच्या पूजेबरोबरच गौरीपुजनाचीही लगबग सुरु होते. या गौरी विहिर, तलाव, नदी अशा पाणवठ्यावरुन आणायच्या असतात त्या निमित्तानेही आपलं निसर्गाजवळ जाणं होतं. 

           अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असं हे तीन दिवसाचं व्रत आहे. याला ' ज्येष्ठागौरी व्रत ' असं म्हणतात. गौरींच पूजन वेगवेगळ्या स्वरुपात केलं जातं. सोन्या चांदीचे, पितळेचे मुखवटे, तेरडयाची एकत्र बांधलेली रोपं किंवा पाच खडे अशा वेगवेगळ्या पध्दतीने हे गौरी पूजन केलं जातं. अशा या सोन्याच्या पावलांनी येणाऱ्या ज्येष्ठागौरींचं व्रत अखंड सौभाग्यासाठी सुवासिनी करतात.

           गौरी आगमन, पूजन, सुवासिनी भोजन, विसर्जन हे सारं मनापासून केलं जातं. 

        

           यानंतर येते अनंत चतुर्दशी, विसर्जनाचा दिवस. दहा दिवस घरी आलेल्या बाप्पाला अतिशय जड अंतःकरणाने निरोप दिला जातो तो पुढल्या वर्षी लवकर परत येण्याचं आश्वासन घेऊनच. 



भाद्रपद मासी असे खास गणेशचतुर्थी

दर्शन देण्या सदनी येई मंगलमूर्ती

     करुनी औक्षण होई स्वागत गणरायाचे

     विनायकासाठी सजे आसन खास मखराचे

तबकी हिरवी दुर्वादले जपाकुसुम रक्तवर्ण

विविध फुलपत्री लेऊनी सजे धुम्रवर्ण

      करुनी षोडशोपचारी पूजा आरतीचा थाट

      नैवेद्यासाठी अर्पण करावे मोदकांचे ताट

पूजन ओंकाराचे असे सुखद सोहळा

निमित्ते जमतो मैत्री नात्यांचा मेळा

       उत्सव गिरीजात्मजाचा जरी खास असे

       गणगोत जमल्याविना मात्र सुनासुना भासे

 गणाधीशा तू सुखकर्ता तू दूखहर्ता 

 संकटी रक्षावे शरण तुला विघ्नहर्ता

        लाभो आयुरारोग्य हेच ईशचरणी प्रार्थूया

        मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया


- स्नेहल मोडक


Thursday, August 19, 2021

ऋतु हिरवा

                    आषाढ श्रावण सरींनी सारी वसुंधरा हिरवीगार होते. अगदी पाचूसारखी पोपटी, हिरवी, गडद हिरवी अशा विविध रंगछटांनी सजते. या सुंदर साजाबरोबरच शुभ्र निर्झरांचा अवखळ नादही आपल्याला ऐकू येत असतो. मखमली हिरवाईवर उमललेल्या रंगगंधी फुलांवर रंगीबेरंगी फुलपाखरं रुंजी घालत असतात. वर्षाऋतुचा काळ म्हणजे फुलपाखरं, पक्षी यांच्या सृजनाचा काळ. पक्ष्यांचाही किलबिलाट अखंड सुरु असतो. अशा नितांतसुंदर सृष्टीसौंदर्याने आपलं मनही मोहोरतं, रानीवनी धावतं.


गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला

         फुलपाखरासम मी वनी विहरले

         तनामनास माझिया जणू पंख लाभले

स्वच्छंद होऊनी मन माझे मोहरले

जणू नभी पुनवेचे चांदणे पसरले

        तरुवेली अन रानफुलांत मी रमले

        मधुगंधात त्या मी रोमरोमी फुलले

मन होऊन पाखरु आकाशी झेपावले

सप्तरंगात इंद्रधनूच्या तन माझे नाहले

        तृप्त मनात अलगद गीत उमलले

        अन पावलात नाचऱ्या नुपूर झंकारले

गंधाळले मन जणू मोगरा फुलला

संचार मुक्त हिरव्या रानी जाहला


-स्नेहल मोडक

Monday, August 9, 2021

आला श्रावण श्रावण

                एक अतिशय नादमधुर शब्द म्हणजे श्रावण. गर्द पाचुचा साज ल्यायलेली अवनी म्हणजे श्रावण. व्रतवैकल्यं, लेकीसुना, सख्यासयांचं एकत्र जमणं म्हणजे श्रावण. उन पावसाचा सुंदर खेळ म्हणजे श्रावण. 

                भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो म्हणून या महिन्याला श्रावण हे नांव देण्यात आलं. 

                 श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा / सणांचा राजा म्हटलं जातं. श्रावणातल्या प्रत्येक वारी एखादं व्रत किंवा देवदेवतेची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणात श्री महादेवाच्या  उपासनेला विशेष महत्त्व आहे.

                 श्रावणात शिवामुठ वाहणे, मंगलागौर पूजन, जिवती पूजन या व्रतांबरोबरच नागपंचमी, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी या सारखे महत्वाचे सण साजरे केले जातात. या निमित्ताने लेकीसुना, सख्यासया एकत्र येतात. मांगल्याचं प्रतिक असलेला उत्साहाने भरलेला , घननीळ बरसणारा असा हा श्रावण.



खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा

       बरसूनी सरी सोनपिवळे उन पसरे

       अलवार नभी मग इंद्रधनू अवतरे

हिरव्या पाचूची धरतीवर होई शिंपण

रंगगंधीत फुलांची असे त्यावर गुंफण

        दरीडोंगरी वाहती अवखळ नितळ झरे

        नाद खळाळता तयाचा थेंबातूनी पसरे

दिवस नागपंचमी अन मंगळागौरीचे

सख्यासयांनी सहजमुक्त खेळण्याचे

        अर्पावे श्रीफळ सागरा नारळी पुनवेला

        सोहळा कान्ह्याचा होई जन्माष्टमीला

 खेळ उनपावसाचा मास श्रावणाचा

 थाट व्रतवैकल्यांचा मास श्रावणाचा


- स्नेहल मोडक

Thursday, August 5, 2021

खेळ

                  भास आभासांचा, स्वप्नकल्पनांचा खेळ अविरत सुरु असतो मनात. घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे पडसाद मनात सतत उमटत असतात. मन जसं क्षणात सुखावतं तसं क्षणात दुखावतंही. कधी हळवं होतं तर कधी वेदनेनं तळमळतं. कधी कुणाच्या विरहात कातर होतं तर कधी कुणाची आसुसून वाट पहातं. कधी भावनांच्या खेळात हरवतं तर कधी आठवणीत रमतं. न सांगताही आपल्या माणसाला आपलं मन कळावं असं प्रत्येकाला वाटत असतंच, हो ना?

                  .

रात्रंदिन खेळ चाले गूढ स्वप्नांचा

संपेल ना कधीही भास कल्पनांचा

       अविरत असे मनात कल्लोळ भावनांचा

       अलवार हलतो हिंदोळा स्वप्न कल्पनांचा

मिटल्या अधरी होई शब्दावीण संवाद

अबोल संकेत नयनातुनी घालती साद

        आस भेटीची नित्य मनास लागते

        स्वप्नातल्या जगी मन झोपेत जागते

गुंफूनी भावनांना सुरेल गीत मोहरते

मनीमानसी भावशब्दांच्या स्वप्नी रमते

         मुग्ध कळ्या भावनांच्या उमलतील का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

         स्वप्नवेडे मन कधी कुणास समजेल का

-स्नेहल मोडक

Sunday, August 1, 2021

मैत्री

            रेशीम बंधी, निरपेक्ष आणि हक्काचं नातं म्हणजे मैत्री. सदैव साथ देणारी, समजून घेणारी मैत्री कधी हक्काने रागावते, वादही घालते. पण तो राग वादावादी म्हणजे चहाच्या पेल्यातलं वादळच जणू. एका भेटीतच सारा रागरुसवा नाहीसा होतो. जिथं सगळ्या मनभावना व्यक्त करता येतात असं एकमेव नातं मैत्रीचं. अव्यक्त भावनाही जिला कळतात ती फक्त मैत्री. निरंतर विश्वासाचं नातं म्हणजे मैत्री. आयुष्यात असंख्य लोकांशी आपली ओळख होते, संबंध जुळतात पण घट्ट मैत्री मात्र काही जणांशीच जुळते. मैत्री म्हणजे जणू श्वासच.


सप्तसुर झंकारती जसे वीणेमधूनी

उलगडते मैत्रीही लयशब्दामधूनी

       उनपावसात जसे इंद्रधनू अवतरते

       लटक्या रुसव्यात मैत्री अधिक खुलते

गंध जसा चिरकाल असे बकुळीला

सुखदुःखात मैत्रीच असे सोबतीला

       दाटले मेघ बरसूनी जसे होती रिक्त

       व्यक्त होऊनी मैत्रीत व्हावे मन मुक्त

गंधभरले फुल चाफ्याचे जसे बागेतले

मैत्री म्हणजे अत्तर आठवणींच्या कुपीतले

       आदिपासून अंतापर्यंत एकच आस

       सदा असावी साथ मैत्री जणू श्वास


- स्नेहल मोडक





Monday, July 26, 2021

गुरुपौर्णिमा

नर्मदा मैय्या आणि गिरनार

            गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचं दर्शन आपल्याला व्हावं, गुरुपूजन करता यावं, गुरुसेवा घडावी हीच इच्छा असते. आणि गुरुपौर्णिमेला गिरनार शिखरी साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन घडणं म्हणजे सुवर्ण योगच.

            यावर्षी गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं असं ठरवलं आणि नेमकं मुंबई, ठाणे, कोकणात पावसाचं थैमान सुरु झालं. मनात किंचित संभ्रम निर्माण झाला पण श्री दत्तगुरुंना प्रार्थना केली आणि गिरनारला जायचं नक्की केलं.

            गुरुपौर्णिमेच्या दोन दिवस आधी आम्ही गिरनारला निघालो. सकाळी निघायच्या आधीपासूनच पाऊस कोसळत होता. त्या पावसातूनच प्रवासाला सुरुवात केली. महाराष्ट्राची हद्द ओलांडून गुजरातमध्ये प्रवेश केला आणि पंधरा वीस मिनिटांतच अक्षरशः जादू घडावी तसा पाऊस पूर्ण थांबला. त्यानंतर पूर्ण प्रवासात पावसाचं विघ्न आलंच नाही.

             आम्ही अंकलेश्वरच्या पुढे पोहोचलो आणि मग सुरु झाली आमची मार्गशोध मोहीम. आम्हाला नर्मदा मैय्याचं किनाऱ्यावरुन प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं. 

             नर्मदा नदी भारतातल्या प्रमुख नद्यांपैकी एक नदी. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या तीन राज्यातून वाहणारी ही सर्वात मोठी पश्र्चिम वाहिनी नदी.  नर्मदा रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या या नावानींही ओळखली जाते.नर्मदेच्या काठावर मार्कंडेय, भृगु, व्यास, अगस्ती, जमदग्नी, दुर्वास, वशिष्ठ आणि अजून अनेक ऋषींनी तपोसाधना केल्याचं सांगितलं जातं. यापैकी मार्कंडेय ऋषींनी पहिल्यांदा नर्मदा परिक्रमा केली. नर्मदेच्या उगमापासून ते मुखापर्यंत अनेक तीर्थस्थानं वसलेली आहेत. म्हणूनच नर्मदा परिक्रमा अतिशय महत्त्वाची मानली जाते. भारतातील अनेक नद्यांपैकी फक्त नर्मदा नदीचीच परिक्रमा करण्यात येते. हि नदी उत्तर आणि दक्षिण भारताच्या मधली सीमारेषा आहे. 

             अशा या पवित्र नदीचं दर्शन आम्हाला गिरनारला जातायेताना घडतंच पण ते फक्त पुलावरुन. म्हणूनच यावेळी गिरनारला जाताना नर्मदा मैय्याच्या किनाऱ्यावर जाऊन प्रत्क्ष दर्शन घ्यायचं ठरवलं. 

              आंतरजालावरुन सारी माहिती आधीच घेतली होती. पण तरी मैय्याच्या किनारी पोहोचण्याचा मार्ग प्रत्यक्षात थोडा बदललेला होता. मात्र त्यामुळे आम्हाला नर्मदा नदीवरील गोल्डन ब्रिजवरुन जाता आलं. अंकलेश्वरहून भरुचला जाण्यासाठी नर्मदा नदीवर १८८१ साली बांधलेला अतिशय सुंदर असा हा गोल्डन ब्रिज. या पुलाच्या बाजूलाच नंतर दुसरा मोठा पुल बांधलाय. गोल्डन ब्रिज ओलांडून आम्ही  तिथे असलेल्या सुरक्षा चौकीत जाऊन मार्गाची चौकशी करुन पुढे निघालो. गावात शिरुन गल्लीबोळातून थोडं फिरुन पोहोचलो ते भृगु ऋषींच्या आश्रमासमोरच. आश्रमात जाऊन दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथे थांबून तिथून बाजूच्याच गल्लीत असलेल्या नर्मदा माता मंदिरात गेलो. या मंदिरात नर्मदामातेची रेखीव मूर्ती आहे. आणि त्या मूर्तीच्या खाली तळघरात श्री दत्तात्रेयांची मूर्ती आहे. तिथे दर्शन घेऊन बाहेर आलो. या मंदिराच्या बाजूनेच नर्मदेच्या किनारी जायला वाट आहे. त्या रस्त्याने गाडीनेच किनाऱ्यावर पोहोचलो. काठाशी गेलो आणि नर्मदा मैय्याचं विशाल रुप भान हरपून पहात राहिलो. काही क्षणांनतर मैय्याची पूजा करुन जलस्पर्श केला. आणि काही क्षणांपुरतं का होईना मन शांत झालं. 

                 थोडा वेळ नर्मदा किनारी थांबून पुढील प्रवासाला लागलो. त्यादिवशी वाटेतच एका ठिकाणी मुक्काम केला. 

                   दुसऱ्या दिवशी सकाळी गिरनारला निघालो. नर्मदा दर्शन झालं होतं, आता वेध लागले होते गिरनार शिखर दर्शनाचे. त्या विचारात दंग असतानाच भ्रमणध्वनी वाजला आणि बातमी कळली ती चिपळूण शहर पाण्याखाली गेल्याची. क्षणात चिंतेचं काहुर माजलं मनात. आमच्या जुन्या घरात पूर्ण पाणी भरलं होतं. पण बाजूलाच बांधलेल्या नवीन घराच्या पहिल्या मजल्यावर आमचे कुटुंबीय सुरक्षित होते. जुन्या घरात रहाणाऱ्या लोकांनाही त्यांनी नवीन घरात आणलं होतं. इतर नातेवाईकही सुरक्षित असल्याचं कळलं आणि चिंतेची एक रेघ कमी झाली. कोकणात पावसाने हाहाकार माजवला होता त्यामुळे सारखं मुंबई, ठाण्यात किती पाऊस आहे याचाही अंदाज घेणं सुरु होतं. 

                   या सगळ्या काळजीत गिरनारला उडन खटोलाच्या ( रोप वे ) कार्यालयात भ्रमणध्वनी वरुन चौकशी केली आणि कळलं गेले तीन दिवस उडन खटोला तुफान वारा, पाऊस, धुकं या कारणांमुळे बंद आहे. आम्ही प्रवासाला निघण्यापूर्वीच उडन खटोलाचं आरक्षण केलं होतं. आम्हाला गुजरातमध्ये पूर्ण प्रवासात अजिबात पाऊस लागला नाही. पण गिरनारवर मात्र तुफान वारा पाऊस सुरु होता. रोप वे बंद असला तरी दहा हजार पायऱ्या चढून जायचं आम्ही ठरवलंच होतं. आम्ही संध्याकाळी गिरनारला ( तलेटी ) पोहोचायच्या आधी परत उडन खटोलाच्या कार्यालयातून आम्ही गिरनारला नंतर यावं नाही तर मग आरक्षणाचे पैसे परत मिळतील असं सांगण्यात आलं आणि मग मात्र पहाटेच पायऱ्या चढायला सुरुवात करायची असं ठरवलं. तिथे पोहोचल्यावर प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा त्यांनी गुरुपौर्णिमेला रोप वे सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे मग रोप वे सुरु होतोय का बघायचं ठरवलं.

                   गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर निघून रिवाजाप्रमाणे लंबे हनुमानजींचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन, पूजा करुन उडन खटोलाच्या कार्यालयात गेलो. तिथे पाहिलं तर रोप वे हळूहळू सुरु करुन वारा पाऊस धुकं याच्या परिणामाचा अंदाज घेणं सुरु होतं. थोड्या वेळाने लोकांसाठी रोप वे सुरु करायचा निर्णय झाला. आणि पहिल्याच ट्रॉलीमधून आम्हाला जायला मिळालं. सुरुवातीला ढगाळ वातावरण होतं पण जेमतेम ७-८ मिनिटांतच वाऱ्याचा जोर वाढलेला जाणवू लागला. आणि काही क्षणातच आमची ट्रॉली धुक्याने वेढली. शुभ्र धुक्याशिवाय काहीही दिसत नव्हतं. नेहमी दहा मिनिटांत पोहोचणारी ट्रॉली त्यावेळी पंचवीस मिनीटांनी अंबाजी टुक वर पोहोचली. रोप वे सुरु करुन खूपच जोखीम घेतली होती. निघताना त्यांनी काळजी करु नका काही अडचण येणार नाही आणि आलीच तर ट्रॉलीत लावलेल्या क्रमांकावर संपर्क करायला सांगितलं होतं. रोप वे मधून उतरल्यावरही रोप वे कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो याची कल्पना देण्यात आली होती.

                    रोप वे मधून उतरुन पायऱ्या चढून वर आलो आणि थक्क झालो. पहाटेच जोरदार पाऊस पडून गेला होता.त्यामुळे संपूर्ण गिरनार सुस्नात होऊन धुक्याची दाट दुलई लपेटून आमच्या स्वागताला उभा होता. शुभ्र दाट धुकं, भन्नाट वारा आणि पावसामुळे ओलावलेला सारा परिसर अतिशय रमणीय दृश्य होतं.  जेमतेम सात-आठ फुटांपर्यंत दिसत होतं तेही किंचित धुसरच. वर्षाऋतूमध्ये खरंतर सगळ्याच पर्वतरांगा धुक्याने वेढलेल्या असतात. पण गिरनारची परिस्थिती थोडी वेगळी आहे. तुफान वाऱ्यातही इथं खूप दाट धुकं असतं. अंबाजी मातेचं मंदिरही धुसरच दिसत होतं. प्रथम मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. गोरक्षनाथ टुक ला पोहोचून गोरक्षनाथांचं दर्शन घेतलं आणि कमानीपर्यंत आलो. पौर्णिमा सुरु व्हायला खूपच वेळ होता म्हणून कमानीजवळच बराच वेळ थांबून मग परत चढायला सुरुवात केली. थोडयाच वेळात शिखरावर पोहोचलो. 

                    मंदिरात प्रवेश केला आणि श्री दत्तात्रेयांच्या दर्शनाने साऱ्या जगाचा विसर पडला. दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि मन शांत तृप्त झालं.

                     दर्शन घेऊन परत  काही पायऱ्या उतरुन खाली अखंड धुनीजवळ आलो. तिथे नुकतीच श्री दत्तात्रेयांच्या नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तिथलं दर्शन, प्रसाद घेऊन परत अंबाजी टुक कडे निघालो. रोप वे सुरु होता पण वाईट हवामानामुळे बंद करणार असल्याचं सांगितलं. पण आम्हाला रोप वे ने गिरनारच्या पायथ्याशी परत यायला मिळालं. बहुधा त्यानंतर काही वेळातच रोप वे बंद झाला असावा. 

                     श्री दत्तगुरुंना मी केलेली प्रार्थना पोहोचली असावी. कारण श्री दत्तगुरुंनी माझी इच्छा शब्दशः पूर्ण केली. आपण प्रार्थना करावी आणि अगदी लगेच ती शब्दशः पूर्ण व्हावी, गुरुदर्शन घडावं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. हे भाग्य आम्हाला कायम लाभावं आणि गिरनार दर्शनाचा योग वारंवार यावा हिच श्री दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.

- स्नेहल मोडक

 


  

 


कविता

वारी

सरतो हळूहळू चैत्र, वैशाख, ज्येष्ठ अवतरतो मग पावन आषाढ श्रेष्ठ चालती वारकरी सारे वाट पंढरीची हाती टाळ अन गळा माळ तुळशीची सदा करती मुखाने विठ्...