Pages

Friday, March 25, 2022

नर्मदा परिक्रमा - भाग १

! त्वदीय पादपंङ्कजं नमामि देवी नर्मदे !

             नर्मदा मैया ही मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यातून वाहणारी प्रमुख नदी. शिवकन्या नर्मदा ही रेवा, अमरजा, मैकलकन्या नावांनेही ओळखली जाते. मध्य प्रदेशातील मैकल पर्वतश्रेणीतील अमरकंटक हे नर्मदा नदीचं उगमस्थान. म्हणूनच नर्मदेला मैकलकन्या या नावानंही ओळखतात. नर्मदेच्या मार्गात अनेक धबधबे, दृतवाह आहेत त्यामुळे 'उड्या मारत, खळखळ करत'  जाणारी या अर्थाने रेवा हे सार्थ नांव. नर्मदेला हे नांव श्री रामांनी दिलं असं मानतात. भारतातील सगळ्या नद्या दक्षिणेकडे वाहतात. नर्मदा ही एकच अशी नदी आहे की जी पश्चिम दिशेकडे जाऊन पुढे सागराला मिळते. आपल्याकडे अठरा पुराणं आहेत. आणि नदी म्हणून फक्त नर्मदा पुराण आहे. महाप्रलयानंतरही नर्मदा लुप्त होणार नाही असं तिला वरदान आहे.

            नर्मदेच्या पात्रात मिळणारा लाल रंगाचा गोटा ज्याला नर्मद्या म्हटलं जातं त्याची गणपती म्हणून पूजा करतात. तसंच तिच्या पात्रातील काळ्या पाषाणांपासून शिवलिंग बनवतात. याची प्राणप्रतिष्ठा करावी लागत नाही यात भगवान शिव विद्यमान असतात असा पुराणात उल्लेख आहे. भरतखण्डात नर्मदेपेक्षा आकाराने मोठ्या नद्या असल्या तरीही नर्मदेचं प्राचीनत्व आणि पुण्यप्रदान करण्याचं सर्वश्रेष्ठत्व या वैशिष्ट्यांमुळे परिक्रमा फक्त नर्मदा नदीचीच केली जाते.

              या परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्रीमार्कंडेय ऋषी. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी त्यांनी नर्मदा परिक्रमा केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त नर्मदा नदीच नाही तर तिला मिळणाऱ्या ९९९ नद्यांचा धारा- प्रवाह न ओलांडता त्यांच्या उगमाला वळसा घालून शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी परिक्रमा केली. २७ वर्षं लागली त्यांना या परिक्रमेला. अनेक ऋषी मुनींनी नर्मदा तीरी साधना करुन देह ठेवला आहे.

              ही परिक्रमा पायी चालत किंवा वाहनानेही करतात. साधारण ३००० किमी अंतराच्या या परिक्रमेत असंख्य प्राचीन मंदिरं, ऋषीमुनींचे आश्रम यांचं दर्शन घेता येतं. पायी चालत परिक्रमा करताना अवघड वाटेवरुन, जंगलातूनही जावं लागतं. पण श्रध्देने चालणाऱ्या प्रत्येकाची काळजी स्वतः मैया घेते. अतिशय सुंदर अनुभूती या परिक्रमेत मैया आपल्याला देते. 

               त्यामुळे नर्मदा परिक्रमा असा नुसता शब्द जरी ऐकू आला तरी आमचे कान टवकारले जायचे. कारण नर्मदा परिक्रमा करायची, अर्थातच आधी वाहनाने अशी खूप तीव्र इच्छा होती. त्यामुळे याविषयी कुठे काही ऐकलं तरी लगेच त्याबद्दल माहिती घेत होतो. 

              खूप वेगवेगळ्या यात्राकंपन्या नर्मदा परिक्रमा आयोजित करतात. अशाच एका आम्हाला हव्या तशा अध्यात्मिक यात्रेची आम्हाला माहिती मिळाली. पण माझी मात्र द्विधा मनस्थिती झाली होती. २०-२२ दिवस मुलींना सोडून कसं जायचं हा विचार मनात येत होता. पण मुलींनी आलेली संधी सोडू नका, नर्मदा मैय्या बोलवतेय, तुम्ही कुठलीही काळजी न करता जाऊन या अशा दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे आश्वस्त होऊन आम्ही परिक्रमेला जायचं नक्की केलं.

              आमची परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होणार होती. ओंकारेश्वरला महाशिवरात्रीच्या सायंकाळी सर्वांनी एकत्र जमायचं होतं. त्याआधी एक दिवस आम्ही इंदोरला पोहोचलो. तिथल्या अतिथी निवासात रहाण्याची व्यवस्था आम्ही आधीच केली होती. त्याप्रमाणे इंदोरला पोहोचल्यावर तिथे जाऊन सारं आवरुन आधीच ठरवलेल्या गाडीने उज्जैनला गेलो. तिथे श्री महाकालेश्वरचं दर्शन घेऊन जवळच्या हरसिध्दी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर कालभैरव, बडा गणपती, सांदिपनी आश्रम हे सारं करुन इंदोरला ५६ दुकान येथे जाऊन इंदोरच्या खास खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. रात्री इंदोरला राहून दुसऱ्या दिवशी परत थोडं इंदोर फिरुन, भेटीगाठी घेऊन ओंकारेश्वरला पोहोचलो. 

                ओंकारेश्वरला ठरल्यानुसार सर्वजणं सायंकाळी एकत्र जमलो. चहापान झालं, परिक्रमेसाठीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता केली. नंतर फराळ करुन उशिरा श्री ओंकारेश्वरच्या दर्शनाला गेलो. रात्री ११.१५ वाजता अतिशय सुंदर दर्शन झालं. तिथून परत येऊन निद्राधीन झालो ते दुसऱ्या दिवशीच्या मांधाता परिक्रमेच्या विचारातच.

               मांधाता परिक्रमा म्हणजे नर्मदा आणि कावेरी संगमस्थित मांधाता पर्वतावर असलेल्या ओंकारेश्वर मंदिराला केली जाणारी परिक्रमा. ही परिक्रमा साधारण ७ किमी अंतराची आहे. ओंकारेश्वरच्या कोटी तीर्थ या स्थानापासून परिक्रमेची सुरुवात होते. ही पायी चालत किंवा नावेतूनही करता येते. या मार्गात नर्मदा आणि कावेरी यांचा संगम होतो. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. ही परिक्रमा अतिशय रमणीय आनंददायी आहे. या परिक्रमेतच ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. त्या मंदिरात चणा डाळ अर्पण केली असता सर्व पापातून, ऋणातून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. 

                अशी ही सुंदर मांधाता परिक्रमा नावेतून करुन, ऋणमुक्तेश्वराचं दर्शन करुन आणि एक सुंदर अनुभव घेऊन आम्ही दुपारी परत आलो.

                सायंकाळी ओंकारेश्वरच्या ब्रम्हपुरी घाटावर परिक्रमेच्या संकल्प पूजेसाठी गेलो. 

                मांधाता पर्वतावरील ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचं शहर आणि बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक. मांधाता पर्वताचा आकार ओम चिन्हासारखा आहे. इथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि इतर अनेक मंदिरं आहेत. परिक्रमेच्या दृष्टीने ओंकारेश्वरचं महत्व अनन्यसाधारण आहे. परिक्रमा आरंभ ओंकारेश्वर, नेमावर किंवा अमरकंटक यापैकी कुठूनही केला तरीही नर्मदा जल ओंकारेश्वरला चढवल्यावरच परिक्रमेची सांगता होते अशी मान्यता आहे.

                संकल्प पूजेपूर्वी नर्मदा स्नान करायचं असतं. स्नानासाठी घाटाच्या पायऱ्या उतरुन खाली गेलो खरं पण मनात गोंधळ होता. पाण्याची भिती, थोडी उत्सुकता, थोडी लज्जा अशा संमिश्र भावना मनात दाटल्या होत्या. अनेक स्त्रिया तिथे मुक्तपणे स्नान करत होत्या. मग मीही नकळत पाण्यात उतरले. पावलांना जलस्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. साऱ्या संमिश्र भावना क्षणात नाहीशा झाल्या आणि उरली ती फक्त मैयाच्या उबदार स्पर्शाची जाणीव. लहान बाळ जसं आईच्या कुशीत शिरल्यावर सुखावतं तशी सुखावले मी. छान स्नान करुन प्रसन्न मनाने संकल्प पूजा केली. 

                संकल्प पूजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रावेरखेडी येथे पोहोचून मैयाची यथासांग पूजा आरती केली. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील रावेरखेडी हे थोरल्या बाजीराव पेशव्यांचं समाधीस्थान. इ.स. १७४० मध्ये उत्तरेच्या मोहिमेवर असतांना वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी थोरल्या बाजीराव पेशव्यांचा रावेरखेडी येथे मृत्यू झाला. नर्मदा तीरीच त्यांचं समाधी स्थान आहे. 

                 तिथूनच पुढे सियाराम बाबांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेतलं आणि मुक्कामाला निघालो.

    

 

  


- स्नेहल मोडक

Tuesday, February 8, 2022

निमित्त माघी जयंतीचे ...

                यावेळी माघी गणेश जयंतीच्या उत्सवाला गावाला जायचं ठरवलं आणि तयारी केली. उत्सवाच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघालो.

    

              प्रवासाला सुरुवात केली खरी पण सारा रस्ता धुक्यात हरवला होता जणू. सध्या रोजच आमच्या परिसरात धुकं दाटलेलं असतंच. सारी सृष्टी शुभ्र धुक्याची दाट दुलई ल्यायली होती. अप्रतिम दृश्य होतं. दाट धुक्यातून आमचा प्रवास सुरु झाला आणि त्याबरोबरच छायाचित्र आणि चित्रण करणं ही सुरु झालं. अतिशय सुंदर वातावरण आणि साथीला गाडीत सुरु असलेली जूनी सुंदर गाणी. प्रवास संपूच नये असं वाटत होतं. सहस्त्ररश्मीचं आगमन होऊन बराच वेळ झाला तरी सारी सृष्टी धुक्याची दाट दुलई लपेटूनच बसली होती. सकाळी अकरा वाजेपर्यंत असंच वातावरण होतं. नंतर मात्र हळूहळू धुकं विरळ होत गेलं आणि सृष्टीवर लख्ख उन पसरलं. 
               उन्हात आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य उजळून निघालं. आणि आमच्या नजरा नेहमीप्रमाणे बहरलेल्या झाडांचा शोध घेऊ लागल्या. कुठलाही ऋतू असला तरी  कोकण सदैव सृष्टीसौंदर्यानं नटलेलच असतं. गुलमोहोर, सोनमोहोर, पांढरा चाफा यांना बहर यायला वेळ असला तरी एव्हाना पांगारा, पळस , गिरीपुष्प ( ग्लिरिसिडीया ) बहरायला सुरुवात झालेली असते. आणि आम्ही तेच पहात होतो. खूप ठिकाणी ही झाडं बहरलेली दिसत होती. पण रस्त्यापासून थोडी दूर असल्याने छायाचित्रं काढणं शक्य होत नव्हतं. 
               हे सारं पहात जात असताना अचानक एका ठिकाणी अगदी रस्त्याच्या जवळच पळसाचं बहरलेलं झाड दिसलं. लगेच गाडी थांबवून उतरुन झाडाजवळ गेले. फुलांची छायाचित्रं काढली पण उन्हामुळे मनासाखी छायाचित्रं मिळत नव्हती मग अलगद फुलांचा एक तुरा खुडून घेतला जवळून छायाचित्र घेता येण्यासाठी. 


             

               पळस - पलाश, किंशुक, याज्ञिक, त्रिपत्रक इत्यादी नावांनी ओळखला जातो. इंग्लिश मध्ये पळस पॅरट ट्री किंवा फ्लेम ऑफ फाॅरेस्ट या नावानी ओळखला जातो. अतिशय औषधी उपयुक्त असा हा वृक्ष आहे. याची पानं, फुलं, साल हे सारं औषधी आहे. पळसाच्या सालीला पडलेल्या किंवा पाडलेल्या खांचामधून लाल रंगाचा रस पाझरतो. तो वाळल्यावर त्याचा विशिष्ट प्रकारचा डिंक तयार होतो. तोही आयुर्वेदिक औषधी बनवण्यासाठी उपयुक्त असतो. या वृक्षात अग्नितत्व असल्याने याच्या लहान फांद्या वाळल्यावर यांचा समिधा म्हणून यज्ञात उपयोग केला जातो. म्हणूनही याला याज्ञिक हे नांव मिळालं असावं. याची वाळलेली फांदी (दंड) मुंज मुलास सोडमुंजीच्यावेळी हाती देतात. याची पानं त्रिदल स्वरुपात असतात म्हणून याला त्रिपत्री हे नांव आणि 'पळसाला पानं तीनच' ही म्हण रुढ झाली असावी. या पानांपासून पत्रावळी तयार केल्या जाता. या वृक्षाची फुलं गर्द केशरी लाल रंगाची ज्वालेसारखी भासणारी असतात. पानगळ होऊन गेल्यावर हा वृक्ष या केशरी रंगाच्या फुलांनी बहरतो. जणू अग्निज्वाला पेटल्यासारखा दिसतो. ही फुलंही अतिशय औषधी आहेत. ही फुलं पाण्यात टाकून त्या पाण्याने स्नान केल्यानं त्वचारोग बरे होतात. या फुलांपासून नैसर्गिक रंगही तयार करता येतो. या पलाशपुष्पाची रचना ईश्वरासमोर, निसर्गासमोर नतमस्तक असल्यासारखी असते. या फुलांमधे मोठ्या प्रमाणात असलेला मध खाण्यासाठी पक्षी आणि मधमाशा येतात.
               सध्या सर्वत्र हा वृक्ष बहरलेला दिसतोय. त्याची छायाचित्रं काढून आणि फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.

         
.
               थोडं पुढे गेलो आणि इतका वेळ दूर दिसणारं बहरलेलं गिरीपुष्पचं एक झाड रस्त्याच्या अगदी जवळ दिसलं आणि आम्ही पुन्हा एकदा थांबलो. 
               गिरीपुष्प - याला इंग्लिश मध्ये ग्लिरिसिडीया असं नांव आहे. हे उंच वाढणारं पण फारशा फांद्या नसलेलं झाड आहे. सध्या हे झाड शेताच्या बांधावर, कुंपणावर लावलं जातंय. अतिशय उपयुक्त असं हे झाड आहे. याची पानं गळून पडल्यावर याचं उत्तम असं कंपोस्ट खत तयार होतं. यामुळे जमिनीचा कस वाढतो. याच्या बिया उंदरांनी खाल्यास त्यांचा नाश होतो. याची पानं गायीगुरं खात नाहीत म्हणून बांधाच्या कडेने याची लागवड करतात. या झाडाची जानेवारी महिन्यात पानगळ होते आणि मग फांद्यांच्या टोकांवर नाजूक गुलाबी जांभळ्या रंगाची फुलं उमलतात. या फुलांनी बहरलेलं झाडं सुंदर दिसतं. या फुलांतूनही मधमाशांना भरपूर मध मिळतो.
               या फुलांचीही छायाचित्रं काढून आणि थोडी फुलं काढून घेऊन आम्ही पुढे निघालो.
               सरळ घरी न जाता थोडं फिरुन जायचं असं ठरवल्यामुळे थोडं वेगळ्या रस्त्याने जाऊन आम्ही आंजर्ल्याला पोहोचलो. 
               आंजर्ला - कड्यावरचा गणपती. याच्या निर्मितीबद्दलची कागदपत्रं उपलब्ध नसली तरी आख्यायिकेनुसार हे मंदिर बाराव्या शतकातील असावं. मंदिरात काळ्या पाषाणातील पाच फूट उंचीची उजव्या सोंडेची सिंहासनाधिष्ठित मूर्ती आहे. जीर्णोद्धार करताना काळ्या पाषाणातील भिंतीना गिलावा देऊन संगमरवरासारखं मंदिर केलं आहे. एकूण सोळा कळस असणाऱ्या मंदिरांचे सोळा उपकळस मंदिराच्या गर्भगृहात आहेत. सभागृह, अंतराळ, गर्भगृह अशी रचना असणाऱ्या या मंदिराच्या कळसावर अष्टविनायकांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. दापोली पासून वीस किमीवर असलेल्या या मंदिरापर्यंत आता गाडीने जाता येतं. पूर्वी पूल नव्हता तेव्हा नावेतून पलिकडे कड्याच्या पायथ्याशी जाऊन साधारण दोनशे पायऱ्या चढून मंदिरात जावं लागायचं. या पायथ्याशी पायऱ्यांच्या सुरुवातीला रॅंग्लर परांजपे याचं निवासस्थान होतं.
               आम्ही या मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आम्हाला अतिशय छान दर्शन झालं. माघी जयंतीचा या मंदिरात मोठा उत्सव असतो. त्यामुळे आम्ही गेलो तेव्हा तिथे कार्यक्रम सुरुच होते. साऱ्या मंदिरात फुलांची सजावट केली होती. मंदिराभोवती मंडप घातले होते. अतिशय उत्साहानं, मांगल्यानं सारा परिसर भारला होता. आम्ही गेलो तेव्हा अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीसंदर्भात कार्यक्रम सुरु होता. आम्ही दर्शन घेऊन थोडा वेळ तिथे थांबून निघालो. 
               मंदिराजवळच असलेल्या एका उपाहारगृहात भोजनासाठी गेलो. घरगुती गरमागरम साधंच पण चविष्ट जेवण आम्हाला मिळालं. आम्ही जेवत असतानाच अचानक तिथल्या ताईनी पुरणपोळी पानात वाढली आणि आम्हाला आश्चर्यच वाटलं. भाजी, पिठलं, भाकरी अशा जेवणात अचानक पुरणपोळी पानात आली. विचारलं तर त्या म्हणाल्या आत्ताच मंदिरातून हा प्रसाद आलाय. ऐकलं आणि आम्ही चमकलोच. नुकतंच मंदिरात झालेलं गणरायाचं सुंदर दर्शन आणि ध्यानीमनी नसताना मिळालेला हा प्रसाद गणाधिशाच्या अस्तित्वाची आणि त्याचं सदैव आमच्याबरोबर असण्याची जाणीव क्षणातच झाली. आणि पुन्हा एकदा मनोमनी नतमस्तक झाले. 
               भोजन करुन आम्ही निघालो ते पोहोचलो थेट मुरुडच्या समुद्र किनारी. अतिशय सुंदर , स्वच्छ आणि विस्तिर्ण असा हा समुद्र किनारा. गेल्या काही वर्षांपासून घोडागाडीची रपेट आणि विविध खेळ इथे सुरु झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांची खूप गर्दी होते. पण आम्ही थोडं लवकर गेलो असल्याने किनाऱ्यावर जास्त वर्दळ नव्हती. 
                मुरुड हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं गांव. त्यांचं नांव त्यांनी ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्या शाळेला दिलं आहे. हिरव्या वनराईनं नटलेलं मुरुड छोटं टुमदार गाव.
                समुद्राला ओहोटी असल्याने लाटांशी खेळायला मिळालं नाही मग समुद्र किनारी फिरुन, छायाचित्रं काढून, शंखशिंपले वेचून आम्ही घरी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
                दुसरा दिवस गणेश जयंतीचा. अतिशय आनंदात, गडबडीत, तयारीत दिवस गेला. सायंकाळी मंदिरात गणरायाच्या दर्शनासाठी गेलो. आमचं हे मंदिर रस्त्यापासून थोडं आत आहे. रानातल्या पायवाटेने थोडं चालत जावं लागतं. मंदिराच्या एका बाजूला रान अन दुसऱ्या बाजूला सुपारीच्या सुरेख बागा आहेत. आम्ही मंदिरात पोहोचलो तेव्हा तिथले कार्यक्रम,  सहस्त्रावर्तनं संपतच आली होती. नंतर पूजा, आरती यथासांग पूर्ण झाली. सगळे तिथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले, आम्ही तिथेच थांबलो. जवळच्या सुपारीच्या बागेत पाटाचं पाणी झुळझुळ वहात होतं. साऱ्या बागेत पाटाचं पाणी फिरवलं होतं. अशा स्वच्छ नितळ पाण्यात जायचा मोह आवरणं अशक्यच. त्यामुळे लगेचच खाली बागेत उतरुन पाण्याजवळ गेले. पावलांना पाण्याचा थंडगार स्पर्श झाला आणि तनामनावर शिरशिरी उमटली. किती वेळ झाला तरी त्या पाटाच्या पाण्यातून बाहेर यावसंच वाटत नव्हतं. नंतर तिथून निघालो ते कोळेश्वराच्या दर्शनाच्या ओढीनेच. 
                कोळथरे येथील हे कोळेश्वराचं पुरातन मंदिर. महादेवाचं मुख्य मंदिर आणि आजूबाजूला इतर छोटी मंदिरं असं याचं स्वरुप आहे. मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे. कोळेश्वराचं दर्शन घेऊन निघालो ते थेट पोहोचलो तिथल्या समुद्र किनारी. कोळथरचा समुद्र किनाराही अतिशय स्वच्छ, सुंदर आणि शांत आहे. इथे पर्यटक फक्त समुद्र अनुभवायला येतात. आम्ही खरंतर सुर्यास्ताच्या वेळेलाच समुद्रावर पोहोचलो होतो. पण ढगाळ वातावरणामुळे सूर्यास्त पहाता आला नाही. मात्र आकाशात हलका केशररंग पसरला होता. त्यामुळे छान छायाचित्रं काढता आली. तिथून घरी परत आलो. रात्री नैवेद्य भोजनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला.
                उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी घरापासून थोडं दूर असलेल्या आमच्या बागेत फिरुन आलो. मग सारं आवरुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली.

                कोकणात गावाला घरी नेहमीच जाणं होत असतं. आजुबाजुच्या गावात फिरणंही नेहमी होत असतं. पण प्रत्येक वेळी वेगळं सृष्टी सौंदर्य पहयला, अनुभवायला मिळतं. आणि एक वेगळीच उर्जा घेऊन घरी परत येणं होतं. 

- स्नेहल मोडक

Thursday, January 20, 2022

पौष पौर्णिमा - गिरनारी

             पौष पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. अष्टमीपासून सुरु होणारं शाकंभरी देवीचं नवरात्र पौर्णिमाला समाप्त होतं. 
             पृथ्वी वर पडलेल्या प्रचंड दुष्काळापासून जनतेला वाचविण्यासाठी माता पार्वतीने अवतार धारण केला आणि आपल्या तनुवरल्या फळं,भाज्या वनौषधींचा उपयोग करुन जीवसृष्टी वाचवली आणि त्यामुळे तिला शाकंभरी देवी हे नांव मिळालं. 
             अशा वैशिष्ट्यपूर्ण पौष पौर्णिमेला आम्हाला पुन्हा एकदा गिरनार शिखर दर्शन आणि अखंड धुनी दर्शनाचा योग आला हे खूप भाग्याचंच.
             पौष पौर्णिमेला गिरनारला जायचं ठरवलं खरं पण नेमकं त्याचदरम्यान काही घरगुती कार्यक्रम आधीच ठरलेले होते. मग कार्यक्रमाला फक्त उपस्थिती लावून गिरनारला जायचं ठरवलं. जायच्या आधी दोन दिवस पित्तामुळे माझी तब्येत बिघडली. पण  शक्य तेवढा आराम करुन आणि औषध घेऊन गिरनारला जायचं नक्की केलं. 
             पौर्णिमेच्या आदल्या दिवशी सकाळी लवकर निघून रात्री वेळेत भवनाथ तलेटीला आमच्या रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. खोलीवर जाऊन ताजंतवानं होऊन जेवण्यासाठीसाठी पुन्हा बाहेर पडलो. परंतु वाढत्या निर्बंधांमुळे सारी दुकानं आणि उपहारगृहही दहा वाजत आल्याने बंद होण्याच्या तयारीत होती. फारशी भूक नसल्याने गरमागरम ठेपले आणि त्याबरोबर झणझणीत मिरची लोणचं बांधून घेतलं आणि आमच्या रहाण्याच्या ठिकाणापासून जवळच असलेल्या पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेऊन परत आलो. जेवण करुन गिरनार दर्शनाचं सुखस्वप्न पहातच निद्राधीन झालो.
             दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर आवरुन पुन्हा पहिल्या पायरीचं आणि मारुतीरायाच दर्शन घेतलं, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ जाऊन रांगेत उभं राहिलो. भल्या पहाटेपासून उडन खटोलासाठी भाविक रांगेत उभे होते. ठरलेल्या वेळी उडन खटोलाच्या फेऱ्या सुरु झाल्या आणि थोड्या वेळातच आम्ही अंबाजी टुकवर पोहोचलो. नुकताच सूर्योदय झाला होता. एका बाजूला सोनकेशरी रंग पसरला होता तर दुसऱी बाजू अजून धुक्याची दुलई लपेटून बसली होती. अतिशय सुंदर नजारा होता. आकाश सोनकेशरी रंगात रंगलेलं, खाली धुक्याची दुलई आणि अंबाजी टुकवर जमलेले, भक्तीरसाने  रसरसलेले सारे भाविक, सारंच अप्रतिम. गिरनारचं वैशिष्ट्यच असं आहे की प्रत्येक वेळी तो वेगळ्याच सौंदर्यानं नटलेला आणि भक्तीरसात चिंब भिजलेलाच असतो.  गिरनारहून परत यावसंच वाटत नाही इतका तिथला परिसर भारलेला आहे. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या तपोबलाने पावन झालेल्या त्या भूमीवरुन दर्शन घेऊन परत फिरावसंच वाटत नाही.
             अंबामातेच दर्शन घेऊन आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गोरक्षनाथ टुकवर पोहोचून दर्शन घेतलं आणि मंदिरासमोरील पापपुण्याच्या छोट्याशा बोगद्यातून (खिडकी) रांगत बाहेर येऊन पुन्हा पुढे गुरुशिखराकडे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. पुढच्या काही क्षणातच मी श्री दत्तगुरुंच्या चरणी नतमस्तक झाले आणि जाणवली ती अपार तृप्ती. स्वयं श्री दत्तात्रेय सतत आपल्याबरोबर आहेत ही जाणीवच फार विलक्षण आहे. मी घरुन करुन नेलेला नैवेद्य दत्तगुरुंना अर्पण करुन, तीर्थ आणि अष्टगंध लेऊन अखंड धूनीच्या दर्शनाला गेलो.
             अखंड धुनी ही दर सोमवारी सकाळी दोन तासांसाठी प्रज्वलित होते. दर सोमवारी तिथले साधूसंत पिंपळवृक्षाची काष्ठं धूनीच्या स्थानी रचतात आणि काही क्षणातच धुनी प्रज्वलित होते. पुढचे साधारण दोन तास धुनी तशीच प्रज्वलित असते.  यावेळी पौर्णिमा आणि सोमवार असा विशेष योग आल्यामुळे धुनीच्या दर्शनाला खूपच गर्दी होती. त्यामुळे थोड्या पाय-या उतरुन रांगेत उभं राहिलो. साधारण तासाभरात आम्ही धुनीजवळ पोहोचलो. मला धुनींचं दर्शन झालं आणि मी तिथेच अक्षरशः खिळून उभी राहिले. माझ्या दृष्टीसमोर होत्या धुनीतल्या केशरपिवळ्या ज्वाला आणि दत्तगुरुंची प्रसन्न मूर्ती. काही क्षणांनी भानावर आले आणि अन्नछत्रासाठी नेलेला शिधा, रक्कम गुरुजींच्या हाती अर्पण करुन नतमस्तक झाले. धूनीचं भस्म लेऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. नंतर तिथे लागूनच असलेल्या एका छोट्या समाधीस्थळी जाऊन बसलो. पून्हा एकदा शांतपणे गुरुशिखर आणि अखंड धुनीचं मानसदर्शन केलं.  गुरुचरित्राचं थोडं वाचन करुन मार्गस्थ झालो. गोरक्षनाथ टुकवर पोहोचून पून्हा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक येथे आलो. अंबामातेचही परत एकदा दर्शन घेऊन उडन खटोलाजवळ आलो. काही वेळातच उडन खटोलाने तलेटीला परत आलो. रहाण्याच्या ठिकाणी परत येऊन थोडा आराम करुन परतीच्या प्रवासाला लागलो.
             कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष सलग तीन पौर्णिमा गिरनार दर्शन श्री दत्तगुरुंनी आम्हाला घडवलं हे आमचं फारच मोठं भाग्य.
             कार्तिकी पौर्णिमेला दर्शन आणि परिक्रमा दोन्हीचा योग आला. निर्बंधांमुळे सुरुवातीला परिक्रमेला परवानगी नव्हती. पण श्री दत्तगुरुंनी भक्तांची प्रार्थना ऐकली आणि ऐनवेळी परवानगी मिळाली. आमच्यासारख्या साऱ्या भाविकांना परिक्रमा करता आली म्हणून वेगळंच समाधान लाभलं होतं. 
             दत्तजयंतीला गिरनारला जायचा आनंद तर विशेषच होता. नेहमी आम्ही दोघं आणि स्नेही असंच दर्शनाला जातो. यावेळी मात्र मुलीही बरोबर होत्या. त्यांना तर दर्शनाला येण्याआधीच श्री दत्तात्रेयाच्या अस्तित्वाची, आमच्या जवळ असण्याची प्रचिती आली होती. त्यामुळे दत्तजयंतीलाही उत्तम रितीने गिरनार दर्शन झालं होतं. त्यादिवशीही संपूर्ण गिरनार धुक्यात हरवला होता. चैतन्याने भारलेलं अतिशय सुंदर वातावरण होत. सूर्योदय होऊनही बराच वेळ सारा परिसर धुक्याची दुलई पांघरूनच बसला होता. 
             भवनाथ तलेटीचा सारा परिसर मला खूप आवडतो. सतत उत्सहाने भरलेल्या आणि भाविकांनी फुललेल्या या ठिकाणी  पोहोचलं की आपणही त्या उत्साहाचा भाग होतो, एका वेगळ्याच विश्वात रमतो. गिरनार पर्वताच्या नुसत्या दर्शनानेही लीनता येते. आणि प्रत्यक्ष दर्शनाचं समाधान तर अवर्णनीयच.
             खरंतर नोव्हेंबर २०१९ आधी कुणी ज्योतिषांनी जरी मला भविष्य सांगितलं असतं तरी माझा विश्वास बसणंच कठिण होतं की इतका मोठा गिरनार वारीचा विशेष योग आमच्या आयुष्यात येईल. खरंच स्वयं श्री दत्तात्रेयच आम्हाला प्रत्येकवेळी गिरनार वारी घडवत आले आहेत. आम्ही फक्त प्रार्थना करतो आणि पूर्तता श्री दत्तगुरु करतात. 
           || अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त  ||


मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास
     मिटल्या नेत्रीही तू नित्य दिसावे
     पापणीत डोळीयांच्या तू असावे
हृदयमंदिरी तू सदा वसावे
अधरावरती तू  नित्य रहावे
     श्वासागणिक तुजला मी स्मरावे
     नामातच तुझिया सदा रमावे
कातर हळव्या क्षणी तू असावे
झुल्यावर सुखाच्या तुज स्मरावे
            सगुण निर्गुण भेदच नुरावे
            दत्तचरणी 'मी' पण हे सरावे
मनी एकच ध्यास एकच आस
लाभो निरंतन तव सहवास

- स्नेहल मोडक

Wednesday, January 12, 2022

बंध मैत्रीचे

                    कोरोना आणि काही इतर कारणांमुळे गेली दोन वर्षं पुढे पुढे जात राहिलेल्या आम्हा मित्रमैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाला अखेर मुहूर्त मिळाला. तारिख आणि ठिकाण ठरवून रेल्वेचं आरक्षण केलं आणि सगळ्यांमधे उत्साहाची लहर पसरली.
                     मळवली - लोणावळ्यापासून अगदी जवळ म्हणजे नऊ किमी अंतरवार असलेलं एक छोटंसं शांत पण निसर्गरम्य गांव. आमच्या स्नेहसंमेलनासाठी या मळवलीमधलाच एक सुंदर बंगला आरक्षित केला होता. 
                    खरंतर काही कारणास्तव मी या संमेलनाला न जाण्याचं ठरवलं होतं. मात्र त्यामुळे माझे सारे मित्रमैत्रिणी खूपच नाराज झाले होते. त्यांची नाराजी मला सतत जाणवत होती. अखेर संमेलनाच्या आदल्या दिवशी कारणं बाजूला ठेवून मी जीवलगांबरोबर संमेलनाला जायचं ठरवलं. रात्री उशिरा जायची तयारी केली आणि सगळेच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भेटीचं स्वप्न पाहातच निद्राधीन झालो.
                   दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वेने सारे निघालो. एका मैत्रिणीने भल्या पहाटे उठून उत्साहाने तयार केलेल्या चविष्ट नाश्त्याने प्रवासाची छान सुरुवात झाली. नाश्त्याबरोबर गप्पाही रंगल्या. आणि त्यात वेळ कसा गेला कळलही नाही. आम्ही लोणावळा स्थानकावर उतरलो. तिथून थोडं दूर असलेल्या पण संमेलन स्थळ म्हणून ठरवलेल्या मळवली गावातील बंगल्यापर्यंत जाण्यासाठी एका मित्राने गाडीची व्यवस्था आधीच केली होती. त्या गाडीने आम्ही संमेलन स्थळी पोहोचलो. काही मित्र मैत्रिणीं दूसरीकडून येणार होते. त्यांना आमच्याबरोबर रेल्वेनं येणं शक्य नसल्यानं एका मित्राच्या गाडीने तेही एकाच वेळी संमेलन स्थळी पोहोचले. बंगला गावापासून थोडा आत होता. पण आवारात सुंदर बाग फुलवलीय. आणि जवळुन एक लहानशी नदी वाहते. एखाद्या छानशा चित्रासारखंच हे ठिकाण आहे.
                    सारे एकत्र जमलो आणि मग सुरु झाली धमाल मजामस्ती. बंगल्यात पोहोचलो, ताजेतवाने झालो आणि मग सुरु झाला यज्ञ - गप्पांचा अखंड यज्ञ. त्यात वाफाळत्या चहाची पहिली आहुती पडली आणि यज्ञ तेजाळला. नंतर भोजन आहुती अर्पण करेपर्यंत त्यात गप्पा आणि छायाचित्रणाच्या समीधा वाहणं अखंड सुरु होतं. झणझणीत भरली वांगी आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरी अशा गावरान जेवणाचा आस्वाद घेत गप्पा अधिकच रंगल्या होत्या.
                    भोजनाच्या आहुतीनंतरही गप्पांच्या समीधा यज्ञात पडतच होत्या. नंतर यज्ञ थोडा बाजूला ठेवून जवळच्या तरणतवावात मनसोक्त खेळून यज्ञाची धग थोडी कमी केली. मग परत आवरुन अंगणातच बसून वाफाळत्या चहाची आहुती यज्ञार्पण केली. मधल्या काळात सकाळपासूनचं स्वच्छ आकाश भरुन यायला लागलं होतं. चहा होईपर्यंत आकाशात मेघ दाटून आले. चहापानानंतर आम्ही जवळच थोडं फिरुन आलो. थोड्याच वेळात वरुणराजाने आमच्यावर गुलाबपाणी शिंपडायला सुरुवात केली. गार वारा आणि पावसाचा हलका शिडकावा वातावरण अतिशय सुंदर झालं होतं. गप्पा गोष्टी आणि छायाचित्रांचा यज्ञ सुरुच होता.
                     दोन मित्रांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ऐनवेळी ते संमेलनाला येऊ शकले नाहीत तर एक मित्र कामाच्या व्यस्ततेमुळे रात्री येणार होता त्याची वाट पहाणं सुरु होते. न आलेल्या मित्रांची उणीव सतत जाणवत होती. 
                    अशातच सांजसावल्या गडद झाल्या आणि पावसाचा शिडकावाही वाढला. मग घरात बसून खेळायचं ठरवलं. एका मित्राने घेतलेल्या या खेळाचा मुख्य उद्देश व्यक्त होणं हाच होता. 
                    खूप साऱ्या गोष्टी आपल्याला बोलायच्या असतात. पण त्यासाठी योग्य वेळ आणि आपल्याला समजून घेणारी योग्य व्यक्ती हे दोन्ही असावं लागतं. बहुतेक वेळा आपल्याला कुणी समजून घेणार नाही या भावनेतून आपण अव्यक्त रहातो. आणि मनाच्या तळाशी या मनभावना दडपून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याचा परिणाम आपल्या मनावर आणि पर्यायाने तब्येतीवर होतच असतो. मित्रमैत्रिणींचं स्नेहसंमेलन हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. इथं आपल्याला समजून घेणारे मित्रमैत्रिणी आहेत याची जाणीव होते आणि मग गप्पांच्या, खेळांच्या माध्यमातून इथं प्रत्येकाला मनापासून व्यक्त होता येतं. आणि मग मनमुक्त झाल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं.
                    आम्ही असंच मनमुक्त बोलत असतानाच काम संपवून येणाऱ्या मित्राचं आगमन झालं आणि आमच्या खेळाची रंगत अजूनच वाढली. अखेर खूप उशीराने गप्पांच्या यज्ञात भोजनाची आहुती दिली. आणि पुन्हा नवीन खेळाला सुरुवात केली. उशीरापर्यंत जागरण करुन अखेर थोडीशी विश्रांती घेतली. 
                   लगेच पहाटे ऊठून फिरायला गेलो. साऱा परिसर धुक्याची दुलई पांघरून बसला होता. पूर्वदिशेला पसरत असलेला सोनकेशरी रंग पाहात, छायाचित्र काढत, गार वारा अनुभवत आम्ही फिरत होतो. काही वेळातच सूर्योदयाचं सुंदर दृश्य डोळ्यात आणि छायाचित्रात साठवत परत आलो. 
                 आदल्या दिवसापासून सुरु असलेल्या यज्ञात पून्हा वाफाळत्या चहा आणि चमचमीत मिसळीची आहुती दिली. सारं आवरुन परत गप्पा, गाणी, खेळ, छायाचित्रं यात दंग झालो. अखेर काही वेळातच यज्ञात भोजनाची पूर्णाहुती दिली. आम्हाला दोन दिवस उत्तम चवीचं, आमच्या पसंतीचं, चहा, नाश्ता, भोजन करुन खाऊ घालणाऱ्या पती-पत्नी चा निरोप घेऊन तृप्त मनाने आम्ही निघालो. 
                 मळवलीपासून जवळच भाजे आणि कार्ल्याची प्राचीन लेणी आहेत. ही लेणी आणि कार्ल्याच्या एकवीरा देवीचं मंदीर पाहण्यासारखे आहेत. तसंच इथं मराठा साम्राज्याचा इतिहास सांगणारे लोहगड आणि विसापूर हे किल्लेही पहाण्यासारखे आहेत.
                आम्ही जवळच असलेला लोहगड किल्ला बघायला जायचं आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे किल्ल्याजवळ पोहचलो. हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला गेलाय. अतिशय मजबूत आणि बुलंद असा हा किल्ला आहे. अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत असलेला हा किल्ला पहाण्यासाठी खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. पण गप्पा आणि छायाचित्रणाच्या नादात दमल्याची जाणीव न होता आम्ही वरपर्यंत चढून गेलो. गणेश दरवाजा, नारायण दरवाजा, हनुमान दरवाजा हे पहात महादरवाजातून पुढे गेल्यावर एक ध्वजस्तंभ, लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, एक छोटंसं अष्टकोनी तळं हे सारं पहाता येतं. वर पोहोचलो आणि एका वेगळ्याच आनंदानं मन भरुन आलं. नुसतं किल्ला चढतानाही आपल्याला दमायला होतं आणि जाणवतं त्याकाळी कुठलीही सुविधा नसताना बांधलेल्या अशा साऱ्या अभेद्य किल्ल्याचं महत्व. किती विपरीत परिस्थितीत बांधलेत हे सारे गडकिल्ले. कुठून आली असेल एवढी शक्ती त्या लोकांमध्ये. जिद्द, निष्ठा, जीवाची बाजी लावणं या साऱ्या शब्दांचा खरा अर्थ या इतिहासातूनच कळतो. किल्ल्यावर पोहोचून मनोमनी नतमस्तक होऊन, फिरुन, छायाचित्र काढून परत खाली उतरलो.
                 दोन दिवस सुरु असलेला हा संमलनाचा यज्ञ पुनरागमनायच म्हणून तात्पुरता शांत केला आणि गोड आठवणींची शिदोरी बरोबर घेऊन उत्फुल्ल मनाने परतीच्या प्रवासाला लागलो. 

      
जरतारी वस्त्र खास मैत्रीचे
स्नेहाच्या धाग्याने विणायचे
   गीत सुमधुर हे आयुष्याचे
   द्यायचे स्वरसंगीत मैत्रीचे
स्वप्नचित्र मनी रेखायचे
रंग मैत्रीचे त्यात भरायचे
   शांत अव्यक्त मन जपायचे
   अन मैत्रीत मनमुक्त व्हायचे
जीवन सारे जरी सुखदुःखाचे
मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे
   मैत्रीचे इंद्रधनु त्यात फुलवायचे

- स्नेहल मोडक

Monday, January 3, 2022

प्रारंभ नववर्षाचा

     पुन्हा एक नवं वर्ष सुरु झालंय. गतवर्षीच्या साऱ्या आठवणी आणि आपल्या माणसांसह या नवीन वर्षाचं स्वागत करुया. कटू आठवणी विसरुन, दु:खद आठवणींना काळाचं औषध लावून, आपल्याला आणि आपल्या साऱ्या सुहृदांना जपूया. नवीन वर्ष सौख्य समृध्दी आणि उत्तम आरोग्याचं असावं यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया. म्हणजे आपल्या आयुष्याचं गीत सुमधुर नक्कीच होईल, हो ना?


   

सूर संगीताचे मनी उमलावे

नीत नवे तराणे हृदयी छेडावे 

     श्वासातूनी आपल्या गीत फुलावे

     अधरातल्या तानेवर मन झुलावे

सुरावटीवरी जणू स्वैर विहरावे

नादावरी अलवार पाऊल थिरकावे

      भलेबुरे ते सारे विसरावे

      गीतामधूनी मनमुक्त व्हावे

क्षणी सुखाच्या संगीत ऐकावे

विरहात कुणाच्या गीत ते गावे

       विसरुन सारे स्वच्छंद जगावे

       गीत जीवनाचे गातच रहावे


- स्नेहल मोडक

Saturday, December 25, 2021

वर्ष सरताना...

              आपल्या आयुष्यातलं हे वर्ष सरत आलय. एक जानेवारीला सध्याच्या दिनदर्शिकेच्या जागी एक नवीन दिनदर्शिका येईल. आणि पुन्हा दर महिन्याला त्या दिनदर्शिकेचं एक-एक पान उलटलं जाईल. आपलं आयुष्य ही इतकं सहजसोपं असतं का हो?

              सरत्या वर्षाबरोबरच आपलं अनुभवांचं, सुखदु:खाचं गाठोडंही मोठं होत असतं. त्यातूनच आपण नवीन वर्षाचे काही संकल्प करतो. अर्थात काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण...


अजून एक वर्ष सरत आलय

आठवणी साऱ्या ठेवून जातय

मोती खास मैत्रीचे काही विखुरले

नव मैत्रीचे बंध ते अलगद जुळले

सुटले काही दूरच्या नात्यांचे बंध

जुळले काही नवागतांशी संबंध

आले रागरुसवे झाले गैरसमज

जाणले कुणी भाव मनीचे सहज

घडल्या भेटी कुणी झाले मनमुक्त

टाळूनी भेट राहिले कुणी अव्यक्त

स्वप्नफुले काही सहजच उमलली

असूनी निगराणी काही कोमेजली

सरत्या वर्षाचा हा आलेखच असे

मनी नववर्षाचे कल्पनाचित्र वसे

चुका अन गैरसमज ते विसरुया

अन नात्यांचे भावबंध घट्ट विणूया

स्वप्नपंख लेऊनी नभी विहरुया

नववर्षाचा हाच संकल्प करुया

- स्नेहल मोडक


Monday, December 6, 2021

झिम्मा

              सहज बोलता बोलता अचानक लेक म्हणाली 'आई आपण झिम्मा बघुया'. क्षणभर ती काय म्हणतेय ते मला कळलंच नाही. मग तिने मला या चित्रपटाबद्दल सांगितलं. लगेच त्याची झलक असलेली चित्रफितही दाखवली आणि मलाही हा चित्रपट पहायची उत्सुकता निर्माण झाली. खरंतर चित्रपट आणि मालिका यांच्याशी माझं सख्य जरा कमीच. मात्र खास विषयांवर आधारित चित्रपट मी नक्की पाहते. ठरवल्यानुसार हा चित्रपट पाहिला आणि त्यावर व्यक्त व्हावं असं वाटलं.

              इरावती कर्णिक लिखित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित हा चित्रपट 'झिम्मा'. यातील उत्तम कलाकार आणि त्यांचा अतिशय सहजसुंदर असा अभिनय आणि संपूर्ण चित्रपटात असलेली नयनरम्य अशी लंडनची पार्श्वभूमी यामुळे जणू आपणही या चित्रपटाबरोबर लंडनचा प्रवास करुन येतो.

             इरावती कर्णिक यांचं , 'प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो' हे एक वाक्यच संपूर्ण चित्रपटाचं सार सांगून जातंं. स्वतः ला किंवा इतरांना समजून घेण्यासाठी, नव्याने ओळखण्यासाठी पर्यटन हे अतिशय सुंदर माध्यम आहे. एकट्याने प्रवास करताना आपण स्वताच स्वताला नव्याने गवसतो. तर बरोबर कुणी असेल तर त्या व्यक्तीच्या सहवासाबरोबर त्या व्यक्तीला अतिशय जवळून ओळखताही येतं. कधी कधी आपणच आपल्यावर विनाकारण अनेक बंधनं घालून घेतलेली असतात. कधी काही घटनांचा खोलवर परिणाम झालेला असतो आणि त्यातून आपण आपलं अस्तित्वही विसरुन गेल्यासारखं जगत असतो. या साऱ्यातून बाहेर पडून आपलं आयुष्य पूर्ववत होण्यासाठी पर्यटन हा एक छान उपाय आहे.

               रोजच्या धकाधकीच्या जीवनातून स्वताला थोडं बाहेर काढून सात स्त्रिया लंडन प्रवासाला निघतात. या साऱ्या स्त्रिया वेगवेगळ्या वयोगटातल्या , वेगवेगळ्या सामाजिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या अशा आहेत. इंग्लंड सहलीच्या निमित्ताने या सगळ्या जणी एकत्र येतात. संपूर्ण चित्रपट या सहलीदरम्यान घडणाऱ्या धमाल, मजामस्तीच्या चित्रांनी सजलाय अर्थात त्या सगळ्या चित्रांना प्रत्येकीच्या आयुष्यातील हळव्या घटनांची किनारही आहे.

              कुठल्याही स्त्रीला बाहेर पडताना खूप वेगवेगळ्या पातळ्या ओलांडाव्या लागतात. मुळात तिने स्वतावर जी बंधनं घालून घेतलेली असतात त्यातून मार्ग काढणं तिला जरा कठिणच होतं. पण कधीतरी तिलाच या बंधनातून मुक्त व्हावसं वाटतं आणि मग मात्र ती 'स्व' च्या शोधासाठी नक्की बाहेर पडते. आणि यासाठी पर्यटन हा एक सुंदर मार्ग आहे. अशा प्रवासातच तिला स्वतः ची नव्याने ओळख होते. सगळ्यांबरोबरच स्वताच्या मनाचाही विचार ती आवर्जून करु लागते. कधी एखाद्या घटनेचा आपण किती खोलवर विचार करत असतो, विनाकारण एखाद्या गोष्टीची अतिकाळजी करत असतो, कुटुंबिय, आप्तस्वकीय यांच्या जबाबदारीत नको इतके अडकलेले असतो या सगळ्या गोष्टींची जाणीव तिला होते. आणि त्यातून ती स्वतःच्या मनाला हळूहळू पण निश्चितपणे बाहेर काढते. अशा प्रवासात नव्या मैत्रीणी मिळवते. तर प्रवासात बरोबर एखादी मैत्रीण असेल तर त्यांच्यातल्या मैत्रीचे बंध अधिक घट्ट होतात. अशा पर्यटनाला निघताना जरी तिची द्विधा मनस्थिती असली तरी नंतर मात्र ती प्रवासातल्या अनुभवातून अतिशय उत्साहात, आनंदात आपल्या रोजच्या कामात दंग होते. 

               माझ्यासाठीही पर्यटन हा नेहमीच एक आनंदानुभव असतो. अर्थात एकटीने प्रवास करायची वेळ सहसा माझ्यावर येत नाही. कुटुंबिय किंवा मित्रमैत्रिणी बरोबर असतातच. पण प्रत्येकवेळी मी माझी मलाच नव्याने उलगडत जाते. एखाद्या गोष्टीबद्दलचं अज्ञान, भिती, समज गैरसमज दूर होतात. स्वत: च्या क्षमतेची जाणीव होते.

               या प्रवासाचाच 'झिम्मा' या चित्रपटात अतिशय सहज सुंदर खेळलाय. मनमुक्त हसवणारा पण मध्येच हळवं करणारा, अगदी आवर्जून पहावा आणि आपल्यातल्या 'स्व' ला आपणही असंच जपावं याची सहज जाणीव करुन देणारा हा चित्रपट आहे.

- स्नेहल मोडक

Saturday, December 4, 2021

मनोमनी

              कधी कधी आपल्या आयुष्यात अशी काही एखादी घटना घडते किंवा कधी विचित्र परिस्थिती निर्माण होते आणि आपली मनस्थिती द्विधा होते. आजूबाजूला सारं काही नेहमीप्रमाणे सुरळीत सुरु असतं, आपणही यांत्रिकपणे वावरत असतो पण आपलं मन मात्र थाऱ्यावर नसतं. या सगळ्यांपासून कुठतरी दूर जावं एकटं शांत बसावं असं काहीसं वाटत असतं. कुणाला त्रास होऊ नये, काही जाणवू नये म्हणून आपण सहज वावरायचा प्रयत्न करत असतो पण मन मात्र भावनांचा गोफ विणतच रहातं.


कधी वाटते एकलेच तळ्याकाठी बसावे

शांत जलाशयासम स्तब्ध नि:शब्द रहावे

        जसे पर्ण तरंगे संथ नितळ जळावरी

        उठती भावनांचे तरंग जणू मनावरी

कधी वाटते एकलेच फिरावे काजळ राती

होऊनी अंधारसावली विसरावी सारी भीती

        जावे विसरुन सारी जणू फसवी नातीगोती

        विणावा कोष हा निर्विकारतेचा मनाभोवती

कधी वाटते एकलेच पावसात भिजावे

कुणास नकळत आसवांचे पाट वहावे

        भिजूनी पाऊसधारात तनमन शांतवावे

        कल्लोळ भावनांचे हृदयातून संपवावे

कधी वाटते फिरावे घनदाट अरण्यात

हलके ओघळावे दु:ख दाटल्या पापण्यांत

        वाढली जरी किती ऊंची स्पर्श धरेचा असावा

        पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

             पानगळीसम निरपेक्ष निर्विकार भाव उरावा

- स्नेहल मोडक

Wednesday, November 24, 2021

गिरनार दर्शन आणि परिक्रमा

              गिरनार परिक्रमा वर्षातून फक्त एकदाच कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात करता येते. गतवर्षी कोविड निर्बंधांमुळे परिक्रमा होऊ शकली नाही. त्यामुळे या वर्षीच्या परिक्रमेची सारेच दत्तभक्त आसुसून वाट पहात होते. 

             आम्हीही वेळेतच रेल्वेचं आरक्षण केलं होतं. यावेळी आमच्याबरोबर आधीपेक्षा जास्त लोकं दर्शन आणि परिक्रमेसाठी येणार होती. साहजिकच सर्वाच्या एकत्रित यात्रेची सर्व व्यवस्थाही आधीच केली. आणि यात्रेला जायच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. पण यावर्षीही परिक्रमेला परवानगी नसल्याचं स्पष्ट झालं आणि मन थोडं नाराज झालं. त्याच नाराजीतून एक दिवस मनात परिक्रमा नसेल तर यात्रा करण्यात काय अर्थ आहे असा विचार आला. कारण इतर वेळी दर्शन घडत असतंच. फक्त परिक्रमा वर्षातून एकदाच. मन बेचैन असतानाच 'सारं मनासारखं होईल, दर्शनाला ये' अशी जाणीव मनाला कुणीतरी करुन दिली, आणि तो भास होता कि अजून काही हा विचार न करता यात्रेला जायचं नक्की ठरवलं. 

             ठरलेल्या दिवशी रेल्वेने सर्वांचा एकत्रित प्रवास सुरु झाला. आमच्याबरोबर काही सहकारी मित्र यात्रेच्या संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत होते. अर्थातच त्यांच्या सहकार्यामुळेच एवढ्या लोकांच्या यात्रेचे सेवा म्हणून आयोजन करणं शक्य होतं. 

             प्रवासातील सर्वांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती. ती जबाबदारीही एका मित्रानी घेतली होती. पण काही कारणानं ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि आमची गाडी सुटली. पुढील स्थानकात ही गाडी गाठण्यासाठी ते निघाले पण गर्दीमुळे तिथेही ते वेळेत पोहोचू शकले नाहीत आणि त्या स्थानकावरुनही आमची गाडी पुढे निघून गेली. मग मात्र बाकिच्या सहकाऱ्यांची काळजी वाढली. एवढ्या लोकांसाठी बनवलेलं अन्न तर वाया जाणार आणि त्या मित्राची यात्राही चुकणार असं वाटू लागलं. मग ते अन्न तिथेच संस्था, मंदिर अशा ठिकाणी देऊन त्यांनी तरी दुसऱ्या गाडीने जुनागढला पोहोचावे असा विचार करत असतानाच दुसऱ्या गाडीची माहिती मिळाली. ती गाडी लगेच सुटणारी होती. ताबडतोब ते सहकारी सामानासहित त्या गाडीजवळ पोहोचले. त्या गाडीत चढायला आजूबाजूला असलेल्या लोकांनी  आपणहून मदत केली. मिळालेल्या माहितीनुसार वाटेत ती गाडी आमच्या गाडीच्या पुढे निघून गेली, आणि आम्हाला थोडं बरं वाटलं. सुरतला ते सामानासहित आमच्या गाडीत चढले आणि सर्वांची काळजी संपली. सर्वांनीच मनापासून श्री दत्तगुरुंना नमस्कार केला. पहिल्यांदा जेव्हा त्यांना गाडी चुकली तेव्हाच साऱ्यांना काळजी वाटू लागली होती. दुसऱ्या स्थानकातही जेव्हा गाडी गाठणं त्यांना अशक्य झालं तेव्हा सर्वांच्या काळजीची जागा चिंतेनं घेतली होती. पण का कुणास ठाऊक मी मात्र शांत होते. माझं अंतर्मन मला सांगत होतं ते सहकारी जेवणासहित वेळेत आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. दुसऱ्यांदाही गाडी गाठता आली नाही मग आता ते कसे आपल्यापर्यंत पोहोचणार याची यत्किंचितही कल्पना मला नव्हती पण ते पोहोचणार याची मनाला खात्री होती आणि अगदी तसंच घडलं ते वेळेतच आमच्यापर्यंत जेवणासहित पोहोचले ही श्री दत्तगुरुंनी दिलेली एक अनुभूतीच. 

             दुसऱ्या दिवशी पहाटे जुनागढला पोहोचलो. तिथून भवनाथ तलेटी येथे आम्ही आधी आरक्षित केलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. सारं भराभर आवरुन लगेच गुरुशिखर दर्शनाला निघालो.

             गुरुशिखरावर दर्शनाला जाण्यासाठी उडन खटोलाचंही आधीच आरक्षण केलं होतं. पण तिथे जाण्याआधी रिवाजाप्रमाणे पहिल्या पायरीजवळ जाऊन श्री मारुतीरायाचं आणि पहिल्या पायरीचं दर्शन आणि पूजा, प्रार्थना केली आणि उडन खटोलाजवळ आलो. खूपच गर्दी होती पण आधी आरक्षण केलं असल्याने लगेचच आम्हाला उडन खटोलाने अंबाजीटुक पर्यंत जायला मिळालं. अंबाजीटुकला पोहोचलो, अंबामातेचं दर्शन घेऊन लगेच पुढे निघालो. थोड्याच वेळात गोरक्षनाथटुक ला पोहोचलो. त्याचदिवशी गोरक्षनाथ जयंती होती. अतिशय छान योगायोग होता. गोरक्षनाथांचं अतिशय छान दर्शन घडलं. तिथं जरा थांबून परत पुढे निघालो. काही वेळातच गुरुशिखरावर पोहोचलो. श्री दत्तात्रेयाच्या चरणी नतमस्तक झाले आणि साऱ्या देहात चैतन्याची सुक्ष्म थरथर जाणवली. साऱ्या चिंता थकवा क्षणात नाहीसा झाला. गर्दी खूपच होती तरीही अतिशय सुंदर दर्शन घडलं आणि तृप्त झाले. नंतर पायऱ्या उतरुन अखंड धुनीजवळ पोहोचलो. तिथे प्रत्यक्ष पादुकांवर मस्तक टेकवून दर्शन घेता येतं. ते दर्शन घेऊन अन्नछत्रासाठी धान्य, रक्कम अर्पण करुन प्रसाद घेण्यासाठी बाजूच्या सभागृहात गेलो. तिथे सकाळची वेळ असल्याने शिरा, ढोकळा आणि चहा असा प्रसाद ग्रहण करुन वरच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या सभागृहात आलो. पण काही कामासाठी ते सभागृह बंद होते त्यामुळे त्याबाहेर बसूनच थोडंसं गुरुचरित्र वाचन केलं आणि प्रसन्न चित्ताने परतीच्या मार्गाला लागलो. परत एकदा गोरक्षनाथांचं दर्शन घेऊन अंबाजीटुक पर्यंत आलो. अंबामातेचं दर्शन घेऊन उडनखटोलाने तलेटी मुक्कामी पोहोचलो. अतिशय सुंदर दर्शन आणि प्रसाद मिळाल्यामुळे जेवायची इच्छाच नव्हती. त्यामुळे थोडा आराम केला.

             संध्याकाळी पुढील दर्शनासाठी सोरटी सोमनाथ ला निघालो. त्याआधी मार्गातील भालका तीर्थ इथे दर्शनाला गेलो. वृक्षतळी विश्रांतीसाठी पहुडलेल्या श्रीकृष्णाच्या पावलाला एका पारध्याने मारलेला बाण चुकून लागला आणि मानवदेहधारी श्रीकृष्णानी तिथेच अंतिम श्वास घेतला ती जागा म्हणजेच भालका तीर्थ. तिथे आता तलाव म्हणजेच तीर्थ आणि बाजूलाच प्रशस्त रेखीव मंदिर आहे. मंदिरात श्रीकृष्णाची पहुडलेले असताना बाण लागलेल्या स्थितीतील रेखीव मूर्ती आहे आणि पायाशी मस्तक झुकवलेल्या अवस्थेतील पारध्याची मूर्ती आहे. हे दर्शन करुन पुढे सोरटी सोमनाथांचं दर्शन घेतलं. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे सोमनाथ मंदिर. हे दर्शन करुन तलेटी मुक्कामी परत आलो.

             कार्तिकी एकादशीच्या आधी पंधरा दिवसांपर्यंत यावर्षीही परिक्रमेला परवानगी नव्हती. पण आठवडाभर आधी निर्णय बदलला आणि फक्त साधू - संत अशा चारशे लोकांनाच परिक्रमा करता येईल. फक्त तीन दिवस आणि पहाटे चार ते सात या वेळेत च परिक्रमेला सुरुवात करता येईल असं जाहीर करण्यात आलं. पण त्यात बाकी लोकांना जायला मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळे सगळेच भाविक नाराज होते. माझ्या मनात मात्र परिक्रमेविषयी संदेह नव्हता. आमची यात्रा द्वादशीला सुरु होणार होती. त्यामुळे तोपर्यंत नक्की काहीतरी श्री दत्तगुरु कृपेने घडणार आणि ते आमच्याकडून परिक्रमा पूर्ण करुन घेणार यावर माझा विश्वास होता. परिक्रमा एकादशी ला रात्री बारा वाजता सुरु होते. त्याआधी रात्री अकरा वाजता आम्हाला निरोप मिळाला. आम्ही ज्या आश्रमात उतरणार होतो तिथल्या प्रमुखांनी परिक्रमेला सर्व लोकांना परवानगी मिळाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या बरोबर येणाऱ्या सर्वाना ही बातमी कळवली आणि सर्वांच्या मनात उत्साह संचारला. 

             गुरुशिखर दर्शन आणि सोमनाथ दर्शन करुन दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजताच परिक्रमेला सुरुवात केली. परिक्रमा पहाटे चार ते सात यावेळेतच सुरु करायला परवानगी देण्यात आली होती. दरवर्षी परिक्रमेत भाविक चार दिवस वास्तव्य करतात. परिक्रमा मार्गात खाऊ आणि पाणी मिळण्यासाठी छोटी दुकानं असतात. पण यावर्षी ही दुकानं आणि वास्तव्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानगी नव्हती. दोन वर्षांच्या निर्बंध काळात मानवी हस्तक्षेप नसल्याने जंगलातील प्राणी मुक्त संचार करत होते. अशात परिक्रमेच्या निमित्ताने लोक जंगलातून फिरताना एखाद्या प्राण्याने हल्ला करण्याची शक्यता असल्याने वास्तव्यास परवानगी देणे योग्य नव्हते. म्हणून फक्त दिवसभराच्या परिक्रमेला परवानगी मिळाली. वाटेत खाणं पिणं मिळणार नसल्यामुळे बरोबर खाऊ पाणी घेऊन परिक्रमेला सुरुवात केली. आदल्या दिवशी परिक्रमा करताना कुणालातरी सिंहाचं दर्शन झालं होतं अशी बातमी आम्हाला मिळाली होती. त्यामुळे एकट्या दुकट्याने न जाता समुहाने मार्गक्रमणा करावी असं सुरुवातीलाच सगळ्यांना सांगीतलं. सुरुवातीचा सात आठ किमी चा उंच चढावाचा गाडीरस्ता संपला आणि पायवाटेला सुरुवात झाली. आजूबाजूचं जंगल न्याहाळत आरामात चालणं सुरु होतं. बघता बघता समोर पूर्व दिशा सोनकेशरी रंगांनी उजळली. आणि केशररंगी रविराजाचं सुरेख आगमन झालं. सूर्योदयाचा अप्रतिम नजारा डोळ्यात आणि छायाचित्रात बध्द करित आम्ही पुढे चालत होतो.

             सिंह आणि इतर प्राणी दिसण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही जंगलात नीट पहात कोनोसा घेतच चाललो होतो. पायवाटेने चालत असतानाच दाट जंगल सुरु झालं आणि आमचं निरिक्षणही वाढलं. काही वेळाने अचानक थोडी खसफस ऐकू आली आणि आम्ही शांत उभं राहून पाहू लागलो आणि झाडीतून हरणं पळताना दिसली. पण ती आमच्यापासून लांब होती आणि चटकन निघून गेली त्यामुळे छायाचित्र घेणं शक्य झालं नाही. पण त्यानंतर मात्र माझी उत्सुकता खूपच वाढली. आणि आज मला सिहांचं दर्शन व्हायलाच हवं आहे असं मोठ्यांदा बोलून गेले. पुढे मी जंगलात जास्तच निरखून बघत चालू लागले. थोडा वेळ गेला आणि मला बाजूच्या जंगलात कुणीतरी प्राणी गेल्याचं दिसलं. कुठला प्राणी असावा हे पहाण्यासाठी मी थोडी पुढे जाणार तोच दोघंतिघं तिथंच उभे असलेले दिसले. त्यांनीही खूणेनच कुणाचीतरी चाहूल लागल्याचं सांगितलं. आम्ही तिथे असलेले सारे क्षणात स्तब्ध राहून निरखू लागलो आणि अचानक अगदी काही फुटांवर आम्हा सर्वांना तिचं दर्शन झालं. तिथे वनराणी निवांत बसली होती. आम्ही अतिशय स्तब्धतेनं तिला पहात होतो. नजरेला जरी ती स्पष्ट दिसत असली तरी दाट झाडीमुळे छायाचित्र मात्र किंचित अस्पष्टच येत होतं. आम्ही पहात असताना जरी शांत असलो तरी बहुधा तिला आमची चाहूल लागली असावी. तिने हलकेच मान वळवून आमच्या दिशेने काही क्षण बघितलं आणि पून्हा मान फिरवून निवांत बसली. आम्ही शांतपणे सिंहिणीला पहात असतानाच एका जंगल अधिकाऱ्याची गाडी तिथे आली. आम्हाला पाहून लगेच गाडी थांबवून ते उतरले आणि आम्हाला तिथे थांबू नका असं सांगितलं. अर्थात आमच्या सुरक्षेसाठीच त्यांनी आम्हाला थांबू दिलं नाही. पण आमची सिंह पहाण्याची इच्छा मात्र पूर्ण झाली. लेकराने मायपित्याजवळ एखादा लडिवाळ हट्ट करावा आणि त्यांनी तो लगेच पूर्ण करावा, तद्वत माझा हट्ट श्री दत्त गुरुनी सहज पूर्ण केला होता. अतिशय आनंदात आणि भारावलेल्या अवस्थेत मी पुढे चालू लागले. 

             परिक्रमा मार्गात तीन डोंगर चढून उतरावयाचे आहेत. साधारण अर्ध्या अंतरावर भगवती मातेचे मंदिर आहे. आदल्या दिवशी मार्गात कुठेही खाण्यापिण्याची सोय नाही असं कळलं होतंच. परंतु आम्ही भगवती मंदिराजवळ पोहोचलो तेव्हा तिथे भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली दिसली. कुणाला पूर्ण भोजन नको असेल तर गोड बुंदी आणि गाठी असा प्रसादही दिला जात होता. आम्हीही बुंदी आणि गाठींचा थोडासा प्रसाद घेऊन पुढे निघालो. 

             परिक्रमेला सुरुवात केल्यावर काही तासांनी पाऊस गुलाबपाणी शिंपडून गेला होता. मात्र भगवती मंदिरानंतर साधारण तासाभरात जोरदार पाऊस सुरु झाला. वाटेत कुठेही थांबण्यासारखी परिस्थिती नसल्याने आम्ही भिजतच चालत राहिलो. वीस - पंचवीस मिनिटं पडलेल्या जोरदार पावसामुळे आम्ही नखशिखांत भिजलो होतो. परंतु परिक्रमा पूर्ण होण्यासाठी बरंच अंतर चालायचं असल्यामुळे फारसं न थांबता चालतच राहिलो. भिजलो असलो तरी गारव्यामुळे चालताना त्रास कमी होत होता. सारे चढ उतार पार करत, जंगलाचा, पावसाचा आनंद घेत, नामस्मरण करीत अखेर शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो. शेवटचा सात - आठ किमीचा रस्ताही गाडीरस्ता आहे. चांगला रस्ता असूनही दिवसभराच्या चालण्यामुळे तो रस्ता संपता संपेनासा होतो. अखेर सावकाश चालत उरलेला रस्ता चालत गेलो आणि ज्याची अगदी आसुसून वाट पाहिली होती ती परिक्रमा पूर्ण झाली. 'सारं मनासारखं होईल दर्शनाला ये' ही मला झालेली जाणीव श्री दत्तात्रेयांच्या कृपेने शब्दशः खरी ठरली होती.स्वयं श्री दत्तगुरुंनी आम्हाला दर्शन आणि परिक्रमा घडवली होती. ही परिक्रमा आपल्या शारीरिक क्षमतेचा कस लावणारी आहे पण मला मात्र श्री दत्तगुरु बरोबर असल्याची जाणीव सतत होत होती.

             बाहेर आल्यावर सर्वात आधी चहा प्यायला गेलो. चहा पिऊन परत ताजंतवानं होऊन मुक्कामाच्या ठिकाणी गेलो. 

             दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरुन सर्वजणं बेट द्वारकेला निघालो. द्वारकेला पोचायला साधारण तासभर असताना धुवांधार पाऊस सुरु झाला. मात्र ओखा येथे पोहोचेपर्यंत पाऊस थांबला. आम्ही सारी लोकं येईपर्यंत धक्क्यावर नौका ठरवण्यासाठी पुढे गेलो आणि पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला. आम्ही मागे फिरुन इमारतीमध्ये पोहोचेपर्यंत चिंब भिजलो. पाऊस थांबल्यावर नौकेतून बेट द्वारकेला पोहोचून मंदिरात‌गेलो. मंदिरात आरती सुरु असल्याने दर्शन बंद होतं. आरती संपल्यावर आम्ही दर्शन घेतलं आणि मंदिर दर्शनासाठी चार वाजेपर्यंत बंद करण्यात आलं. तिथून नौकेतून आम्ही परत फिरलो. आणि त्या परतीच्या प्रवासात समुद्रात उसळणाऱ्या मोठ्या लाटांमुळे आम्हाला नखशिखांत समुद्र स्नान घडलं. आधी पावसात चिंब भिजलो होतोच ते कमी कि किय म्हणून परत समुद्र स्नानही घडलं होतं. थंडीने गारठलो होतो पण तरीही खूप छान वाटत होतं.  तिथून निघून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक नागनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. नंतर तिथून द्वारकेला जाऊन पुन्हा द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा तलेटीला परतलो. दुसऱ्या दिवशी दुपारच्या रेल्वेने परतीच्या प्रवासाला लागलो.

               अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...

- स्नेहल मोडक

Monday, November 1, 2021

दीपावली

                 दीपावली या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील दोन शब्दांमधून झालीय. दीप म्हणजे दिवा आणि आवली म्हणजे ओळ याचा संपूर्ण अर्थ म्हणजे दिव्यांची एका ओळीत केलेली रचना म्हणजेच दीपावली. दीपावलीस अजूनही वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं. निलमत पुराणात हा सण दीपमाला या नावाने ओळखला जातो. दीपावलीचं मूळ नांव यक्षरात्र होतं असं हेमचंद्रानी नोंदवलंय. कनोजचा राजा हरिश्चंद्र यानी दीपप्रतिपदुत्सव असं या सणाला नांव दिलं होतं.

                 अश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस दिवाळी सणाचे असतात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. तिमीर दूर करुन प्रकाश देणारा दीप मांगल्याचं प्रतिक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्याही जीवनातील अंध:कार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. आनंद, कृतज्ञता, सौख्य समृध्दी यांच प्रतिक म्हणजे दीपावली. रंगावली, पणत्या, आकाशकंदील, रोषणाई या साऱ्यांनी घर सुशोभित करतात. गोड अन खमंग फराळाचे पदार्थ नैवेद्यासाठी आणि सर्वांसाठी केले जातात.

                अश्विन वद्य द्वादशीचा दिवस गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या नावाने ओळखला जातो. वसु म्हणजे द्रव्य आणि बारस म्हणजे म्हणजे द्वादशी. यादिवशी सवत्स धेनूची पूजा करुन पुरणाचा नैवेद्य दिला जातो.

                अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी म्हटलं जातं. यादिवशी घरातील द्रव्यायालंकारांची पूजा करतात. अपमृत्यू टळावा यासाठी यादिवशी यमदीपदान केलं जातं म्हणजे सायंकाळी दाराबाहेर दक्षिण दिशेला दिवा लावतात. या दिवसाला धन्वंतरी दिन म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे या दिवशी धन्वंतरी पूजनही केलं जातं.

                दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासुराचा वध करुन प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवलं होतं त्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. पहाटे अभ्यंगस्नान करतात. तैलमर्दन करुन, सुवासिक उटणं लावून सूर्योदयापूर्वी केलेलं स्नान म्हणजे अभ्यंगस्नान. अलक्ष्मीचं मर्दन करुन आपल्यातील अहंभाव नष्ट होऊन आत्मतेज पसरावं हा उद्देश असतो.

                अश्विन अमावस्या म्हणजेच लक्ष्मीपूजन. प्रदोषकाली म्हणजे सायंकाळी लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मी ही चंचल आहे असा समज आहे. ती स्थिर रहावी म्हणून तिचं पूजन केलं जातं. द्रव्य आणि सुवर्णालंकारांची पूजा यादिवशी केली जाते.

                कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा करतात. यादिवशी बलीराजाची पूजा करुन  इडा पिडा टळो आणि बलीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते. तसंच यादिवशी सुवासिनी पतीला औक्षण करतात. अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात.

                कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भावाबहिणीच्या अतूट रेशमी नात्याचं प्रतिक असा हा सण. या दिवशी यम आपली बहिण यमी हिच्याकडे जेवायला गेला म्हणून या दिवसाला यमद्वितीया या नावानंही ओळखतात. या दिवशी बहिण भावाला औक्षण करते आणि भाऊ औक्षणानंतर ओवाळणी देऊन बहिणीचा सन्मान करतो.

                रात्रभर जागून सर्वांनी मिळून तयार केलेला आकाशकंदील आणि फराळ, सगळीकडे केलेली पण्त्या आणि रांगोळ्यांची आरास, भल्या पहाटे उठून केलेलं अभ्यंगस्नान, मंदिरात जाऊन घेतलेलं देवदर्शन आणि त्यानिमित्ताने पाहिलेले सगळीकडचे आकाशकंदील, फटाक्यांची आतिषबाजी, पहाटे आकाशवाणीवरुन ऐकलेली दिवाळीची विशेष गाण्यांची मैफल यात कालानुरुप थोडा बदल झालाय खरा. पण तरीही अतिशय उत्साहाचा, सौख्य समृध्दीचा असा सण म्हणजेच दीपावली.

                 अंध:काराचा नाश करुन तेजाने लखलखणारी, सौख्यमयी, आनंदमयी हवीहवीशी वाटणारी ही दिवाळी. आपल्या सर्वांच्या जीवनात हा तेजाचा लखलखाट सदैव रहावा.

        ..

सरले नवरात्र अश्विनही सरत आला

लक्ष लक्ष दीप लावित कार्तिक आला

उष्णवात संपूनी शीतलता आली

रखरखती अवनी शांत जाहली

आकाशदिव्यांनी आसमंत सजले 

दीप रंगावलीने अंगणही उजळले

खमंग मधुर फराळाचे ताट भरले

आस्वाद घेण्या गणगोत हे जमले

सुरु होतसे दीपावली अभ्यंगस्नाने

होते धनवृद्धीही मंगल लक्ष्मीपूजने

बली प्रतिपदा हा कार्तिक प्रथमदिन

औक्षणे पूजने मागावे नित्य सुदिन

बहिणभावाच्या घट्ट रेशमी नात्याचा

दिवस असे तो खास भाऊबीजेचा 

फराळ आतिषबाजी लक्ष दिवे रंगावली

भासते उत्फुल्ल नित्य नवी दीपावली

- स्नेहल मोडक



Sunday, October 24, 2021

सफर लेह लडाखची...

            लडाख हा ३१ ऑक्टोबर २०१९ पासून केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. याआधी तो जम्मू काश्मीर चा एक भाग होता. लडाखमध्ये लेह आणि कारगिल हे दोन जिल्हे असून ते पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत.

           हिमालयातील चहूबाजूंनी दिसणारी उंचच उंच हिमाच्छादीत गिरीशिखरं, खोल दऱ्या, त्यातून नागमोडी वळणं घेत जाणाऱ्या नितळ निळ्या पाण्याच्या नद्या, अवतीभवती असलेली हिरवाई, दुर्गम रस्ते, अनोखी भूरुपे अशा विलक्षण निसर्ग सौंदर्याने नटलेला हा लेह लडाख. याचमुळे लडाखला गेल्यावर एका वेगळ्याच विश्वात गेल्याचा अनुभव येतो.

           सुर्योदयाचा अप्रतिम नजारा पहात आम्ही पहाटे लेह विमानतळावर उतरलो. कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकणारी बर्फाच्छादीत गिरीशिखरं पहाणं हा एक सुंदर अनुभव होता. विमानातून उतरण्याआधीच लेहचं तापमान ६ अंश असल्याचं सांगितलं होतं. अर्थात आम्ही थंडीपासून संरक्षण करण्याच्या पूर्ण तयारीनेच गेलो होतो. विमानतळावरुन आम्ही रहाण्याच्या ठिकाणी पोहोचलो. आणि तो संपूर्ण दिवस आराम केला. संध्याकाळी अर्धातास जवळच्या भागात थोडंसं फिरुन आलो. ११५०० फुट उंचीवर असलेल्या लेह मध्ये रहाण्यासाठी आपलं शरीर अनुकूल होणं ( high altitude acclimatization) गरजेचं असतं. एवढ्या उंचीवर ऑक्सिजनची पातळी थोडी कमीच असते. त्यामुळे लेहला पोचल्यावर एक दिवस संपूर्ण आरामाची गरजच असते.

           दुसऱ्या दिवसापासून आमचं स्थलदर्शन सुरु झालं. सर्वात आधी लेहमधल्या हेमिस येथील बौद्ध मठ पहायला आम्ही गेलो. हा मठ लेहपासून साधारण ४५ किमी अंतरावर आहे. अकराव्या शतकातील हा मठ लडाखमधील सर्वात श्रीमंत मठ समजला जातो. दरवर्षी इथे जूनमध्ये हेमिस फेस्टिव्हलचे आयोजन केलं जातं. त्यावेळी हजारो पर्यटक इथे हजेरी लावतात. हा मठ पहायला बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागतं. लाकडी कोरीव काम केलेल्या इमारती, शांत पवित्र वातावरण अगदी अनुभवण्यासारखं.

 
           हेमिसचा मठ पाहून पुढे थिकसे येथील मठ पहायला गेलो. ११८०० फुट उंचीवर असलेल्या या मठातून आपल्याला इंडस खोरं पहायला मिळतं. या मठात जाण्यासाठीही खूप साऱ्या पायऱ्या चढून जावं लागतं. इथे आपल्याला अप्रतिम असा ४९ फुट उंचीचा मैत्रेय बुद्धांचा पुतळा पहायला मिळतो. १९७० मध्ये १४ व्या दलाई लामा यांनी या मठाला भेट दिली होती. सगळ्या मठांमध्ये आपल्याला बुध्दाच्या विविध मुर्ती, पुतळे, भित्तीचित्रं पुराणकालीन हस्तलिखितं, पोथ्या हे सारं पहायला मिळतं.

           यानंतर आम्ही पोहोचलो शे पॅलेस पहायला. इथेही खूप वरपर्यंत पायऱ्या चढून जावं लागतं. १६ व्या शतकातली मठ आणि बाजूलाच खास उन्हाळ्यात रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा असं याचं स्वरुप आहे. इथे शाक्यमुनी बुध्दाची लडाखमधील दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीची रेखीव मूर्ती आहे. सोनं आणि तांबं या धातूंच्या मिश्रणातून ही मूर्ती घडवली आहे. या मठाच्या बाजूलाच असलेला पॅलेस राजा नामग्याल यांनी बांधलाय. मात्र आता तिथे खूप काही पहाण्यासारखं नाही.

           प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, आदराने मान झुकवावी अशी लेहमधील वास्तू म्हणजे हाॅल ऑफ फेम. भारतीय सैनिकांना दिलेली मानवंदना म्हणजे हाॅल ऑफ फेम. या दुमजली इमारतीमध्ये भारत पाकिस्तान युद्धाची माहिती, पाकिस्तानी सैनिकांनी युध्दात वापरलेली शस्त्रास्त्रं, युद्धकालीन कागदपत्रं, सैनिकांना मिळालेली सन्मान चिन्हं, लडाखचा इतिहास, लेहमधील जीवनशैली, सियाचीन मध्ये उणे तापमानात सैनिकांना वापरावे लागणारे पोशाख आणि इतर साहित्य हे सर्व पहाता येतं. त्याचबरोबर रोज सायंकाळी इथे कारगिल युध्दाची अर्ध्या तासाची चित्रफित आणि थोडं सादरीकरण दाखवण्यात येतं. 

            हे सारं पाहून त्यादिवशी लेहमध्येच मुक्काम केला.

            दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघालो नुब्रा खोऱ्याकडे. इथे जाण्यासाठी खारदुंग-ला ही सर्वात उंच खिंड पार करावी लागते. वाहनाने जाता येईल अशी ही सर्वात उंचावर असलेली, श्योक खोरं आणि नुब्रा खोरं यांना लेह शहराशी जोडणारी ही खारदुंग-ला खिंड वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. १८००० फूट ऊंचीवर असलेल्या या ठिकाणी ऑक्सिजनची पातळी खूपच कमी असल्यामुळे इथे १५-२० मिनीटांवर थांबणं अशक्य असतं.

             ही खिंड पाहून पुढे गेल्यावर येतो तो दिस्किट मठ. इथेही खूप साऱ्या पाय-या चढाव्या लागतात. १४ व्या शतकातील या मठातही अतिशय शांत पवित्र वातावरण आहे. या मठात बुध्दाचा ३२ मी. उंचीचा सुवर्ण पुतळा आहे. या मठाच्या जवळच मोकळ्या जागेवर मैत्रेय बुध्दाचा १०६ फुट उंचीचा सुंदर पुतळा आहे.

              यानंतर‌ आम्ही पोहोचलो ते नुब्रा खोऱ्यातील वाळवंटात. ज्याला हिमालयातील थंड वाळवंट म्हटलं जातं ते सॅन ड्यून किंवा कोल्ड डेझर्ट. अतिशय अप्रतिम आणि विस्तिर्ण असं हे वाळवंट. फक्त इथेच आपल्याला भारतातील एक आश्चर्य पहायला मिळतं ते म्हणजे मंगोलियन जातीचे दोन कुबड असलेले उंट. हे उंट पहायला आणि त्यावर बसून फिरायला पर्यटक इथं नेहमीच गर्दी करतात. हे सारं पाहून आम्ही जवळच असलेल्या हुंदेर या छोट्या गावातील रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.

              सकाळी लवकर निघालो भारत पाकिस्तान सीमारेषेवरचं शेवटचं थांग हे गाव पहायला. या छोट्या गावातून पायवाटेने चालत या गावतील घरं, लोकं, त्यांचं रहाणीमान हे सारं पहात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो. तिथून दुर्बिणीच्या सहाय्याने आपल्याला भारत-पाक सीमारेषा पहाता येते.

                ते पाहून आम्ही थांग जवळच्या तुरतुक या भारत पाक सीमारेषेवरच्या दुसऱ्या गावात पोहोचलो. हे भारतातील शेवटची चौकी असलेलं ठिकाण आहे. यापुढे पाकिस्तान मधील गिलगिट-बाल्टिस्तानचा भाग सुरु होतो. १९४७ च्या युध्दात तुरतूक गावावर पाकिस्तानने कब्जा केला होता. नंतर १९७१ साली झालेल्या युध्दात भारताने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. श्योक नदीवरील पूल पार करुन गावातून पायवाटेने चालत इथल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता येतं. इथंही दुर्बिणीच्या सहाय्याने भारत पाक सीमारेषेवरच्या दोन्ही देशांच्या चौक्या पहाता येतात. हे एकच ठिकाण असं आहे की जिथे पाकिस्तानची चौकी आपल्या चौकीपेक्षा थोडीशी उंचावर आहे. ते पाहून परत फिरताना वाटेत एक छोटं संग्रहालय आहे. त्यातून बाल्टि लोकांच्या संस्कृतीचा परिचय होतो. पुलाच्या दुसऱ्या बाजूला अजून एक लहानसं संग्रहालय आहे. मुळात तो एक लहानसा राजवाडा होता. तोच आता संग्रहालय म्हणून ओळखला जातो. बाल्टिस्तानच्या राजाने खास उन्हाळ्यात फक्त ३ महिने रहाण्यासाठी बांधलेला राजवाडा. आता तिथे त्या काळात वापरलेल्या वस्तू, शस्त्र, राजगादी हे पहायला मिळतं. हे पाहून आम्ही परत हुंदेरमधल्या रिसॉर्टमध्ये मुक्कामाला गेलो.   

                  दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजताच पॅनगाॅंग लेक च्या दिशेने निघालो. याआधीच्या साऱ्या प्रवासातले रस्ते अतिशय वळणाचे, चढ उताराचे, एका बाजूला उंच पर्वत आणि दुसऱ्या बाजूला खोल दऱ्या असे असले तरी ठिक होते पण पॅनगाॅंग सरोवराकडे जाणारा रस्ता मात्र फारच खराब होता. म्हणजे बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही तर नुसत्या दगडातूनच जावं लागतं. अर्थात याला तिथली परिस्थिती कारणीभूत आहे. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे रस्ता नीट राहणं अशक्यच. तसंच रस्त्याचा काही भाग प्रत्क्ष नदीपात्रातून जात असल्यामुळेही नुसता दगडाळ आहे. पण तरीही विलक्षण अशा निसर्ग सौंदर्यामुळे हा त्रास बिलकुल जाणवत नाही. हिवाळ्यात बर्फवृष्टीत मात्र हा मार्ग बंद होतो. थोडं आधीपासूनच आपल्याला पॅनगाॅंग सरोवराचं दर्शन घडू लागतं. जेव्हा प्रत्यक्ष त्या सरोवरापाशी आपण पोहोचतो तेव्हा अक्षरशः भान हरपून पाहत राहतो. स्फटिकासारखं नितळ निळंशार पाणी आणि एका बाजूने असलेल्या पर्वतरांगा असलेलं हे अतिशय अप्रतिम असं हे सरोवर साऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. हे सरोवर खाऱ्या पाण्याचं असूनही हिवाळ्यात पूर्णपणे गोठतं. या सरोवराचा ३० टक्के भागच आपल्या भारतात आहे , उर्वरित ७० टक्के भाग चीनमध्ये आहे. हे अप्रतिम सरोवर पाहून आम्ही लेह येथे मुक्काम करण्यासाठी निघालो. पॅनगाॅंग सरोवर पाहून लेह ला येताना चांगला खिंड पार करावी लागते. ही खिंडही १७००० फूट उंचीवर आहे. इथेही ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे १५-२० मिनीटांपेक्षा जास्त थांबणं‌ शक्य होत नाही. 

                  लेह ते नुब्रा व्हॅली या संपूर्ण प्रवासात आपल्याला श्योक नदी सदैव साथ देते.

                पॅनगाॅंग सरोवर ते लेह या पूर्ण प्रवासात लांब पर्वतमाथ्यांवर उतरलेले ढग आणि सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी अनुभवायला मिळाली. लेहला लवकर पोहोचलो म्हणून खरेदीसाठी मार्केटमध्ये जायचं ठरवलं पण पूर्ण प्रवासातलं ढगाळ वातावरण लेहमध्ये ही अवतरलं होतं. तिथेही दूरवरच्या डोंगरात सुरु असलेली हलकी बर्फवृष्टी दिसत होती. गार वारा सुटलेला व थंडीचा कडाका वाढला होता. रात्रीतून तापमान उणे अंशात जाणार असल्याचं जाणवलं आणि मार्केटला जाणं रद्द केलं.

                पुन्हा सकाळी लवकर उठून निघालो ते थेट लेह-श्रीनगर मार्गावरील द्रास येथे. इथे जाताना दोन खिंडी लागतात - फोटू-ला खिंड (१३५०० फूट) आणि नामिका-ला खिंड (१२२०० फूट). द्रास हे भारतीय युध्दसैनिकांना दिलेली मानवंदना व युध्दाचा इतिहास सांगणारं हे युध्द स्मारक. १९९९ साली झालेल्या भारत - पाक कारगिल युध्दात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या पवित्र स्मृती म्हणून इथे अखंड ज्योत तेवत असते. इथे सैनिकांना अभिवादन करुन आम्ही कारगिल येथे रिसॉर्टमध्ये मुक्काम करण्यासाठी आलो. त्या रात्री तापमान -२ अंशावर उतरलं होतं. अर्थात ही सुरुवात होती. द्रास कारगिलमध्ये हिवाळ्यात तापमान -४० अंशावर येतं. हिवाळ्यात सतत होणाऱ्या बर्फवृष्टीचे हे सहा महिने इथल्या लोकांसाठी अतिशय त्रासदायक असतात. ज्या लोकांना शक्य असतं ते जम्मू, गोवा, नेपाळ किंवा इतरत्र स्थलांतर करतात. पण ज्यांना हे शक्य नाही ते लोकं आणि आपले भारतीय सैनिक मात्र अतिशय कष्टप्रद जीवन जगतात.

                कारगिलहून सकाळी लवकर निघून पोहोचलो लामायुरु मठात. हा मठही खूप पूर्वीच्या काळातील आणि सर्वात मोठा आहे. इथे सर्वात जास्त प्रमाणात बौद्ध भिक्षू वास्तव्यास आहेत. या मठात जाण्यासाठी मात्र अगदी थोड्याच पाय-या चढाव्या लागतात.

 

                लामायुरु आणि आसपासचा भाग मूनलॅण्ड म्हणून ओळखला जातो. इथल्या अविश्वसनीय अशा वेगळ्या भौगोलिक रचनेमुळे या भागाला मूनलॅण्ड म्हणतात. अतिशय वेगळ्या प्रकारचे पर्वत आणि दरीखोरं इथे पहायला मिळतं.

                कारगिल हून येताना आधीच्या रात्री झालेल्या बर्फवृष्टी मुळे सारे पर्वत शुभ्र बर्फाची दुलई लपेटून बसलेले दिसत होते त्यामुळे वाटेत थांबून त्या बर्फात थोडंसं खेळायचा मोह आवरता आला नाही आणि ती हौसही पूर्ण झाली.

                यानंतर आम्ही पोहोचलो संगम येथे. इंडस आणि झंस्कार या दोन नद्यांचा हा संगम अतिशय सुंदर आहे. या संगमाच्या बाजूला उथे आहेत थंड वाळवंटातील पर्वत. इंडस ही संपूर्ण उत्तर भारतातून वाहणारी नदी आणि तिला मिळणारी लडाखमधील झंस्कार नदी. हा संगम लडाखमधील निमू गावात होतो. ही झंस्कार नदी हिवाळ्यात जेव्हा पूर्ण गोठते तेव्हा तिच्यावरुन पूर्ण चालत जाता येतं. हा चादर ट्रेक या नावानं प्रसिद्ध आहे. यासाठी दरवर्षी इथे खूप लोक जातात.

                तिथून पुढे निघून पोहोचलो ते मॅग्नेटिक हिल येथे. लेह- श्रीनगर मार्गावरील उंच सखल भूपृष्ठ असलेलं हे ठिकाण आहे. इथे उताराच्या दिशेने गियर विरहित स्थितीत उभी केलेली गाडी चढावाच्या दिशेने जाताना पहायला मिळते. चमत्कारारीक आणि दृष्टीभ्रम अशी वाटणारी ही घटना पहाण्यासाठी पर्यटक इथे येतात.

                लेह ते द्रास या पूर्ण प्रवासात आपल्याला इंडस नदीचं सुंदर दर्शन होत रहातं.

                 यानंतर परत आम्ही लेहला मुक्काम करण्यासाठी आलो. 

                दुपारीच लेहला पोहोचलो होतो. त्यादिवशी वातावरणही एकदम ठिक असल्यामुळे खरेदीसाठी मार्केटमध्ये जाणं शक्य झालं. लेहचं मार्केटही पहाण्यासारखं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मार्केटमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे. अतिशय गजबजलेल्या या मार्केटमध्ये स्थानिक लोकांबरोबर पर्यटकही आवर्जून खरेदी करतात. इथे तिबेटी कलाकुसरीच्या विविध वस्तू, चांदी व इतर धातूंच्या वस्तू,  मूर्ती, पश्मिना शाली, जर्दाळूचं तेल व जाम, सुकवलेले जर्दाळू, इतर सुकामेवा, गालिचे, ध्यानधारणेसाठी उपयुक्त धातूचे सिंगींग बाऊल्स इत्यादी गोष्टी प्रसिद्ध आहेत त्यामुळे त्या खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जातात.

                 संपूर्ण प्रवासात प्रचंड थंडी होती. ६ अंशापासून सुरु झालेलं तापमान कारगिल मुक्कामात -२ अंशावर आलं होतं. परंतु आम्ही पूर्ण तयारीनिशी गेल्यामुळे थंडीचा आणि कमी ऑक्सिजन पातळीचा आम्हाला बिलकुल त्रास झाला नाही. आणि त्यामुळेच लेह लडाखचं विलक्षण पण नितांतसुंदर निसर्ग सौंदर्य आम्हाला मनसोक्त अनुभवता आलं. 

                  पुन्हा पुन्हा जावं असं वाटणारं लेह लडाख म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच जणू. प्रत्येकाने किमान एकदातरी नक्की अनुभवावं.

- स्नेहल मोडक



कविता

गुरुपौर्णिमा

               दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुरुपौर्णिमेला गिरनारला जायचं आमचं आधीच ठरलं होतं. त्यानुसार रेल्वेचं रिझर्व्हेशनही केलं ...